Showing posts with label जी ए. Show all posts
Showing posts with label जी ए. Show all posts

Sunday, May 10, 2009

जी ए

कधी तरी (कुसुमगुंजा)
अनुभव कोणाला चुकले नाहीत. पण त्यांचे रुपांतर जर आठवणीत झाले तर मात्र आणखी एक बंधन जखडलेलेच. म्हणून आत्ताच फार वाटते, या दैनंदिन आयष्याचे मलीन वस्त्र फेकून द्यावे व वेळ आहे तोच निसटावे. जाताना दोन-चार व्यक्तींचा निरोप घ्यावा. पण नको. नेमका त्यांचाच तर निरोप नको. नाहीतर जायच्या वेळीच एकाद-दुसरा शब्द स्पष्ट व्हायचा. मुद्दाम काळजीपूर्वक लपवून ठेवलेल्या भावना प्रकट व्हायच्या आणि आणखी एक पाश भोवती पडायचा. तेव्हा नको. त्या भावनांना शब्द नको. उत्कटतेला वाचा नको. भरल्या खोलीतून मागून हळूच जावे, त्याप्रमाणे बाहेर पडावे व निघून जावे. त्यांना नकळत, पण त्यांना आठवत त्यांच्याविषयीच्या भावना घेऊन, त्या पण मूक ठेवून

माणसे: अरभाट आणि चिल्लर
सत्याचा नेहमीच विजय होतॊ - आज ना उद्या ! हे सुत्र कधीच खोटे ठरवता येत नाही, कारण त्यातली मेख आहे ती आज ना उद्या या शब्दात ! माणसाचे आयुष्या टीचभर व काळ अनंत आहे. शतकानुशतके गेली तरी पुन्हा कोडगेपणाने हसत ’आज ना उद्या’ असे म्हणत स्वतःचा आब राखता येतो. पण माणसाची माती देखील नष्ट होऊन जाते आणि तो सत्याच्या विजय-परभवच्या पलीकडे गेलेला असतॊ. म्हणजे एखाद्या दरिद्री माणसच्या हातावर कागदाचा तुकडा ठेवून त्याला ’यावर लिहिलेली प्रचंड रक्कम दोनशे लक्ष वर्षे आठ महिने एकोणतीस दिवसांनंतर तुझ्या मालकीची होईल, व तुझे दरिद्र्य नष्ट होईल’ असे सांगण्यासरखे आहे.
देव संकटकाळी मदतीला धावतो, भक्तांना तारतो, ही देखील असलीच सवंग वाक्ये. काकराज, तुम्हीच सांगितले ना की सारे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होते? म्हणजे आमचे रक्षण करण्याची त्याला ईच्छा झालीच तर कुठे तो आमचे रक्षण करणार ! संकटे निर्माण करणारा तोच, त्यांतून तारणारा तोच, आणि तशी इच्छा झाली नाही की नष्ट करणार तोच ! त्याच्या इच्छेची वाट पाहत युगे जातील व त्याच्या मदतीची गरजच रहाणार नाही. व्रत-वैकल्ये, जपजाप्य, नवस, भजन, पूजन असल्या उपायांनी त्याच्या मनात आपल्याला अनुकूल अशी इच्छा निर्माण करता येईल, इतका का तॊ बोटचेपा आहे ? असली माणसे आम्हांला खडोगणती माहीत आहेत. पण परमेश्वर देखील तसाच ? छ्ट, त्यावर विश्वास ठेवणे मुढांना अशक्यच आहे. उप्परवालेके घर में देर है, लेकिन अंधेर नहीं !, वा, काय सुरेख अनुप्रास जुळले आहेत ! पण देर तरी का असावा ? ते घर म्हणजे आम्ही दररोज पाहतो तसली कचेरी आहे की काय ? अंधार नाही, प्रकाश आहे का ? चांगली गोष्ट आहे. पण दिवे जळत आहेत म्हणून तत्परतेने काम चालू आहे, असा अर्थ होत नाही. आमच्या कच्ये-यांत रात्रीच काय, दिवसा देखील दिवे जळत असतात. पण बहूधा तेथे कुणीच नसते, किंवा रेकॊर्ड रुमच्या वातवरणात रमीचा डाव, अगर ओली पार्टी चाललेली असते. सगळीकडे नुसते वायदे, आणि वसूल न होणारी उधारी !

