Saturday, October 11, 2008

आहे मनोहर तरी

<सुनीता देशंपाडे>

<आहे मनोहर तरी...><प्रकाशक :- श्री. पु. भागवत, मौज प्रकाशन गृह><पुणे>

आवृत्ती :- तिसरी आवृत्ती

पान नं. 1

हे आत्मचरित्र नाही.

आठवणींच्या प्रदेशातली ही स्वेर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या

फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत

केलेली.



आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे

नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्या

संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.



पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि

जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग

माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?



प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध

लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढ

वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या

पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नाते

जाणवते का ?

अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.

आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधूनमधून वेळ

मिळेल तसे, थोडेथोडे तुकडयातुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता

केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.



एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.



कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश

धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच

रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर

नक्षत्र.



पान नं. 2



पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू

गात माझ्या झाडावर उतरतं.



चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात.

...हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कां

जमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ' अशी ही मनाची अवस्था असताना या

पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ?

एक होता राजा आणि एक होती..

(एक कोण होती ?)

... आणि एक होती परी की एक होती म्हातारी ?

की...(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त

...एक होती परी आणि ती झाली म्हातारी ?

....

....

सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी.

सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.



सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे' मूड म्हणता येईल.

म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे,

असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे

काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळ

खेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत.

अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browne

च्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices' अशी. धूसर

स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत

वाहणारं- निर्मात्याबरोबरच' ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं.



आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि

शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन

जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले

नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण

विसरून, चक्रावून - अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त

होता म्हणून मी या बंधनात अडकले की... तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे



पान नं. 3



करून मनसोक्त खेळत राहिले ? की दोन्ही ?



आजा पाहावे तिथे सगळी स्वच्छ निराशाच दिसतेय. आकाशदेखील कुठे निळे नाही.

सगळीकडे एकच राखी रंग, अगदी निर्मळ किंवा विशुध्द कारूण्याची राखी रंगच्छाटा.Gray

of the purest melanchol. झाडेदेखील स्तब्ध, विचारमग्न उभी आहेत. आईच्या डोळ्यांत

गलबल दिसली तर कडेवरचं मूल कसं बावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची

सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे. माझ्या मनात कसले विचार येताहेत त्याच्याशी या

बाहेरच्या जगाचे इतके जवळचे नाते असेल? कोण जाणे. पण कदाचित साऱ्या

सजीव-निर्जीव सृष्टीशी माझे अज्ञात नातेही शेवटी त्याच मूलतत्त्वांतून-

पंचमहाभूतांतून - सारी सृष्टी निर्माण झाली ना ? मग सारे काही अदृष्ट धाग्यांनी जोडलेले

नसेलच कशावरून ? समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नाते

असेलही. समोर कोण राहतो ? त्याची-माझी ओळख नाही, त्याचे नाव मला माहीत नाही.

अरे वेडया, आम्हा बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू

उभे केलेल हे लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातलेच आहेत हे कसे विसरलास ? हा

विचार आला आणि सगळे काही मूर्खपणाचेच वाटायला लागले. मूर्खपणाचे की भीतिदायक ?

की आशादायक ?



मूड्स तरी किती अस्थिर असतात ! येतात, जातात. पण मुक्कामाला आले की कधीतरी हे

पाहुणे जाणार आहेत हे भानच नाहीसे होते, आणि आपण त्यांच्यात अगदी बुडून जातो.



प्रचंड वेगाने स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्याभोवती फिरणारी ही पृथ्वी अशीच,

या मूड्ससारखीच, पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते. या वेगाचे आणि तिच्याही

हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात. अज्ञानात खरेच सुख आहे

हे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो, तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि

आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो. हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा ?



माझ्या लहानपणी आमच्या घरात बालदत्तोत्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती. रंगीत

पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष-दीड वर्षांच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुख

दत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं. आईने मग ती फ्रेम मलाच दिली. तिच्या

देवांजवळच भिंतीवर, माझा हात पोचेल इतक्या उंचीवर खिळा मारून घेऊन त्यावर मी ती

टांगली. रोज बागेतून निवडून निवडून फुले आणायची आणि त्यांचा हार करायचा. आंघोळ

झाल्याबरोबर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा गंध लावायचं आणि तो फुलांचा

हार घालायचा. मग हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थनाकरीत असे. ही प्रार्थना निश्चित



पान नं. 4



कोणती होती, त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते, यांतले काहीच आता

आठवत नाही. पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा

अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते,

नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोषट असली तरी त्यात मनःस्थिती मात्र नसते

आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थ

स्थेर्य,आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला

तरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्देवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा

विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो,, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत

नाही.



पान नं. 5



आप्पांना जाऊन आता सात वर्षे होऊन गेली. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आतच

आईही गेली. जन्माला आलेलं प्रत्येकजण असं जातच असतं. शिवाय त्यांची वयेही

झाली होती. हे सगळे खरे असले तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा-

आईकडे पाहता येत नाही. मी स्वतः नको तितकी व्यवहारी आहे तरीही. त्यांनी

मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी

त्यांच्याच छत्राखाली वाढले. त्यानंतर मी स्वंतत्र जीवनक्रम स्वीकारला, तरी शेवटपर्यंत

आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते. उलट माझे वय वाढत गेले तशी प्रेमाची किंमत

मला अधिकाधिक जाणवू लागली आणि त्यांच्या मृत्यूमुळे पोरकेपण आले.



पण यात नवल ते काय ? आई-वडील गेले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच.

मग हळूहळू दुःख कमी कमी होत जाते आणि पुढे सोईस्कर विसरही पडायला लागतो.

अधूनमधून आठवणी तेवढया शिल्लक राहतात. बऱ्या,वाईट, दोन्हीही

माझ्या बाबतीत ही नेसर्गिक वाटचाल आहेच. पण आणखीही काही घडतेय. ते

निश्चित काय ते निरखण्याचा का हा प्रयत्न आहे ?



आप्पांना मृत्यू मोठा छान आला. वयोमानाप्रमाणे ते थकत चालले होते, शरीर

दुबळे होत होते, स्मृतीही अंधूक होत चाललीय का अशी अधूनमधून शंका येई. पण

समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा जराही कमी झाला नव्हता. निवृत्तीतला आनंद

मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत होते. त्यामुळे त्यांनी

आपल्यातून कधी जाऊच नये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटे. त्यांचा

शेवटचा आजारही आला तसाच झटकन त्यांना घेऊन गेला. अवघ्या बारा तासांत

सकाळी एकरा-साडेअकराला त्यांना हार्ट-अँटॅक आला. लगेच उपचार सुरू झाले,

आणि पुण्या-मुंबईला मुलांना फोन गेले. रात्री आठनंतर एकेक गाडी येऊन पोचली

आणि सगळी मुले त्यांना भेटली. आम्ही दोघे सर्वात शेवटी दहा वाजता येऊन

पोचलो. सलाइन,ऑक्सिजन वगेरे लावलेल्या अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले

होते. भोवतीला सगळे आप्तस्वकीय. मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाले,""आप्पा

मी आलेय. कसं वाटतंय तुम्हाला ?""



त्यांनी मोकळा असलेला हात माझ्या पाठीवरून फिरवत क्षीण आवाजात म्हटलं,

""किती ग माझ्यासाठी माझ्या बाळांना त्रास झाला !""



पान नं. 6



""आप्पा, मला ओळखलंत ?""

""माझे भाई नाही आले ?""

म्हणजे त्यांनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी माझ्याकडे थोडे पाणी मागितले.

डॉक्टर सकाळी आप्पांना अँटॅक आला म्हणताक्षणी आले होते ते आता घरी जायला

निघाले. मी दारापर्यंत त्यांच्याबरोबर जात त्यांना म्हटले,""आप्पांचं सर्व काही फार

छान झालंय. त्यांना सुखानं जाऊ दे. आता उगाच त्यांना नाकातोंडात नळ्या घालून

जगवत ठेवू नका.""



डॉक्टर मला म्हणाले,""त्यांना आलेले अँटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही

कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ

राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.

असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळ राहतीलसे""

आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पांनी प्राण सोडला.



बिचाऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला

आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती,वाचा,भान सगळे जात चालले; आणि

नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पेसा,मनुष्यबळ,काही कमी नव्हते.

पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते, आणि तेच नशिबी आले. ती आजारी

पडताच आम्ही मुंबईला आणले. तिथे सगळी मुले,नातवंडे,लेकी,सुना-

सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होतो.

कामे वाटून घेऊन करत होतो. तिऱ्हाइताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान !

कुणी कमी पडू देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुध्दीने,

नाइलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करीत होती, अद्याप करतेय.



समजा, तिच्या ऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी

औषधोपचार,सेवाशुश्रूषा,नवससायास करत राहिली असती.



तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षांच्या

काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वतःचे

औषधपाणी स्वतःच करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती

अंथरूणात आराम करतेय आणि दुसरं कुणी तिची सेवाशुश्रूषा करतंय असं दृश्य

प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न

मानवणारी. आणि दुर्देवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्या

सेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.



आई गेली. मुलेबाळे,नातवंडे लेकीसुना,अगदी भरले घर होते, तरी तिच्या

शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग

आता यानंतर त्याबद्दल लिहून मी दुःख उकरून काढतेय का ? हे दुःख नव्हे; हा



पान नं. 7



वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलटसुलट विचारांचा,भावनांचा गुंता आहे.

तो सोडवता आला तर पाहावा, त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा

यासाठी हा सलारा खटाटोप.



या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत,दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस

असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन. उरलेल्या वेळात

माझ्या स्वतःच्या व्यापातच गुंतले होते, घर-संसार,प्रुफे,नव्या कवितावाचनाच्या

कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोठाय व्यवहाराची कामे आणि

त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगेरे

वगेरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही

सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन

छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन

आमंत्रितांसाठीचे वगेरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमांत काही

अडथळा तर येणार नाही ? ऐनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही

आमची अडचणही होऊन बसली होती, आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक

यातना होत. आपण स्वतः किती स्वार्थी,कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. स्वतःचीच

जेव्हा जाऊन राहत असे तेव्हा ?



हॉस्पिटलमधे मी आईच्या उशाशी बसले होते. माझी थोरली वहिनी आपल्या

छोटया नातींना घेऊन आली होती. तासभर त्या छोटया मुलींनी खूप करमणूक केली.

मोठया गोड पोरी. सगळ्यांना कौतुक. आईच्या शेजारी त्यांना पाहताना एकदम

मन कुठल्या कुठे गेले. वाटले, ही पलीकडे झोपलेली म्हातारी, माझी आई,हीही

एकेकाळी अशीच छोटी,चुणचुणीत,गोड होती असेल. तिचेही तिच्या आईवडिलांनी

असेच कौतुक केले होते असेल...



फार बेचेन झाले. करूणेनं मन भरून आलं, डोळ्यांवाटे वाहू लागलं. जन्मापासून

मृत्यूपर्यंतच्या या फेऱ्यात सुरूवातीच्या टोकाला कुठेतरी त्या छोटया पोरी आहेत,

मध्याच्याही पुष्कळ पुढे कुठेतरी मी आह आणि अगदी शेवटच्या टोकाला आई आहे.

आईची जागा काही काळाने मी घेणार, त्या वेळी ? त्या वेळी माझ्या वाटयाला

आलेल्या फेऱ्याच्या सुरूवातीला कुणी,मधे कुणी,कुठेच कुणी आपले असे दिसेना.

किंबहुना, तो फेराच नाहीसा झाला होता, फक्त शेवटच्या टोकाला मी लोंबकळत होते.

खरे तर आपली ही अवस्था इतर कुणालाही क्लेश देत नाही, असा क्लेश होऊ शकेल

असे लागेबांधे गुंतलेले आपल्याला कुणीही नाही; चला- खऱ्या अर्थाने आपण मुक्त

आहो. आपल्यामुळे इतर कुणालाही दुःख नाही, ही केवढी आनंदाची घटना आहे !

मग मला आनंद न होता हे असं तिसरचं काही कां होतंय ?





रात्र झाली आहे. नुकतेच डॉक्टर तपासून गेले. शरीराबरोबरच आईचं मनही





पान नं. 8



अस्थिर होऊ लागलं आहे. स्मृती फार अंधूक होत चालली आहे आणि असंबध्दता

वाढते आहे. वाचाही अस्पष्ट आणि असमर्थ होऊ लागली आहे. असे आणखी किती

दिवस जाणार ? हे म्हणजे संपूर्ण परावलंबित्व. नेमकी तिला नको असलेली अवस्था.

तिने आयुष्यभर अनेकांसाठी अनेक कष्ट उपसले. पण कुणाहीपुढे मदतीसाठी याचना

केली नाही. आपल्याला मरण कसे नको ? तर नेमके असे, असेच ती म्हणाली असती

निश्चित. मी म्हणे लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन

आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची

स्वतःची,चुलत दिराची,मामेसासूची,बरीच मुलेमाणसे घरात होती. सेपाकपाणी,

आलेगेले,सर्वांचा अभ्यास करून घेणे,सणवार,एवढया मोठया घरसंसारात त्या

काळाच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार,

जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील ! माझ्यापुरते तरी कृतज्ञतेच्या भावनेने

मी तिच्यासाठी काही करायला नको का ? आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार ?आता

तिच्यासाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे या परावलंबित्वातून तिची

सुटका. पण हे कोण कसे करणार ?मर्सी किलिंगबद्दल अद्याप तरी नुसती चर्चाच चालू

आहे. चर्चेत मला रस नाही;तिला तर कधीच नव्हता. याक्षणी मी तिच्यासाठी काही

करणे, अगदी पुढलामागला कसलाही विचार न करता काही करणे म्हणजे...



