><सौ. वीणा गवाणकर>
<एक होता कार्व्हर><दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन><पुणे>
आवृत्ती :- आवृत्ती पाचवी
एकूण पाने :- 18
FROM 1 TO 118
---------------------------------------------------------
+
पान नं.1
""ए ! चल, उठतोस की येऊ मीच तिकडे ?"" मोझेस बाबांची
दमबाज हाक ऐकून ते काळं, बारकं पोर दचकून उठलं. अजून पुरतं
उजाडलंही नव्हतं. पण मोझेसबाबाला कुठला तेवढा धीर ?
""तुझ्याएवढी पोरं बघ कशी धारा काढतात,गुरं राखतात. कोंबडया-
डुकरांची देखभाल करतात. पण तुझे असले हे काडयामुड्याचे
हातपाय आणि हे असलं मुकं तोंड ? काय होणार तुझं ते देवास
ठाऊक !""
""नका हो असं करवादू!"" सुसानबाई आपल्या नवऱ्याला -
मोझेसला-चुचकारत म्हणाली,""केवढंसं पोर ते. काल दिवसभर
काम करून थकलंय.""
""पण मला आता शेतात कोण मदत करील ? खिशात ना पेसा ना
अडका. लागवडही नीट झालेली नाही. अशा आळसानं उभ्या पिकाची
नासाडी व्हायची."" मोझेसबाबा कुरकरले.
""काही काळजी करू नका. ईश्वरकृपेने सारं ठीक होईल. अहो ! हा
दुबळा पोरसुध्दा बघा. काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो !""
""हो ! होईल !एक घोडा होता तोही या पोरापायी गमावला.""
झालं होतं. काय-अमेरिकेतील मिसोरी राज्यातील, डायमंड ग्रोव्ह
(Diamond Grove) पाडयावर मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन
शेतकरी आपली पत्नी सुसान हिच्यासह राहात असे. त्याच्या घरी
""मेरी"" नावाची गुलाम निग्रो स्त्री होती. ज. ग्रॅटकडून त्याने ती
700 डॉलर्सना विकत घेतली होती. वास्तविक मोझेस कार्व्हरला
पान नं. 2
गुलामगिरी पसंत नव्हती. माणसं विकत घेणं अमानुषपणाचं वाटे. पण
शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी अन्
सोबतीसाठी कोणी असावं, म्हणून त्यानं ""मेरी"" विकत घेतली होती.
तिला आपल्या घराजवळच्या गोठयाशेजारी एक लाकडी
खोपटही बांधून दिलं होतं. तिचा नवरा दुसऱ्या एका मळेवाल्याकडे
लाकडे कापण्याच्या कामावर मजुरी करायचा. मधून मधून तो आपल्या
बायकोला-मेरीला-भेटायला येई. एके दिवशी तिला बातमी मिळाली
की, दोन महिन्यांपूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला. गुलामीचं जिणं !
बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं
दुःखाचे कढ सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी
""डायमंड ग्रोव्ह"" दचकून उठलं. 1860 -62 च्या सुमाराची ही
घटना. गुलामांना पळवून,विकायचं हा मोठा तेजीचा धंदा झाला होता.
मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली. रातोरात तिला पळवून
नेण्यासाठी धाड पडली होती. मेरीच्या किंकाळ्यांनी जाग आल्यावर
काय घडतंय याची कल्पना क्षणार्धात मोझेसबाबांनी आली. ते आपली
बंदूक सरसावून मेरीच्या खोपटाकडे धावले. पण उशीर झाला होता.
दूरवर जाणारा घोडयांच्या टापांचा आवाज ऐकत ते हताश होऊन
नुसतेच उभे राहिले.
सुसानबाई घराबाहेर आल्या. मेरीच्या खोपटापाशी जाण्याचं त्यांच्यात
त्राण नव्हतं. मोझेसबाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपटाकडे
गेल्या. मेरीच्या मोठया मुलीला या धाडीत जिव्हारी मार बसला होता.
ती शेवटचे आचके देत होती. मधला मुलगा ""जिम"" अजूनही थरथर
कापत, अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता. धाकटा दोन महिन्यांचा पोर
आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं. होतं. त्या रात्री त्या खेडयातले
बरेच निग्रो गुलाम पळवले गेले. कार्व्हर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या
मदतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला,उमदा घोडा देऊ
केला. त्याच्या त्या उमद्या घोडयाच्या मोबदल्यात तो परत काय
पान नं. 3
मिळवू शकला ? तर मेरीचा दोन महिन्यांचा मरणोन्मुख मुलगा. मेरी
नाही !
साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सेडली होती. जेमतेम श्वासोच्छ्वास
करणारं ते काळं मुटकुळं, कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत
नव्हतं. पण सुसानबाईनी आशा सोडली नाही. त्यांच्या शुश्रूषेला फळ
आलं. तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला. त्याचा तो छाती
फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून
कोणाला वाटलंही नसतं की हे पोर जगेल ! फक्त सुसानबाई मात्र
जिवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवीत होत्या. त्यांच्या दीर्घ
परिश्रमांना यश आलं. त्या पोरानं जीव धरला. तो हळूहळू चालू
लागला. खाऊ लागला. पण वारंवर उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या
उबळीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं. त्याला बोलता येत नव्हतं.
मेरीचं पुढं काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही. त्या उत्तम,
उमद्या घोडयाच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमेकरी,दुबळा,
मुका पोर मात्र कार्व्हरच्या घरात वाढत होता. त्याच प्रसंगाची
मोझेसबाबांना आठवण झाली. सुसानबाईंच्या त्या शुश्रूषेत,देखभालीत
त्यांचाही वाटा होता. `मेरी' ला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं
नव्हतं. मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती. ही ममता सुसानबाई
जाणून होत्या.
अमेरिकेतील राज्याराज्यांतील यादवी संपली होती. गुलामगिरी
कायद्यानं नष्ट करण्यात आली. यादवीपायी विस्कळीत झालेले जीवन
पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले होते. शेतीवाडी करायला उसंत मिळू
लागली होती. युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं.
डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजाच्या ""ओझार्क"" टेकडया फळाफुलांनी
बहरू लागल्या होत्या. बहरलेल्या निसर्गात कार्व्हरचा तो अनाथ
पोर सुखावत होता. आता तो दहा-एक वर्षाचा झाला होता. मोझेस-
पान नं. 4
बाबांनी गुरांची,बागेची परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर
सोपवलं होतं. तोही ती कामं मोठया हौसेने करी. शिवाय जवळच्या
झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेबाबांच्या
परसूत लावायची, बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार
करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास
आवडीचा छंद. त्यातच त्याचा फावला वेळ जायचा.
नव्यानंच शेजाराला आलेल्या सौ. म्युलरबाई एकदा गप्पागोष्टी
करायला सुसानबाईकडे आल्या होत्या. चहापाणी झाल्यावर
सुसानबाईंनी आपली छोटी, सुरेखशी बाग त्यांना दाखवली. पण त्या
छोटयाशा बागेतील अनेक फुलझाडे सौ. म्युलरना ओळखता येईनात.
सौ. म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या, तेव्हा सुसानबाईनी
आपल्या `माळ्याला' हाक मारली. छोटा माळीदादा गुणगुणत समोर
येऊन उभा राहिला.
""काय हो ! तुम्ही तर म्हणत होता की, याला बोलता येत नाही
आणि हा तर चक्क गुणगुणतोय !""
""खरोखरच तो मुका आहे. दोनचार शब्दांपलीकडे त्याला बोलता
येत नाही.पण फुलं,फळं,झाडं,कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र
तो नेहमी असंच गुणगुणतो. त्याची आईसुध्दा काम करताना अशीच
गुणगुणत असायची. याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं.""
छोटा माळी आणि त्याची ती अद्भूत छोटी फुलबाग पाहून सौ.
म्युलरना आपले आश्चर्य लपविता आले नाही. त्यांनी त्या मुलाची
पाठ थोपटली. पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला. ""खरंच
का या लोकांना झाडातलं काही कळतं ? की नुसतं हे कौतुकापुरतं
असतं ? झाडाकडे ""लक्ष"" द्यायला यांना जमतं का ?""
मोझेबाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय
अनेक वेळा आला होता. त्याच्या सूक्ष्म अवलोकाचा,निरीक्षणशक्तीचा
त्यांना अंदाज येऊन चुकला होता. झाडावरची अगदी बारीकशी कीडही
पान नं. 5
त्याच्या नजरेतून सुटत नसे. घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी
सुरक्षित असत. त्यामुळे मोझेसबाबा त्याच्यावर खूष असत.
या एकाकी,अबोल मुलाचा मित्रपरिवार -मुलखावेगळाच होता.
रानावनातील झाडं-झुडपं,पक्षांची पिल्लं,डबक्यातले छोटे मासे हाच
त्याचा गोतावळा. वेळप्रसंगी मोझेसबाबांच्या चापटया खाऊनही या
""मित्रांची"" संगत तो चुकवीत नसे. एकदा त्याने पालापाचोळा,गवत
दोरा,सूत गोळा करून इतकं सुरेख अन् हुबेहूब घरटं बनवलं की,
सुसानबाईंना शपथेवर लोकांना सांगावे लागे ""हे आमच्या मुक्या
पोरानेच बनवलंय !""
तो झाडा-प्राण्यांच्या संगतीत रमे. मनसोक्त गुणगुणत राही. अगदी
भान विसरून ! पोटावर पालथं पडून तासन् तास एखाद्या अंकुराचं
किंवा वाळवीचं निरीक्षण करीत राही. त्याच्या या दोस्तांच्या सह-
वासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी-खुपणी, आजारपणं
कळत. त्यांच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत.
आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही एक मग चालतं-बोलतं
झाड बने. त्यांच्या सहवासात तन्मय होई. ""झाडांची देखभाल कशी
करावी, त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्याच्या-
कडून शिकावं,"" मोझेसबाबा कौतुकानं म्हणतं.
आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोटया माळ्याला
आपल्या बागेतल्या झाडांचे दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून
बोलावणे येई. मग हा इकडची झाडे तिकडे लाव. याला झाडीत नेऊन
ठराविक ठिकाणी लावून ये, त्याची आळी भुसभुशीत कर,
पलीकडल्याच्या फांद्या काप-असं काहाबाही करून, बाग दुरूस्त करी.
चारआठ दिवसांनी झाडीत नेऊन लावलेलं रोपटं अलगद काढून आणी
आणि त्या बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं
रूपच पालटून जाई. त्याच्याही अनुभवात भर पडे. ज्ञानात भर पडे.
सौ. बेनयामबाईंचे गुलाब - "" यांना गुलाबच म्हणायचं का ?"" अशा
पान नं. 6
अवस्थेला आले होते. आपली बाग पाहून ती खंतावत होती. एका
दुपारी ती सुसानबाईकडे गेली. छोट्या माळ्याला घेऊन घरी आली.
त्याला बागेत सोडून घरात गेली. त्याने गुलाब तपासले. घराभोवती
चक्कर टाकली. आपलं काम केलं. काय केलं ते सांगायला घरात शिरला
अन् दिवाणखान्यातच थबकला. काय सुरेख रंगीत चित्रं होती ती.
जन्मात प्रथमच पहात होता तो. किती तरी वेळ तो त्या
चित्रातील रंग न् रेषा न्याहाळत होता. कधीपासून बेनयामबाई
आपल्यासाठी उभी आहे, हे त्याला कळलंच नाही.
""बाळा, तुला चित्रं रंगवायला आवडतं का रे ?""
""मी मी मला"" नेहमीप्रमाणे तोतरेपणा आड आला.
""तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास नं.?""
""ऊन पाहिजे न् जागा बदलली."" अक्षराला अक्षर अन् शब्दाला शब्द
जुळवत कसंबसं तो बोलला. साफ मुकेपणा जाऊन अलीकडे तो तोतरं
का होईना पण चार-दोन शब्दांचं वाक्य करू लागला होता.
बेनयामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिले.
गुलाबांची जागा बदलली होती. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा
ठिकाणी झाडं लावली गेली होती.
""छान माझं काम छान केलंस हं. हे घे तुला "" असे म्हणून त्यांनी
त्याच्या हाती नाणे ठेवले. ते घटट मुठीत धरून तो निघाला. आता
त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं. ती रंगीत चित्रे
डोळ्यासमोर नाचत होती.
घरी आल्यावर त्यानं आपल्या तोतऱ्या भाषेत सुसानबाईंना नाना
प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखान्यातील रंगीत चित्रांच्या तसबिरी-
समोर उभे करून परत परत विचारू लागला. त्याचं हे तसं बोलणं
समजून घेत सुसानबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. रंग अन् रेषा
समजावून दिल्या. झालं ! नवा छंद सुरू.
पान नं. 7
झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगीबेंरगी फुले, फळे, पाने
कुटून कुस्करून रंग बनवी. पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी. मग लाकडी
फळकुटावर,काचेच्या फुटक्या तावदानावर, अगदीच काही नाही, तर
स्वच्छ कातळावर चित्रे काढून रंगवणं सुरू होई.
त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्याने मोझेसबाबांबरोबर
शेतात कष्टाची कामे करी. पण हा दुबळा अन् नाजूक असल्याने
नेहमी सुसानबाईभोवतीच घोटाळत असे. त्याची चौकस नजर, त्यांच्या
हाताचं कसब टिपत असे. त्यांचं ते चुली लिंपणं,लोकर पिंजणं,
कातडी कमावणं,मेणबत्त्या बनवणं. मसाले तयार करणं. झालंच तर
पाव,बिस्किटे,पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या
गोष्टी तो पाही आणि आपल्या परीने तशा करत राही. सुसानबाईही,
""हा कसल्याच कामाचा नाही तर निदान हे तरी शिकू दे."" म्हणून
त्याला बारीक-सारीक गोष्टी दाखवी. साखर अन् कॉफीखेरीज अन्य
काही त्या विकत घेत नसत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने
करीत. हाही पुष्कळशा गोष्टी शिकला. तरबेजही झाला. कार्व्हर कुटुंब
खाऊनपिऊन सुखी होतं. पण होतं शिस्तीचं. बेफिकिर,उधळमाधळ
खपत नसे. सगळं कसं टुकीनं चाले. हा ते सारं उघडया डोळ्यांनी
पाहात होता. त्याच्यावर या गोष्टींचे संस्कार खोलवर उमटत होते.