माणसे: अरभाट आणि चिल्लर
- आधी शिक्षा, नंतर निर्णय हे तूला चमत्कारीक वाटले, अँलिस, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षांनी तुला तसे वाटणार नाही. आपल्या आयष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कूठे तरी आपल्या सगळ्या कृत्यांचा, कर्माचा हिशोब होतो. निदाण शहाणे तरी तसे सांगत असतात. पण त्याआधीच जगताजगता आपली शिक्षा सुरू झालेली असते

Wednesday, November 26, 2008

निरोप : जी ए

सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांनो, मी हीन-दीन दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात, क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे दिसले तरी ते रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे.

म्हणून द्वारपालांनो, माझ्यासाठी दिंडी उघडताना तुमच्या वागण्यात थोडी नम्रता असू दे. तुमच्या शब्दात थोडा आदर दिसू दे. कारण धुळीने भरलेल्या अनवाणी पण रोख पावलांनी मी येथे येत आहे. आता मी निघालो आहे म्हणून हे कालपुरुषा, तू मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे. तू माझ्यापासून खूप हिरावून घेतलेस. माझ्या आशा, माझी स्वप्ने, माझी आवडती माणसे तू माझ्याकडून लुबाडून घेतलीस, आणि मला निर्दयपणे दरिद्री केलेस. त्यामुळे मी तुझ्यावर अनेकदा संतापलो, द्वेषाने जळत राहिलो हे खरे आहे. पण त्याचा कसलाही सल आता मनात ठेवू नकोस. आता निघण्याच्या क्षणी तर माझ्या मनात कसलेच वैषम्य उरले नाही. शिवाय पूर्वी देखील मी उगाचच तुझा द्वेष केला, ही जाणीव आता मला झाली आहे. मला जे सुख मिळाले ते तुझा माझ्यावर विशेष लोभ होता म्हणून नव्हे, त्याचप्रमाणे ज्या यातना मला भोगाव्या लागल्या त्या देखील तुझा माझ्यावर राग होता म्हणून नव्हे. मी तुझ्यासमोर असाहाय्य होतो, पण तू देखील एका अविरतपणे फिरणाऱ्या चक्राला बांधलेला असल्यामुळे असाहाय्य होतास. त्या त्या गोष्टी तू घडविल्या नाहीस, त्या गोष्टी तुझ्याकडून घडवल्या गेल्या. दर क्षणाला अनंत बुडबुडे नष्ट होतात, त्यामुळे प्रवाहात काही रितेपणा येत नाही.

तर एक विशेष ध्यानात घे. जीवन इतके अनंतरुप आहे की अगदी संपूर्णपणे माझ्यासारखेच आयुष्य असलेला माणूस पूर्वी कधी झाला नाही व पुन्हा कधी होणार नाही. त्या दृष्टीने प्रत्येक सामान्य माणूस देखील अद्वितीय असतो. मी गेल्यानंतर एक अव्दितीय भावविश्व पूर्णपणे विरुन जाणार आहे. ते पुन्हा कधी जन्मणार नाही. तेव्हा त्याला निरोप देताना तुझा मनात आता कसलीही कसर ठेवू नकोस. मी येथून कोठे जाणार ते मला माहीत नाही. मी कदाचित शून्यातून शून्य होऊन जाईल किंवा इथल्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण आणि सुसंगत अशा ठिकाणी जाईन. त्या ठिकाणी एक तर तुला येता येणार नाही किंवा तू आलास काय, नाही आलास काय, याला 'आला वारा गेला वारा' यापेक्षा जास्त अर्थ आणि साफल्य असणार नाही. मी पुन्हा या वाटेने कधी येणार नाही. म्हणजे ही आपली शेवटची भेट आहे.

काही झाले तरी माझ्या आयुष्यभर तू सांगाती सहप्रवास केलास. आता आपले मार्ग निराळे होत आहेत. अशा या अंतिम क्षणी तू मला मुक्त मनाने निरोप दे. कारण आता मी निघालो आहे. मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे.

कुसुमगुंजा