सगळीकडे सामसूम आहे. प्रत्यक्ष मुलगीच खोलीत तिच्याजवळ असल्यामुळे

हॉस्पिटलच्या नर्सिससुध्दा निर्धास्त आहेत. आम्ही, म्हणजे मी, बेल वाजवल्याशिवाय

कुणीही खोलीत येणार नाही. आई शांत पडली आह. डोळा लागला आहे. हीच वेळ

आहे. मोठया निश्चयाने मी जवळ गेले. म्हातारपणाने आणि आजाराने

आवळचिवळ झालेली तिची एवढीशी मान. माझ्या हातांत पुरेशी शक्ती निश्चित

आहे. आईसाठी काही करण्याची ही अखेरची संधी आहे. बंडखोर,क्रांतिकारी वगेरे

माझी एकेकाळची विशेषणे कालप्रवाहात कधीच वाहून गेली. आताच्या कुणालाही

त्यातले काहीही माहीत नसेल. पण ती बंडखोरी अद्याप मेलेली नाही हे मी स्वतः

जाणते ना ? माझ्या सामर्थ्याचा पुरेपूर अंदाज मला स्वतःला आहे ना ? मग ? मग

अडतेय कुठे ? भीती ? ती तर कधीच नव्हती, नाही. कुठे जीव गुंतलाय का, की

ज्यासाठी जगायला पाहिजे, अविचारी बनून चालणार नाही ? एकेकाळी असे खूप

काही होते. अगदी परवापरवापर्यंतही असे थोडे शिल्लक असल्याचे अधूनमधून जाणवे.

पण आता- या क्षणी तरी असा कुठलाही पाश नाही. माझे हात मुळीच थरथरत

नाहीत. गादीचा कोपरा खूप जोरात दाबून पाहिला, आणि पलंगाचा कठडाही. हातांत

पुरेसा जोर आहे. मग अडतेय कुठे ? मध्यमवर्गीय दुबळेपणा ? मी असे कृत्रिम वर्ग

मानत नाही. मी त्या अर्थाने मध्यमवर्गीय वगेरे मुळीच नाही. भरपूर कष्ट मी

आवडीने करते. कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला

नाही. नाइलाजास्तव कष्ट करणाऱ्या माझ्या परिचयातल्या `कष्टकरी' वर्गातल्या अनेक

व्यक्तींपेक्षा माझ्या वेयक्तिक गरजा फार कमी आहे. ते असो, पण माझ्यात असला



पान नं. 9



कसला दुबळेपणा नक्की नाही. या क्षणी तरी नाही. माझ्या डोळ्यांदेखत अन्याय होत

असेल तर तो समूळ निपटायला मी मागलापुढला विचार करणार नाही. मी पूर्वीचीच

आहे; पिंड तोच आहे.



संतापाच्या भरात कुणालाही मारणं ही गोष्ट मुळीच कठीण नाही. कोणताही प्राणी

हे करू शकतो. शांत डोक्याने, विचारपूर्वक शत्रूला मारणे हे चारचौघांचे काम नसेल,

पण तेही फार कठीण काम आहे असे मला वाटत नाही. आपण ज्यांना क्रांतिकारी

म्हणतो, त्यांतल्या अनेकांनी तेच केलेय. वेळीप्रसंगी मीही ते करू शकले असते. पण

जिथे आपला जीव जडला आहे अशा, निरपराध, विश्वासाने झोपलेल्या व्यक्तीचा

प्रेमापोटी गळा दाबण्याची अलौकिक शक्ती माझ्या हातांत नाही. या क्षणी मला ती

शक्ती हवी होती, पण त्या बाबतीतला माझा दुबळेपणा फक्त जाणवला. आवंढा

गिळता येईनासा झाला. खूप गरम अश्रू वाहू लागले. इतके असहाय दुःख यापूर्वी

कधी झाल्याचं स्मरणात नाही. आईची ती मान आणि माझे ते हात यांच्यात

दुबळेपणाची एकच चढाओढ लागून राहिली आहे. आई गेल्याला आता इतके दिवस

लोटले तरी ही जीवघेणी चढाओढ डोक्यातून मिटतच नाही.



याच आईने आम्हा मुला-नातवंडांची आणि आप्तेष्टांची अनेक आजारपणं

काढली. जाग्रणं केली, काळजी वाहिली, मर मर मरून आम्हांला तऱ्हतऱ्हा करून

खाऊपिऊ घातलं. अभ्यास करून घेतला. मुलं मोठी झाली तशी पांगत गेली. मग आई

आम्हां सगळ्यांना या ना त्या कारणाने कोकणात आपल्याकडे बोलवत राहिली,

आमच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागली. आंबे,नारळ,बोरे,शेवग्याच्या शेंगा,

तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे- जे जे तिच्या मेहनतीतून ती फळाला आणी ते ते आम्हां

सर्वांना ती कुणा ना कुणाबरोबर पाठवत राही. मग नारळ पाठवताना ती पोचवण्यासाठी

त्याला किती त्रास होत असेल याची ती विचार करत नसे. तिची असली कामे

करणाऱ्या मंडळीनाही कधी तक्रार केली नाही. कारण या नाही त्या तऱ्हेने ती त्यांच्या

उपकाराची परतफेड करत असावी. पण असल्या भेटी स्वीकारताना आमची,निदान

माझी तरी, फार पंचाईत होई. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असे. कधी

कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असे. कधी घरात तिसरेच कुणी काही महत्त्वाच्या

कामासाठी आलेले असे. अशा वेळी आईने पाठवलेले आंबे,पोहे,किंवा असलेच

काही घेऊन कुणीतरी येई. आईचे काम केल्याची आणि विशेषतः पु.ल.देशपांडे

यांच्या घरी जाऊन आल्याची धन्यता त्याच्या चेहऱ्यावर दिसे. माझा मात्र चेहरा

ओशाळा होई. आईचा राग येई. या वस्तू इथे मिळत नाहीत का ?मग उगाच

इतक्या दुरून त्या कुणाबरोबर तरी पाठवायच्या कशाला ?आणून पोचवायचा

त्यांनाही त्रास आणि आता त्यांचे आदरातिथ्य करत बसायचा मलाही त्रास. मग

त्यांच्याशी काहीतरी बोलावे लागे. चहापाणी विचारावे लागे. एरवी मी दिवसभर



पान नं. 10



बडबडत असते. रोजचा कित्येकदा आणि कित्येक कप चहा करते. पण हाकपभर

चहा आणि ही इकडली तिकडली चौकशीची चार-सहा वाक्ये मला जड वाटत.



या वस्तू इथे मिळत नाहीत का? आम्ही कामात असतो हे हिला कळत नाही का ?

पुण्या-मुंबईसारख्या शहरात, अगदी एखादा पु.ल.देशपांडे किंवा डॉ. ठाकूर

असला तरी, त्याचं घर शोधून काढून या भेटी पोचवायच्या म्हणजे काय ताप असतो

हे कितीदा सांगूनही हिला कळत कसं नाही ? आणि वर त्या भेटीबरोबर पत्रही असे.

यांतली ही पिशवी या नातवाला पोचव, ती त्या नातजावयाला पोचव-म्हणजे

आम्हांला काय दुसरे धंदेच नाहीत का ? असल्या आईची मग मला लाज वाटे. आणि

ओशाळ्या सुरातच तिचं हे मला न पटणारं वागणं कसं चूक आहे हे न राहवून मी

त्या पाहुण्यांना बोलूनही दाखवीत असे. मला कळू लागल्यापासून जवळजवळतीसएक

वर्ष आईचं हे वागणं माझ्या काटेकोर व्यवहारी दृष्टिकोनात कधी बसलं नाही आणि

त्यामुळे ते मला कधी मनापासून रूचलंही नाही. पण आई आईच राहिली आणि

त्यानंतर मात्र पुढे पुढे आपलेच काहीतरी चुकतेय असे मला वाटू लागले. आता आई

नाही. माझ्यावर तसे ओशाळे होण्याचा प्रसंग तर आता कधीच येणार नाही. ती

पाठवी त्या वस्तू, मला हव्या तेव्हा मी आणू शकेन. ते सगळे काही इथेही मिळते.

मात्र तिने लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांचे आंबे, नारळ, शेवग्याच्या शेंगा, बोरे,

रामफळे,फणसाच्या कुयऱ्या- इथल्या बाजारात विकायला येत नाहीत. इथे

मिळणाऱ्या या व्सतू कदाचित अधिक चांगल्या प्रतीच्याही असतील. जिभेला त्या

अधिक चांगल्या लागतील. पण आत कुठेतरी पिंडाला तृप्त करण्याचं सामार्थ्य त्यांना

नक्कीच नाही. कारण त्यांना आईच्या हाताचा स्पर्श नसेल.



हा पिंड म्हणजे काय ? आई-आप्पांनी मला जन्म दिला. माझं अस्तित्व हे

त्यांच्यामुळे. पण जन्म दिला म्हणजे काही उपकार केले असे मी मानत नाही. तो

त्यांच्याही आनंदाचा भाग होता. त्यांनी,विशेषतः आईने, आम्हां मुलांचे पालपोषण

केले. पण हाही तिच्या आनंदाचाच भाग म्हणायचा. स्वतःच्याच मुलांचे केले ना ?

मी तिच्याच पोटची. पण तिच्या पोटची म्हणूनच तिच्यातले अनेक गुणदोषही

अपरिहार्य माझ्यातही आले आहेत. गुणांपेक्षा दोषच अधिक. तिच्याचसारखी मी

फार मोठयाने बोलते. तिच्या मोठयाने बोलण्याचा आम्हांला कधी त्रास झाला नाही,

कारण लहानपणापासूनच आम्हांला त्याची सवयच झाली होती. मला वाटते. शहराबाहेर

राहणारी माणसे जरा मोठयानेच बोलतात का ? कोण जाणे. पण तसे म्हणावे तर

माझी इतर भावंडे माझ्याइतकी मोठयाने बोलत नाहीत. मी मात्र फार मोठयाने

बोलते. याची जाणीवही मला सतत होत असते. कारण भाईला त्याचा फार त्रास होतो

हे मला कळते. पण तरीही, अनेकदा ठरवूनही मी माझी ही सवय बदलू शकले नाही.

हा पिडांचाच धर्म ना ?



पान नं. 11



तिच्यातला माझ्यात उतरलेला दुसरा दोष म्हणजे ती तोंडावर कुणाचे कौतुक करू

शकत नसे. ही बाई एके काळी शिक्षिका होती. लग्न झाल्यावर पहिली तीन मुले

होईपर्यंत तिने हे काम करून जी काही आर्थिक कमाई केली त्याचाही हातभार तिच्या

संसाराच्या पायाला लागला. वक्तृत्वात तिला बक्षिसे मिळाली होती. घोडयावर बसावं

उत्तम घोडेस्वार व्हावं, ही तिची अपुरी राहिलेली इच्छा मी पुरी करावी असे तिला

फार वाटे. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही केले. मला अनेकदा सांगून पाहिले. मला घोडा

हा प्राणी फार म्हणजे फार आवडतो. घोडयावर बसायलाही माझी ना नव्हती. पण

त्याबद्दल आईला होती तितकी ओढ मला नव्हती. तिचे स्वप्न होते, तसे माझे

त्याबद्दल नव्हते. मलाही तशी हौस असती तर तिने रत्नागिरीसारख्या ठिकाणी एखादा घोडा

पाळलाही असता कदाचित, कुणी सांगावे ! पण हीच बाई पुढे वाढत्या संसारात अशी

काही बुडून गेली, की वेळीप्रसंगी एखादी पोथी आणि तिला येणारी पत्रे यापलीकडे

तिचे वाचन राहिले नाही. अधूनमधून आप्तेष्टांना पत्रे लिहिणे आमि संसारातले

हिशेब-ठिशेब यापलीकडे लेखन गेले नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर, परवा

परवा तिच्या कपाटात दोन-चार वह्या सापडल्या. त्यांत तिने डायरीवजा थोडे

लिहिलेले आहे. मी ते वाचल्यावर हसावे का रडावे कळेना. सगळ्या लिहिण्यात सूर

एकच. आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरे सांगायचे तर तिने लिहिलेल्यात काहीही

अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही.

त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा,चांगुलपणा,

दातृत्व,आदरातिथ्य वगेरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते, दुर्गुणांप्रमाणेच

सद््गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची

परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी

वाटत असते. पण सद््गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीने आनंदी मुखवटा वापरावा

लागतो. आणि सदेव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभंयकर शिक्षा

नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायाचं झालं तर दुसऱ्याला त्रास

होईल असं जाणूनबुजून आप्पांनी कधीही काही केलं नाही. अगदी स्वप्नातदेखील

नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या,

आत्मचरित्रे लिहित नव्हत्या हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकारक

ठरले ! आईने ह्या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. पण त्यात तिने आप्पांना दोष मुळीच

दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा

मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने

कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू

शकते. याचं भान ठेवून, तिच्या अडचणी लक्षात घेऊन, मग आप्पांनी त्यावर आपली

गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला ह्या वह्यांचा आधार

घ्यावा लागला नसता. तशी आप्पांची जीवनमूल्ये बावनकशी होती. त्यामुळेच ते संत म्हणा

किंवा फार थोर म्हणा असे होते, निर्भेळ माणूस नव्हते. ह्या माणसांच्या जगात खरी स्वच्छ



पान नं. 12



माणसेच सापडत नाहीत. आणि संत म्हटले किंवा फार थोर लोक म्हटले, की मग

`लोकापवादो बलवान मतो मे' आले आणि पत्नीच्या नशिबी वनवासही आलाच.