तसं कार्व्हर कुटुंबाने या दोघा भावांना-जिमला अन् या मुक्याला-
निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं. उलट ही भावडं कुठेही
जाण्यास मुक्त होती. हे अनाथ,निराश्रित,पोरके जीव जाणार तरी
कुठे ? मोझेस कार्व्हरच्या आश्रयानेच ते जगत होते.
जिम थोडा मोठा झाल्यावर आपलं नशीब काढायला डायमंड ग्रोव्ह
सोडून गेला. पण छोटा मात्र तिथेच राहिला. छोटयाच्या अंगची
प्रामाणिक अन् विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबानं त्याचं नामकरण
केलं- ""जॉर्ज"" जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं नाव ते ! त्याला
आता सारे मुका, छोटा माळीदादा वगेरे न म्हणता जॉर्ज म्हणू
लागले. जॉर्जच्या दुबळ्या, नाजूक प्रकृतीमुळे सुसानबाई त्याला
पान नं. 8
नजरेआड दूर कुठे पाठवायला तयार नसत. त्यांचं ""मेरीचं पोर""
होतं ते. जॉर्जही दूर कुठे जायला तयार नव्हता. आपल्या आईच्या
मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्याने त्याला वाटे,"" न जाणो !
आपली आई पटकन् केव्हातरी येईल."" तिच्या स्वागतासाठी तो आपलं
लाकडी खोपटं झाडून-झटकून स्वच्छ ठेवी.
कधी तरी तो आपल्या आईविषयी सुसानबाईंना विचारी. तिच्या
आठवणीनं त्यांचा गळा दाटून येई. त्या म्हणायच्या ""तुझी आई फार
गुणी होती. अगदी तुझ्यासारखी. तुझ्यासारखंच काम करताना काही
तरी गोड, पण उदास गुणगुणायची. कामात फार चलाख. चटपटीत.
तिला लिहावाचायला येत नव्हतं. पण तिची आठवण फार दांडगी
होती बघ.""
""हा पोरगा भारी भंडावतोय ग !"" मोझेसबाबा आपल्या पत्नीकडे
तक्रार करत होते. म्हणे गवत हिरवंच का ? टोळ उडया कशामुळे मारू
शकतो ?सकाळची कोवळी किरण दुपारी कुठे जातात ? इंद्र-
धनुष्य तयार करायला किती वर्ष लागतात ? हे काय प्रश्न झाले ?
वेताग नुसता !""
सुसानबाईंना हसू आलं.""हो !म्हणूनच ना मला `मदत करायला
त्याला माझ्याकडे पाठवता ? कळलं हो ! पण माझी काही तक्रार
नाही. उलट तो हाताशी असला की घरकाम बरीक झटकन् उरकतं !""
""हं नाही तरी शेतीपेक्षा स्वयंपाकघराच्याच लायकीचा आहे तो !""
मोझेसबाबा फिस्कारले.""त्याची वाढच नीट होत नाही त्याला कोण
काय करणार ? खरंतर आता तो चांगला नऊ-दहा वर्षाचा झालाय.
त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी नाही का ?""
""आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांसाठी शाळा ? आणि शिकून
तरी काय करणार आहे हा ?"" मोझेसबाबा थोडया उद्वेगानेच
म्हणाले.
""पण आता त्याला आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंच
पान नं. 9
पाहिजे.त्याचं हे निसर्गप्रेम,रानावनातलं हिंडणं- त्याच्या पुढच्या
धकाधकीच्या जीवनात त्याला निरूपयोगी ठरवील."" मग विषय
बदलीत त्या पुढं म्हणाल्या-""पण काय हो ! त्याच्याच जोरावर तुम्ही
यावर्षी द्राक्षाची लागवड करणार आहात ना ? उद्.या जायचंच म्हटलं
त्या स्विस् शेतीतज्ज्ञानकडे. चला, कामं आवरती घ्या.""
स्विस् शेतीतज्ञ श्री. हरमन यायगर (Hermann Jaegar ) मिसोरी
राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज
घेण्याच्या कामगिरीवर आले होते. मिसोरीतील जमीन व हवा
द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिध्द झाले होते. जॉर्जला
हाताशी घेऊन मोझेस कार्व्हरनेही आपल्या शेताच्या तुकडयावर
चाचणी घेतली होती. यायगरसाहेब छोटया जॉर्जच्या हुशारीवर खूष
होते. त्यांनी दिलेल्या बारीकसारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या
होत्या. द्राक्षवेलींची उत्तम निगा राखली होती. मांडवांकडे ध्यान दिलं
होतं. वाळवी, किडीपासून वेलीचं रक्षण केलं होतं. डोळ्यात तेल
घालून सारी कामगिरी बजावली होती. त्याच्या या चोख कारभारावर
यायगर खूष झाले. चाचणी यशस्वी झाली होती. मोझेसबाबांनी आता
जॉर्जच्या मदतीने मोठया प्रमाणावर द्राक्षांची लागवड करावयाचे
ठरविले. जॉर्जही शेतीकामात यानिमित्ताने काही नवीन शिकून घेईल
अशी त्यांना उमेद होती.
""जॉर्ज,उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचंय
बरं का ! "" मोझेसबाबांनी त्याला आठवण दिली.
""हां- हां तो द्राक्षवाला ना ! पण बाबा, द्राक्षांचा रंग जांभळा का
असतो हो ?"" - जॉर्ज.
""मलाही माहीत नाही. सगळीच द्राक्षं काही जांभळी नसतात. काही
काही हिरवी पण असतात. पण ""का"" ते मला नाही नाहीत.""
मोझेसबाबा उत्तरले
""देवाला माहीत असेल ?""
पान नं. 10
""नक्कीच ! देवाला माहीत नाही असं या जगात काहीच नाही.""
""मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो !"" टुणकन् उडी मारून
पळता-पळता जॉर्ज म्हणला. मोझेसबाबांचे तोंड रागाने लाल झाले. तेव्हा सुसानबाई
त्यांना अडवीत समजुतीच्या सुरात म्हणाल्या-
""जाऊ द्या त्याला.""
""अग पण हा उद्धटपणा बरा नाही. चुकतोय तो. त्यानं असं बोलणं
बरोबर नाही. जणू काही याला भेटायासाठी परसदारी देव खोळंबलाय.""
""तसंही असेल कदाचित्- !""
""सुसा न ! अगं, तू तरी -?"" मोझेसबाबा विचारात पडले. थोडया
वेळानं ते म्हणाले,तुझं बरोबर आहे. त्याला आता वाचायला
शिकवलंच पाहिजे. आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी
तयार होता कामा नये. त्याला बायबल वाचायला,देवाधर्माबद्दल
विचार करायला,आदर बाळगायला शिकवलं पाहिजे.""
""शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकलिपी दिलीय. त्यांची
बाग शिंपायला जातो तेव्हा ती बरोबर घेऊन जातो. त्या म्हणत
होत्या,""जॉर्जची सारी अंकलिपी पाठ झालीय.""
""ते काहीही असो. तो बायबल वाचायला,देवाविषयी आदराने
बोलायला शिकलाच पाहिजे."" - मोझेसबाबा ठासून पुन्हा एकवार
म्हणाले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच मोझेसबाबा जॉर्जसह जायला निघाले. जॉर्ज
खाटऱ्याच्या मागच्या बाजूला आपले अनवाणी पाय खाली सोडून
मजेत बसला होता. बाकी त्यानं काय कपडे घातले होते तो कसा
दिसत होता यात दखल घेण्याजोगं काही नव्हतंच. ""कार्व्हरकडचा
पोर"" एवढीच त्याची बाहेरच्या जगाने घेतलेली ओळख. त्याने
पान नं. 11
घातलेत तेच कपडे म्हणायचे. मग ते गबाळे आहेत आणि त्यामुळे तो
आणखी बाळवट,वेडाविद्रा दिसतो याचा इतरांनाच काय पण त्याला
स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. किंबहुना असा काही
विचार करावयाचा असतो, याची त्याला जाणीवच नव्हती, हो अगदी
मोठेपणीसुद्धा ! !
भरदुपारी एका झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला. एका
झाडाच्या सावलीत बसून सुसानबाईनी बांधून दिलेली शिदोरी त्यांनी
संपवली. एक ""गोरा"" एका ""काळ्याला शेजारी बसवून खातोय हे
पाहून रस्त्याने येणारे-जाणारे खेडूत थबकत.""गुलामगिरी"" अजूनही
लोकांच्या मनातून पार पुसली गेली नव्हतीच म्हणायची !
मोझेसबाबा बुंध्याला टेकून तिथंच धटकाभर पहुडले. हे त्यांचं पहुडणं
जॉर्जच्या पथ्यावरच पडत असे. नाहीतरी मोठी माणसं त्याच्याशी
बोलत असत हे बहुधा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे
हुकूमच असत. त्यापेक्षा त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला
भारी आवडे.
तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले. यायगरसाहेबांच्या
बागेच्या दर्शनाने जॉर्ज एकदम खूश झाला. यायगर आणि मोझेस
कार्व्हर एकमेकांशी बातचीत करीत होते. ती संधी साधून जॉर्ज तिथून
सटकला आणि सारी बाग मजेत फिरू लागला. त्या बागेत हिरवा
ताजेपणा,आखीव-रेखीव ठेवण पाहून त्याला वाटलं, ""स्वर्ग,नंदनवन
म्हणतात ते हेच तर नव्हे !"" बिचाऱ्याच्या स्वप्नातही आले नसले
की, पुढे भविष्यात आपले हेच काटकुळे हात ओसाड जमिनीवरही
असेच नंदनवन फुलवणार आहेत !
तो एका कुंडीपाशी थबकला. खाली बसून हळूवारपणे त्या कुंडीतल्या
वनस्पतीवरून हात फिरवू लागला. तिच्या कोंबांना कुरवाळू लागला.
गोंजारू लागला. कोवळ्या पानांशी तोड नेऊन गुणगुणू लागला.
पान नं. 12
यायगरचं लक्ष त्याच्या त्या गुणगुणण्याकडे वेधले गेले. ते मोझेस
कार्व्हरला म्हणाले,""या बेटयाला माझी झाडं आवडलेली दिसतात.
पाहा त्यांना कसं मायेनं गोंजारतोय् !"" त्यांनी जॉर्जला जवळ
बोलावले आणि विचारले.-
""बाळा तुला झाडं मनापासून आवडताता का रे ?"" जॉर्जने मान वर
करून पाहिलं. दोघांनी एकमेकांच्या नजरेत क्षणभर रोखून पाहिलं.
कुठं तरी अंतरीची खूण पटली. आपल्याला झाडा-झुडुपातलं काय नि
किती कळतं हे जॉर्जला त्यांना समाजावून सांगता आलं नसतं. पण
तरीही त्याची खात्री झाली की, तो स्वतः जे काही करत होता त्याची
जाण असलेला ""जाणकार"" त्याच्या पुढयात उभा होता.
""हो- हो ! या झाडाझुडपांच्या अगदी सगळ्या गोष्टी आवडतात
मला !"" आपले दोन्ही हात उडवीत जॉर्ज उत्कटतेने म्हणाला. त्याचे
हात आपल्या हाती घेऊन त्याची ती विशेष लांबसडक बोटे कुरवाळीत
यायगर म्हणाले, ""हे आहेत एका जातिवंत माळ्याचे हात. नुसत्या
स्पर्शाने संजीवनी देणारे !"" त्याचे हात हलकेच सोडीत, यायगर
कार्व्हरना म्हणाले, "" तुमच्या द्राक्षाच्या मळ्याची देखभाल यानं केली
म्हणता, पण हा तर अगदीच पिटुकला माळीदादा आहे !""
मोझेसबाबांनी खालच्या आवाजात जॉर्जची सारी हकीकत यायगरना
सांगितली आणि म्हणाले,""हा कधीच मजबूत गडी होणार नाही.
निग्रो फक्त कष्टावरच जगू शकतो. ह्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय.
पण हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मला सोडून जाऊच
शकत नाही. अशी परिस्थिती आहे.
यायगर पुन्हा जॉर्जकडे वळले. जॉर्ज आपल्या कुंडयांची तपासणी
करण्यात गुंग होता. त्यांनी त्याला द्राक्ष-वेलीचे कलम कसे करतात ते
दाखवले. कलम करण्याने द्राक्षांची प्रत कशी सुधारते ते समजावून
दिले."" मी द्राक्षाची उत्तम जात बनविण्याच्या प्रयत्नात आहे. देवाच्या
मार्गदर्शनाखाली माझे प्रयोग आहेत. ही सारी धरणी, त्या एका
पान नं. 13
विधात्याची आहे. तो विधाता- तोच परमेश्वर तुझा पिता आहे. ""
""माझा पिता ?"" जॉर्ज बोलता बोलता अडखळला.
""हो ! हो ! तुलाही त्यानेच निर्माण केलंय. रानावनातल्या वनस्पतीं-
प्रमाणे तूही एकाकी आहेस. पण त्या दयाघन प्रभूने तुला निर्मितीक्षम
हात दिले आहेत. तू त्यांचा उपयोग कर. माझ्यासारखा तूही देवाचा
आदेश घे. त्याच्या कार्यात सहभागी हो.""
जॉर्जला मोझेसबाबांच्या तोंडून ऐकलेलं बायबलमधील वचन आठवलं-
""ही भूमी देवाची आहे !""
परत निघते वेळी श्री. यायगर यांनी जॉर्जसाठी एक छानसं पुस्तक दिलं
आणि म्हणाले, -""हे घे तू. तू उघडया डोळ्यांनी लक्ष देतोस म्हणून
बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत. तू लिहा-
वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक तू वाच. आणखीही खूप खूप
वाच. मग तुझा ""पिता"" तुला आणखीन गोष्टी दाखवील ! तुझं ज्ञान
वाढवील.""
संध्याकळ झाली तेव्हा मोझेसबाबा आणि जॉर्ज परतीच्या प्रवासाला
लागले. यायगरनी जॉर्जच्या मनात चांदणं शिंपडलं होतं. बऱ्याच नवीन
गोष्टींच ज्ञान त्याला झालं होतं. एका नव्या जगाचं दर्शन त्याला झालं
होतं. मोझेसबाबाही यायगरसाहेबांच्या बरोबर झालेल्या
विचारविनिमयाची उजळणी करीत होते. त्यांनाही शेतीसंबंधी अनेक
नव्या गोष्टी समजल्या होत्या. उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं. पण या
साऱ्याला किती उशीर झाला होता. ! मोझेसबाबा आता उतरणीला
लागले होते.थकले होते. त्यांना मूलबाळही नव्हतं. त्यांना वाटे,
""हाच जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नसती ता सारी
जबाबदारी पेलली ! भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल
पण तो साधी नांगरटही करू शकत नाही त्याचं काय ?""
""घरी आल्यावर त्यांनी जॉर्जला यायगरकडून मिळालेली सारी माहिती
पान नं. 14
नीट समजावून सांगितली. त्या यायगर साहेबांच्या गावात - `नेओशो त
निग्रोच्या शाळेची सोय होती. त्यांनी जॉर्जला विचारले,""आज
आपण गेलो होतो त्या.""नेओशो"" गावात निग्रोंची शाळा आहे. तू
जाणार का तिच्यात ?"" जॉर्जने उत्तर दिले नाही. आपली पंसती
शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती. त्याच वेळी तो
समजून चुकला, कार्व्हर कुटुंबापासून आपल्याला दूर जावं लागणार
आहे. उघडया जगात वावरावं लागणार आहे.""
""सारी धरणी माझी आहे. माझ्या पित्याच्या कामात हातभार
लावायला मला तयार झालं पाहिजे.""
एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा ""नेओशो"" च्या रस्त्याला
लागला. मात्र या वेळी तो एकटाच, पायी निघाला होता. मोझेसाबाबा
त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते. पण त्यांच्या
गोठायातलं एक वासरू एकाएकी आजारी पडलं. त्यामुळे जॉर्जला
एकटयालाच निघावं लागलं.
शाळेच्या गणवेषाचा वगेरे काही पत्त नव्हताच. पण सुसानबाई व
म्युरलबाईंनी मिळून त्याची सोय केली होती. एक जुनी शाल,
मोझेसबाबांची कापून तोकडी केलेली पॅन्ट,अंकलिपी,यायगरने दिलेले
पुस्तक, फांद्या छाटायचा आपला छोटा चाकू आणि दोन मोठी
सफरचंद. हो ! एक साधारणसा बुटांचा जोडही मिळाला होता. पण
धुळीच्या रसत्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून, बुटांचे बंद
एकमेकांना बांधून, तो खांद्यावर टाकला होता त्यानं. शिवाय
म्युलरबाईनी दिलेला आख्खा डॉलर, त्याच्या हाती आलेली ही
पहिलीच रोख रक्कम- त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती.
त्याची ती तयारी चाललेली असतानाच त्याचा एकुलता एक भाऊ-
जिम- त्याला भेटायला "" डायमंड ग्रोव्ह"" ला आला होता. ती ""तयारी""
पान नं. 15
""पाहून जिम जॉर्जला म्हणाला, ""सुखाचा घास टाकून कुठं वणवण
करायला निघालास ? अंकलिपिवरून अक्षर-ओळख झाली.
तेवढी बस झाली.""
""नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण संपलं का ? अरे
जिमदादा, मी इतके शब्द, इतके शब्द शिकणार आहे की, मला अख्खं
पुस्तक लिहिता आलं पाहिजे."" जॉर्जच हे भयंकर उत्तर ऐकून जिम
बापडा गप्प बसला.
जॉर्जमध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता. त्याच्या सद्गुणांची
पारख असलेल्या सुसानबाईं त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं.
एखादं मोठठसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय काय घरकाम
येतं ते सांग. मदत मिळणं काठीण असतं रे बाळा ! पण तू तुझा मार्ग
शोधशीलच अशी माझी खात्री आहे.
मोझेसबाबा म्हणाले,
""आपला जीव सांभाळून राहा आणि हे बघ ! आता किनई तू गुलाम
नाहीस, ""स्वतंत्र"" आहेस- हे कधीच विसरू नकोस. लोक तुला
फुकटात राबवू पाहतील, तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो !
त्यांच्या नादी लागू नकोस.""
""जॉर्जला निरोप देतेवेळी कार्व्हर दांपत्याचा ऊर भरून आला. तो
वळणावर गेला आणि थबकून त्यानं एकदा मागे वळून पाहिलं. दहा
वर्षाचा तो अनाथ पोरका जीव, ज्ञात असलेले सुरक्षित जग सोडून
अज्ञाताकडे झेप घेत होता. भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून
गेली. त्याने आता पाऊल पुढे टाकले. निघाला. तो निघाला-ज्ञान-
यात्रेला !
पान नं. 117
गंगा आली रे अंगणी
`टस्कगी' त संगीत होतं. अगदी मधुर संगीत होतं. प्रा. कार्व्हरनी पूर्वी
कधी ऐकलं नव्हतं असं -! दर रविवारी सायंकाळी टस्कणी शाळेचे
विद्यार्थी प्रार्थना मंदिरात जमत. आपल्या गोड, मधुर आवाजाने सारा
परिसर भारून टाकीत. डॉ. वॉशिग्टनची ख्याती ऐकून दूरदूरहून, अगदी
परदेशातूनही लोक त्यांचा `उद्यमशील हात' बनविण्याचा उपक्रम
जाणून घेण्यासाठी येत. गुलाम आईबापांच्या पोटी जन्म घेतलेल्या या
मुलांच्या कंठातील संगीत ऐकून पाहुणे भारवून जात. एका आगळ्या
वेगळ्या वातावरणाची स्मृती त्यांच्या अंतःकरणात दीर्घकाळ रेंगाळे.
डॉ. कार्व्हर ही रविवारची संध्याकाळ कधीच चुकवीत नसत. ते
संगीत त्यांना भूतकाळात नेई. त्यांच्या आईच्या गुणगुणण्याची त्यांना
आठवण देई. ते गाणे त्यांच्या एकाकी आयुष्याला उभारी आणी.
अशाच एक रविवारी संध्याकाळी प्रार्थना मंदिरातून परतत असताना
त्यांची नजर वसतिगृहातील पिओनोवर गेली. किती वर्षांत त्यांनी या
वाद्याला स्पर्श केला नव्हता ! ते त्या पिआनोपाशी गेले,
स्वरपट्टयांवर त्यांची बोटे फिरू लागली. त्यांना एकेक रचना
आठवू लागली. सौ. मिलहॉलडंकडे शिकून घेतलेल्या निरनिराळ्या
रचना आठवू लागल्या. त्यांच्या त्या लांबसडक बोटातून `आठवणी'
स्त्रवत होत्या.
अंधार पडला. प्रा. कार्व्हरांना स्थलकालाचं मुळी भानच उरलं नव्हतं.
`सिंप्सन' वाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार वा संगीतकार
झाले नव्हते. ते झाले होते एक `दक्षिणी शेतकरी' एका छोटया पण
धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर ! आणि रंगारीही ! !
हे त्यांचे अपयश म्हणायचं का ? एका उजाड ओसाड माळाला त्यांनी
पान नं. 118
नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं. लोकांच्या डोळ्यावरच्या डॉलर्सच्या
पटटया काढून त्यांना `बघायला' शिकवलं होतं. आणि ते लोकही
आता डॉक्टर कार्व्हरप्रमाणे चिखलात,मुळ्यात, पाना-फुलात `देव'
शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले
होते. उजाड,वेराण माळ दिसामासांनी फळत-फुलत होता. याला
अपयश म्हणायचं का ?.... तरीही त्यांना वाटत होतं, ही तर नुसती
सुरूवात आहे. अजून खूप मजल मारायची आहे.
त्यांची बोटं पिआनोच्या स्वरपट्टयावर फिरूनफिरून थकली. ते थांबले
चाहूल लागली म्हणून मागे वळून पाहिले. दिवा लावला गेला होता.
दरवाज्यात बरेच विद्यार्थी दाटीवाटीने उभे होते. वादन थांबताच
ते पुढे आले.
""सर ! किती सुंदर वाजवता तुम्ही ! !""
प्रा. कार्व्हर विलक्षण संकोचले. जागेवरून उठू लागले.
""नाही सर, उठू नका. आणखी थोडं वाजवा ना !""
""आम्ही इतकं शास्त्रशुध्द आणि सुरेलसंगीत पूर्वी कधी ऐकलंच
नव्हतं !""
""मुलांनो मी काही वादक नाही.""
""सर, तुम्ही तर नेहमी उपदेश करता की, आपल्याकडे आहे ते देत
राहावं !""
तेवढयात वसतिगृहाची घंटा घणघणली. दिवे मालवून झोपी जाण्याची
नेहमीची सूचना होती ती ! नाइलाजाने सारेजण आपापल्या
खोलीत परतले. प्रा.कार्व्हरही परतले `उद्या पहाटे आपल्या
`देवाच्या'सानिध्यात त्याचा कौल घ्यायलाच हवा.. !'
गेले काही दिवस त्यांच्या कृषी विभागाचा व्याप झपाटयाने वाढत होता.
पान नं. 119
त्यांच्या विभागासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीसाठी देण्यात
आली होती. पण पेशाअभावी बेत तडीस जात नव्हते. डॉ वॉशिंग्टन
आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर संस्थेसाठी फंड गोळा करीत. ही
अलोकिक देणगी प्रा. कार्व्हर यांच्यापाशी नव्हती. पण कालच्या
पिआनोवादनाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रशंसेने, काही नवेच
विचार त्यांच्या मनात घोळू लागले होते.
थोडयाशा संकोचानेच त्यांनी शाळेचे कोषाधिकारी श्री. वॉरन लोगन
यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला- वाद्यवृंद तयार करून त्यांच्या
कार्यक्रमाद्वारे पेसे उभे करण्याचा ! श्री. लोगन डॉ. कार्व्हरना पूर्णपणे
ओळखून होते. उत्तरेकडचा हा अबोल, विनम्र संशोधक किती
कर्तृत्ववान आहे, हे जाणून होते. आजवर डॉ. कार्व्हरनी जे जे कार्य
हाती घेतलं होतं, त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यशाला
घातलं होतं. मातीचं सोनं करणाऱ्या प्रा. कार्व्हर यांनी मांडलेल्या
नुसत्या प्रस्तावावरच निर्भर होऊन. श्री. लोगननी साऱ्या दौऱ्याची
आखणी करायला सुरूवात केली.
डॉ. कार्व्हर फावल्या वेळात पिआनोवर रियाज करू लागले.
विद्यार्थ्यानाही आता इतक्या दिवसांच्या अनुभवाने,सरांच्या कोणत्याही
कृतीबद्दल नवल वाटेनासं झालं होतं. नवल तरी कशाकशाचं करावं !
आणि तेही रोज रोज ! !
दौरा यशस्वी झाला. आपल्या वाद्यवृन्दाच्या कार्यक्रमातून ते आवश्यक
तो निधी जमवू शकले. याहीपेक्षा एक अधिक फायदा या दौऱ्यामुळे
झाला. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी `खरी दक्षिण अमेरिका' पाहिली.
तिथले आपले दलित निग्रो बांधव, त्यांचं दारिद्रय. त्यांचं अज्ञान, त्यांची
होत असलेली उपेक्षा आणि आबाळ- सारं काही उघडया डोळ्यांनी
पाहिलं.
अजूनही दक्षिणेत गुलामगिरी ही नेसर्गिक अवस्था समजली जात होती.
निग्रोला दुय्यम मानव म्हटलं जात होतं. मुक्ततेनंतरही निग्रोंच्या
पान नं. 120
सामाजिक स्थानात फरक पडला नव्हता. अजूनही त्याला सार्वजनिक
ठिकाणी, सार्वजनिक वाहनात, एवढेच काय, सार्वजनिक बागेतही
मज्जाव होता. रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्याला ओलांडणे किंवा आडवे
जाणे या निग्रोच्या गुन्ह्याला चाबकाची शिक्षा मिळत होती. सामोऱ्या
येणाऱ्या गोऱ्यासाठी त्याला रस्ता सोडून बाजूला व्हावं लागत होतं.
स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या, व्यवसाय
करणाऱ्या निग्रोचा होणारा उपमर्द ही तर नित्याचीच गोष्ट. कोणी
अस्मिता दाखवू धजले की पाठीवर आसूड बसलाच. अजूनही निग्रोला
`श्रीयुत' किंवा `श्रीमती' आपल्या नावामागे लावता येत नव्हते.
लावल्यास शिक्षा ठरलेली. चामडी सुटेपर्यंत चाबकाचे फटके. पुन्हा
न्याय मागायची सोय नाही. मग चेहऱ्यावर उदास,लाचार हसू कवचासारखं
बाळगून, जीव जगवण्याची केविलवाणी धडपड ! दाक्षिणात्य म्हणत,
""आमच्या निग्रोंच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असते. कोण म्हणतं
गुलामगिरीत ते सुखी नाहीत ? तीच नेसर्गिक अवस्था त्यांना मानवते.""
बहुजन समाज शेतकरीच. मोडकळीला आलेली. लाकडी खोपटं त्यात
राहणारे ते निग्रो -बांधव . आपले अस्तित्व तगवण्यासाठी जिवापाड
कष्टत असलेले. त्या लाकडी खोपटात माणसं तरी किती ! डझनाच्यावर
लहानमोठे सारे एकत्र राहायचे. एकत्र खायचे, हातावरतीच घेऊन
चालता चालता किंवा भिंतीला पाठ लावून उकिडवं बसून. एकत्रच
निजायचे. बिछाना वगेरे भानगड नाहीच. खिडक्या,तावदाने,पडदे
यांची माहितीच नाही. बहुतेक खोपटांतून शौचकूप हा प्रकार नव्हता.
होता तिथे तरट,फळकूटयांच्या आधारे कसाबसा उभारलेला. खायचे
जिन्नस लांबवरच्या बाजांरातून विकत आणलेले . तेही ठारविक. मांस,
पीठ आणि काकवी. दारात काही पिकवून खाता येतं. कोंबडया,बदकं
डुकरं, एखादं दुभतं जनावर आपली पोटाची गरज भागवू शकतं याचं
ज्ञानच नाही. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे `पेलाग्रा', `स्कर्व्ही' अशा
रोगांनी पछाडलेलं.
पान नं. 121
पिण्याचं पाणी कोसा-दोन कोसांवरून आणलेलं, त्यामुळे पाणी पिण्यात
काटकसर इतर वापर तर फार दूर राहिले. परिणाम व्हायचा तोच
होत होता. कातडी भेगाळत होती.
जमीनही अशीच भेगाळली, पागोळ्याच्या पाण्याने जमीन धुपून चांगली
(पंचवीस) फुटाची घळ पडली. तरी दखल नाही. सारं मानवी जीवन
कसं कोणत्याही क्षणी गडप होऊन जाईल अशा टोकावर आलेलं.
दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचं मन एका वेगळ्याच दिशेने विचार करू
लागलं. `समाज प्रबोधना' चा एक आगळा, अभूतपर्व उपक्रम
डोक्यात शिजू लागला. `या आपल्या बांधवांना जागृत करायला हवं
ती माझी नेतिक जाबाबदारी आहे'
डॉ. वॉशिंग्टनपुढे त्यांनी आपले विचार मांडले. `त्यांना उत्पादन कसे
करावे,कशाचे करावे आणि या उत्पादनाचे पुढे नेमके काय करावे,
हेही शिकवणं आवश्यक आहे... घरं बांधून त्यात राहायला,
दूध-दुभत्यांची सोय करायला शिकविले पाहिजे. टस्कगीनं त्यांच्या
दारात जायला हवं.' डॉ. वॉशिंग्टन या उपक्रमाला मान्यता न देते
तरच नवल !
1899 साली पहिल्या `फिरत्या कृषि विद्यालया ' ने जन्म घेतला
आपल्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी करून एका छोटयाशा
खटाऱ्यावर सारे सामान व्यवस्थित जमवून,निवडक विद्यार्थ्यासह प्रा.
कार्व्हर मोहिमेवर निघाले. टस्कगी शाळा शेतकऱ्यांच्या अंगणात
जायला निघाली.
खेड्यापाड्यातून घरोघरी हिंडताना आपले म्हणणे सप्रयोग समजावून
देण्यासाठी तेथील माती, पाणी तपासणीसाठी काही (साधी का
होईनात) उपकरणे त्यांना बरोबर न्यावी लागत. ही उपकरणं
मांडण्यासाठी, आपली प्रयोग शाळा फिरतीवर नेण्यासाठी म्हणून त्यांनी
स्वतः आराखडा काढून त्याप्रमाणे एक खटारा-गाडी तयार करून
पान नं. 122
या दौऱ्यात प्रा. कार्व्हर आपल्या गरीब बांधवांच्या खोपटांतून राहात.
आपल्या मृदू बोलांनी,विनयशील स्वभावाने,अकृत्रिम स्नेहाने त्यांना
आपलेसे करीत. पुरेसा मोकळेपणा निर्माण झाला की, प्रा. कार्व्हर
त्यांना जमिनीची मशागत कशी करावी.ती खोलवरच का करावी,
बियाणं कसं निवडावं,कसं तयार करावं या सर्व बाबतीत सोप्या भाषेत
माहिती देत.
परसातला एखादा वाफा हिरव्या पालेभाजीसाठी राखायला ते सांगत
स्वस्तातल्या बियाण्याची लागवड करून घेतलेला भाजीपाला त्या
शेतकऱ्यांची पूर्वापार तीन `म' कारापासून सुटका करू शकत होता-
मीट (मांस),मील (पीठ), मोलॅसेस )काकवी) . चौरस आहाराच्या
अभावी त्या शेतकी समाजाला पेलाग्रा व स्कर्व्ही रोगानं पछाडलं होतं.
त्यांना हिरवी भाजी व टोमॅटोसारखी फळं खायला त्यांनी शिकविली.
टौमॅटो हे `विषारी फळ' मानलं गेलेलं. ते तसं नाही, हे सिध्द
करण्यासाठी त्यांना ते ठिकठिकाणी खाऊन दाखवावं लागे. तसेच ते
डाळवर्गातील धान्य पेरायला सांगत. कारण निकस जमिनीचा कस
वाढविण्यासाठी या लागवडीची आवश्यकता होती. आपल्या शाळेतील
वीस एकर निकृष्ट जमिनीतून कसं भरगच्च आणि रसरशीत पीक येते
हे दाखविण्यासाठी ते त्यांना आपल्या संशोधन केंद्रावरील बटाटे, कोबी
कांदे,कलिंगड इत्यादी दाखवत. शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे
देत. हे बियाणे त्यांना सेक्रटरी श्री. जेम्स विल्यम्स् यांनी पुरविले होते.
त्याचा ते या प्रसंगी वापर करत.
पिकांच्या फेरपालटाविषयी समजवताना ते म्हणत- ""तुमच्या
लहानपणी कपास कशी भरगच्च बोंडाची असायची. आता ती का
रोडावली ? तुम्ही जमिनीला विश्रांतीच दिली नाही. दिवसभर श्रम
केल्यानंतर आपल्यालाही विश्रांती हवी असते ना !""
""खरंय बाबा ! पण जमिनीला अशी विश्रांती देत बसलो, तर
पान नं. 123
आमच्या कच्च्याबच्च्यांनी काय खावं ? माती !""
""माती कशाला ? मी हे रताळ्याचं बियाणं देतो. दहा एकराला पुरेल
ते. एवढयात पीक घेतलंत तर वर्षभर खाऊन सरायचं नाही. झालंच
तर रताळ्याची पानं देठ खाऊन तुमची डुकरं पोसली जातील. वर्षातून
दोनदा हे पीक घेऊ शकाल आणि गंमत म्हणजे तरीही जमिनीचं काही
नुकसान होणार नाही. याच दहा एकरांवर तीन वर्षांनी कपाशीचं पीक
घ्याल तेव्हा आता उभ्या शेतात घेत आहात तेवढं पीक या एवढयाशा
तुकडयावर मिळेल.""
एवढं समजावून देऊनही एखादा खट म्हातारा म्हणायचा- ""पोरा,
तू काय मला शिकवतोस ? शेतीतलं तुला माझ्याइतकं कळतं काय ?
उमरभर शेती करतोय. तीन शेताची वाट लावलीय मी आतापर्यंत
बोल !""
ही मर्दुमकी !
एखाद्याच्या अंगणातल्या कोंबडया रोगट दिसल्या की, प्रा. कार्व्हर त्यांचे
खुराडे तपासत.
""तुझ्या कोंबडया रोगट का ते माहीत आहे ? त्यांच्या खुराडयात
सूर्यप्रकाश पोहोचतच नाही. म्हणून खुराडं दमट राहातं आणि त्या
आजारी होतात.""
""तसं नाही कार्व्हर, ती अंडी पौर्णिमेला उबवली होती ना म्हणून त्या
कोंबडया अशा ! "" हा जंतर-मंतरचा प्रभाव !!
असं सारं असूनही प्रा. कार्व्हर माघार घ्यायला तायर नव्हते. त्यांना
समजावत होते. घरांघरांतून,खेडोपाडी फिरतच होते. कोणी समजूतदार
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतीत बदल करी. त्याचा झालेला फायदा
शेजारचा शेतकरी पाही. तोही मग प्रा. कार्व्हरांचं ऐके. त्यांचे ऐकल्याने
नुकसान तर कधीच होत नाही, उलट पूर्वी कधी नव्हे एवढा फायदा
पान नं. 124
होतो याची खातरजमा होत गेली. प्रा. कार्व्हरांची मशागत चालूच
होती. न थकता. न खचता.
प्रत्येक सुटीच्या दिवशी आपला खटारा घेऊन ते मॅकॉन काऊंटीत
फिरायचे. जत्रेच्या ठिकाणी जायचे. बाजाराचे ठिकाण गाठायचे.
रस्त्याच्या कोपऱ्यावर खटारा थाटून लोकांना आपले म्हणणे समजावून
द्यायचे. लोक नीट शांतपणे ऐकायचे, तर एखादा गोरा अहंमन्य
`मोठा आलाय काळ्या आम्हाला शिकवायला,' म्हणून तोंडावर
अवहेलनाही करायचा.पण असले उद्गार ते कानाआड करायचे.
सुरूवाती-सुरूवातीला त्या अडाणी शेतकऱ्यांना वाटायचं की, हे
प्राध्यापक महाशय शिकलेले. काही तरी अवघड- न कळेलसं बोलणार. खूप
काय काय न समजेलसं सांगत बसणार. पण एकदा का त्यांनी प्रा.
कार्व्हरांचे बोलणे ऐकले की, त्यांच्या मनातली अढी जाई.
आपला खटारा उभा करायला प्रा. कार्व्हरांनी आणखी एक ठिकाण
शोधलं होतं. एकगठ्ठा लोक हुकुमी भेटण्याचे ठिकाण- चर्च ! आपल्या
साथीदारांसह चर्चच्या दारात ते तयार असत. चर्च सुटले की, आतलं
प्रवचन ऐकून बाहेर पडलेले लोक त्यांचं प्रबोधन ऐकायला गोळा होत
सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे गांभीर्य न जाणणारे महाभाग-
विशेषतः धर्मगुरू- या प्रबोधनावर उखडत. प्रभूच्या विश्रांतीच्या दिवशी
असले थेर त्यांना पसंत नसत. काही गोरे तर त्यांच्या या अशा सभा
उधळायला टपलेले असत. `आमच्या दयेवर जगलेले हे निग्गर इथे तरी
नकोत' म्हणत. म्हणजे काय तर आमच्यापेक्षा अधिक धान्य पिकवायला
पाहणारे काळे नकोत. वास्तविक दक्षिणेत गरीब गोरा शेतकरी आणि
निग्रो शेतकरी यांच्यात आर्थिकदृष्ट्या तफावत नव्हती. पण तरीही
गुलामी नष्ट होण्यापूर्वी गुलाम म्हणून त्यांना खालच्या पातळीवर
ठेवता येत होते. आता मुक्ततेनंतर त्यांना बरोबरीने हक्क होते. त्यात
आता या शेती सुधारणेने ते वरचढ होणार हे त्यांना कसं सहन व्हावं !
पान नं. 125
पण सारेच गोरे असे खडूस नसत. काही समजूतदार गोरे शेतकरी,
धर्मगुरू या फित्या शाळेचा लाभ घेत. प्रात्यक्षिके पाहात. प्रा. कार्व्हर
अशांशी दुजाभाव ठेवून कधीच वागले नाहीत. दक्षिणेत साऱ्यांच्याच
समस्या सारख्याच होत्या. खाईतून साऱ्यांनाच वर काढायचं होतं.
`आहात तिथून पुढे चला.' हा प्रा. कार्व्हरांचा सांगावा उभ्या
दक्षिणेसाठीच होता.
हळूहळू त्यांनी दक्षिणेतील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलत्या.
अडचणीच्या काळात वापरण्यासाठी मांस कसे टिकवावे, भाजीपाला
उन्हात वाळून, सुकवून, त्याची बेगमी कशी करावी याची प्रात्यक्षिके
दिली. वेद्यकशास्त्राने जाहीरपणे सांगण्यापूर्वी कितीतरी आधीच त्यांनी
लोकांना उपलब्ध कच्ची फळे खाऊन आहारातील अन्न -घटकांची त्रुटी
भरून काढण्यास शिकविले. उत्तम बी-बियाणाचा पुरवठा केला.
उपजलेल्या धान्यापासून पदार्थ बनविण्याच्या कृती शिकविल्या. लोणची,
मुरांबे घालण्याच्या क्रिया त्यांच्या देनिक जीवनात समाविष्ट केल्या.
पिकलेल्या फळांच्या रसाच्या पोळ्या उन्हात वाळवून `साठं' करायला
शिकविले.
अनेक वर्षाच्या परंपरेने लोकांच्या आहारविषयक सवयी ठरून
गेलेल्या असतात. त्यात बदल घडवून आणायचा असेल तर, त्यांच्या
जेवणात नवीन पदार्थ समाविष्ट करायचे असतील, तर ते नवीन
पदार्थ आकर्षक व चवदार असले पाहिजेत. त्यादृष्टीने नवीन पाककृती
बनवून पाहायच्या, आहारदृष्ट्या त्यांची उपयुक्तता तपासायची, हा
प्रा. कार्व्हरांचा नवा उदोयग होऊन बसला होता. युरोपीय पदार्थाच्या
चवी घ्यायची संधी त्यांना कोण देणार ! ते मात्र स्वतःच्या परीने
पान नं. 126
नवनव्या पाककृती बनवून दक्षिणेच्या जेवणात विविधता आणत होते.
त्यांचे `प्रबोधन' एवढयावरच थांबलं नाही. कपडे कसे धुवावेत,
शारीरिक स्वच्छता कशी राखावी,पडदे कसे शिवावेत, बालसंवर्धन,
पशु-संगोपन,कुक्कुट -पालन इ. विषयही या प्रबोधन मालिकेतून
सुटले नाहीत. तसेच, खोपटाच्या दाराला लाकडी ओंडक्याची एकच
पायरी असण्यापेक्षा तीन पायऱ्या बसविणे सोयीचे कसे, शौचकूप कसे
असावे, वनस्पतींच्या तंतूपासून घोंगड्या कशा विणाव्यात, मातीपासून
रंग बनवून घरे कशी रंगवावीत. इ. अनेक कलाही खेडयांतून रूजविल्या.
त्या अडाणी शेतकऱ्यांना उमजेल अशासोप्या, सरळ भाषेत त्यांनी
पत्रकं काढली. शाळेच्या शेतकी-विभागाकडून खेडोपाडी पोहोचवली.
पत्रकांचे विषय विविध असायचे. उदा. शेंगदाण्याची लागवड कशी
करावी-त्यापासून तयार होऊ शकणारे 105 खाद्य पदार्थ, टोमॅटोची
लागवड कशी करावी- त्यापासून तयार होऊ शकणारे 115 खाद्यपदार्थ,
शेतकरी त्यांची रताळी कशी वाचवू शकतील, वराह-पालन,
अलाबामास पशुपालन कसे फायदेशीर ठरेल, उन्हाळयात मांस खारवून
कसे टिकवाल, आपल्या जमिनीचा कस वाढवून कसा टिकवाल इत्यादी.
एवढेच नव्हे तर दररोज पाच सेंट्स वाचविले, तर जमलेल्या पुंजीतून
वर्षाअखेरीस तीन एकर जमीन विकत घेता येते, हेही त्यांनी आपल्या
बांधवांना दाखवून दिले. मग त्या गरीब शेतकऱ्यांची गाडगी,मडकी
रोज पाच सेंटस््ची सुटी नाणी पोटात साठवू लागली. वर्षाअखेरीस
जमीनखरेदीचे व्यवहार होऊ लागले.
`जमिनीवरची मालकी' ही भावना गरीब शेतकऱ्यांना सुखवू लागली.
आत्मसन्मान वाढला. जमीनदारीचं जोखड सेल करण्याचा हा मार्ग
शेतकऱ्यांना पटला. आर्थिक स्थेर्याची शाश्वती नजरेच्या टप्प्यात येऊ
लागली.
प्रा. कार्व्हर ओळखून चुकले होते की, जोपर्यंत दक्षिणेचा शेतकरी
पान नं. 127
`समुद्धीच्या पातळीवर पोहोचत नाही, तोपर्यंत दक्षिणेचा संस्कृतीला
भवितव्य नाही. शेतकऱ्यांचं समृद्ध जीवन राष्ट्रविकास घडवत असतं.