आम्हांला आई दिसली ती दिवसरात्र काही ना काही कामातच असलेली. तिने

आम्हांला तरतऱ्हा खाऊपिऊ करून घातले, शिकवले, आमची आजारपणे काढली;

पण कधीही प्रेमाने जवळ घेऊन मुका घेतल्याचे आठवत नाही, की तोंडभर कौतुक

केल्याचेही आठवत नाही. या गोष्टींना तिला वेळ नव्हता म्हणणे सर्वस्वी खरे नव्हे.

मनात असते तर त्यात अशक्य काहीच नव्हते. तिचा तो स्वभावच नव्हता असेच

म्हणावे लागेल. तिला आमचे दोषच दिसायचे आणि ते घालवण्यासाठी जिवाचे रान

करण्यात ती धन्यता मानायची. इतरांनी आम्हांला नावे ठेवू नयेत यासाठीही ही

धडपड असेल. पण कौतुक करून घेण्याची भूक इतकी मोठी असते, की आईच्या

रोजच्या आमच्यासाठी होणाऱ्या काबाडकष्टांपेक्षा वर्ष-सहा महिन्यांनी पाठीवरून

प्रेमाने फिरणारा आप्पांचा हात आम्हांला अधिक मोलाचा वाटे.



समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा,

कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रूक्ष या, एकच त्यां आकांक्षा

तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा !



या कुसुमाग्रजांच्या ओळी कविता म्हणून माझ्याप्रमाणे इतरांनाही आवडतच असणार.

कितीतरी संसारी बायकांना त्यांत ओळखीचा चेहरा दिसल्याचने त्यांचा आधारही वाटत

असणार. कवितेच्या बाबतीत हे सर्व ठीक असते. पण प्रत्यक्षात,`जात्याच रूक्ष' असे

काहीही कुणालाही आवडणार नाही. अगदी त्या समिधांनाही स्वतःतल्या या गुणाचा

तापच होत असेल.



आईमधला हा दोष माझ्यात सहीसही उतरला आहे. तिला स्वतःतल्या त्या दोषाची

जाणीव नव्हती. ते तिला कर्तव्यच वाटे. त्यामुळे त्या बाबतीत ती सुखी होती. मला हा

दोष सतत जाणवत असतो. पण त्यातून सुटका नाही. एखादे पुस्तक वाचले,नाटक

पाहिले, गाणे किंवा व्याख्यान ऐकले, आणि ते खूप आवडले, तरी त्यात एवढेसे काही

न्यून राहिले असेल तर ते नजरेतून सहसा सुटत नाही, विसरता येत नाही; त्या

गोष्टीला चांगले म्हणून गुणगान करताना ती अधिक चांगली व्हावी या हेतूने का

होईना. पण ते न्यूनही सांगितल्यावाचून राहवत नाही. हाही पिंडाचाच भाग.



आईमधला स्पष्टवक्तेपणाही असाच माझ्यात आलेला आहे. हा गुण म्हणायचा की

दोष ? स्पष्टवक्तेपणा हा तसा पाहिला तर गुणांच्या यादीतच सापडतो. पण प्रत्यक्षात

मात्र तो ज्याच्या अंगी असतो तो माणूस फारसा कुणाला आवडत नाही हाच अनुभव

येतो. कुणीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी बाबतीत स्पष्टवक्ता असणे सर्वांना मानवते.

व्यासपीठावरून भाषण करताना तर हा गुण प्रकर्षाने जाणवतो. सर्व श्रोत्यांकडून



पान नं. 13



पसंतीच्या टाळ्या मिळतात. पण प्रत्यक्षात दोन व्यक्तींत एक स्पष्टवक्ती असणे म्हणजे

दुसरीचा दोष न घाबरता सांगणे असाच प्रकार होतो. मग तो फटकळपणा ठरतो.

कुणालाही सहसा न आवडणारा. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. छाप आणि काटा.

स्पष्टवक्तेपणा हा त्या सामान्य व्यक्तीच्या नशिबी काटाच होऊन येतो. सार्वजनिक

पुढाऱ्याच्या नशिबी मात्र तो छाप होतो. आम्ही सामान्य माणसे. तेव्हा पिंडातून

आलेल्या या स्पष्टवक्तेपणाच्या दोषामुळे आम्हांला मात्र मिळणे किंवा कुणाचे प्रेम

मिळणे फार फार कठीण. इतर लोक आम्हांला सदेव टाळतच असतात. फारच खरे

बोलताता ते `तुमची भीती वाटते ' असे स्पष्ट सांगतात, इतकेच.



या स्पष्टवक्तेपणाप्रमाणेच कामसू वृत्तीही गुण आणि दोष यांच्या सरहद्दीवरच

वास्तव्याला असते. सतत काही ना काही काम करत राहण्यातच धन्यता वाटणारी

माणसे चांगली की वाईट ? एके काळी मी `चांगली' असेच उत्तर दिले असते. त्याला

थोर थोर आदर्श व्यक्चींच्या वचनांचा आणि वर्तनाचा आधारही दिला असता. पण

आता मात्र `निश्चितच वाईट' असेच म्हणेन. आता पाय जमिनीला लागले आहेत.

आता थोरामोठयांचा ऐकीव आदर्श जीवनाचा आधार वाटत नाही. स्वतःचे अनुभव

वेगळेच सत्य सांगून जातात.



आमचे आप्पा आणि आई दोघेही सतत काही ना काही काम करत असायचे.

त्यामुळे या बाबतीत त्यांचा एकमेकांना त्रास झाला नाही. त्यांचा हा गुण आम्हां

बहुतेक भावंडात उतरलाय. लहानपणी हे ठीक असते. पण पुढे बायको जर आळशी

मिळाली तर तिला अशा कामसू नवऱ्याचा जाचच होईल. हे झाले माझ्या भावांच्या

बाबतीत. पण मुलींचा फक्त नवऱ्याशीच नव्हे, तर सासरच्या सगळ्याच घराशी संबंध

येतो. अशी वेळी तिथली माणसे जर आळशी किंवा जरूर तरच हातपाय हलवणारी

असतील तर तिच्यावर कामाचा खूपच भार पडतो. म्हणजे या कामसू व्यक्तीला श्रम

अधिक होतात. त्यातून, आपण आहोत म्हणून हे सगळं निभवलं जातंय असा

अंहकारीही स्पर्श करायला लागतो. शिवाय, या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती एकाच

घरात एकत्र नांदायच्या म्हटले की संघर्ष अटळच होऊन बसतो. पांढरपेशा समाजात

असले संघर्ष चारचौघांना कळणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि मग मनाचा फार

कोंडमारा होतो. घरात काय आणि समाजात काय, कामसू माणसांचे प्रमाण एकूण

कमीच असते. त्यामुळे जी अशी सतत काम करणारी माणसे असतात त्यांना इतर

लोक आळशी आणि ऐतखाऊ वाटतात आणि वेताग येत असतो. इतरांना तर या

कामसू लोकांचा सदेव तापच होत असतो. शेवटी सारखे काम तरी कशाला करत

राहायचे ? शाळेत असताना वाचलेली `लोटसईटर्स 'ही कविता मला या संदर्भात

नेहमी आठवत राहते. ते तत्त्वज्ञान कुठेतरी आत अंतरात्म्याला आवडलेल असते.

आणि आपण न थकता सतत काम करू शकतो हा आपला मोठेपणा न वाटता,

आळशी नाही ही उणीव वाटत राहते. असो.



पान नं. 14



आईचा हात फार सढळ होता. तिथे हिशेबी वृत्ती नव्हती.मनाचे मूलभूत औदार्य

आणि परंपरागत रीतिरिवाजांच्या बंधनातून पत्करलेली विशिष्ट जीवनपध्दती यांतून

कधीकधी मजेदार प्रसंग निर्माण होत. सहज गंमत म्हणून आठवतो तो एक सांगते.

आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या,हारे वगेरे गोष्टी

लागायच्या. त्या काळी बालद्या हा प्रकार फारसा वापरात नव्हता. मोरीत बसून

धुवायला दगडी डोणी असत आणि धुतलेल्या कपडयांचे पिळे ठेवायला हारे असत.

धान्य पाखडायला सुपं लागत आणि सांदूळ धुवायला रोवळ्या. त्या काळी या वस्तू

विणून विकायला महारणी यायच्या. आणची एक ठरलेली महारीण होती आणि

वर्षांतून दोन-तीनदा ती आमच्याकडे या वस्तू विकायला आणी.माझ्या आठवणीत

तरी वर्षानुवर्षे हीच बाई या वस्तू घेऊन येई. ती आली की तिचा माल ती उलट-सुलट

करून दाखवी. आईला पसंत पडला की तो एका बाजूला ठेवी. मग काय काय घ्यायचे

ते ठरले, की भावात घासाघीस चाले, आणि शेवटी सौदा पटला की मग त्या वस्तूंवर

पाणी टाकून तो माल आई घरात घेई. महारणीला शिवणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् होती.

तिने केलेल्या वस्तूंनादेखील त्यांवर पाणी टाकल्याखेरीज आम्ही हात लावायचा नसे.

तिच्या आणि आमच्या सामाजिक स्थानातला हा फरक आई कसोशीने पाळत असे.

त्यात काही चूक अगर अन्याय आहे असे तिला कधीही वाटले नाही. उलट, हे असेच

असायला हवे यावर तिची इतकी श्रध्दा होती, आणि आम्हांलाही या बाबतीत तिचा

असा काही धाक होता, की वेगळा काही आचार-विचार तिथे त्या काळी संभवतच

नव्हता. केक मेलांवरून पायपीट करून भर उन्हाची आमच्या दारी येणारी ही

महारीण मग तिथे चांगली तास-दोन तास रेंगाळत असे. आई मग तिला जेवण देई.

चहापाणी देई. चहाबरोबर काहीही खायला दिले की ती ते लगेच मुलांसाठी न्यायला

म्हणून मोटलीत बांधू लागे आणि मग आई तिला रागवे.""दिलंय ते निमूटपणे खा.

उन्हातान्हातून आलीस ते पाय काय मुलांचे नाय भाजले. आणि मुलांची आठवण

मलाही आहे. आण्हांलाही देवाच्या दयेनी भरपूर मुलंबाळं आहेत. हे घे मुलांसाठी. पण

तुला दिलंय ते तू खा."" असा संवाद दर वेळी चाले. तिच्या मुलांची आणि घरच्या

सर्वांची नावे आईला माहीत होती. आणि आमची सर्वांची तिला. मग हा कुठे असतो

आणि तो हल्ली काय करतो वगेरे एकमेकींच्या चौकश्या चालत. सुखदुःखाच्या गोष्टी

चालत. जाताना ती तांदूळ,पोहे,लोणचे,कसली कसली औषधे, जुने कपडे, काय

काय घेऊन जाई. या वस्तू देताना आईच्या मनात कोणताही हिशेब नसे. पण तिचा

माल विकत घेताना मात्र घासाघीस ही व्हायचीच.



एकदा अशीच ती महारीण मागल्या दारी येऊन बसली आणि तिने नेहमीप्रमाणे

आईला हाक मारली. मग अगदी नेहमीच्याच पध्दतीने खरेदी वगेरे झाली. पाणी

टाकून माल उचलत असताना आईचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे गेले.आईने

चौकशी केली तेव्हा कळले, की रानात कसलातरी मोठठा काटा लागून तिची पोटरी



पान नं. 15



थोडी फाटली होती आणि आता त्यात पू पण झाला होता. पाय सुजला तर होताच,

पण ठणकल्याने दोन-तीन दिवस झोपही आली नव्हती. आईने `पाहू' म्हणून तिचा

पाय पकडला. मग गरम पाणी, पोटॅशियम परमॅगनेट,कापूस,बँडेज म्हणून जुन्या

धोतराच्या पटटया वगेरे वस्तू आणि जखमेवरचा हमखास इलाज असे ते `शेटटीचं

मलम' आणायला आण्हांला सांगून आईने सगळा पू पिळून काढला आणि यथासांग

औषधपाणी करून तिचा पाय बांधून दिला. हे करत असताना ती बाई मोठमोठयाने

ओरडत,रडत होती आणि त्याच्याही वर आवाज काढून,या वयाला आणि

बाईमाणसाला असं ओरडणं शोभत नाही, सहन करता येत नाही तर बायकांच्या

जन्माला आलीस कशाला, वगेरे व्याख्यान आई तिला देत होती,. शेवटी एकदाचे ते

ड्रेसिंग संपले. पुवाने भरलेले कापसाचे बोळे वगेरे एका कागदात गुंडाळून,`रानात

टाकून दे' म्हणून आईने तिच्याकडे दिले. मग आई तिच्या टोपल्यांवर पाणी टाकी तसे.

आम्ही आईच्या डोक्यावर कळशी ओतली आणि आंघोळ करून आई घरात आली.

एका छोटया डबीत आणखी थोडे मलम घालून आईने तिला ते पुन्हा एकदोनदा

लावायला म्हणून दिले. झाल्या प्रकारात काही अंतर्गत विसंगती आहे असे त्या काळी

तिला, आईला अगर आम्हालांही कुणाला वाटले नाही.



पुढे वय थोडे वाढल्यावर आणि शिक्षणाने थोडे ज्ञान आल्यावर आईच्या या

सोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आटवला, की

आईचा कर्मठपणा आणि सह्दयता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून उभी

असल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या, ओळखीच्या, सर्व संबंधित गोरगरिबांबद्दल

तिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ सगळे वेयक्तिक होते.

आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते तर त्या महारणीकडचा

माल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकलं नसतं. पण

त्याचबरोबर बहुधा तिच्या पायाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले असते कदाचित. फार तर

""एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावा

लागेल"" असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे !



गेल्या पंधरा-वीस वर्षात मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला गेले, तेव्हा तेव्हा सुंदराबाई

म्हणून एक बाई न चुकता भेटायला यायची. मलाच नव्हे, आम्हां मुलांपेकी कुणीही

रत्नागिरीला गेले तरी ती भेटायला येऊन जायचीच. आम्ही दोन-तीन दिवसांसाठी

गेलो तरी तिला कसा सुगावा लागे कळत नसे. एखादी वेडी भिकारीण अशी ती दिसे.

केस पिंजारलेले, काहीशी गलिच्छ. एकटी असली तरी ती सारखी बडबडत असायची.

तिच्यात असं काहीतरी होतं की मला ती कधीच आवडली नाही. आईच्या पोटात

मात्र तिच्याबद्दल अपरंपार दया असे. आमच्याकडून पेसे किंवा एखादी वस्तू हातावर

पडेल या आशेने ती येई. पण येताना कधी रिकाम्या हाताने येत नसे. कुठल्यातरी

दुकानातून विकत घेतलेली गलिच्छ कागदात बांधलेली एखादी खाण्याची वस्तू ती



पान नं. 16



घेऊन येई. चिवडा, लाडू फुटाणे, किंवा असलेच काहीतरी. ते ती आम्हांला

देई आणि खाण्याचा आग्रह करी. आम्हीही तिला भरघोस काही द्यावे अशी आईची

अपेक्षा असे. तिला उचलून काही द्यायला आमची ना नसे, पण तिने फार वेळ

रेंगाळून आम्हांला त्रास देणे, तिने आणलेले आम्हांला खायला लावणे, याला आमचा

विरोध असे. एके काळी आपण कसे खूप श्रीमंत होतो, मग नवरा मेल्यावर

आपल्याला इतरांनी कसे लुटले, मग आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम कसा झाला,

त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही आपले घरदार धुऊन नेऊन आपल्याला भिकेला

कसे लावले वगेरे आपली कहाणी तिने आईला सांगितली होती; आणि त्यावर आईचा

पूर्ण विश्वास होता. आता ही कहाणी खरी असू शकेल, तशी खोटीही असू शकेल.

आणि काहीही असले तरी त्याचा आम्हांला कां त्रास? पण आईला वाटे प्रसंग,

कुणावर कसा येईल सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या सुंदराबाईशी फार

सहानुभूतीने वागावे.



""ती तर अर्धवट वेडीच आहे. तिला काय कळतं ?पण आम्ही शहाणी आहोत

ना ? मग थोडं सहन केलं तर काय बिघडतं ? इतक्या लांबून पायपीट करत तुम्हांला

डोळे भरून पाहायला येते. एके काळची घरंदाज बाई. आता भिकारी झाली,वेडी

झाली, तरी रीतिरिवाज रक्तात आहेत. कुणाला भेटायला जायचं तर रिकाम्या हाताने

नाही जाणार. तिच्याकडे पेसे कुठले ? पण कसंतरी करून काहीतरी प्रेमाने आणले, तर

तुम्हांला तिच्या समाधानासाठी थोडं तोंडात टाकायला काय होतं ? स्वच्छतेची थोतांड

मला नका सांगू !हॉटेलात खाता-जेवता , तिथे सेपाकघरात काय चालतं ते पाहता का

कधी ? पण तिकडे ठणकावून पेसे घेतात तेव्हा तुम्ही निमूटपणे नोटा काढून द्याला. इथे

ही प्रेमानं काही आणते तर तिची किंमत नाही. आईला आई म्हणता हे तरी माझं

नशीब !"" - इथपर्यंत आईची मजल जायची. त्या सुंदराबाईबद्दल आईला इतका

उमाळा कां ते मला कधीच कळले नाही. मला तर ढोंगी वाटायची. पण आईचा

दृष्टिकोन काही बाबतीत हा असा फार उदार होता. कदाचित नेमित्तिक भेटीला

येणाऱ्या आम्हां मुलांपेक्षा, नित्याच्या या गोतावळ्याचा आईला अधिक आधार तर

वाटू लागला नसेल ? कोण जाणे !



अशीच एकदा आप्पांना बरं नाही म्हणून मी रत्नीगिरीला त्यांना भेटायला गेले

होते. आप्पा, आई दोघेही थकलेले, तेव्हा सेपाकाला एक पोरगी आणि वरकामाला

चोवीस तास घरी राहणारी एक बाई अशी दोन बायका कामाला आहेत हे मला

ठाऊक होते. मी तीन-चार दिवसांसाठी येणार हे कळवले होते. मी संध्याकाळी जाऊन

पोचले आणि दुसरे दिवशी सकाळीच वरकामाला असलेल्या बाईने आपली पाळी सुरू

झाल्याचे सांगितले. म्हणजे आता पुरे तीन दिवस ही नुसती बसून राहणार. आईचे या

बाबतीत कडक सोवळे असे. त्याचा फायदा घेऊन महिन्यातून दोनदादेखील `पाळी'चे

निमित्त सांगून कुणी बसून खाल्ले तरी तिला चाले. अशा वेळी त्या दूर बसतात याचेच

तिला कौतुक. आम्ही कुणीही आपापल्या घरी विटाळ पाळत नाही ही गोष्ट तिला

पान नं. 17



मुळीच आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी राहायला येणेही तिला मनापासून

पसंत नसे. तिच्या या वागण्याचा फायदा कामवाल्या बाया चांगलाच घेत. मी घरी

आल्यावर आप्पा-आईना आवडेल असं काहीतरी करून खाऊपिऊ घालणार, तर

हाताखाली मदतीला कुणी नाहीच, आणि त्यात सेपाकाला येणाऱ्या पोरीनेही ""पोट

दुखते आहे,"" असा निरोप पाठवला. मी वेतागून म्हटले,"" आजच नेमकं हिचं पोट

कसं दुखायला लागलं ?"" तर आई म्हणाली,""तिचे दिवस भरत आले आहेत, ती

लवकर बाळंत होणार असेल."" मला त्या दोघीचा, आईच्या सोवळ्या-ओवळ्याच्या

कल्पनेचा आणि माझ्या नशिबाचाही भयंकर राग आला. मी कधी नव्हे ती माहेरी

आले तरी तिथेही मला क्षणाची विश्रान्ती नाही, याचे आईला वाईट वाटले. पण तिने

त्याबद्दल त्या दोघीनांही दोष न देता, स्वतःचे वय झाल्यने आणि ढोपरे फार दुखत

असल्याने आपल्याच्याने आता होत नाही, नाहीतर आपणच कसे वेगळे केले असते

हेच ऐकवले.



तिसरे दिवशी माझा सगळा सेपाक करून झाल्यावर सेपाकीणी आली. मी

म्हटले.""यायचंच तर लौकर का नाही आलीस? आता सगळा सेपाक झालाय; तू

जा."" तर आईने तिला जेवूनच जायला सांगितले. कारणे दोन. एक तर ती रोज

सेपाक केल्यावर जेवूनच घरी जायची.,मग आज उपाशी पोटी कसे पाठवायचे ? आणि

दुसरे, त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे ती गरोदर आहे आणि पहिलटकरीण आहे.

तिला काही खावेप्यावे वाटत असले तरी तिला कोण करून घालणार ? मी इतका

चांगला सेपाक केलाय, तर दोन घास खाऊन तिचा आत्मा तृप्त झाला तर परमेश्वर

मला आशीर्वादच देईल. मला स्वतःला मात्र राब राब राबून मिळणाऱ्या परमेश्वराच्या

त्या आशीर्वादापेक्षा दोन घटका विश्रान्ती आणि आप्पांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष

देता आलं आसतं तर ते अधिक मोलाचं होतं. पण आईचे सगळे तर्कशास्त्रच उलटे

होते. त्यामुळे तिचे मझे कधई पटलेच नाही.



आज आई नाही. आता मागे वळून पाहताना असे अनेक प्रसंग आठवले, की

त्यामागच्या तिच्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि स्वत:ची लाज वाटते. आईचं

औदार्य माझ्या बहिणीत आलंय. माझ्यात आप्पांची निवृत्ती थोडीबहुत आली असावी,

पण आईचं हे औदार्य मात्र जरासुध्दा आलं नाही.



मला वाटते, औदार्यामागे विचार, सद््सद््विवेकबुध्दी नसते. कुणालाही पटकन

काही देण्यातला निर्भेळ आनंद तेवढा असतो. या आनंदाचा छंद लागला, की औदार्य

हा त्या व्यक्तीचा अविभाज्य घटक बनतो. हा फार मोठा गुणच मानला पाहिजे.

कारण त्यातून स्वतःला सुख लाभतेच, पण दुसऱ्यालाही लाभच होतो, आनंद मिळतो.

शिवाय, त्यात समाजविघातक असे काहीही नाही. औदार्यामुळे स्वभावाचे काही कोपरे

घासून जाऊन जीवनाचा पोत छान तलम बनत असावा.



माझी आई किंवा तिच्यातला हा गुण मोठया प्रमाणावर लाभलेली माझी बहीण या

कुणालाही, काहीही पटकन उचलून देताना मी अनेकदा अनुभवलंय. माझ्या हातून



पान नं. 18



मात्र असं सहसा घडत नाही. एखादी वस्तू किंवा पेसे मागायला दारी आलेल्याला मी

सहज `नाही' म्हणून घालवून देऊ शकते. मग ती मागणी कितीही शुल्लक असो किंवा

मागणारी व्यक्ती कितीही थोर असो. भिकाऱ्याला द्यायलातर पाच-दहा पेशांचे

नाणेदेखील माझ्या हातून कधी सुटत नाही. त्यामुळे मी फार चिक्कू आहे असा

कुणाचाही समज होणे स्वाभाविक आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला त्याचे

सोयरसुतक जरासुध्दा नाही. मी तशी रेशमाच्या किडयाच्या जातीची, स्वतःभोवती

छोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांना

स्थान आहे असी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फार

मोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्याहिशेबी काही महत्व नसावे. मला सर्वार्थाने न

ओळखणाऱ्या अनेकांना हे विधान चुकीचे किंवा अतिशयोक्त वाटेल. पण तसे नाही.

मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी ते

विसरूनही जाताना मला मी पाहिले आहे. पण त्या क्षणी तिथे `इदं न मम' ही

निःसंगतेची भावनाच प्रबळ असावी. औदार्याचा लवलेशही नसावा. म्हणून मला

वाटते, या बाबतीत मी कदाचित आप्पाची मुलगी शोभेन.



आमचे आप्पा हे निष्णात फौजदार वकील होते. तर्कशुध्द विचार करत निर्णयाला

येण्याची, उलटसुलट विचार करून शंका काढण्याची त्यांना चांगलीच सवय होती.

बुध्दिबळ आणि ब्रिज हे त्यांचे आवडते खेळ होते. या दोन खेळांचा आणि तर्कशुध्द

विचारसरणीचा परस्परसंबंध असेल का ?



या तिन्ही गोष्टी मलाही खूप आवडायच्या. त्यांतल्या बुध्दिबळ आणि ब्रिज या

खेळांशी पुढे माझा काहीच संबंध राहिला नाही. पण विचारांचा खेळ मला अजूनही

आवडतो. तो कुठेही,केव्हाही, स्वतःशीच खेळता येतो.



आप्पांना वाटे, मी वकील व्हावे, बॅरिस्टर व्हावे. बॅ.सीता आजगावकर ही त्यांची

बहीण.(सख्खी नव्हे,त्यांना सख्खे भावंड वगेरे नव्हतेच. ही दूरची, बहुधा

मावसबहीण असावी. ) ही माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली स्त्री बॅरिस्टर. ती

शंकरशेट स्कॉलरही होती. आप्पांना साहजिकच तिचा फार अभिमान होता. मीही असं

काही व्हावं असं त्यांना फार वाटे. पण या बाबतीतही मी त्यांची निराशाच केली.

नाही म्हणायला माझा थोरला भाऊ वकील आमि पुढे जज्ज झाला. पण त्याला

वकिलीत फारसा रस नव्हता. थोरल्या मुलाने वडिलांचा व्यवसाय घ्यावा या त्या

काळच्या धोरणामुळे त्याला वकील करण्याच आले होते इतकेच. पण मी कदाचित

बऱ्यापेकी वकील होऊ शकले असते असे आता वाटते.



आमचे आप्पा गेले त्यापूर्वी दहाच दिवस आधी आम्ही कोल्हापूरला काही

कामानिमित्त गेलो होतो. तिथून जवळच रत्नागिरीला आप्पा-आईना भेटायला म्हणून

एका दिवसासाठी जाऊन आलो. आम्ही घरी जाऊन पोचल्यावर तासाभराने आप्पांनी



पान नं. 19



माझ्या हाती एक पत्र दिले. ते एक प्रकारचे इच्छापत्रच होते. त्यांच्या पेशाअडक्याचे

आणि जमीजुमल्याचे पुढे काय करायचे याबद्दलचे इच्छापत्र त्यांनी रीतसर करून

ठेवलेच होते. या पत्रात त्यापेकी काही नव्हते. स्वतःच्या मृत्यूनंतर आपले डोळे

नेत्रपेढीला आणि शरीर मेडिकल कॉलेजला द्यावे अशी इच्छा त्यात सविस्तर लिहिलेली

होती. इतके मुलगे,सुना,जावई,दुसरी मुलगी वगेरे इतरही असताना, कुटुंबात इतके

डॉक्टर्स असताना, हे पत्र मलाच कां लिहिले, असे मी विचारले तेव्हा ""यावरून या

बाबतीत तुझ्यावर माझा सर्वात अधिक विश्वास आहे असंच नाही का सिध्द होत ?""

असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मग मी त्यांना दोनतीन गोष्टी समजावून सांगितल्या :

एक तर डोळे हे माणसाच्या मृत्यूनंतर तासाभरात काढले तरच त्यांचा उपयोग करता

येतो, असे मला वाटते. आणि रत्नागिरीत नेत्रपेढी नसल्याने ते शक्य होणार नाही.

बाकीच्या शरीराचा उपयोग हा केवळ हा केवळ डिसेक्शनसाठी मेडिकल कॉलेजला तेवढा

होणार. तिथे मग गरीब-श्रीमंत, मूर्ख-विचारवंत, सर्वांच्या शरीराचे अवयव

अभ्यासाच्या दृष्टीने सारखेच. पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांत. जिथे मेडिकल

कॉलेजे आहेत तिथे, रोज अनेक बेवारशी मृत देह फुकट मिळू शकतात. असे

असताना उगाच खर्च करून आपला देह तिथे नेऊन देणे हा वेडेपणाच नाही का ?

तेव्हा हा हटट त्यांनी सोडावा. पण त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी मी माझे डोळे

आणि शरीर मृत्यूनंतर असे देऊन टाकण्याची व्यवस्था नक्की करीन. आम्ही शहरात

राहतो. आम्हांला मृत्यूही शहरातच येईल असे धरून चालू, तेव्हा हे सहज शक्य

होईल. मी तुम्हांला असं वचन दिलंय हे सर्वांच्या कानावर घालून ठेवते म्हणजे झालं.



त्यांना माझे म्हणणे तितकेसे रूचलेले दिसले नाही. पण त्यावर ते काही बोलले

नाहीत. हा मृत्यूचा विचार मात्र त्यांना तरीही सोडत नव्हता. कारण त्यानंतर थोडया

वेळाने पुन्हा तोच विषय काढून ते म्हणाले.



""विनोबांनी, सावरकरांनी प्रायोपवेशन केल्याचं वाचलं. मला वाटतं. आपणही

आता तेच करावं. आणखी किती जगायचं आणि कशासाठी ? आता या बाबतीत तर

काही अडचण नाही ना ? पण तुझ्या आईला ते पटत नाही. तुम्ही माझ्यासाठी

इतकं करा. तिची समजूत घाला आणि मला सहकार्य द्या.""



आई तिथेच बसली होती. ती भडकून म्हणाली,""मी असलं काही ऐकून घेणार

नाही. त्यांना आता या वयात दुसरा काही धंदा नाही. उगाच काहीतरी विचार करत

बसतात आणि म्हातारचळ लागल्यासारखे वेडंवाकडं सांगत बसतात. पण तुला तरी

काही अक्कल हवी की नको ? तू ऐकून कसं घेतेस असलं अभद्र ?""



खरे तर हा अप्रिय विषय आम्हांला कुणालाच नको होता. पण आप्पांच्या डोक्यात

तो ठाण मांडून बसला होता, तेव्हा त्यांच्या डोक्यातून तो काढून टाकणे भाग होते.

मग मी त्यांना म्हटले,""आप्पा, मला तुमचं म्हणणं पटत. मीही तुमच्याच विचाराची

आहे. पण प्रायोपवेशन वाटतं तितकं सोपं नाही. त्याला इतरांचा विरोध चालू शकत

नाही. समजा, तुम्ही प्रायोपवेशन सुरू केलं आणि काही काळानं तुमची शुध्द गेली



पान नं. 20



आणि त्यानंतर तुम्हांला जगवण्याचे प्रयत्न इतरांनी केले तर सगळंच फुकट नाही का

जाणार ? आणि आईच खुद्द तसं करील याची मला खात्री वाटते. तुम्ही विचार करू

शकता. तुमची समजूत घालणं सोपं आहे. आईला असलं काही पटवणं कुणाला तरी

शक्य आहे का ? तेव्हा तुम्ही असा विचार करा- गेली साठ-पासष्ट वर्ष आईनं

वाढलेल्या अन्नावरच पोरालेलं हे तुमचं शरीर त्यावर अधिक हक्क कुणाचा ? तुमचा

की तिचा ? मग त्या शरीराची विल्हेवाट होईना का तिच्या मनाजोगी ? आपण या

हाडामांसाला फार महत्व देऊयाच नको. मला तर वाटतं, जिवंतपणीच स्वतःच्या

शरीराकडे निर्मम भावनेनं पाहता आलं तर किती सुखाचं होईल ! तुम्ही मृत्यूचा

विचारच डोक्यातून काढून टाका बरं. त्याला यायचं तेव्हा येऊ द्या. इतकी घाई

कशाला ? तुम्ही आम्हांला सगळ्यांना आणखी खूप हवे आहात. आमच्या एकत्रित

इच्छाशक्तीपुढे तुमचा एकटयाचा काय निभाव लागणार ?""



मी तो विषय एकदाचा संपवून टाकायचा वेडयावाकडया भाषेत प्रयत्न करत होते

लहानपणी अधूनमधून कोर्टात एखादा फार महत्त्वाचा दावा चालू असला, की आप्पा

तो ऐकायला आम्हांला यायला सांगायचे. जिल्हा-न्यायलय आमच्या घरासमोरच

चपराश्यापर्यंत सगळी माणसे आम्हांला ओळखत. आमचे घर, कोर्ट, पोस्ट, ऑफिस,

युरोपियन क्लब (आता तिथे गोगटे कॉलेज झालंय.) या इमारती एकाच परिसरात,

थोडया गावाबाहेर होत्या. नवीन न्यायाधीश आले की प्रथम त्यांचा आमच्या गराशी

परिचय होई. पी.एम.लाड, गुंडील,वॉटरफील्ड, डी. आरा. प्रधान- तिथे

बदलून आलेल्या बहुतेक न्यायाधीशांचे आमच्या घरी खूप जाणेयेणे असे. त्यांचे-

आमचे त्या वेळी जोडले गेलेले कौटुंबिक संबंध पुढेही वर्षानुवर्षे-अद्यापही-तुटलेले

नाहीत. या पार्श्वभूमीवर,लहानपणी त्या कोर्टात आप्पा चालवीत असलेले काही

खटले बाकावर बसून मी ऐकलेले आहेत, तो काळ या क्षणी मला(आणि बहुधा

आप्पांनाही) आठवला. शेवटी आप्पा मला हसून म्हणाले,""तू वकील फार चांगली

झाली असतीस !""



त्यानंतर दहाच दिवसांनी आप्पा गेले, `आपण आता जावं' या प्रबळ इच्छेच्या

पोटीच हे शक्य झालं असेल का ? अगदी शांत,निरामय असा हा मृत्यू. मी बरेच

मृत्यू खूप जवळून पाहिले आहेत. मृत्यूनंतर काही वेळाने अनेक मृतदेहांच्या नाकातून

वगेरे एक प्रकारचा द्रव बाहेर पडतो. आप्पांच्या बाबतीत असले काहीही झाले नाही.

मृत्यूनंतरही दहा-बारा तास ते त्याच अवस्थेत, अगदी स्वच्छ, शांत झोपल्यासारखे

पलंगावरच होते.



मृत्यूचं दुःख हे असतंच. आणि दुःखात मला वाटतं माणसांची मनं थोडी विशाला,

क्षमाशील किंवा अधिक उदार होत असावीत. आपण भेदभाव विसरू पाहतो,

एकमेकांच्या मदतीला धावतो, मृतदेहाला तर पवित्र मानून नमस्कारदेखील करतो. मग

हा मृतदेह स्वच्छ असला काय किंवा दुर्देवाने गलिच्छ झालेला असला काय. हे खरं



पान नं. 21



असलं तरी आप्पांचा मृतदेह शेवटपर्यंत स्वच्छ राहिला या गोष्टीचेही कुठेतरी मला

समाधान होते. आपला मृत्यूही असाच असावा ही इच्छा तर असेलच; पण त्यांचीच

मुलगी असल्यामुळे तो असाच असण्याची शक्यता असल्याचे तर हे समाधान नसेल ?



थोडे बहुत कळायला लागेपर्यंतची माझ्या वयाची पहिली आठदहा वर्षे वजा केली

तर त्यानंतर आईच्या मृत्यूपर्यंत साधारणतः पंचेचाळीस-पन्नास वर्षे आई मला

लाभली. माझ्या सासूबाईशी माझी ओळख झाल्यालाही आता जवळपास तेवढाच काळ

लोटला आहे. साधारणतः एकाच वयाच्या,सारख्याच मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि

सुसंस्कृत घरांत वाढलेल्या,आपापले संसार निष्ठेने केलेल्या या दोन बायका. भाईचे

वडील फार लौकर गेले. त्यामुळे मी त्यांना पाहिलेले नाही. पण भाईकडून त्यांच्याबद्दल

जे काही ऐकले, त्यावरून तेही आमच्या आप्पांसारखेच एक देवमाणूस होते. म्हणजे

या दोघींनी ज्यांच्या बरोबर संसार केले तेही वृत्तीने सारखेच होते म्हणायला हरकत

नाही. पण मुळातच या दोघींचे पिंडधर्म अनेक बाबतींत वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशी

संबंधित असलेली माझी सुखदुःखंदेखील अगदी वेगवेगळ्या जातीची आहेत.



माझीही त्या दोघींशी वागण्याची तऱ्हा एकच नसे. आईशी हक्काने फटकून

वागणारी मी, सासूशी संबंध आला की चार वेळा विचार करत असे. देण्याघेण्याच्या

बाबतीत `अं:! आपलीच आहे !' अशी आईला गृहीत धरणारी मी, सासूच्या बाबतीत

शक्य ते उपचार पाळत असे. थोडक्यात, आईच्या बाबतीत आतडयाचा धागा

गुंतल्यामुळे तिला मी माझ्यातच पाहत असे आणि अनेकदा हक्काने दुर्लक्षीत असे, तर

सासूच्या बाबतीत कर्तव्य, सुसंस्कृतता, भाईला बरे वाटावे ही इच्छा, आणि वळण

लावले नाही असा आईला कुणी दोष देऊ नये हा कटाक्ष, वगेरे गोष्टींची फळी पक्की

ठेवून झुकते माप घालण्याकडे माझा कल असे.



माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीला झाला आणि माझ्या आईचा शिवरात्रीला.

हे दोन्ही सणांचे दिवस; त्यामुळे सहज लक्षात राहण्यासारखे. पण माझ्या आईचा

जन्मदिवस शिवरात्रीचा, ही गोष्ट मी लग्न होऊन सासरी आले तरी मला माहीत

नव्हती. आमच्या लहानपणी वाढदिवस वगेरे प्रकार नव्हतेच. आमच्या घरीच नव्हे

तर त्या काळातल्या माझ्या माहितीतल्या इतर घरांतही कधी कुणाचा वाढदिवस

साजरा झाल्याचे आठवत नाही. पण माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशी

झाला हे मला आमच्या लग्नाच्या आधीच कळले. त्यांच्याकडूनच. सहज बोलता

बोलता. मग मी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस आठवणीने



पान नं. 22



माझ्या परीने मी साजरा करीत आले. सतत पस्तीस-छत्तीस वर्षे, नेमाने. आता हळूहळू

मीच ती प्रथा मोडून टाकली. म्हणजे आठवण येत नाही म्हणून नव्हे. आठवण येते,

मी फोनवर त्यांच्याशी त्याबद्दल मुद्दाम बोलतेही; पण पहिल्यासारखा वाढदिवस साजरा

करणे सोडून दिले. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडत. घरी केलेल्या साजूक तुपात

बेसन खमंग भाजून आणि बेदाणा,बदाम वगेरे घालून मी खास त्यांच्यासाठी लाडू

करत असे. त्या दिवशी त्यांना जितकी वर्षे पुरी होत तितके लाडू आणि शिवाय साडी

वगेरे. एकदा कधीतरी आईशी बोलताना मी याचा उल्लेख केला, तेव्हा ती म्हणाली,

""वा, त्यांचा जन्म गणपतीच्या दिवशी का ? माझा शिवरात्रीला."" तेव्हा मला

आईचाही वाढदिवस असू शकतो हे इतक्या वर्षांनी प्रथमच जाणवले., आणि ही गोष्ट

इतक्या उशिरा कळली याचे हसूच आले. पण त्यानंतरही कधी मी आईचा वाढदिवस

खास लक्षात ठेवला नाही आणि सासूबाईंचा वाढदिवस विसरू दिला नाही.

भाईलाही स्वतःच्या वाढदिवसाबद्दल उत्साह असे आणि मीही त्या दिवशी त्याच्या

आवडीचा खास असा सेपाक करत असे.



असे या मायलेकांचे पंचवीस-तीस वाढदिवस झाले, पण माझी जन्मतारीख कोणती

हे विचारण्याचं माझ्या सासूबाईंना कधी सुचलं नाही आणि भाईला ती तारीख मुद्दाम

लक्षात ठेवावी असं कधी वाटलं नाही. मला मात्र इतरांच्या जन्मतारखा लक्षात

ठेवायच्या आणि त्या त्या दिवशी प्रत्यक्ष, फोनवर किंवा पत्राने सदिच्छा द्यायच्या असा

छंदच लागला आणि हळूहळू तो वाढतच गेला. मग त्यांतल्या काहींनी माझी

जन्मतारीख काढण्याचा आणि उलट मलाही सदिच्छा पाठवण्याचा उद्योग सुरू केला

आणि त्यामुळे मग मला भंयकर संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मनुष्यस्वभाव तरी

कसा मजेदार असतो ! माझा वाढदिवस भाईच्या लक्षात नसतो याचे मला मनापासून

वाईट वाटे. आताशा आताशा तो मुद्दाम ती तारीख लक्षात ठेवतो, आणि आपल्या

लक्षात आहे हे मला त्या दिवशी सकाळी किंवा आधल्या दिवशीही सांगून टाकतो.