म्हणून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य
शेतकऱ्याने आत्मविकसनाचा प्रयत्न केला तर, प्रत्येकाने `सुधारणा'
आत्मसात केल्या तर, त्यांना स्वतःची अशी `संस्कृती' निर्माण करता
येईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, समाजाच्या तळागाळाच्या या
घटकाच्या गरजा ओळखून आपल्या सशोधनाला प्रा. कार्व्हरनी एक
विशिष्ट दिशा दिली. आपल्या कार्याचा वेग वाढता ठेवला.
प्रा. कार्व्हरांच्या मोहक साधेपणानं,घरगुती वागण्याने दक्षिणेच्या
शेतकऱ्याला ते आता परके वाटत नसत. शेतकरी-वर्ग त्यांचा चाहता
बनला. एवढया मोठया प्राध्यापकाचे,कृषितज्ज्ञाचे बोलणे, वागणे
किती साधे नि सहज असते याचेच साऱ्यांना अप्रूप वाटे.
हे फिरते प्रदर्शन गावोगाव जाई. बेलगाडीवर वस्तू मांडणे,पुन्हा
खोक्यात भरणे इ. सारी कामे ते जातीने करीत. कोणी खोडसाळपणे
एखादी वस्तू पळवू नये वा तिचा गेरवापर करू नये म्हणून ते
जागरूक असत.
शिवाय या खबरदारीमागे आणखीही एक कारण होते. ते स्वतः
`टस्कगी ' संस्थेचे प्रतिनिधी म्हणून वावरत. त्यामुळे प्रदर्शनावर
वेयक्तिक मालकी न दाखवता `संस्थेचे' कार्य म्हणून ते प्रदर्शनाची
देखभाल करीत. ज्यांना त्यांच्या कृषिउत्पादनाविषयी उत्सुकता असे ते
आपला जुना रिवाज मोडून प्रा. कार्व्हरना आमंत्रीत. याचा परिणाम
म्हणजे निग्रोंच्या सावलीलाही मज्जाव असणाऱ्या ठिकाणी त्यांचा
शिरकाव झाला.
या फिरत्या शाळेच्या धकाधकीत हातभार लावणारा एक चांगला
पान नं. 128
विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाला. थॉमस कॅम्पबेल म्हणजेच
पुढे पहिला निग्रो फिल्ड एजंट म्हणून नावाजला गेलेला. टी.एम्,
कॅम्पबेल. हा प्रा. कार्व्हरांच्या हाती कसा लागला, त्याची कथा वेगळीच
आहे.
थॉमस कॅम्पबेलचा थोरला भाऊ विली हा आधीपासून टस्कगी
शाळेत होता. त्याच्या बरोबरीने शिकण्यासाठी तॉमस जॉर्जियांतील
अथेन्स गावाहून 200 मेलांहून आईबाप सोडून पळून आला. आपल्या
भावाचं न ऐकता. विलीनं त्याला कळवलं होतं.`टस्कगीत फिरकू नकोस,
इथं देवीची साथ आहे' पण असल्या छोटया साथीला (small pox)
काय भ्यायचं, म्हणून थॉमस आलाच. तो आला तेव्हा देवीनं
पछाडलेला विली शेवटच्या घटका मोजत होता. शेवटची तरी भेट
झाली. विली म्हणाला- `माझे इथेच दफन कर. तू आता इथेच राहा
आणि जे काही करायचं तू ठरवशील, त्यात दुसरा कोणी वरचढ
होऊ शकणार नाही इतकं यश मिळव.'
भावाच्या मृत्यूनं हळवा, व्यथित झालेला थॉमस सुकाणू नसल्यागत
भटकताना प्रा. कार्व्हरांच्या नजरेस पडला. त्यांनी हळुवारपणे त्याची
हकीकत समजून घेतली. विचारलं- `तुला शेती करायला आवडेल का ?'
""अं हं !""
शेतीच तर यापूर्वी कसली. त्याचा भाऊ विली इथं शिकत होता तसं
काही केशकर्तन किंवा लोहारकाम,सुतारकाम असं काही तरी शिकावं,
असं त्याच्या मनानं घेतलं होतं. प्रथमदर्शनीच हा गंभीर अन् दणदणीत
तब्येतीचा मुलगा प्रा. कार्व्हरांच्या मनात भरला होता. त्यांनी फिरून
विचारलं- ""बरं ! तर मग तुला कृषिविद्या शिकायला आवडेल ?""
बापरे, बरीच अवघड विद्या दिसते. नाव पण चट्कन उच्चारता येत
नाही. कसली का असेना, शेती करण्यापेक्षा बरी. थॉमसने विचार केला
अन् म्हणाला,- ""हो, मला असंच काही वेगळं शिकायचंय.
कृषिविद्या !"" आणि त्याला या होकाराचा पुढे कधीच प्श्चात्ताप वाटला
पान नं. 129
नाही. प्रा. कार्व्हरांच्या हाताखाली शेती शिकणं हे नेहमीच्या शेतावरच्या
हमालीपेक्षा खूपच वेगळं. होतं. `कसे' आणि `काय' याबरोबरच `का'
विचारणारा हा विद्यार्थी फिरत्या शाळेच्या कार्यात प्रा. कार्व्हरांना
खूप उपयोगी पडला. सडसडीत बांध्याचे कार्व्हर आणि दणकट थॉमस
या जोडीला न ओळखणारा त्या परिसरात सापडणं कठीण होतं. कारण
जिथे खटारासुद्धा जाऊ शकत नसे अशा आडगावातही आपलं सामान
खेचरावर लादून,डोंगर -टेकडया ओलांडून हे दोघं पोहोचत. प्रा.
कार्व्हरांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकऱ्याच्या अंगणात गंगा
अवतरली. ज्ञानाची गंगा, समृद्धीची गंगा.
त्यांच्या या दौऱ्याने अमेरिकेच्या दक्षिण प्रदेशाचा संपूर्ण कायापालट
झाला ! त्याचे जीवनामान उंचावले. प्रा. कार्व्हर यांच्या `फिरत्या
कृषिविद्यालयाने' दक्षिणेच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली.
दक्षिणेची मान उंचावली.
डॉ. वॉशिंग्टनची आपल्या सहकाऱ्याच्या कामगिरीचे अभिनंदन केले.
इतर देशांतही त्याच्या या कार्यक्रमाचे पडसाद उमटले. रशिया,पोलंड
चीन, जपान, हिंदुस्थान, आफ्रिका या देशांतून लोक त्यांच्या फिरत्या
कृषि-विद्ययलयाची माहिती घेण्याकरिता येऊ लागले. स्वतःच्या देशाच्या
संदर्भात या उपक्रमाचा उहापोह करू लागले. ठिकठिकाणाहून त्यांना
व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली. त्यांच्या बुद्धीवेभावाने आणि
मूलगामी संशोधनाने सारे जग स्तिमित झाले.
टस्कगीला तिच्या कष्टाचं फळ मिळालं. शाळेची भरभराट होऊ लागली.
शाळेबरोबर गावही बाळसं धरू लागलं. आयात-निर्यात, माणसांची
आणि सामानाची, वाढू लागली. टस्कगी स्टेशनवर उतरवलेला माल
टस्कगी शाळेपर्यंत पोहोचविण्याची यातायात टाळण्यासाठी जवळच्या
`चेहॉ ' स्टेशनपासून टस्कगी शाळेपर्यंत नवा लोहमार्ग टाकण्यात
आला !
आपली स्वप्नं प्रत्यक्षात उतरविणाऱ्या या कर्तव्यरत सहाय्यकाला डॉ.
पान नं. 130
वॉशिंग्टननी पगारवाढ देऊ केली. पण निःस्पृह प्रा. कार्व्हरनी ती
नाकारली. `जास्त पेसे घेऊन मी काय करू ?'
तेही खरंच ! सारी धरणीच ज्याची, चार भिंतीबाहेरच ज्याचा संसार
त्याला काय हवं असणार !
डॉ. वॉशिंग्टन आपल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानातून आपल्या या
निःस्वार्थी, निगर्वी सहकाऱ्याच्या गौरवपूर्ण उल्लेख करीत असत.
`या देशाने जन्माला घातलेल्या काही पुरूषोत्तमांपेकी श्री. कार्व्हर हे
एक आहेत. आम्हाला आणखी असे अर्धा डझन कार्व्हर लाभले.
तर...!'
`फिरत्या कृषि-विद्यालयाची' सुरूवात करून `समाज प्रबोधना' चा
नवा पायंडा पाडण्यात आपण यशस्वी झालो, याबदद्ल प्रा. कार्व्हरना
नेहमी कृतार्थ वाटे. `माझ्या आयुष्यातील महत्वाची कामगिरी'
असा ते आपल्या फिरत्या शाळेचा उल्लेख करीत. त्यांच्या हरितक्रांतीने
दक्षिणेकडच्या दरिद्री शेतकऱ्यांचे जीवन उजळून निघाले; त्यांच्या
आयुष्याला नवा अर्थ लाभला.
या फिरत्या कृषि-विद्यालयाचा विस्तार पुढे खूप वाढला. 1918 मध्ये
अलाबामा सरकारनं या कामासाठी एक मोठा ट्रक दिला. या `फिरत्या
शाळे'चं महत्त्व शेतकऱ्यांना एवढं जाणवलं होतं की, कालांतराने जेव्हा
हा ट्रक अतिवापराने निरूपयोगी झाला तेव्हा त्यांनी वर्गणी काढून
5000 डॉलर्स उभे केले आणि शाळेला नवा अधिक मोठा ट्रक विकत
घेऊन दिला.
अमेरिकेचा हा आग्नेयेकडचा प्रदेश एकेकाळी खनिजसंपत्ती,मनुष्यबळ व
नवसंपत्ती या बाबतीत नशीबवान होता. आता तो आपल्या कर्तबगारीने
दरिद्री झाला होता. त्यात वंश-वर्ण-भेदांच्या झगडयांची भर. लोकांनी
पान नं. 131
या समुद्ध प्रदेशाच्या नेसर्गिक सुपीकतेची उपेक्षा केली. सुजलाम्
भूमीला वंधत्व आणले. अशा वेळी केवळ आपल्या बांधवांपुरतंच
आपलं काम मर्यादित न ठेवता साऱ्या दक्षिणेच्या अडचणी लक्षात
घेऊन प्रा. कार्व्हरनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दक्षिणेला
`स्वयंपूर्ण' बनविण्याच्या दृष्टीने संशोधन करीत राहिले. आपली
प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या शेतात, घरात नेली.
प्रा. कार्व्हरांची समाजसेवा स्थलकालाच्या बंधनांपासून मुक्त होती.
त्यांना खाजगी आयुष्य असं उरलंच नव्हतं आणि तसं ते उरू नये.
आपल्या अखंड समाजसेवेत बाधा येऊ नये, म्हणून ते अविवाहित
राहिले होते.
त्यांच्या बांधवांना त्यांची गरज होती ती मौजमजेसाठी नव्हे ! आपलं
जीवनमान सावरण्यासाठी !! आपल्या या कर्तव्यात प्रा. कार्व्हरनी
कधीच कसूर केली नाही.
अमेरिकेतील यादवी युद्दाच्या वेळी निग्रोतील साक्षरता प्रमाण 3% होते.
1910 साली ते 70 % झाले. या प्रगतीवर डॉ. वॉशिंग्टन आणि
कार्व्हर समाधानी नव्हते. शिक्षणाबाबतीत नवनवे प्रयोग चालूच होते.
आपला अभ्यासक्रम संपवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. वॉशिंग्टन
नेहमी उपदेश करीत असत,`तुम्ही जेथून आलात तिथेच परत जा.
पेसे मिळविण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यात वेळ दवडू नका. पेसा न
मिळाला तरी बिनावेतन काम करा, पण कामाची संधी सोडू नका.'
आपल्या प्राचार्याचा बा उपदेश प्रा. कार्व्हरही शिरोधार्य मानीत.
सुट्टीचा उपयोग `शेती सुधार' योजनेचा वेग वाढविण्यासाठी करीत.
अशाच एका सुट्टीत त्यांनी `अलाबामातील अळंबी' वर लेख लिहून,
कृषिखात्यातर्फे भरविल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात आंबळीचे शंभर
पान नं. 132
नमुने पाठविले. औषधी वनस्पतीवरील संशोधन प्रसिद्ध केले.
रोगनिवारक वनौषधींची जंत्री प्रसिध्द केली.
दुसऱ्या सुट्टीत `पॅन अमेहिकन मेडिकल कॉग्रेस' चे कोलॅबोरेटर म्हणून
ते वॉशिंग्टनला दाखल झाले. तेथे अमेरिकेतील औषधी वनस्पतींची
(Medica; flora) सूची तयार करण्याचे काम चालू होते. या सूचीसाठी
प्रा. कार्व्हरांनी दिलेली काही नावे तेथील तज्ञांना संपूर्णतः अपरिचित
होती. नावेही माहीत नव्हती. तर गुण कुठून माहीत असायला !
सुखिया जाला
पान नं. 204
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी काळाच्या उदरात खोलवर मशागत
कली होती. उत्तम बी पेरलं होतं. त्याच्यावाढीची निगा राखली
होती. आता आत्यांतिक निकडीच्या वेळी त्यांच्या कार्याचं भरघोस फळ
मिळत होतं.
सारे जग दुसऱ्या (1940च्या ) महायुध्दात गुंतलं होतं. विघातक
शक्तीनी मानवतेला हादरवून टाकलं होतं. साराच तोल ढासळला
होता अशा वेळी आपल्या ज्ञानाने,संशोधनाने हा तोल साधण्याचे
कार्य डॉ कार्व्हर पार पाडीत होते.
डॉ. कार्व्हर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवीत होते !
तिच्याशी जवळीक साधायला शिकवीत होते !
अलबामातील त्यांच्या बांधवांजवळ काहीच नव्हते. काही मिळवायचं
म्हटलं तर लागणारी आवश्यक ती साधने उपलब्ध नव्हती. त्यांच्या-
जवळ होत्या भरपूर `गरजा' जी काही तुटपुंजी साधने जवळ होती
त्यांचाच उपयोग करून, त्या गरजांचा मागोवा घेत, डॉ. कार्व्हरनी
किमया केली. कपडयालत्त्याची सुबत्ता ! हे सारं कुठून मिळवलं ?
फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या त्या रखरखीत जमिनीतून
कापूस साम्राज्याला शह दिला होता. भुईमूगा आणि रताळी यांनी !
अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या
तणातणीत परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणे बंद झाले.
अमेरिकेतील उद्योगधंद्यावर संकट कोसळले. अशा वेळी डॉ. कार्व्हरनी
`वनस्पतीजन्य ' रंग तयार करून अमेरिकेला बहुमोल देणगी दिली.
पान नं. 205
29 पकारच्या वनस्पतींच्या पाने,फळे,खोडे,मूळ भागांपासून
पाचशे प्रकारचे रंग तयार करण्याचा भीम-पराक्रम त्यांनी केला. हे रंग
(Dyes) कापूस, लोकर, रेशीम,लिनन,चामडे यांवर वापरण्यासाठी
होते. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊही !!
रंग बनविणाऱ्या एका मोठया कारखानदाराने त्यांचा हा भीमपराक्रम
पाहून, आपल्या उद्योगसमूहात येऊन काम स्वीकारण्याची विनंती
केली. सुसज्ज प्रयोग शाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं व सोबत
एक `कोरा' चेक ! पूर्वी अनेक वेळा घडले तेच याही वेळी ! चेक
साभार परत गेला. सोबत रंगाच्या पाचशे सत्तावीस कृती विनाशुल्क !
रंगाचे एवढे प्रकार शोधले जाऊनही दक्षिणेतल्या ग्रामीण भागाला ते
परवडण्यासारखे नव्हतेच. ओबड-धोबड, सच्छिद्र, जंगली लाकडाची
त्यांची घरे खूप रंग शोषून घेत. त्यामुळे टिकाऊपणा येत नव्हता. डॉ.
कार्व्हरांनी याची दखल घेतलीच.
मातीतून अनेक रंगद्रव्ये त्यांनी पूर्वीच शोधली होती. आळशीचे तेल
(Linseed Oil) त्यासाठी वाहक म्हणून वापरले जाई. परंतु हे तेल
गरिबांना न परवडणारे. यावर उपाय म्हणून त्यांनी टाकाऊ मोटार-
ऑईलचा वापर केला. त्याची परीक्षा घेतली. चाचणी म्हणून एका
विद्यार्थ्यीनीचे सहा कोसावरचे घरही रंगवून पाहिले, निश्चित खात्री
झाली. गरिबांना अत्यल्प किंमतीत सुरेख रंग मिळाले.
प्रकरण इथेच थांबले नाही. या रंगाचा वापर TVA आणि FSA
प्रकल्पातील स्वस्त घरयोजनेच्या कामी केला गेला. त्यासाठी टस्कगी
संस्थेला अनुदान देण्यात आले. `टस्कगी' त तयार झालेल्या रंगाने
14 TVA सुशोभित झाले. अल्पखर्चात `सौंदर्य साधनाचा 'धडा
टस्कगीने घालून दिला.
पान नं. 206
डॉ. कार्व्हर यांच्या सल्लाची फी एरवीसुद्धा पोस्टकार्डाला लागणाऱ्या
तीन सेंटस्च्या स्टॅम्प एवढीच असे. म्हणजे काय, तर पत्र पाठवून सल्ला
विचारण्यासाठी लागणारे टपाल-हशील !1940-42 च्या काळात
त्यांनी वृत्तपत्रातून `प्रा. कार्व्हर यांचा सल्ला' या सदरातून
वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी `टस्कगी
प्रायोगिक केंद्रा' तर्फे- `Nature's garden ford victory and peace'
या शीर्षकाखाली पत्रकं प्रसिद्ध केली. या पत्रकांतून अमेरिकेत जनतेला
अनेक रानफुले,रानगवत यांची ओळख करून दिली. त्यापासून पाककृती
कशा कराव्यात, त्यांची पौष्टिक आहारदृष्टया गुणवत्ता काय याची
जाणीव करून दिली.
फार पूर्वीपासून त्यांनी अमेरिकेतील रानगवतांचा अभ्यास सुरू केला
होता. `रानगवत म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला भाजीपाला'
असे ते त्याचे वर्णन करीत. रानगवताच्या अडीचशे जाती शोधून त्यांची
वर्गवारीही त्यांनी केली होती. आता अधिक जोमाने त्यावर संशोधन
सुरू केले.
काळजीपूर्वक लागवडीच्या लाडाने नाजूक बनलेल्या पिकांपेक्षाही
स्वतःच्या ताकदीवर टिकून राहणाऱ्या रानगवताता अधिक जीवनसत्त्वे
असतात. त्यांना अधिक रूची असते. कुंपणाच्या संरक्षणात भीत भीत
वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षाही कुंपणाबाहेर मोकळ्यावर वाढणाऱ्या
वनस्पतीत अधिक जोम असतो. त्यांची वाढही झपाटयाने होत असते.
त्यांना आयुष्यही भरपूर असते. त्यांच्याभोवती पिंगा घालीत, किडा-
मुंगीपासून संरक्षण देत त्यांची काळजी वाहावी लागत नाही. रोजच्या
अन्नपदार्थाच्या जागा या रानगवतापासून तयार होणारे पदार्थ घेऊ
शकतात.
टस्कगी शाळेच्या स्वयंपाकगृहात डॉ. कार्व्हरांच्या मार्गदर्शनाखाली
वरच्या वर्गातील मुली रानवनस्पतीची पाकसिद्धी करीत. मग ते
रूचकर आणि चवदार पदार्ख कोणकोणत्या वनस्पती पासून बनवले गेले
पान नं. 207
होते हे जाहीर करीत.
`जोपर्यंत अमेरिकेच्या धरणीवर रानगवत आणि रानवनस्पती उगवत
आहेत, तोपर्यंत अमेरिकेला उपासमारीचे संकट संभवत नाही. केवळ
अन्नाचीच नव्हे, तर औषधांची गरजही या वन्स्पती पुरवू शकतात.'
आजुबाजूला उपलब्ध असणाऱ्या वनौषधींचा उपयोग न करता, लोक
त्याच वनस्पतींपासून बनवलेली बाजारी औषधे बाहेरून का मागवतात
हे त्यांना न उलगडलेला कोडे होते.
`टस्कगी' संस्थेतील एक शिक्षक आपल्या वृध्द मातेच्या इच्छेखातर
डॉ. कार्व्हरांच्या भेटासाठी तिला घेऊन आले. त्या वेळी डॉक्टर
प्रयोगशाळेत वनौषधींवर संशोधन करीत होते. ती वृद्ध माता त्यांना
भेटायला प्रयोगशाळेत गेली. तेथे टेबलावर मांडून ठेवलेल्या अनेक
वनौषधींची घरगुती नावे व त्यांचे गण ती सहजगत्या त्यांना सांगू
लागली. शिक्षक बिचारे संकोचले.
डॉ. कार्व्हरनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवलं. वृद्ध मातेला
एका खुर्चीत बसवलं. शिक्षकाला खोळंबून न ठेवता वर्गावर पाठवलं.
मग गुलामीत अर्धे आयुष्य घालवलेल्या त्या वृद्ध मातेशी त्यांची
`वनौषधी व घरगुती उपाय' यावर बातचीत सुरू झाली. आजी-
बाईंनी आपलं `बटव्याचं' ज्ञान त्यांच्यासमोर उपडं केलं !
डॉ. कार्व्हरना समाधान वाटलं- `गेल्या काही वर्षात बऱ्याच जणांशी
चर्चा करण्याचा योग आला. पण या आजीबाईइतकं वनौषधी विषयीचं
ज्ञान त्यापेकी एकालाही नव्हतं.'
आजीबाईही खूष - `दक्षिण अमेरिकेवर जादूची कांडी फिरवणाऱ्या
या जादूगाराच्या नजरेतून `जडीबुटी' सुटली नाही बरं का ?'
पेसा अपुरा पडत होता. त्यांनी केलेले प्रयोग फायदेशीर ठरल्याने
पान नं. 208
नवीन आलेले पशुवेद्य डॉ. कार्व्हरांच्या कडे सल्ला मागायला जाण्यात
कमीपणा मानत. डॉ. कार्व्हर पशुवेद्य थोडेच होते. !पण एका वर्षी
कडक उन्हाच्या तडाख्यानं सहा जनावरे एकाच दिवशी मेली. मृत
जनावरांची शरीरे फाडून आजाराचे कारण शोधण्याचा प्रयत्न झाला.
गवत गोळा करून तपासण्यात आले. काहीच कळेना. शेवटी पशुवेद्य
डॉ. कार्व्हरांकडे गेले. जावंच लागलं. ""हं पूर्वी एकदा असंच घडलं
होतं. असाच दुष्काळ अन् असाच प्रदीर्घ उन्हाळा...""
""आम्ही उन्हाळ्याविषयी नाही, गायीविंषयी विचारत आहोत.""
""अर्थात..."" डॉ. कार्व्हर आपली पोतडी उचलून चालू पडले. पशु-
वेद्यांना उलगडा होईना. प्रखर उन्हाळ्यानं म्हाताऱ्याचं डोकं फिरलेलं
दिसतं, अशी वल्गना करीत ते गोठ्याकडे परतले.
गायरान तुडवून आल्याने वृद्ध कार्व्हर दमले होते. आपली पोतडी उपड
करत म्हणाले-
""हे तुमचं संकट !""
पशुवेद्यांना समजेना. या हिरव्या रानगवताचा संबंध लागेना.
""हे काय ?""
""रॅटल बॉक्स ! शास्त्रीय नाव Crotalaria कुंपणाभोवती हे
वाढतं. हिरव्या गवतात ते अलग ओळखता येत नाही. पण जेव्हा वनस्पती
आणि इतर गवत कोळपून जातात तेव्हा गाय हेच हिरवं रॅटल बॉक्स
खाते. ते चवीला रसदार आणि रूचक, पण विषारी !""
""मग आता काय करायचं ?""
""आणखी गाय मरायला नको असतील तर तुम्ही आणि तुमचे
विद्यार्थी बाहेर पडा, रॅटलबॉक्स वेचून काढा अन् नष्ट करा.""
आभाराचे शब्द ऐकण्यासही न थांबता डॉ. कार्व्हर निघून चालते झाले.
पान नं. 209
आणि आपल्या खोलीत जाऊन बुलेटिन लिहू लागले- रॅटल बॉक्स या
विषारी रानगवतावर !
प्रत्येक ऋतूत ते शाळेच्या परिसराची तपासणी करीत. आपल्या
हातांनी लावलेल्या झाडांची वाढ तपासत. झाडे खूप उंच झाली होती.
विस्तारली होती. आता या उतारवयात त्यांना झाडावर चढता येत
नसे. जवळून जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ते हाक मारीत. हातात
करवत देऊन एखादी फांदी कापून टाकायला सांगत. बहुधा त्या फांदी-
वरची पाने वाळलेली असत. मुलेही अशी कामे मोठया आत्मीयतेने
करीत. डॉ. कार्व्हरांनी सांगितलेले काम हे ज्ञानात भर टाकणारेच
असे.
प्रत्येक झाडांच्या बुध्यावर डॉ. कार्व्हरांनी त्या झाडाच्या जातकुळाची
पाटटी लावलेली असे. टस्कगीतल्या रस्त्यांना दुतर्फा झाडं वाढलेली
दिसतात ती डॉ. कार्व्हरांच्या कृपेने. तशा पाटया लावून झाडांची
ओळख ठेवायची पद्धत आजही तिथे आहे.
त्यांची नजर द्रष्टयाची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं.
त्यांनी त्या दृष्टीने आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात
उतरवायला अडचण पडे ती आजूबाजूच्या अदूरदृष्टीवाल्यांची. 1899
सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मंडली होती. वनसंपत्तीची राखण
व वृद्धी करणे आवश्यक कसे आहे हे सांगितले होते. परंतु ही योजना
प्रत्यक्षात उतरायला `ग्रेट डिप्रेशन' ची आपत्ती यावी लागली.
त्यानंतर सरकारने ती योजना विचारात घेतली. (1932-33 चा
काळ.)
`या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारे जपा. वेळेवर त्याचा
पान नं. 210
उपयोग होतो. या प्रा. कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेचे
लक्ष आता केंद्रित झाले होते.
डॉ. कार्व्हर यांच्या तंत्रशुध्द पद्धतीनुसार लागवडी केल्याने अमेरिकेत
प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झाले होते. ते वाया जाऊ नये म्हणून
`अन्नःधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती' त्यांनी शेतकऱ्यांना
शिकविल्या. अवजड शास्त्रीय भाषा व उपकरणे न वापरता अगदी
`वाळवा',`सुकवा',`उन्हं लावा ' अशा बोली भाषेत !! अनेक
प्रकारची फळे व भाज्या टिकविल्या जाऊ लागल्या. `पदार्थ दीर्घकाळ
सुस्थितीत टिकविण्याचे उपाय',`सोप्या पौष्टिक पाककृती' या
विषयांवर पत्रके काढली. साधा स्टोव्ह,तारेच्या जाळ्या,मच्छरदाणीचे
जाळीदार कापड, स्वच्छ सूर्यप्रकाश यांच्या साह्याने कोणते अन्नपदार्थ
टिकविता येतात याच्याही याद्या प्रसिध्द केल्या.
पहिल्या महायुद्धात डॉ. कार्व्हरांच्या रताळ्यांनी लोकांची आणि
सेनिकांची उपासमार टाळली. युद्धानंतर मोठया प्रमाणावर `निर्जली-
करण प्रकल्प' उभारला जाणार होता. तशी योजनाही आखली गेली.
होती-
पण तीही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुध्द यावं लागलं.
म्हणजे वीस वर्षाचा अवधी जावा लागला. आणि गंमत म्हणजे
निर्जलीकरणाच्या योजनेचे, तिच्या मागच्या कल्पनेचे श्रेय डॉ. कार्व्हरना
द्यायला लोक विसरून गेले होते. डॉ. कार्व्हरना मात्र त्याचे वेषम्य
वाटत नव्हते. श्रेय कोणी का घेईना, देशाला संकटकाळी आपला
थोडाफार उपयोग झाला याचेच त्यांना समाधान `भुईमूगाच्या
टरफलापासून जमीन भुसभुसीत बनवणारे खत तयार करता येते. त्या
टरफलापासून जमिनीला सेंद्रिय खत मिळते. तिची प्रत सुधारते. टर-
फलापासून बनवलेल्या कंडीशनरमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती
अधिक असून नायट्रोजन,पोटॅश,फॉस्फेट यांचेही प्रमाण त्यात अधिक
आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या
पान नं. 211
पिटमॉस (Peat Moss) पेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे.'
याही बाबतीत तेच झाले. असा प्रकल्प उभा राहायला 1940 साल
उजाडावं लागलं. मधल्या वीस वर्षात अमेरिकेत लाखो टन टरफलं
जाळली गेली.
ह्या अशा त्यांच्या अनेक गोष्टी. त्यांनी प्रयोगशाळेत यशस्वी करून
दाखविलेली उत्पादने बाजारपेठेत यायला वीस वर्षे जावी लागली.
1937 च्या सुमारास प्रा. कार्व्हर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड
यांची भेट झाली. रथी-महारथींची भेट ती. एक होता उपेक्षित, दलित
निग्रो समाजात जन्म घेतलेला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव
टाकून असलेला धनत्तर कोटयधीश ! एक वय सोडलं तर कोणतंही
साम्य नव्हतं त्या दोघांत.
साम्य नव्हतं कसं ? दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता. प्रयत्नावर
श्रध्दा होती.
`फोर्ड' मोटारीची निर्मिती करून हेन्री फोर्ड स्वस्थ बसले नव्हते.
नवनिर्मितीची जिद्द त्यांना अस्वस्थ करीत होती. काही तरी नवीन
घडवावं ही जाणीव टोचणी लावून होती. तशात डॉ. कार्व्हर यांचा
अविश्रांत परिश्रमातून साकारणाऱ्या समाजोन्नतीचा ध्यास त्यांच्या
कानी आला. वाट वाकडी करून फोर्डसाहेब टस्कगीला आले.
दोघेही परस्परांचा वकूब,परस्परांचे असीम कर्तृत्व ओळखून होते.
परस्परांविषयी आदरभाव ठेवून होते. पहिल्याच भेटीत अंतःकरणे खुली
झाली, अंतरीच्या खुणा पटल्या. हस्तांदोलन करताना दोघांच्याही मुद्रा
कशा कमालीच्या प्रफुल्लित झाल्या होत्या. !
हेन्री फोर्डना डॉ. कार्व्हर यांच्या निःस्पृह निर्विकल्प मनाचा मोठेपणा
पान नं. 212
जाणून घेण्यासाठी फार काळ जावा लागला नाही. ते दिसतात त्याही-
पेक्षा अधिक पटीने त्यांचं व्यक्तिमत्व विशाल आहे. या मुक्तात्म्याला
`गरज' कशाची ती नाहीच, याचा अनुभव फोर्डसाहेबांनाही आलाच.
`शाश्वत मूल्य पेशाच्या मोबदल्यात मिळत नसतात, किंबहुना पेशाच्या
मोबदल्यात जे विकत घेता येतं त्याला `शाश्वत मूल्य म्हणत नाहीत.'
हेन्री फोर्ड यांच्या या विधानाचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर !
पण ज्या परिस्थितीत, वातावरणात ते जगत होते, त्याने त्यांच्या
आचरणाचे मोल होत नव्हते. `काय बोलतो' यापेक्षा `कोण बोलतो'
याच्याकडेच लोकांचे अधिक लक्ष असते. भोवतालची परिस्थिती साथ
देणारी नसली की `असामान्य कर्तृत्व' लोकांच्या नजरेसमोर यायला
काळ जावा लागतो. तसंच काहीसं डॉ. कार्व्हर यांचं झालं होतं.
डियर बॉर्न येथे सोयाबीन्सची लागवड करून त्यापासून अनेक उपयुक्त
उत्पादने बनविण्यात श्री. फोर्ड यांनी यश मिळविले होते. डॉ. कार्व्हरना
फोर्ड साहेबांच्या या संशोधनाविशयी कमालीची उत्सुकता होती.
त्यामुळे त्यांनी पहिल्याच भेटीत `डियर बॉर्न' ला भेट देण्याचे आमंत्रण
स्वीकारले. आणि तेथून परतल्यावर आपल्या संशोधनांचा रोख
सोयाबीनवर वळवला.
लवकरच डॉ. कार्व्हरनी फोर्डना मोटारीचे काही सुटे भाग बनविण्यास
योग्य असे प्लॅस्टिक सोयाबीनपासून तयार करून दाखविले. तसेच
त्यांनी सोयाबीन्सपासून तयार केलेले तेल मोटारीसाठी वापराच्या
रंगाचे मूलाधार बनले.
फोर्डसाहेबांना आसा दक्षिणेची ओढ लागली होती. त्यांनी जॉर्जियात
बरीच जमीन खरीदली. तेथे मग `कृषि-संशोधन केन्द्र' उभारले.
काळ्या-गोऱ्यांना उद्योग मिळाला. कामगारांसाठी घरे उभारली.
त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या. एक शाळा डॉ. कार्व्हर यांच्या
पान नं. 213
नावे होती. डॉ. कार्व्र यांनी मातीपासून बनविलेल्या रंगाने तेथील
इमारती नटल्या.
टस्कगीला फोर्डसाहेबांच्या फेऱ्या वारंवार संस्थेकडे वळले. तेही टस्कगीला
भेट देऊ लागले.`टस्कगी' च्या अतिथ्यशील वागण्याने,शिस्तबद्ध
कारभाराने ते प्रभावित झाले. त्यांची सक्रिय सहानुभूती टस्कगीवा
मिळाली. टस्कगीला आर्धिक मदत मिळू लागली.
एकदा वृत्तपत्राद्वारे त्यांची एकत्रित मुलाखत घेतली गेली. श्री.
फोर्डनी आधीच त्यांना सांगून टाकलं.-"" तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
डॉ. कार्व्हरच देतील. आमच्या दोघांचे विचार एकच असतात.""
एक निःस्पृह,निरिच्छ,कर्मयोगी सहकारी लाभला. म्हणून फोर्डना
समाधान,तर आपले स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी आवश्यक ते
द्रष्टेपण आणि संपत्ती लाभलेला मित्र पाठीशी उभा राहिला म्हणून
डॉ. कार्व्हर खूष ! एक गर्भ-श्रीमंत तर दुसरा भूमिपुत्र, विश्वासा
स्वामी ! या दोघआंत आंतरिक भागीदारीबोरबर सामाजिक
जबाबदारीची भागीदारी झाली. कामं दुपटीने वाढली.
या दोन्ही महापुरूषांना त्यांच्या या उतारवयात जणू उत्साहाचं उधाण
आलं होतं. वेळाकाळाची पर्वा न करता कार्य चालू होतं. आपापल्या
नवनव्या कल्पना राबवून पाहात होते.
आपल्या ढासळत्या तब्येतीची फिकिर न करता ऐंशी वर्षआचे वृद्ध कार्व्हर
आपल्या मदतनिसाला-कर्टीसला-घेऊन डियर बॉर्नला हजर झाले. तेथे
फोर्डसाहेबांनी आपल्या मित्रासाठी खास प्रयोगशाळा उभारली होती.
त्या प्रयोगशाळेत टस्कगीतील `गुरूशिष्य' दाखल झाले.
पान नं. 214
`सांप्रती काय नवीन जन्म घेत आहे' या उत्सुकतेने वृत्तपत्रकार,
बातमीदार डियर प्रयोगशाळेभोवती घिरटया घालत होते.
एका- सुदिनी त्या प्रयोगशाळेत डॉ. कार्व्हर यांनी `कृत्रिम रबर'
जन्माला घातले.
`जन्म' शुभ नक्षत्रावरचा होता. स्वस्तात मुबलक रबर उपलब्ध होऊ
लागल्याने अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोडांकडं
पाहण्याच कारण उरले नाही.
एका उन्हाळ्यात श्री.` फोर्ड मोटार' कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आले. दक्षिणी
निग्रोंना स्थलांतर करून डेट्रॉईटला जाण्याची गरज आता उरली
नव्हती.
आपल्या धनाचा प्रभाव फोर्डसाहेब जाणून होते. इथं तर `काहीच
नको !' पण या भूमिपुत्राचं कौतुक करावं, अशी त्यांची इच्छा होती
त्यांनी डॉ. कार्व्हरना एक घर बांधून द्यायचे ठरविले. ते `घर' म्हणजे
एक प्रासादही होऊ शकला असता. पण नाही - डॉ. कार्व्हरना घर हवे
होतं ते त्यांच्या आईचं `डायमंड ग्रोव्ह' म्ध्ये होतं तसं साधं लाकडी
खोपट.
डॉ. कार्व्हरची मातृभक्ती पराहून फोर्डसाहेबांचं ह्दय भरून आलं. तेही
स्वतः माचृभक्तच होते.
उत्तमातील उत्तम वापरून `ग्रीनफील्ड' येथे `काव्हरभवन
उभारलं गेलं. डॉ. कार्व्हरना कोण आनंद ! एक साधी इच्छा पूर्ण
पान नं. 215
व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या ऐंशीच्या वर्षी
कार्व्हर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते
क्षणभर थबकले. आईच्या स्मृतीने त्यांचे डोळे पाणावले.
फोर्डसाहेबांनी आपल्या मित्राला एक `खास भेट' दिली. फोर्ड-
साहेबांच्या मातेला तिच्या लग्नात माहेरून मिळालेल्या आहेरातील
एक कपबशी ` मातेची स्मृती' म्हणून त्यांनी जपून ठेवली होती. तीच
कपबशी ` मातेची स्मृती' म्हणून त्यांनी आपल्या दोस्ताला भेट दिली.
दोघंही थोर मातृभक्त.
1938 साली एका सभेत डॉ. कार्व्हरांचे व्याख्यान होते, एकाने
डॉ. कार्व्हरांशी ओळख करून दिली.-
""सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो, तो म्हणत असे की,
मला एवढचं माहीत आहे की, मला काहीच माहीत नाही. आज त्या
कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे डॉ.
कार्व्हर ! त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडिलच काय,
पण त्यांची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत मते
एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना
ज्ञान प्राप्त होते,""
यावर कार्व्हर मिष्किलपणे उद्गारले,""आज माझी खूप निराशा
झाली. सभेतून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा पूर्वी माझ्याच
मला ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतात. आज मला
तसे काहीच समजले नाही.""
पण खरं म्हणजे आता त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्वतिहासाचे काहीच
वेषम्य वाटत नव्हते. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या
दास्यत्वातून-आर्थिक,शेक्षणिक,काही अंशी सामाजिक-मुक्त करण्यात
पान नं. 216`'`'``'`'`'`'
यश मिळवलं होतं. त्यांच्या पूर्वजांचा हिशोब कधीच लागणार नव्हत
त्यांचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं ? पण भविष्यकाळ मात्र ही उणी
भरून काढणार होता. इतिहासात त्यांना अढळस्थान मिळालं होतं.
त्यांना टस्कगीत येऊन चाळीसहून अधिक वर्षे झाली होती. लोकांनी
त्यानिमित्त समारंभ करण्याचे ठरविले. डॉ. कार्व्हरांच्या विरोधाला न
जुमानता त्यांनी 2000 डॉलर्सचा निधी गोळा करून डॉ. कार्व्हरांचा
ब्रॉन्झचा अर्धपुतळी तयार करवला. आपल्याला भुकेच्या खाईतून वर
खेचणाऱ्या आपल्या या बांधवाविषयी त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त
करायची होती. 2 जून 1937 रोजी त्या पुतळ्याचे अनावरण
करण्यात आले. लोक त्यांना भेटत होते. डॉक्टरांच्या अंगावर तोच
सूट होता. वर्गमित्रांनी प्रेमाने चढवलेला. वार्धक्याने झुकलेले कार्व्हर
भरल्या नजरेने साऱ्यांशी बोलत होते. अगत्याने चौकशी करत होते.
रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचे जीवनमान
उन्नत केले. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून 1939 साली
त्यांना `रूझवेल्ट पदक' अर्पण करण्यात आले.
1940 साली फ्रँकलीन डी. रूझवेल्ट यांनी टस्कगीला भेट दिली.
त्या वेळी वृद्ध कार्व्हरना ते म्हणाले-
""तुम्ही एक थोर `अमेरिकन' आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत
जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली. शक्ती मिळाली.
1940 सालापर्यंत टस्कगी शाळेच्या इमारतींची संख्या 83 झाली.
होती. 200 विद्याविभागात मिळून 2000 विद्यार्थी शिक्षण घेत होते.
डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता. या हिवाळ्यात मात्र
त्यांचे सहकारी श्री. हॅरि अँबट यांनी 125 डॉलर्स खर्चून नवा कोट
आणला. डॉ. कार्व्हरांनी तो अंगावर चढवायला नकार दिला. मग श्री.
पान नं. 217 शब्द :-1238
अँबटनी हुकमी एक्का वापरला- ""सर, या कोटाला 125 डॉलर्स पडले.
ते पेसे तुम्ही `फुकट' घालवणार का ?""
उभ्या आयुष्यात आपल्या कपडयावर सगळे मिळून 125 डॉलर्स खर्च
न केलेल्या प्रा. कार्व्हरनी तो कोट अंगावर चढवला.
असे काही प्रसंग सोडले तर त्यांचे बाकी सारे साधेच असे. पहाटे
चारपूर्वी उठून, फिरून आले की त्यांचे काम सुरू होई ते चांगले
अंधारून येईपर्यंत. आत्यंतिक निकड असेल तेव्हा रात्र रात्र संशोधनाचे
काम चालू असायचे. त्यांची प्रयोगशाळाही साधीच. प्रयोगाची साधनेही
साधीच. त्यांना बघायला येणाऱ्यांची सतत रीघ लागलेली असे. त्यांचे
ते अज्ञानाचे प्रदर्शन करणारे `चौकस' प्रश्न ऐकून डॉ.
कार्व्हरांच्या साध्या उपकरणांची अपूर्वाई वाटणारे `बघे' त्यांची
उपकरणे पळवत. एखादं मडकं दुधाची फुटकी बाटली किंवा असलंच
काही तरी. डॉ. कार्व्हरांना मात्र हे कोडं उलगडत नसे. `इथून असल्या
वस्तू उचलून नेण्यापेक्षा कमी कष्टात त्यांना त्यांच्या घरी नाही का
मिळणार त्या ? मग हा उपद््व्याप का ? ' मग पुन्हा बिचारे डबे
बाटल्या, मडकी गोळा करून आपली उपकरणं बनवीत. पण डॉ.
कार्व्हरांना हे कसं कळावं की त्यांच्या हातची असली `अधिकृत'
उपकरणे पळवण्यात त्या बघ्यांना प्रोढी वाटत असे.