मला वाईट वाटू नये म्हणून; स्वतःच्या आनंदासाठी नव्हे. कारण त्या शुभेच्छा देऊन

होताच त्याने `हुश्श' केल्याचे मला जाणवते. मग माझाच मला खूप राग येतो.

आपणच कुठेतरी कधीतरी बोललो असणार, याला माझा वाढदिवस कधीच आठवत

नसल्याचे. या विचाराने मला स्वतःशीच फार लाज वाटते. माझा वाढदिवस कुणाच्या

ध्यानामनी नव्हता ते किती चांगले होते ! त्यात कसला तरी गूढ आनंद मला त्या

दिवशी लाभायचा. माझ्या हाताने आता तो मी गमावून बसले. आणि कमावले काय ?

वर्षांतून एक-दोन कसेसेच दिवस, की ज्या दिवशी फोन वाजला की धडाधडायला

लागतं. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नसतील ? यांच्याशी आता काय आणि

कसं बोलू ? मला औपचारिक बोलणं आवडत नाही हे ठीक आहे. पण करं सांगायचं

तर वेळप्रसंगी तसं बोलावं लागतं हे कळत असूनही मला औपचारिक बोलताच येत

नाही. म्हणजे नक्की काय होतं ? मला रंगभूमीवर अशी एखादी भूमिका वढवायला

मिळाली असती की असं औपचारिक बोलण्याचा जिचा स्वभावच आहे, तर मी काय



पान नं. 23



केलं असतं ? ती भूमिका नाकारली असती ? सांगता येत नाही. ती भूमिका तशी

महत्त्वाची असती तर मी ती स्वीकारलीही असती आणि बहुधा चांगली वठवलीही

असती. मग हा रंगभूमीवरचा अभिनय प्रत्यक्ष जीवनात क्वचित्प्रंसगी आवश्यक

असला तर कां करू नये ? आवश्यक असतानादेखील तो करू नये असे मला मुळीच

वाटत नाही. पण मला मात्र तो तसा करता येत नाही हेच तर दुर्देव आहे. पराभव

आहे. अशा हजारो रंगीबेरंगी पराभवांची मालिका म्हणजेच आपले आयुष्य का ? ""



माझ्या माहेरचे आणि सासरचे वळण अनेक बाबतींत वेगळे होते. आमच्या

आप्पांना चहा फार आवडे. काम करताना त्यांना मधूनमधून थोडाथोडा चहा लागत

असे. अशा वेळी साहजिकच त्यांच्याबरोबर त्या वेळी जी कुणी माणसे असत त्या

सर्वांसाठी आई चहा करीत असे. आप्पांच्या वकील मित्रमंडळीत, त्यांच्याकडे

शिकायला येणाऱ्या तरूण वकील मंडळीत आणि आप्पांच्या पक्षकारांतही बरेच

लोक धर्माने मुसलमान होते. आमच्या पलीकडे बरीच मुसलमान कुटुंबे राहत

होती. अद्याप आहेत. या सर्व मंडळीचे आणि आईचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. पण

चहा देताना मात्र, तोच चहा पण मुसलमानांसाठी आई वेगळ्या कपबश्या वापरत

असे. खरे तर सहज ओळखू याव्यात म्हणून, पण प्रत्यक्षात त्यांनाखास सन्मानित

वाटावे म्हणून, आईने या कपबश्या जरा अधिक किंमतीच्या आणि फुलांची नक्षी

असलेल्या अशा घेतल्या होत्या. चहा देताना मोठया चतुराईने ती त्या त्या माणसापुढे

तो तो कप ठेवी. पण आप्पांचे एकदोन मुसलमान वकील मित्र तिच्याहूनही चतुर होते.

ह्या पाहुणचाराचे वेशिष्टय लौकरच त्यांच्या ध्यनात आले आणि मग आईने टेबलावर

चहा आणून ठेवला की त्यांतला कधी हा तर कधी तो वकील नेमका आप्पांच्या पुढचा

कप आपण घेई आणि आपल्या पुढयातला कप आप्पांच्या पुढे ठेवी. आई मग

घाईघाईने त्यांना सांगे ""त्यांचा (म्हणजे आप्पांचा) चहा नका तुम्ही घेऊ. ते सारखा

चहा पितात. मग पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी त्यांना अर्धाच कप चहा दिलाय.

त्यांना तोच घेऊ दे. तितकाच पुरे. तुम्ही तुमचा घ्याकपभर."" त्यावर तेही हसून

सांगत की त्यांनाही सारखा सारखा चहा घेऊन त्रास होतो, तेव्हा अर्धा कप चहा

हवा होता. आणि हे सांगत असतानाच आप्पांच्या कपातून ते तो चहा पिऊही लागत.

आप्पाही मग समोर आलेल्या त्या फुलांच्या कपातला अर्धा चहा पीत आणि उरलेला

अर्धा आईकडे देत तिला सांगत,""हा तू घे. फक्कड झालाय. पण मी अर्धा कपच

घेतला. बाकीचा तुला ठेवलाय. घे."" मग आम्ही रिकाम्या कपबश्या धुवायला आत

आणल्या की."" हा पण कप मेल्यांनी बाटवला.!"" म्हणत आई तो आप्पांचा कपही

`मुसलमानांच्याकपा'त ठेवी. लौकरच घरात असे `मुसलमानांचे कप'च फार झाले,

तेव्हा आईने तिचे हे सोवळे मनातल्या मनात गंगेला वाहिले आणि मग सगळे कप

निधर्मी झाले. आमच्या घरातली ही कपबश्यांची, भांडयाकुंडयांची,पंक्तींची वगेरे

वर्णव्यवस्था अशी हळूहळू कोलमडून पडली आणि `ह्या नव्या पिढीला विधिनिषेधच



पान नं. 24



राहिला नाही, तिथे मी तरी एकटी किती पुरी पडणार ?' अशा विषादाने आई खिन्न

झाली. आप्पाही अर्थातच त्या नव्या पिढीतच होते.



माझ्या सासरी सोवळ्या-ओवळ्याचा प्रकार किंवा असला भेदभाव नव्हता. पाळीच्या

वेळी तीन दिवस दूर बसणे हा प्रकारही माहेरच्यासारखा सासरी नव्हता. त्यामुळे खूप

मोकळे वाटे. मात्र गुरूवारी माझ्या सासूबाईंना कांदा-लसूणच वर्ज्य होती असे नव्हे,

तर त्या दिवशी त्यांचेही सोवळे-ओवळे असे. सकाळची पहिली चहा-कॉफीही गुरूवारी

प्रथम आंघोळ करून, मग भरलेल्या पाण्याचीच करावी लागे. पाळी चालू असले तर

त्या सुनेच्या हातचे अन्न त्यांना गुरूवारी चालत नसे. ""गुरूवारमध्येच असं काय खास

असतं ? तुमचा जर असल्या गोष्टींच्यावर विश्वास नाही तर गुरूवारी तरी तुम्ही त्या

कां करता ?"" असे मी सासूबाईंना विचारत असे; पण त्यांच्याकडे त्यावर काहीच उत्तर

नसे. त्या गप्प बसत. किंवा ""एक वार तरी करावंसकेलं तर काय बिघडलं? तुझी

आई पण सोवळं-ओवळ मानतेच."" असले काहीतरी उत्तर देत. माझ्या आईची मात्र

या बाबतीतली विचारसरणी पक्की होती.तिला वाटे, पिढयानपिढया आपले पूर्वज

जीवनाची जी मळलेली वाट तुडवट आले तोच ही भवनदी पार करायचा निश्चित

आणि खात्रीचा मार्ग आहे. त्या वाटेवरून प्रवास करण्यातच आपलं भलं आहे. त्या

पूर्वजांच्या पुण्याईने आणि आशीर्वादानेच आपल्याला शरीरा-मनाची ही शक्ती-बुध्दी

लाभली, त्यांचा अवमान करणे हे पाप आहे. या निष्ठा मूर्खासारख्या, बिनबुडाच्या

होत्या; पण त्यांना चिकटून राहण्यात कष्ट अधिक होते तरीही ते उपसण्याची ताकद

आईमध्ये खूप होती. कुटुंबातल्या आणि भोवतालच्या इतरांचाच विचार आई प्रथम

करीत असे, पण तो पक्कया आखीव अशी तिच्या दृष्टिकोनातून. भाई किंवा त्याच्या

आई यांना इतरांचा विचार कधी सुचतच नाही. हे एकेकाचे प्रकृतिधर्म किवां पिंडधर्म

असतात. त्याला त्या त्या व्यक्तीचा इलाजच नसावा.



सर्वसाधारण घरामध्ये बायकांचे राज्य असते. त्यामुळे स्वतःचे घर असावे,ते

घर, त्यातल्या सोयी, तिथले सामानसुमान,भांडीकुंडी, मांडणी वगेरे वगेरे कशी

असावी, याबद्दलही विशेषतः बायकांना स्वतःची मते, हौशी असतात. दुर्देवाने या

बाबतीत मी बायको म्हणून नालायकच निपजले. असली कोणतीच शहरी हौस मला

नाही. निवडच करायची झाली तर शहराबाहेर,छोटंसं, खूप मोठठाली झाडं

आजूबाजूला असलेलं, एक गाय आणि एक कुत्रा यांची सोबत असलेलं, नदीकाठचं

घर मी निवडलं असंत. पण भाई हा पक्का शहरी माणूस असल्याने तसे घर आपल्या

नशिबात नाही हे मी चटकन मान्य करून मोकळी झाले. मग शहरातच राहायचे तर

बेताचे असे आणि स्वच्छ घर असले की झाले. ते असेल तसे मी भागवून घेत असे.

एक स्वच्छता सोडली तर माझ्या इतर गरजा फारच कमी होत्या. अमकीच भांडीकुंडी

वगेरे मला लागत नसत. त्यामुळे अशा वस्तू निवडून मी कधी जमा केल्या नाहीत.

पण घरातल्या प्रत्येक चीजवस्तूशी माझी वेयक्तिक ओळख आहे. सुरूवातीच्या काळात



पान नं. 25



जुन्या कपडयांवर वगेरे घेतलेली आणि पुढे वेळीप्रसंगी कुणीकुणी दिलेली जी काही

भांडीकुंडी माझ्या घरात जमली आहेत त्यांच्यावर माझा माणसांसारखा जीव जडला

आहे. त्यांतल्या एखाद्या भांडयाला पोचा आला तर चारपाच दिवस माझी झोप उडते

आणि त्यानंतर वर्षाननुवर्षे ते भांडे वापरताना त्या पोच्यावरून माझा हात न चुकता

फिरतो, ते भांडे कुरवाळल्यासारखा.



भाईला मात्र गाडीसारखी घराचीही हौस होती.मग आम्ही सांताक्रूझला मोठठं घर

घेतलं. तिथल्या त्या मोठाल्या हॉलमध्ये अनेकांची गाणी झाली.या कार्यक्रमांना

मित्रमंडळींप्रमाणेच घरचे लोकही साहजिकच असत. माझ्या सासूबाईंनाही गाण्याची

खूपआवड. त्या बाबतीत माझी आई म्हणजे दुसरं टोकं होतं. मुलांना झोपवण्यासाठी

यापेक्षा अधिक गाण्यांची मानवजातीला गरजच नाही, असे तिचे मत होते असावे.

आम्ही गाणं शिकावं असं तिला वाटे. आपला जावई गाणारा आहे याचाही तिला

अभिमान होता; पण याचा अर्थ तिला संगीताच्या क्षेत्रात काही रस होता असा मात्र

मुळीच नव्हे. याउलट, माझ्या सासूबाईना दिवसभर रेडिओ लावून बसा म्हटले तरी

ती शिक्षा वाटत नाही. त्यांना गाण्यातले डावेउजवे काही कळते अशातला भाग नाही,

पण गाणे ऐकायला मनापासून आवडते हे मात्र खरे. तर सांताक्रूझच्या घरी त्या पाच

वर्शांत झालेल्या प्रत्येक गाण्याला त्या हजर असतच. मग मध्यंतरात कॉफी होई. ती

तयार करून कप भरणे वगेरे सर्व मी केलेल असे. पण ट्रे भरभरून पाहुण्यांना कॉफी

नेऊन देणे, रिकामे कप गोळा करून सेपाकघरात आणून ठेवणे वगेरे कामांना

मित्रमंडळीपेकी काही स्वयंसेवक पुढे येत. असल्या कामात भाई स्वतः, त्याचे भाऊ

अगर त्याच्या आई कधीही स्वतःहून भाग घ्यायला येत नसत. पण माझ्या सासूबाईंना

कुणीतरी कॉफी नेऊन दिली, की त्या मलाही चारचारदा ""तूही घे ना ग"" असा

आग्रह करत. आपण घरातली माणसे, पाहुण्यांना आधी द्यावे, मग आपण घ्यावे,

असा विचार भाईप्रणाणेच त्यांनाही चुकूनही सुचत नसे .""आधी तू घे बघू. मग संपेल."" असे

मनापासून सांगत. कारण मीही त्यांची होते, इतर पाहुणे मंडळीसारखी परकी नव्हते.



हे `आपलं' आणि `परकं' ह्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात.

माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या तर अगदी दोन टोकांच्या होत्या. रक्ताचे

नाते हे माझी आई अपरिहार्यपणे मानतच आली. पण अगदी मनाच्या गाभ्यात तिला

लेकीसुना काय आणि शोजारपाजारच्या बायकांपासून कामवाल्यांपर्यंत इतर जणी काय,

एका विशिष्ट पातळीवर सगळ्या सारख्याच होत्या. देवधर्म,सोवळेओवळे,

रीतिरिवाज, नीति-अनीतीच्या कल्पना वगेरे बाबतींतल्या आईच्या निष्ठा पाळणाऱ्या

त्या तिला स्वकीय वाटत आणि धुडकावणाऱ्या त्या परक्या वाटत. अशा अनेक

बाबतीतं माझ्यासारख्या मुलीला तिने जन्माला घातले यात पूर्वजन्मीचे तिचे



पान नं. 26



कोणतेतरी पाप गुंतले असावे अशी तिची भावना असावी. तसे तिने कधी बोलून

दाखवले नाही. पण माझ्या अशा एखाद्या कृतीनंतर तिला जे दुःख आणि वेदना होत

त्यावरून मला हे जाणवे. पण या बाबतीत मीही तिच्याइतकी हट्टी होते. तिला दुःख

होते म्हणून आपण पडते घ्यावे, असे तिच्या हयातील मला कधीही वाटले नाही.





आम्ही परदेशप्रवासाला निघालो तर आमचा प्रवास सुखरूप पार पडो म्हणून ती

सत्यनारायण बोलून गेली. आम्ही परत आल्यावर जोडप्याने बसून तो पुजावा अशी

तिची इच्छा. कारण तो नवस बोलताना म्हणे तिची धारणा तशीच होती. भाईचाही

असल्या गोष्टीवर विश्वास नाही. पण तिची चेष्टा करत का होईना, भाई पूजेला

बसला आणि कथा सांगणाऱ्या भटजींचीही अधूनमधून खिल्ली उडवत त्याने ती पूजा

यथासांग पार पाडली. मी मात्र त्याच्याबरोबर बसले नाही. माझा असल्या गोष्टींवर

विश्वास नाही हे माहीत असताना आईने या नवसात मुळात मला गोवावेच कां ?

आणि विश्वास नसताना केलेली असली खोटी पूजा तिच्या त्या देवाला तरी मानवेल

की ? तरीही आईला सत्यनारायण करायचाच असेल आणि भाई त्याला तयार

असेल तर त्याने माझ्याऐवजी सुपारी लावून पूजेला बसावे असे मी सांगितले; आणि

शेवटी ती पूजा तशीच पार पडली. मग सेपाक करण्यात, इतर कामांत,,वगेरे मी तिला

सर्व मदत केली; पण ही मदत आईला होती. त्या देवाशी या गोष्टींचा काहीही संबंध

नव्हता. खरे तर आईच्या दृष्टीने घरातला तो एक आनंदाचा प्रसंग. मंगल कार्य. पण

त्या दिवशी तिच्या डोळ्याला मधूनमधून पाणी येत होते. माझ्यावर मात्र त्याचा

काडीचाही परिणाम होत नव्हता. ती वाकली होती; मी ताठ होते.



पुढे एकदा बऱ्याच वर्षानंतर त्या प्रसंगाची कशावरून तरी आठवण निघाली आणि

माझ्या त्या हटटी स्वभावाचा निषेध करताना ""कुठे फेडणार आहात ही पापं कोण

जाणे !"" असे ती पटकन बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आले.

त्यावर मी म्हटले.



""मी केवळ पूजेला बसले नाही म्हणून जर मी तुला पापी वाटत होते, तर मग

प्रसादाच्या शिऱ्यापासून कितीतरी सेपाकात वगेरे मी त्या दिवशी तुला मदत केली ती

माझ्या हातची कशी चालली ग ?""



तीही माझीच आई. म्हणाली,""कुठे चालली ?मी तर तुला कशालाही हात लावू दिला

नसता. इतके सत्यनारायण मी करते तेव्हा तू थोडीच असतेच मदतीला ? पण विचार केला,

त्या देवाला डोळे आहेत. नेवेद्याचा सेपाक.तेवढं तरी पुण्य तुझ्या हातून घडू दे.""



मी कपाळावर हात मारून घेतला. त्या दिवशी अशा रितीने माझ्या पदरी पडलेले

पुण्य पुरेसे नव्हते म्हणून तिने मला सद्बुध्दी लाभावी एवढयासाठी म्हणे आणखी एक

सत्यनारायण माहू पूजला होता.



आम्ही- विशेषतः मी- जाणूनबुजून स्वतःचं असं अकल्यमआम करते आणि त्याची

भरपाई करण्यासाठी तिला असे आता या वयात न पेलणारे कष्ट पडतात. माझ्या



पान नं. 27

पोटी तिच्याबद्दल दयामायाच नाही असे पुढेपुढे तिचे ठाम मत बनत गेले होते

असणार. पण हा गेरसमज दूर करायचा उपाय तरी कोमता ? तिच्या समाधानासाठी

मी देवपूजा करणे ? म्हणजे माझा स्वासच मती मागत होती. आई आणि मुलगी हे

आतडयाचे नाते आम्हां दोघींत निश्चितच होते. पण देवाने आम्हां दोघींची स्थाने ही

अशी दोन ध्रुवांवर रोवून ते आतडे तुटेपर्यंत ताणले होते खरे.



माझ्या सासूबाई अश्रध्द मुळीच नव्हत्या. पण त्यांच्या श्रध्दा,देव, धर्म त्यांच्यापुरते

सगळे काही होते. ते त्यांनी कुणावरही कधी असे लादले नाही. खावे,प्यावे,द्यावे,

घ्यावे, चार घटका आयुष्य लाभलेय तर ते आनदात घालवावे, अशा वृत्तीचा हा भाग

होता. अस्तित्ववादी विचारसरणी वगेरेतून निर्माण झालेली ही तात्त्विक भूमिका

नव्हती; तो रक्तदोष( रक्तगुण म्हणू या हवे तर) होता. त्यामुळे लेकी-सुनांशी आणि

मुलांनातवंडांशी त्यांचे खटके उडत ते ऐहिक पातळीवरच्या त्यांच्या अपेक्षाभंगातून

किंवा त्यांच्या मागण्या आणि आमच्याकडून होणारा पुरवठा यांतल्या तफावतीतून

उद्भवत. सुनाकाय, जावई काय, त्यांच्या नातयात आलेली सगळी माणसे ही त्यांनी

त्यांची मानली. मग ती कशीही वागली तरी त्यांना चालत. मी ऋण काढून सण केला

असता तरीही त्यांना विषाद वाटला नसता. फक्त त्या सणात त्यांनाही प्रेमाने

सहभागी करून घ्यावे, इतकेच, आपल्या इतरांपासूनच्या अपेक्षा या अशा छोटया

असोत की मोठया असोत, तपशिलावर बेतलेल्या असोत की त्त्वावर, त्या पुऱ्या

होण्यात नाना तऱ्हेच्या अडचणी असू शकतात आणि हे लक्षात न आल्यानेच आपण

दुःखी होतो. माझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनामुळे बराच काळ त्यांना आर्थिक

ओढाताण सहन करावी लागली हे खरे. पण परिस्थिती सुधारली तरीही त्यांना

मनाजोगे सुख कधीच लाभले नाही. शत्रूच्याही वाटयाला येऊ नयेत इतके आप्त-

स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या वाटयाला आले. पण निवृत्ती मात्र त्यांच्यापासून सदेव

दूरच राहिली. त्यामुळे बाकी सर्व काही असूनही दुर्देवाने त्या असुखीच राहिल्या. कुणी

कितीही दिले, त्यांना बरे वाटावे, खूष करावे म्हणून कितीही धडपडले, तरी त्यातून

त्यांना मिळणारे समाधान हे फक्त क्षणिक असे. वृत्तीतच कुठेतरी अतृप्तीचा आणि

तक्रारीचा सूर घुमताना ऐकू येत असे. अजूनही येतो.



म्हणजे मग मृत्यू काय करतो ? त्याचा प्रभाव, त्याची टांगती तलवार वगेरेला खरेच

काही अर्थ आहे का ? की त्याच्या बाबतीतही `अतिपरिचयात् अवज्ञा' हेच तत्त्व लागू

पडते ? मला वाटते, अनेकांच्या बाबतींत, त्या क्षणी त्याचा घाव जाणवतो, इतकेच. बाकी

इतकी लौकर बरी होणारी एवढी मोठी जखम दुसरी कोणतीही नसेल. स्वतःच्या

स्वभावातून निर्माण होणारे सव मात्र संवेदनाशील माणसांना जन्मभर टोचचत राहतात.



मी सासूबाईंशीबी अधूनमधून वाद घालत आले. त्यांच्या अधिक्षेप न करता त्यांची

चेष्टा करत आले. पण आमचे भांडण असे कधी झाल्याचे आठवत नाही.



पारल्याच्या आमच्या त्या छोटयाशा बेठका घराला वरती एकच खोली होतीय ती



पान नं. 28



भाईच्या वडिलांनी खास त्याच्यासाठीच बांधली होती. आमच्या लग्नानंतर अर्थातच

तीच आमची खोली झाली. आणचे कुणीही पाहुणे,दोस्तमंडळी आली तरी ती मग

आमच्या खोलीतच आमच्याबरोबर राहत. घरच्या इतरांना परकी अशी नाना

जोग, जे. पी. नाईक, भय्या वगेरे मंडळी मुक्कामाला आली तरी ती त्या वरच्या

खोलीत आमच्याबरोबर असत. अशा एखाद्या वेळी भाई कामानिमित्त बाहेरगावी

गेलेला असला आणि मी एकटीच असले तरी माझ्या सासूबाईंनी या पाहुण्यांच्या

वास्तव्याला कधी हरकत घेतली नाही. माणसाच्या सभ्यतेवर, सुसंस्कृतपणावर त्यांचा

विश्वास होता. त्यांच्या तुलनेने माझी आई या बाबतीत फार कर्मठ, सोवळ्या

विचारांची होती. असे प्रसंगक्वचित एकदोनदाच आले असतील, पण त्या वेळी

माझ्या सासूबाईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला फार मोलाचा होता. या

बाबतीत आईपेक्षा त्यांचे पारडे जड होते. आणि ही गोष्ट मी त्यांच्या माझ्या

संबंधातल्या कोणत्याही संदर्भात विसरूच शकत नाही. त्यांच्या वागण्यातून आम्हां

सगळ्यांना अनेकदा मनस्ताप होत आला आहे. त्या त्या वेळी त्यांचा फार रागही

येतो. पण मग मला दयाही येतो. स्वतःपलीकडे दुसऱ्या कुणावर तरी जीव तोडून प्रेम

करण्यातला आनंद त्यांच्या ललाटी लिहिलाच गेला नाही, त्यामुळे जमेची बाजू खूप

असूनही त्यांची ओटी फारशी कधी भरली नाही खरी.



गेल्या काही वर्षांपासून माझ्या अंतर्मनात सुरू असलेली एक प्रक्रिया आप्पा-आीच्या

मृत्यूनंतर जरा तीव्र झाली आहे. मनाच्या खेळात मृत्यूच्या विचाराभोवती पिंगा घालणं

जरा जास्तच व्हायला लागलंय. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नाहीत. पण

या दोहोंना जोडणारा प्रवास तरी ? तोही आपल्या हाती नाही ? अनुकूल किंवा

प्रतिकूल परिस्थितीची ताकद आणि आपले आईबाप आणि पूर्वज यांच्या वारशातून

लाभलेल्या पिंडाची ताकद या दोन ताकदींची गुंतागुंत. त्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीतून

निर्माण होणारी सुखदुःखे सगळेच परस्वाधीन. त्यातला अहंकारी `मी' हा तरी मुळात

मनाजोगा असावा ! तो `मी' म्हणजेच पिंड ना ? आई-बाप, पूर्वज या साखळीतले काही

दुवे आणि त्यांत आपल्या निर्मितीमुळे पडलेला आणखी एक वळसा. हे सगळं मोठं

विचित्रच आहे.



मी मृत्यूचा विचार करते,म्हणजे नक्की काय करते ? माझ्या डोळ्यांपुढे दोनतीन

प्रसंग पटकन येऊन जातात. मी खूप लहान होते, धामापूरला आजीकडे होते.

पावसाळ्याचे दिवस. खूप रान वाढलेले. त्या काळी त्या भागात संडास ही गोष्टच

नव्हती.

पान नं. 29 शब्द :-1597



शेतात कुठेतरी जायचं. मी जाऊन बराच वेळ झाला म्हणून आजी शोधायला

आली. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती त्या दिशेला आली.

माझ्यासमोर जवळच काही अंतरावर एक नाग वेटोळं घालून, फणा काढून ऐकत (?)

होता, आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होते.- त्याला काहीतरी सांगत होते. मला ही

सवयच होती. कावळा,चिमणी, मुंग्या, तांदळातल्या किडी, हालती पाने-फुले, झाडे

यांच्याशी बोलताना पाहून""अशांनी एक दिवशी वेड लागेल !""असे आईही

म्हणायची. धामापूरच्या त्या वेळच्या आमच्या घरात भिंतीवर एक खूप मोठठे नागोबाचे

चित्र रंगवलेले असे. दरवर्षी नागपंचीमीच्या आधी ती भिंत सारवून नवा नागोबा

रंगवला जाई. आणि नागपंचमीला त्याची यथासांग पूजा होई. ती एक संरक्षक देवताच

मानली जाई. खरा नागदेखील कधीमधी दिसे. पण तरी त्याला मारायचे नसे. आजी

त्याला राखणदार म्हणे. मी ज्याच्याशी बोलत होते तो इतरत्र कुठेही दिसला असता

तरी आजीने हात जोडून त्याला ""राखणदारा,भलं कर बाबा सर्वांच"" असेच म्हटले

असते. पण तो रक्षणकर्ता असला तरी शेवटी विषारी जनावरच ते. त्याच्यापासून

किती दूर राहायचे याची अक्कल माणसाला हवी. त्या वयात मला ती निश्चितच

नव्हती. भिंतीवरचा नाग तर चोवीस तास घरातच असे. त्याला मी हातदेखील लावत

असे. त्याच्या फणेवर गंध-पुष्पे लावली जात. हात जोडून नवस बोलले जात. त्यामुळे

असेल कदाचित, पण या खऱ्या नागाचे मला जरादेखील भय वाटले नव्हते. आणि

म्हणूनच मी त्याच्याशी बोलत बसले होते असेन.त्याला संरक्षक देवता मानणारी

आजी मात्र भलतीच घाबरली आणि मला मागच्या मागे बकोटीला धरून उचलून

धावत घरी आली. मग मला देवाच्या पायावर घालणे, भिंतीवरच्या नागोबापुढे

स्वतःचे आणि माझे नाक,डोके घासणे वगेरे बरेच काही आजीने केले. मला न

समजणारे बरेच समजावूनही सांगितले. त्याचले काहीच आता आठवत नाही. पण

मृत्यूचा विचार आला की हा प्रसंग न चुकता आठवतो.