कोणाला त्यांच्या उपकरणाविषयी कुतूहल, तर कोणाल त्यांच्या
निःस्पृहतेबद्दल. ते पगार वाढ घेत नाहीत. संशोधनाचं मानधन घेत
नाहीत, याचे अनेकांना आश्चर्य वाटे. डॉ. कार्व्हरांना लोकांना याचं
का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे. ते म्हणत, ""ईश्वरदत्त देणगीबद्दल
मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं ?"" यावर `अर्थदास' म्हणे ""तुम्ही
जर असे पेसे घेतले असलेत तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवांसाठी
नसता का करता आला ?""
""मी पेशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो
असतो...""
पान नं. 218
ऑस्टिन कर्टीसने बरीच धावपळ करून एक योजना आखली. डॉ.
कार्व्हर यांचे गेल्या पन्नास वर्षातील कार्याचे दर्शन भावी पिढयांना
घडावे, म्हणून `कार्व्हर संग्रहालय' उभारण्याच्या कामी तो लागला.
भुईमूग,रताळी,रानगवत,टाकाऊ वस्तू, कंदमुळं,हस्तकला,झालरी
(लेसेस्),विणकाम इ. अनेक विषयांवरील त्यांच्या कृती तेथे हारीने
मांडल्या गेल्या. तशीच त्यांची चित्रे ! अलाबामाची माती व आपल्या
हाताची बोटं एवढया साधनांनी उत्कृष्ट चित्रे कशी साकारता येतात,
हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती
तेथे मांडल्या गेल्या. (याच चित्रांपेकी एक चित्र पॅरिसच्या लुक्झेंबर्ग
गॅलरीने विकत घेतले.)
हे `कार्व्हर संग्रहालय' केवळ गतेतिहासाची जंत्री बनू नये, तर
भविष्यकाल घडविण्याचे शिक्षण घेण्याचे साधन बनावे, दक्षिणेच्या
भविष्याचा संदर्भ म्हणून त्याचा उपयोग व्हावा, अशा पध्दतीने
संग्रहालयाची उभारणी केली गेली.
विज्ञानशाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या
उत्कर्षासाठी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत नसे. पदवी
घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौन्दर्य-प्रसाधने किंवा फार
तर एखादं दुसरं `पेटंट औषध' तयार करण्यापलीकडे अन्य काही
बनविण्यास वाव नसे. व्यावसायिक प्रयोगशाळांतून ""निग्रोंना मज्जाव""
अशा अलिखित पाटया. काही ठिकाणी तर कायद्याने बंदी. अशा
परिस्थितीत मोठया कष्टाने आत्मसात केलेले ज्ञान त्या खऱ्या अर्थाने
वापरून पाहता येत नसे. त्यामुळे साहजिकच पुढे. निरूपयोगी ठरणाऱ्या
या विषयाकडे विद्यार्थ्याचा ओढा कमी झाला. हा फार मोठा धोका
होता हुशारमुलांची बुद्धी वाया जाणार होती. डॉ. कार्व्हरांनी इलाज
शोधला कार्व्हर-प्रतिष्ठान स्थापण्यात आले.
पान नं. 219
`मी जॉर्ज डब्लू. कार्व्हर, स्वतः उभारलेले कार्व्हर-प्रतिष्ठान' माझ्या
जवळच्या मिळकतीसह(तेहेतीसहजार डॉलर्स) टस्कगी संस्थेला
अर्पण करीत आहे.' वृत्तपत्रातील ही बातमी साऱ्या जगाला अवाक्
करून गेली.
हे प्रतिष्ठान उभारण्यचा त्यांचे स्वप्न साकार करण्यात अनेकांचा
हातभार लागला. जवळ जवळ दोन लाख डॉलर्स किंमतीची वास्तू
उभी राहिली. हजारो संशोधकांना,विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला.
विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना,प्रगत अभ्यासक्रमात प्रयोग-
शाळेची उणीव भासू नये, म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण
खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारले.
उजाड माळावर फुलबाग फुलविल्याबद्दल,आपले हात केवळ निर्मिती-
साठी वापरल्याबद्दल डॉ. वॉशिग्टनला दिलेल्या वचनाची पूर्तता
केल्याबद्दल त्यांना संस्थेने जे काही मानधन दिले होते, तेही त्यांनी
संस्थेला साभार परत केले होते. कारण ते जाणून होते-काळाच्या
उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं. डोळस कष्टाच्या खतपाण्याने
अंकुरलेल्या कार्यानं मूळ धरलं होतं. नवीन धुमारे फुटत होते. लवकर
फळे लागणार होती.
त्यांच्या द्रष्टेपणाचं,कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर
समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे तेव्हा ते
विनयानं म्हणत.-
""माझी नाहीतर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवानं
आपलं काम करवून घेतलं असतंच. त्यानं माझी निवड केली यात माझी
प्रशंसा करण्याजोगं काय आहे !""
खरंच, अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवानं स्वतःचं देवपण
राखलं होतं.
पान नं. 220
अविरत चार तपे परिश्रम घेतल्याच्या खुणा आता त्यांच्या शरीरावर
चांगल्याच दिसत होत्या. कर्टीस शक्यतो त्यांना एकटे राहू देत नसे.
जेव्हा त्यांना कामामिनित्त बाहेर जावे लागे तेव्हा, त्यांची देखभाल
इतर विद्यार्थी करत. त्यांची जाग घ्यायला मधून मधून प्रयोग-शाळेत
डोकावत. या देखभालीचा डॉ. कार्व्हरना व्यत्यय व्हायचा.
`ही ये जा सहन करायचीच असती, तर मी लग्न नसतं का केलं ?'
मग विद्यार्थ्यांनी सुचवलं,प्रयोगशाळेत दाराला एक छोटे काचेचे
तावदान बसवा. म्हणजे आण्ही बाहेरूनच तुमची जाग घेऊ. मग त्यांनी
ती सोय करून दिली.
1935 च्या सुमारास ते बरेच आजारी झाले होते. अँनिमियचा खूप
त्रास झाला. पण त्यातून ते सावरले अन् पुन्हा कामाला लागले होते.
उतारवय आणि नुकतंच येऊन गेलंल आजारपण यामुळे ते थकले होते.
`म्युझियम' आणि `फाऊडेशन' कडची ये-जा करण्याचा त्रास कमी
व्हावा म्हणून नजीकचे निवासस्थान त्यांना देण्यात आले.
त्यांच्या उतारवयाकडे आणि थकत चाललेल्या शरीराकडे पाहून हेन्री
फोर्ड यांनी त्यांच्या निवासस्थानी लिफ्ट बसवून दिली. जिना चढण्या-
उतरण्याचा त्रास तेवढाच कमी व्हावा म्हणून डॉ. कार्व्हरांना त्या
लिफ्टचं एवढं कौतुक वाटे की, त्यांना भेटायला येणाऱ्यांना ती लिफ्ट
दाखविल्याशिवाय त्यांना चेन पडत नसे.
डॉ. कार्व्हरचं नाव घेतल्याखेरीच वृत्तपत्रवाल्यांना आत दिवस उजाडत
नव्हता. या महात्म्याला एकदा `पाहून घेण्याचं' पुण्य लाभावं म्हणून
बरेच वारकरी टस्कगीला येत. पण वार्धक्याने थकलेल्या कार्व्हरना
आता जनसंपर्क नको असे. स्वतःला प्रदर्शनीय वस्तू बनविणे तर
मुळीच नको असे. आपल्या लाजऱ्या-बुजऱ्या वृत्तीवर मात करणे
त्यांना कधीच जमले नाही. तेव्हा या `वारकऱ्यांपासून दूर राहण्या-
साठी भोजनाच्या वेळीही ते भोजनगृहात न जाता स्वयंपाकगृहात
पान नं. 221
एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशाने उरकत. तिथे त्यांचा संपर्क
येई ते स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर. त्याच्याशी मात्र
ते मोकळेपणानं हास्यविनोद करीत. दुर्मिळ क्षण वेचण्यासाठी, त्यांच्या
सहवासाचा आंनद लुटण्यासाठी विद्यार्थी स्वयंपाकगृह सांभाळण्याचे
काम आपणहून मागून घेत. आकाशवाणीवरच्या भाषणातून किंवा
सभा-व्याख्यानातून न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी ते मुलांना
सांगत. आपल्या विद्यार्थिदशेतील अनुभव सांगून त्यांना शहाणे करत.
धोक्याचे कंदिल दाखवत. रोज काही ना काही सांगून त्यांचे ज्ञान व
त्यांचा आत्मवशिव्सा वृद्धिंगत करत.
बाहेरचं जग मात्र डॉ. कार्व्हरना आता असं एकाकी ठेवायला राजी
नव्हतं. `इंटर नॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्टस्,इंजिनिअर्स,
केमिस्टस अँन्ड टेक्निशिअन्स' या संघटनेने त्यांची `194- सालचा
महामानव ' म्हणून निवड केली.
`दक्षिणेतील `सुंदर विषयाचे ' उत्तम चित्र काढल्याबद्दल चित्रकार
बेन्सफादर यांना बेंजामीन पारितोषिकाचे अडीचशे डॉलर्स बक्षिस
देण्यात आले ' वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी होती. सोबत त्या
सुंदर विषयाचा फोटो होता. तो फोटो होता नीटनेटका आणि
रूबाबदार पोषाख केलेल्या डॉ. कार्व्हर यांचा दक्षिणेतील सुंदर
विषय !!!
त्या दिवशी डॉ. कार्व्हर खुशीत होते ! त्यांचं चित्र काढणाऱ्या पोराला
प्रोत्साहन मिळालं होतं म्हणून !
टस्कगीत आताशी चित्रपट निर्मात्यांची धावपळ चालू होती. त्यांच्या
आयुष्यावर चित्रीकरण चालू होते. आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे
दुर्लक्ष करून ते त्यांना सहकार्य देत होते. एखाद्या होतकरू पोराला
त्यामुळे पुढे यायला प्रोत्साहनच मिळणार होते नाही का ?
पान नं. 222
आता त्यांचा बहुतेक सारा कारभार खोलीतल्या खोलीत चाले. फारच
क्वचित ते प्रयोगशाळेत जात.
1942 साली कॉग्रेस पक्षाने ठराव मांडला- मोझेस कार्व्हरच्या घरा-
मागचं ते लाकडी खोपटं `राष्ट्रीय स्मारक' म्हणून जाहीर करण्यात
आले.
`महानिर्वाण'
पान नं. 223
टस्कगीचं वातावरण गेले काही दिवस जरा उदासच भासत होते. दोन
आठवडयांपूर्वी पोर्चबाहेरच्या बर्फावरून डॉ. कार्व्हरांचा पाय घसरला.
जवळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरलं. त्यांच्या सांगण्यावरून
प्रयोगशाळेत घेऊन गेले. कर्टीसशी बातचीत केली. णग आपल्या खोलीत
परतले ते पुन्हा बाहेर न येण्यासाठीच. सारी टस्कगी चिंताग्रस्त होती.
डॉ. कार्व्हरनी पडल्यापडल्या निरवानिरव करण्यास सुरूवात केली होती.
संस्थेचे अध्यक्ष पॅटरसन यांना बोलावून त्यांच्या हाती `राष्ट्रीय बचत
योजने' च्या रोख्याचे पेसे दिले- `हे प्रतिष्ठानच्या कामी वापरा आणि
जगाला कळू द्या, मी हे मुद्दाम विकत घेतले होते. देशभक्ती ही
कोणत्याही वर्णाची ठेकेदारी नाही. ती बंधनातीत आहे...""
शेवटपर्यंत ते आपल्या कामाची व्यवस्था लावू देत होते. सवड मिळेल
तेव्हा मारियाआत्याने दिलेलं कातडी बांधणीचं बायबल उघडून वाचत
होते.
बायबल उघडताना त्यांना मारियाआत्या समोर दिसत होती. तिने
घातलेली आण... खूप खूप शीक आणि तुझ्या ज्ञानाचा उपयोग
तुझ्या बांधवांसाठी कर...
चित्रकार किंवा संगीतकार व्हायचं होतं.. बाकी त्या हौशी भागवून
घेतल्याच जमतील तशा... हे जातिवंत माळ्याचे हात...यायगरला
पान नं. 224
आवडलेले...आपल्या बांधवांचं जीवन सुसह्य करण्यासाठी खूप
धडपडले.
पाऊस कसा पानापानांतून ठिबकतोय. अलगद हिरव्या धरित्रीवर
उतरतोय. हलकेच जिरतोय. कुठे गेला त्याचा आक्रस्ताळेपणा... ही
खिडकीतून डोकावणारी फांदी तर नात्याचीच आहे. फार पूर्वी
लावलेल्या रोपांपेकी हे एक. केवढं उंच वाढलंय, डेरेदारपण झालंय...
डॉ. वॉशिंग्टन, आज तुम्ही हवे होतात. साधी हिरवळ रूजली,तर किती
आनंद झाला होता...आता हे सूर्याचे किरण अंगावर पडू न देणारे
टस्कगीचे रस्ते अन्, हा पर्णाच्छादित अलाबाम पाहून किती आनंदला
असता तुम्ही !
चर्चमधल्या ऑर्गनचे सूर वातावरणात भरून राहिलेत. मिलहॉलंडबाई
पण पिआनो काय सुरेख वाजवायची, पण तिचं वादन ऐकताना का
कुणास ठाऊक, खूप रडू आलं होतं. खरं म्हणजे संगीताने मन कसं
शांत व्हावं... अगदी आता वाटतं तसं...
अंधार पडू लागलाय. हवेत गारवा वाढतोय... या कोटानं बरीच वर्षे
ऊब दिली. काय उत्साहानं त्या मुलांनी माझ्या अंगावर चढवला होता
हा ! नाही तरी अशा कोटांची ऊब काही वेगळीच.. सुखद...
जिमदादाचं हे एवढंच रूप लक्षात... कधी तरी नेओशाच्या जत्रेत
काढलेला फोटो... बाकी हा नशीबवान...कशी होती कुणास
ठाऊक, पण याला निदान आई म्हणून हाक तरी मारायला मिळाली.
कशाचीच आस नव्हती. एका परेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी
नव्हती. एका भूमीखेरीच कोणाशीच जवळीक नव्हती. अखंड पोरके-
पणानं सावलीसारखी सोबत केली होती....
पान नं. 225
स्वतःचं `काहीच' नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता
पंचत्त्वात निघाला होता.
टस्कगीनं त्यांचा अखेरचा श्वास ऐकला 5 जून 1943.
Saturday, October 11, 2008
एक होता कार्व्हर
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
thnx a lot for posting d whole story :-)
abhari ahe.....
thk u so much
ithe hi story post kelybaddal.
Post a Comment