दुसरा प्रसंग खूप मोठया वयातला आहे. आम्ही दिल्लीला होतो. साठ सालची

गोष्ट असावी. संध्याकाळ झाली होती. भाई ऑफिसमधून घरी येऊन टेबलावर

`अपूर्वाई' या प्रवासवर्णनातला पुढला भाग लिहित होता आणि मी समोरच बसून

पूर्वीच्या भागाची `किर्लोस्कर' ला पाठवण्यासाठी प्रेसकॉपी करत होते. आभाळ भरून

आले होते. खोलीत दिवा, पंखा लावून आमचे काम चालले होते. अचानक गडगडाट

सुरू झाला. ती मेघगर्जना तर होतीच, पण पृथ्वीच्या पोटातूनही काही विचित्र आवाज

येताहेत असा भास झाला आणि सगळं थरथरायला लागलं. आम्ही दोघंही

एकमेकांकडे पाहून ""धरणीकंप! असे म्हणत जागचे उठलो. आम्ही वरच्या

मजल्यावर राहत होतो. पंडारा रोडला, मधे मोठे मोकळे मेदान आणि भोवताली ही

सरकारी घरे होती. धरणीकंप झाला की इमारती कोसळतात, तेव्हा घर सोडून शक्य

तितक्या लौकर उघडया जागी जाणे आवश्यक असते, हे आम्हां दोघांनाही माहीत

होते. भाई धावत खाली उतरून मेदानात गेला. जाता जाता त्याने आमच्याकडे



पान नं. 30



कामाला असलेला पोरगा भेदरून रडायला लागला होता त्यालाही खाली नेले.

भोवतालच्या सर्व घरांतली बहुतेक सगळी माणसे धावत मेदानात गोळा झाली होती.

मी मात्र प्रथम दिवा आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत म्हणून

त्यावर पेपरवेट ठेवले. भाईने पेन उघडेच टाकले होते ते नीट बंद करून खणात

टाकले. खाली उतरताना घराला कुलूप घातले. मी खाली जाऊन पोचेपर्यंत धरणीकंप

कधीच थांबला होता. त्यानंतर पुढले काही दिवस माझी ही वर्तणूक हा आमच्या

मित्रमंडळीत चेष्टेचा विषय होता. या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे झाली. पण मृत्यूचा

विचार म्हटला की हाही प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसा लख्ख उभा राहतो.



तिसरा प्रसंग मात्र अगदी याच्या उलट आहे. मला वाटते, शेहेचाळीस सालच्या

ऑक्टोबरातलीच गोष्ट असावी. दिल्लीजवळ ओखल्याला डॉ. झाकीर हुसेन यांची

जामिया मिल्लिया इस्लामिया ही संस्था. भय्या (मीर असगर अली )हा तिथला विद्यार्थी.

त्या संस्थेचा रौप्यमहोत्सव होता. त्या निमित्ताने प्रथम ओखल्याला, मग मीरतला

कॉग्रेसचे सेशन होणार होते तिथे, आणि परतताना उत्तर हिंदुस्थानातली प्रसिध्द स्थळे

पाहायला, असा दौरा आखून भय्याबरोबर भाई आणि मी जायचे नक्की केले होते.

आयत्या वेळी भाईचा बेत रजा न मिळाल्याने रद्द झाला आणि भय्या आणि मी

दोघेच दिल्लीला आणि तिथून ओखल्याला गेलो. माझी उतरायची व्यवस्था प्रो. आगा

अश्रफ यांच्या घरी होती. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर सभारंभ पहिल्या

दिवशी पार पडला. गांधी,नेहरू,आझाद,जिना वल्लभभाई, राजाजी, सरोजिनी

नायडू-- नाव घेण्यासारखा त्या काळचा देशातला प्रत्येक राजकीय पुढारी त्या प्रचंड

स्टेजवर बसला होता. अनेकांची भाषणे झाली. सभारंभानंतर जवळपासचे म्हणजे

दिल्लीहून वगेरे आलेले पाहुणे परत गेले. जेवणे, गप्पा होऊन आम्ही झोपलो.

मध्यरात्री प्रचंड आरडाओरडा ऐकू आला आणि मी जागी झाले. घरातले इतरही

लोक उठले होते. फाळणीपूर्वीचा तो काळ. ठिकठिकाणी मधूनमधून जातीय दंगे

उसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारच्या गावातून हिंदुंचा प्रचंड जमाव हातांत

पलिते घेऊन मुसलमानांचे हे विद्यापीठ जाळायला हल्ला करून येत होता.`हर हर

महादेव' च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले,

""घाबरू नको. काही होणार नाही. ते लोक खूप दूर आहेत. पोलिसांची गस्त चालू आहे.""



हे जरी खरं होतं तरी मी भेदरून थरथरत होते. हा प्रसंग आठवला म्हणजे न

चुकता मला माझी भयंकर लाज वाटते. मी मृत्यूला घाबरले म्हणून नव्हे. ती प्रतिक्रिया

नेसर्गिकच होती. त्यात कमीपणा मानायचे काय कारण ! पण मला शरम वाटते ती

त्या क्षणी माझ्या डोक्यात क्षणभर का होईना, पण येऊन गेलेल्या एका विचाराची.

मला वाचले, मुसलमानांना मारायला आलेले हे हिंदू. मी त्यांच्यातलीच आहे, हिंदू

आहे हे त्यांना कळणार नाही आणि मला निष्कारण मरावे लागणार.



`मी त्यांच्यातलीच आहे' म्हणजे काय ? मी धर्म मानत होते का ? त्या काळी

भय्याइतका जवळचा मला दुसरा कुणीही मित्र नव्हता. घरदार, नातीगोती, कोणतीही



पान नं. 31



बंधने न मानणारी मी, सुंदर जीवनमूल्यांना जिवापाड जपणारी मी, क्षणभर का

होईना पण त्या अविचारी जमावाला `आपला मानते ? प्रसंग आलाच असता तर

प्रो. आगा अश्रफ आणि त्यांच्या घरातल्या इतरांनीही त्यांच्या घरच्या माझ्यासारख्या

पाहुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली असती, हे त्या क्षणीही मला

कळत होते. त्यांचा तो धर्मच होता. त्या क्षणी त्या मुसलमानांतला माणूस जागा झाला

होता आणि माझ्यातला हिंदू डोकं वर काढू पाहत होता. हल्ला करून येणाऱ्यांचा लोंढा

परतून सगळे स्थिरस्थावर होण्यात अर्धाएक तास तरी गेला असेल. तो महाभयंकर

विचाराचा क्षण कधीच मागे गेला होता. प्रत्यक्ष प्रसंग आलाच असता तर स्वतःवर सूड

काढण्यासाठी मी कदाचित सर्वांत अधिक धेर्य आणि माणुसकी दाखवली असती. इतर

कुणाला काहीही कळले नाही; पण मला मात्र माझं एक वेगळंच दर्शन झालं होतं.



या वृत्ती एरवी कुठे असतात ? प्रसंगी केवढी उसळी मारून ज्वालामुखीतून

विध्वसंक लाव्हा अचानक उफाळून यावा तशा येतात ! या एवढयाशा जीवात असं

काय काय एकवटलेलं असतं आणि संस्कार करून न घेता स्वतंत्र अस्तित्व बाळगत

असतं ? आपल्यालाच आपण अद्याप ओळखलेले नाही.



भीती ही शारीरिक असते की मानसिक ? माझ्या असे लक्षात आलेय, की इतरांच्या

दृष्टीने अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या काही प्रसंगी मी शारीरिक आणि मानसिक दोन्ही

दृष्टींनी अगदी अळुमाळू होऊन भेदरून लागते आणि जिथे सर्वसामान्यांचे

धेर्य खचते तिथे मी अगदी सहजतेने वावरू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर

अगदी जवळच्या व्यक्तीचादेखील आजार, अगर मृत्यू, अपघात, ऑपरेशन, वेडा,

राजकीय लढयातील दंडुकेशाही किंवा गोळीबार, आग, युध्द, असल्या गोष्टींचे अगर

नेसर्गिक आपत्तींचे मला कधीच भय वाटलेले नाही. पण दारू पिऊन झिंगलेला माणूस,

चोरी, मारामारी, दंगे, अगदी चित्रपटातले बॉक्सिंग किंवा कुस्तीचे दृश्य, असल्या गोष्टी

मी पाहू शकत नाही. मला कसेतरीच व्हायला लागते. मळमळायला लागले, थरथरायला

लागते, आपल्याला भोवळ येईलसे वाटू लागते. मी क्राइम-स्टोरीज वाचू शकते, म्हणजे

वाचताना ती दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतातच ना ? पण त्या वेळी असे काही होत नाही.

प्रत्यक्षात मात्र अशा वेळी माझी मी राहतच नाही. म्हणजे निश्चित काय ?

मला वाटते, माझ्यातले जिवाला अतिशय घाबरणारे, दुबळे, नेसर्गिक अस्तित्व

अशा वेळी जागृत होऊन माझ्या संस्कारित अस्तित्वावर मात करते. म्हणजेच मला

वाटते माणसाला दोन पिंड असावेत. एक आई-बाप आणि पूर्वज यांच्यापासून

लाभलेला आणि पुढे आपल्या वंशजांचे आपण पूर्वजच होणार या अर्थाने आपल्या

स्वतःच्या आयुष्यातल्या नव्या अनुभवाने थोडा बदलेला असा संस्कारित पिंड; आणि

दुसरा आदिमायेकडून (इथे मूळ शब्द `आदिमाया' नसून `आदिमाय' असा असायला

हवा ) लाभलेला, कोणतीही संस्कार करून घ्यायला राजी नसलेला मुळ पिंड. वाटले तर

असे म्हणून या, की भूगोलावर आधारलेले जिवंत शरीर म्हणजे हा मूळ पिंड आणि



पान नं. 32



इतिहासावर आधारलेले मन हा संकरित पिंड. म्हणजे मग हे द्वेत झाले. आजचे

वेद्यकशास्त्र हे शरीर आणि मन यांचे अद्वेत मानण्याकडे झुकत असताना हा

द्वेतविचार योग्य आहे का ? अचूक आहे का ? मलाही शंका आहे, पण त्याबरोबरच

हा विचारही आहेच.



आता वय उताराला लागलंय. स्वतःच्या प्रकृतीची मी कधीच काळजी केलेली

नाही. तेव्हा मला काय वाटतं याची काळजी न करता आता प्रकृतीने मला इंगा

दाखवायचं ठरवलं तर मला तक्रार करण्याचा अधिकार नाही. आपल्याला शेवटचा

आजार कधी येईल आणि कोणत्या स्वरूपाचा येईल हे जरी अनिश्चित असलं आणि

आपल्या हाती नसलं तरी त्या वेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचं आपल्याशी जे

वर्तन राहील ते बरंचसं आपलं आयुष्यभर त्यांच्याशी जे वर्तन राहिलं त्यावरच

अवलंबून असणार.त्यामुळे या बाबतीत कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवण्याचा

मला अधिकार नाही. मी मला वाटले तसेच वागत आले, इतरांना काय वाटेल याचा

विचार कधीच केला नाही. म्हणजे मी माझ्यासाठीच जगले, इतरांसाठी नाही. मग मी

मरताना इतरांनी स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ आणि काही शक्ती माझ्यासाठी कां

खर्च करावी ?



म्हणजे मग हा प्रश्न सोडवायचा एकमेव उपाय म्हणजे आत्महत्या का ?



स्वतःच्या विचारानेच जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींनी खरं तर एकटं राहावं,

एकटं जगावं, एकटं मरावं. हा विचार आला की मला न चुकता फक्त माझ्या आजीची

आठवण येते. तिचा- माझा सहवास माझ्या लहानपणी घडला तेवढाच. पण आम्हां दोघींचा

एकमेकींवर इतका जीव होती, की आयुष्यातला अत्यंत सुखाचा काळ कुठला या प्रश्नाला,

लहानपणी धामापूरला होते तो, किंवा धामापूरच्या आजीच्या सहवासात गेला तो, इतकेच

उत्तर मी देऊ शकेन. या आजीचे मला दिसलेले रूप फार सुखद आहे आणि तिच्या

पूर्वायुष्याची वाडवडिलांकडून कानावर आलेली कहाणी विलक्षण आहे.



तसे आम्हां दोघींचे रक्ताचे नात नव्हते. ती माझी सावत्र आजी. आम्ही ठाकूर

धामापूरचे. माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते. त्यांच्या

घोडयाच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसे

ते रूबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार.

त्या मोठया कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे

मालवणपासून बारा मेलांवर आहे. मालवणहून नेहरूपाराला नदीपाशी येणारा रस्ता

धामापूरला जातो.





No comments: