Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Monday, October 13, 2008

माणसे अरभाट आणि चिल्लर

<जी ए. कुलकर्णी>

<माणसे अरभाट आणि चिल्लर><विष्णू गजानन परचुरे>



एकूण पाने :- 18

FROM 9 TO 26

पान नं:- 9

+

आता यापुढे इंग्रजी शाळेत जायचे म्हणताच मी अगदी हादरून गेलो होतो,

पण तरी त्याबद्दल उतावीळ देखील झालो होतो. आधीची

म्युनिसिपालिटीची शाळा अगदी अंगवळणी पडून गेली होती, आणि शाळा

म्हटले की परूळेकर मास्तरांखेरीज कुणीच डोळ्यांसमोर येत नसे.

ऊनपाऊस असो अगर नसो, परूळेकर मास्तर नेहमी छत्री वापरत व वर्गात

आल्यावर ती ते फळ्याजवळच्या कोपऱ्यात ठेवत. ती मनाप्रमाणे व्यवस्थित

ठेवण्यास त्यांना बक्कळ पाच मिनिटे लागत. अगदी लहान पोरांखेरीज

सारेच जण ज्याला लक्कड म्हणत तो लखू तोपर्यंत फळा पुसून ठेवत असे,

व खडूची पूड भरलेले फडके त्याचा विशेष राग असलेल्या पोरांच्या

तोंडासमोर फडफडवत असे. मग तीन-चार उदाहरणे होत. त्यानंतर

कविता सगळ्यांनी मिळून म्हणायच्या असत. त्या वेळी काही पोरे तोंड

उंघडे ठेवून शुंभासारखी उभी राहत, किंवा उगाचच तोंड हलवत. नंतर

मास्तर महादेव कणेरीला बोलावत. साऱ्या वर्गाला शुध्दलेखन घालायला

सांगत. ते स्वतः बाहेर जात, आणि चहा घेऊ परत आल्यावर खुर्चीत

बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागत.



आमच्या वर्गात आठदहा पोरांचा एक फर्मास घोळका होता. ते सगळे जण

जमिनीवर रेघोटया मांडून चिंचोक्याचा खेळ खेळत. आंब्याच्या दिवसांत

केऱ्यां-मीठ खायची हीच वेळ असे. पुष्कळदा समोरील बिगर इयत्तेतील

छोटया पोरांना खिडकीतून खडे मारायची गंमत करण्याची हीच वेळ होती.

वर्गात अगदी दाराशीच नामदेव खटावकर बसे. त्याच्याजवळ एक मोठी.

छडी होती. हेडमास्तर जिना चढून वर येणार असे दिसले की, तो छडी

जोराने कपाटावर हाणू लागे. परूळेकर जागे होत व लगबगीने फळ्याजवळ

जाऊन उभे राहत आणि काही तरी नाटकी लिहू लागत. सगळे चिंचोके,

बसण्यासाठी फळ्या घातलेल्या असत, त्याखाली जात. हेडमास्तर येऊन

गेले की मग आमचे सारे लक्ष घंटेकडे असे. हेडमास्तर आपले घडयाळ

घरी तरी विसरत, किंवा ते बंद तरी पडलेले असे. म्हणून ते निंगू पाटलाला

कोपऱ्यावरच्या शेटजींच्या दुकानात वेळ पाहून यायला सांगत परत

आल्यावर निंगू हटकून दहाबारा मिनेटे जास्तच सांगे. पण मास्तरांना घरी



पान 10



जायची घाई असली तर ते त्याच्यावर खेकसत, ""जा पुन्हा बघून ये पोस्टात

जाऊन. शेटजीचे घडयाळ मालकाप्रमाणेच नुसते बूड ओढणारे आहे."" निंगू

धावत जाऊन पाहून येई, आणखी पाच-सात मिनिटे वाढवून सांगे आणि

मग पितळी तबकडीवर लाकडी हातोडा दणादणा बडवू लागे. यापेक्षा शाळा

काही निराळी असते याची आम्हांला कल्पनाच नव्हती.



इंग्रजी शाळेविषयी आम्हांला पहिली जबरदस्त माहिती मिळाली, ती म्हणजे

वर्गाला सर्वच विषयांना एकच मास्तर नसतात. दर तासाला नवे मास्तर

भूगोलाचे निराळे, मराठीचे निराळे. त्याशिवाय बसायला पुढे डेस्क

असलेली बाके अगर लांब जोडलेल्या खुर्च्या असतात. मी फर्स्ट `बी' मध्ये

गेलो. त्या वेळी बरीच पोरे आधीच वर्गात येऊन बसली होती. मी आणि

परशुराम खुर्च्यावर बसलो, पण त्यांच्या अगदी अरूंद फळ्यांवर आम्हांला

बसता येईना. आम्ही तसाच तोल सावरत कळ काढली. पुढल्या तासात

देशपांडे मास्तर आले. आम्हांला पाहताच ते समोर येऊन उभे राहिले व

कमरेवर हात ठेवून आम्ही बेडूक असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहू लागले.

ते म्हणाले,""अहो, सिंहासनवाले, खुर्चीवर सरळ बसता येत नाही की काय

तुम्हा विक्रम राजांना ?"" त्यावर सगळी पोरे फिसकल्याप्रमाणे हसू लागली.

मग एकाने सांगितले,""अरे खुर्चीची फळी खाली टाक नि मग बस.""

आमच्या खुर्च्या घडीच्या होत्या. आम्ही अगदी ओशाळून गेलो.



मला वाटले होते, मी इंग्रजी शाळेत गेल्यावर आमच्या वर्गाला दातार

मास्तर येतील. ते आमच्या घरापासून आठदहा घरेच सोडून राहत.

आमच्या घरी त्यांची चांगली ओळख होती. पुष्कळदा आजोबा करंदीकर

आणि अप्पा काळे आले की आमच्या घरी त्यांच्या तास न्् तास गप्पा चालत.

व दादा त्यांना अर्ध्या अर्ध्या तासाने चहा विचारत. पण मी आतून चहा

आणून त्यांच्यासमोर ठेवला की, तेथून माझी हकालपट्टी होत असे. पण

मास्तर सकाळी शाळेत जायला सायकलीवरून निघाले की आम्ही

पाच-सात पोरे त्यांच्या मागोमाग जात असू. मास्तर कधी सरळ सीटवर

बसत नसत. रस्ता थोडा चढ असल्यामुळे पिनवर पाय ठेवून ते उड्या

मारत मारत जात व मग मध्येच उंच होऊन एखादी शिकार पकडावी

त्याप्रमाणे सीट पकडत, आणि त्या वेळी चावट पोरे टाळ्या वाजवत.

मास्तर निदान अर्धी गल्ली तरी अशा उड्या मारतच पार करत. दादा तर

म्हणायचे,""हा किटू अशाच उडया मारत आणखी थोडा पुढे गेला की



पान नं. 11

शाळेतच जाऊन पोहोचेल. मग सीटवर बसण्याची गरजच राहणार नाही.""



दातार मास्तरांमुळे तर दादांनी ही शाळा माझ्यासाठी निवडली होती. पण

पहिल्या तीन-चार वर्षांत मास्तर आमच्या वर्गाला आलेच नाहीत. कधी तरी

भूगोल अथवा शास्त्र असल्या विषयाच्या बदली तासाला येत. पण मग ते

आम्हांला काही तरी लिहायला सांगत इतकेच.



मास्तरांच्या स्वतःच्या शिक्षणाची झालेली परवड आम्हा सगळ्यांना माहीत

होती. शाळेत वार्षिक परीक्षा आली की, आई किंवा वडील हटकून आजारी

पडत व औषधपाण्यातच त्यांचे वर्ष फुकट जात असे. आपल्या हयातीतच

मास्तरांनी बी.ए. व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती. पण ते

मात्र घडले नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदी विषय घेऊन बनारसला जाऊन

मास्तर बी.ए. झाले व मोठया कष्टाने मिळवून टिकवून धरलेली त्यांची

नोकरी सुसूत्र झाली. ""तुमचे पेपर कले गेले ?"" असे अनेकदा मास्तर

विद्यार्थ्यांना विचारतात, पण खुद्द मास्तरांनाच तसे विचारण्याची संधी

आम्हांला मिळाली. आम्ही तसे विचारले तर दातार मास्तर हसून म्हणत,

""कसे गेले म्हणजे काय ? गेले एका लहान पेटाऱ्यांतून !"" ते पास झाले हे

समजताच आम्ही गोंगाट करून त्यांच्याकडे पेढे मागू लागलो. एरव्ही

मास्तरांनी म्हटले असते, "" आता जर आवाज कराल तर भोपळ्यांनो, तुम्हा

सगळ्यांनाच पाठवीन प्रिन्सिपालकडे. तेथे मग मिळतील वाट्टेल तेवढे पेढे !""



पण त्या दिवशी मासतरांचे मन ठीक दिसत नव्हते. त्यांनी खिशातून

हातरूमाल काढला, पण तो तपकीर पुसण्यासाठी नव्हे. तपकिरीचा

हातरूमाल वेगळा होता. हा छोटा व स्वच्छ होता. ते खिडकीपाशी गेले व

आमच्याकडे पाठ करून डोळे टिपून परतले. तरी सुध्दा त्यांचे डोळे

अद्याप नानू बापटाप्रमाणे ओले होते. मग मात्र आम्ही खाडकन गप्प झालो

व काही तरी वाचण्याचे ढोंग करू लागलो.



आमच्यापेकी काही जणांना मास्तरांचा एक विशेष जबरदस्त वाटे. दुसऱ्या

शाळेतील आमचे दोस्त भेटले की आम्ही ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांच्या

नजरेस आणत होतो. पुसत्कावर किंवा पुस्तकात कुठे तरी ज्याचे नाव

छापलेले आहे, तो लेखक मेलेलाच असतो, अशी समजूत करून घेण्याचे

ते वय. पण मास्तरांमुळे बोलणारा चालणारा असा एक लेखक प्रत्यक्ष



पान नं. 12

पाहण्याचा अनुभव आम्हांला मिळाला होता. दातार मास्तर म्हणजे न

दुखवता हळूच कान पिरगळणारे, किंवा ""अरे भोपळ्या !"" म्हणत

बिनशिंगाचा राग दाखवणारे नुसते मास्तर नव्हते. मास्तर लेखक व कवी

होते. त्यांचे चार-सहा लेख आणि बऱ्याच कविता प्रसिध्द झाल्या होत्या. ते

लेख किंवा त्या कविता मला कधी पाहायला मिळाल्या नाहीत, पण आपल्या

एका छोटया नाटकाची प्रत मात्र त्यांनी मला दिली होती. देह-घर नावाच्या

घरात अनेक आगंतुक माणसे घुसून राहिली होती. एकाचे नाव होते खादाड.

तो सदोदित काही खात असे. दुसरा एक जण होता त्याचे नाव होते आळशी

व तो नेहमी जांभया देत असे. आणखी एक जण झोपाळू नावाचा होता तो

नेहमी झोपून आडवा पडलेला असे, त्यामुळे त्याला नाटकात फारशी

भाषणे नव्हतीच. अशीच आणखी थोडी माणसे त्या घरात राहत होती. एक

दिवस त्या घराचा मालक उद्योगराव येतो व छडीने बडवत सगळ्यांना

हाकलून घालतो, आणि मग घर सुखाने शोभू लागते. या नाटाकाच्या

जोडीला मास्तरांनी सुबोध रामायण देखील लिहिले होते व त्यात त्यांची

स्वतःची पाच चित्रे छापली होती. त्यांनी लिहिलेल्या दोन गाण्यांची तबकडी

सुध्दा निघाली होती. ती गाणी त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या मालती

जांभेकरने म्हटली होती. त्या काळी रेकॉर्ड निघणे किंवा रेडिओवर कार्यक्रम

मिळणे ही गोष्ट फार दुर्मिळ व डोळे दिपवणारी होती. आज रेडिओ आर्टिस्ट

पेशाला मण भेटतात.



मालती जांभेकरचा एक कार्यक्रम रेडिओवर झाला म्हणून सुनंदा कामत

तर आपल्या खोलीत बसून तेथेच चहा-जेवण मागवू लागली, आणि

महिनाभर आपल्या जुन्या मेत्रिणींशी बोलली नाही. जांभेकरांना सगळ्या

मुलीच होत्या व गल्लीत सारे जण त्यांना ""हाच मुलींचा बाप"" म्हणत.

मालती ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. ती स्वभावाने मुळातच थोडी जादा

होती. आपणाला इतरांपेक्षा निराळी हवा श्वासोच्छ्वासासाठी लागते हे

दाखवण्यासाठी ती नेहमी नाक वर करून चाले. आकाशाला नाक

लावण्याची जर एखादी स्पर्धा असती तर मालतीला कायम बक्षीस मिळत

गेले असते ! पण या साऱ्याबद्दल आमचा तिच्यावर काहीच राग नव्हता. एक

तर की आमच्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी होती,आणि तिला तो तोरा

थोडा शोभूनच दिसे. तिचा आवाज साखरपाकाच्या तारेसारखा होता आणि

ती समोरून गेली की एखादा छबिना गेल्याप्रमाणे वाटे. शिवाय ती



पान नं. 13

खरोखरच बुध्दिमान होती.नंतरच्या आयुष्यात तिने सगळ्या परीक्षांत

फटाफट फर्स्टक्लास मिळवले, आण ती पुण्याच्या एका कॉलेजात

प्रोफेसर झाली. बोटावर मोजण्याइतकीच कॉलेजे असताना त्यांतील

एखाद्या खानदानी कॉलेजात प्राध्यापक होणे हे छाती दडपून

टाकण्याइतकेच यश होते. त्या वेळी आनंदाने व्याकुळ झालेल्या

जांभेकरांचा चेहरा मला आज देखील आठवतो. स्वतः मँट्रिकपलीकडे जाऊ

न शकलेल्या या माणसाचे पाय जमिनीवर ठरेनात. या वेळी त्याने घरी

जाऊन काय वाटले असेल -पेढे ? छट््. त्यांनी गल्लीतील प्रत्येक घरात

वाळ्याची एकेक लहान जुडी नेऊन दिली. यापेक्षा मूठभर दुर्वा देणे कमी

खर्चाचे झाले असते अशी काही जणांनी त्यांची थट्टा केली. एकाने तर

नारळाची शेंडी घरोघरी वाटणे हाच उत्तम मार्ग ठरला असता, असे सुध्दा

सांगितले. कळवळलेल्या चेहऱ्याने जांभेकर आमच्या घरी आले व थोडा

वेळ दादांबरोबर बोलत थांबले. ते फार खजील झाले होते. तरी ते शांतपणे

म्हणाले,""भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा, आणि देऊन देऊन

प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे."" मालतीने नंतर तीन-चार पुस्तके देखील

लिहिली, पण ती नंतरची गोष्ट आहे.



आता एक लेखक, कवी व नाटकार म्हणून दातार मास्तरांविषयी

आम्हांला उदंड अभिमान होता, व पुस्तकावर असलेले त्यांचे छापील नाव

पाहून आम्हांला फार हेवा सुध्दा वाटे.



पहिली तीन वर्षे कशी गेली कोणास ठाऊक ! पण प्रत्येक वर्षी दोन-तीनदा

तरी वर्गातून बाहेर जावे लागले, हे मात्र मला आठवते. सडेकर मास्तर

मराठी घेत व निबंध लिहायला सांगत. त्यांचे विषय चांगलेच ऐसपेस असत.

आणि त्यांचा संबंध सगळ्या जगाशी किंवा बाजार उतरला तरी निदान

अखिल भारताशी असे. भारतातील बेकारी कशी नाहीशी होईल ? युध्दे

कशी थांबतील ? देशभक्ती इत्यादी. त्यांचे सगळेच विषय आमच्या

आवाक्याबाहेर असत व त्यांच्याविषयी आम्हांला काहीच आवड वाटत नसे.

आज चाळीस-पन्नास वर्षांनंतर देखील जगातील युध्दे थांबवण्याचा मार्ग

मला मिळालेला नाही. आमच्या शेजारच्या पांगळ्या मधुकरला त्याला कुठे

खेळायला जाता येत नाही, म्हणून त्याच्या वडिलांनी एक छोटा कुत्रा आणून

दिला. तो एकदा उंबऱ्याबाहेर गेला. मधू पुढे सरकून त्याला आवारायच्या

आत तो रस्त्यावर गेला व एका सारवटाखाली सापडून चिरडून गेला.



पान नं. 14

आमचा पोपट एकदा मांजराने मारला. याविषयी लिहायला मला आवडले

असते. एकदा भीत भीत मी सडेकर मास्तरांना विचारले. तेव्हा ते खेकसून

म्हणाले, ""तुझ्या पोपटाची हकीकत ऐकायला सारं जग वाट पाहत आहे

असा कोण लागून गेला आहेस रे तू दीड बाजीराव ?"" ते ऐकून प्रभाकर,

तातू सामंत, नानू बापट यांनी तोंडे घट्ट मिटून ठेवली. प्रभाकरला त्याच्या

घराजवळ असलेल्या सात चिंचांच्या झाडांविषयी लिहायचे होते. मुद्दाम

लावल्याप्रमाणे ती गोलाकार रेषेत वाढली होती. अनेकदा मी प्रभाकरबरोबर

त्यांच्या त्या गर्द सावलीत जाऊन बसत असे. तेथील सावली देखील

किंचित हिरवट दिसायची व तिला चिंचेच्या कोवळ्या पानांची, फुलांची चव

आहे असे वाटून जीभ शिवशिवू लागे. तेथे गेल्यावर काही करावे, खेळावे,

बोलावे असे वाटतच नसे. नुसते बसावे अगर आभाळावर चिंचपानी नकशी

पाहत अंग पसरावे असे वाटे. प्रभाकरचे वडिल हातभर उंच होते तेव्हा

देखील ही झाडे अशीच खानदानी आणि पोक्त दिसायची असे ते सांगत.

मग काय झाले कुणास ठाऊक ? म्युनिसिपालिटीने ती झाडे तोडून त्या

ठिकाणी दवाखाना बांधण्याचे ठरवले. मग प्रभाकरने आईकडून छोटे नेवेद्या

करून घेतले व प्रत्येक झाडापुढे ठेवले. त्याचे आईवडिल रात्री त्या ठिकाणी

गेले व तेथे एक पणती लावून परतले. रात्रभर आईच्या डोळ्यांतले पाणी

थांबले नाही. झाडावर पहिली कुऱ्हाड पडण्याच्या आधीच प्रभाकरच्या

वडिलांनी ते घर सोडले व ते किल्ल्यात राहायला गेले. तातू सामंतला

आपल्या थोरल्या भावाविषयी लिहायचे होते. त्याने त्या भावाला पाहिले

सुद्दा नव्हते, कारण त्याच्या जन्माआधीच तो वारला होता. पण त्याची आई

त्याला त्याच्याविषयी सतत सांगत असे. तिने त्याचे जुने कपडे, त्याची

पाटी, त्याचा भोवरा-सारे अगदी जपून ठेवले होते. नानू बापट देखील

मधून मधून आमच्याच येऊन बसत असे. पण तो सतत कुठल्या तरी एका

नदीविषयीच बोलत असे, त्यामुळे आम्हांला फार कंटाळा येई. त्याच्या गावी

एक नदी होती. तिच्याकडे पाहत काठावरच्या एका दगडावर बसले की

तिच्या पाण्याबरोबर आपण सुध्दा वाहत जात आहो, नव्या प्रांतात, देशांत

चाललो आहो, असे त्याला वाटे. एकदा तर तो नदीबरोबर इंग्लंडला देखील

गेला होता म्हणे. पण एकदा काही तरी विलक्षण घडले. नदीवर ऊन पडले

की पाण्यात झगझगीत जरीतुकडे दिसत. एकदा ते सगळे एकदम डोळे

झाले व नानूकडे रोखून पाहू लागले. तो घाबरून उठला तेव्हा कुणी तरी

मोठयाने हसले. ते सांगत असताना देखील नानू भेदरायचा. शेवटी हटकून



पान नं. 15

त्याचा प्रश्न असे, ""कोण हसले असेल त्या वेळी ?""



एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : ""प्रयत्न वाळूचे कण

रगडिता ... "" रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर

सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; `उद्योगाच्या घरी ऋध्दी सिध्दी

पाणी भरी '... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर: माहितीचा कागद असतो,

त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून

आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही दोनदा लिहिले

देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास

ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : ""प्रयत्ने वाळूचे

कण -"" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच

नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर

देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची

उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानेलेल्या माणसाची (एखाद्या वेळी)

तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा

थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे ह्दय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून

ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट

अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला

पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरूवातीला शिंकलेच पाहिजे

असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे.""



मास्तरांनी छद्मी आवाजात माझा निबंध वर्गात वाचून दाखवला. पोरे

फिदीफिदी हसली. ते म्हणाले,""जादा शहाणपणा दाखवू नको. निबंध पुन्हा

लिहून आण आणि आता येथून चालता हो."" त्यांनी मला वर्गाबाहेर घालवले.

निबंधाची वही घेण्याची तसदी देखील त्यांनी वाचविली, कारण मी

वर्गाबाहेर पडल्यावर त्यांनी ती वही फर्रदिशी बाहेर फेकली. बऱ्याच

उशीरापर्यंत जागून लिहिलेल्या त्या निबंधाबद्दल मी घरी मात्र काही

बोललो नाही.



पण मला नेहमी नवल वाटायचे ते एका गोष्टीचे. दिवेकर तिसरीत दोनदा

नापास झाला होता. जाधव गणितात उत्तम होता, पण त्याला इंग्रजी येत

नसे. त्या दोघांचे होमवर्क अनेकदा मीच करून देत असे. पण निबंधात मात्र

त्यांना नेहमी दहापेकी आठ-नऊ मार्क पडत. एक दिवस मी रागारागाने



पान नं. 16

त्यांना विचारले, तर ते एकमेकांना ढकलत हसतच राहिले. मग दिवेकर

म्हणाला, ""तू माझा जिगरी दोस्त म्हणून सांगतो. यातली ग्नानबाची मेख

अशी आहे बघ. माझ्याकडे दोन वर्षांच्या जुन्या वह्या आहेत. जाधवचे दोन

भाऊ येथेच शिकून गेले. त्यांच्या वह्या त्याच्याजवळ आहेत. सडेकर

मास्तरांचे सहा-सात विषय ठरलेले असतात, भारतातील बेकारी, युध्दे

कशी थांबतील, दारूबंदी, प्रयत्ने वाळूचे, जातिभेद, खेडयातील जीवन. दर

खेपेला आम्ही तेच जुने निबंध उतरून काढतो. मास्तर कधी तरी दोनचार

वह्या पाहतात, आणि बाकीच्या वह्या त्यांची बायको तपासते. म्हमून आम्ही

आमच्या निबंधावर दहापेकी आठ किंवा नऊ मार्क सुध्दा लिहून ठेवतो.

मास्तरांना वाटते, बायकोने आधीच मार्क दिले आहेत, तर बायकोला वाटते,

मासत्रांनी या वह्या आधीच तपासलेल्या आहेत. आता बघ पुढल्या खेपेला

देशभक्ती हा विषय येतो की नाही ते !""



पण दिवेकराचा अंदाज चुकला. मास्तरांनी यो खेपेला खेडयांतील जीवन

हा विषय दिला आणि या खेपेला दिवेकर-जाधव यांच्या जोडीला माझी

देखील तिसरी मोट कुरकुर आवाज करत चालू लागली, व आमच्या

सगळ्यांना गोठयांतून गाई-वासरे हंबरू लागली.



भूगोलाला कुलकर्णी मास्तर होते. त्यांनी देखील एकदा मला वर्गातून

हाकलले. ते अतिशय नाकातून बोलत. आमचा एक महिना तोंड गच्च दाबून

धरून त्यांच्या बोलण्याची सवय करून घेण्यातच गेला. पण ते काय

सांगतात हे ऐकण्याऐवजी ते कसे सांगतात हे पाहण्याची वृत्ती मात्र गेली

नाही. आमच्या वर्गाला अगदी दरवाज्यापासून दुसऱ्या भितींपर्यंत मोठा

सिमेंट बोर्ड होता. एकदा ते दरवाज्याजवळ उभे राहिले व हात जोडून त्यांनी

बोर्डाच्या वरच्या कोपऱ्यापर्यंत. नेले. मग त्यांचा गुंजारव सुरू झाला.



""गंगा येथे उगम पावते, मग ती अशी हिमालयातून खाली येते."" त्यांनी

जोडलेले हात खाली आणून ओंजळ समोर धरली व गंगेचा प्रवास दाखवत

ते पुढे निघाले. वाटेत ते खुर्ची सरकवून प्लँटफॉर्मवर चढले व तो ओलांडून

पलीकडे उतरले व सरकत सरकत शेवटी बोर्डच संपला. तेथपर्यंत आले

व त्या ठिकाणी तळवे उघडून ""या ठिकाणी गंगा समुद्राला मिळते,"" असे

त्यांनी सांगितले. आता बोर्डच संपला म्हणून गंगा नदी त्यांच्या आवाजातून

निसटून धावत समुद्रात गेली. त्यांच्या इतक्या आवाजाच्या सवयीनंतरही



पान नं. 17

मला हसू आवरले नाही. तेव्हा गंगेला सासरी पोचवल्यावर टेबलावर छडया

हाणत त्यांनी मला वर्गाबाहेर हाकलले.



खरे म्हणजे संस्कृतचे दामले मास्तर सावरी कापसाची आठवण व्हावी असे

गुबगुबीत व सौम्य दिसत. ते जुनेच नव्हेत,तर प्राचीन होते. त्यांना वाढवून

दिलेली दोन वर्षांची मुदत देखील आता संपत आली होती.



ते फार सौम्यपणे बोलत व रूईची केळ फुटल्याप्रमाणे त्यांच्याकडून शब्द

येत. साऱ्या आयुष्यात त्यांनी कधी कुणाला कठोर शब्द वापरला नसेल,

पण त्यांच्याकडून देखील मी एकदा हाकलला गेलो. खरे म्हणजे ते एक

रेकॉर्डच होते.



मास्तर स्वतः थोडे सद््गदित होऊन धर्मराजाविषयी बोलत होते.

पांडवांमध्ये धर्मराजाविषयी मला कधी फारसे आकर्षण वाटले नाही व

त्याच्याविषयी जास्त माहिती करून घेण्याची कधी इच्छा झाली नाही.`नरो

वा कुंजरो वा' हा एकच क्षण त्याच्या आयुष्यात नाटयमय ठरला. पण त्या

क्षणातील क्रौर्य, कारूण्य ही कधी त्याला जाणवली होती की काय कुणास

ठाऊक ! धर्मराज म्हणताच त्या वेळी माझ्यापुढे एकच चित्र येत असे. संत

चित्रपटांतील संत ज्याप्रमाणे हनुवटी वर करून डोळे ओलसर करून

घोगऱ्या आवाजात बोलणारा, भक्ती, सत्य, स्न्मार्ग, कर्तव्य असल्या

शब्दांखेरीज एक वाक्य न बोलणारा, उपदेशाची एकही संधी न सोडणारा,

नातीचे नाक पुसताना देखील उपनिषदांतील एक अवतरण दिल्याखेरीज

न राहणाऱ्या आचार्यांची जी एक पेदास नंतर दिसू लागली होती

त्यांतील एक असल्याप्रमाणे वागणारा - थोडक्यात म्हणजे

सगळ्याच do-gooders प्रमाणे a bit of a bore. पण मास्तर

म्हणत होते,""अरे, तो इतक्या स्वच्छ मनाचा होता की तो दुर्योधनाला

देखील सुयोधन म्हणत असे."" त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले व ते म्हटले,

""तुला काय वाटतं ?""



त्यांनी तो प्रश्न मलाच का केला हे एक कोडेच होते. मी काही समोरच्या

बाकावर नव्हतो. मी चौथ्या रांगेत अत्यंत निरूपद्रवीपणाने `कालिकांमूर्ती '

वाचत होतो. त्यामुळे तो प्रश्न माझ्यावर येताच माझी धांदल उडाली. मी

म्हटले, ""सर, कोणते आईबाप `वाईट' अशा अर्थाने सुरू होणारी नावे

आपल्या मुलांना देतील ? मुलीचे नाव दुःशीला ठेवतील ? भुते-पिशाच्चे



पान नं. 18

यांपासून संरक्षण व्हावे, व मुले दीर्घायुषी व्हावीत या हेतूने दगडू, धोंडू

मसणू, उकीरडा अशी नावे काही वेळा दिसतात, पण सगळ्याच शंभर

एक मुलांची नावे तशी असतील का ? तेव्हा `दुर' या अक्षरांना `वाईट'

असा अर्थ नंतर केव्हा तरी आला असला पाहिजे. शिवाय ही अक्षरे म्हणजे

काही नंतर लावलेला उपसर्ग नव्हे. ती अक्षरे काढल्यानंतर

उरलेल्या शब्दांना नेहमीच अर्थ उरतो असे नाही. तेव्हा कुठल्या तरी

कीर्तनकाराने सूपभर तांदळासाठी ही वावडी उडवलेली असावी. तरी बरं

धर्मराज आज हयात नाही. नाही तर त्याने `बॅडमिंटन' ला `गुडमिंटन'

म्हटले असते.""



पण या धर्मराजामुळे मी गोत्यात आलो. दामले मास्तरांनी मला वर्गाबाहेर

तर घातलेच, शिवाय प्रगतिपुस्तकावर `उध्दट' असा शेरा लिहिला. त्यामुळे

मला घरी देखील सक्तमजुरी मिळाली. पण या साऱ्या अवधीत आनंदाच्या

काही गोष्टी घडल्या. नाही असे नाही. उत्तम व मराठी हस्ताक्षरासाठी मला

दोनदा बक्षिसे मिळाली. आमच्या शाळेचे अद्याप देशीकरण झाले नव्हते.

आमचे प्रिन्सिपॉल अमेरिकेतून येत. एकदा डॉक्टर हिल नावाचे प्रिन्सिपॉल

होते. निळा सूट घालून ते सावकाश शाळेभोवती फिरू लागले की `ऐरावत'

सरकत असल्याप्रमाणे दिसत. अशा फेऱ्या घालत असता त्यांच्या कोटाच्या

बाहीत वेताची छडी असे. ती काही केवळ शोभेसाठी नसून तिची सणसणीत

ओळख अनेकांना झाली होती. त्या दिवसांत प्रत्येक वर्गात मोठी चित्रे

लावली जात. एकदा हिल आमच्या वर्गात आले व त्यांनी विचारले,""हे

प्राचीन अँम्फी थिएटर कुठे आहे ?"" खरे म्हणजे त्या चित्रावरच `रोम' असे

लिहिले होते. पण ते सांगितल्यानंतर त्यांनी विचारले,""रोम कुठे आहे ?""



त्यावर मी भीत भीतच, उत्तर दिले,""इटलीत"". भीतभीतच कारण त्या वेळी

इटली व ईजिप्त यांबाबत माझ्या मनात बराच गोंधळ होता. ""you are

right"" म्हणत त्यांनी माझे नाव लिहून घेतले. थोडया वेळाने शिवाप्पा एक

नोटिस घेऊन आला. साहेबाने मला ताबडतोब बोलावले होते. ते ऐकूनच

माझे अवसान संपले. कारण साहेबाकडे गेलेला कोणताच मुलगा सरळ

चेहऱ्याने परत येत नसे. ड्रिलमास्तर नातू यांनी तर कुत्सितपणे सांगितले,

""हाताला खोबरेल नाही तर साबण लावून जा. म्हणजे छडया मऊ

वाटतात.""



पान नं. 19

पण तसे काही घडले नाही. मी ऑफिसमध्ये जाऊन उभा राहिल्यावर साहेबाने

एक टाक काढला, व तो म्हणाला ""this is for you."" मी `थँक्यू' म्हणून

बाहेर पडलो, तो वर्गाबाहेर येऊन थांबलो. टाक म्हणजे काचेच्या नळीत

पोपटाच्या कोवळ्या पिसांच्या रंगाचे पाणी होते व त्यात मोहरीएवढा लहान

मासा होता. टाक वर-खाली केला की हो काचेचा मासा जिवंत

असल्याप्रमाणे वर-खाली होत असे. खरे म्हणजे टाक म्हणून त्याचा काहीच

उपयोग नव्हता. शाईत बुडवून त्याने लिहायला बसले की शाई ओघळून

मनगटावर येत असे. पण हिरव्या पाण्याचा रंग मात्र अतिशय आकर्षक

वाटे. रोम इटलीमध्ये आहे, हे माहित असणे म्हणजे काही ज्ञानाची

परमावधी नव्हे. पण तो टाक मी आज देखील जपून ठेवला आहे.



तेव्हापासून मात्र सारे स्वच्छ मोकळे वाटू लागले. दातार मास्तर प्रथमच

आमच्या वर्गावर आले. आणि आम्ही अगदी मॅट्रिक होऊन बाहेर पडेपर्यंत

आम्हांला टिकले. त्यांनी आम्हांला इंग्रजी शिकवले, गणित शिकवले व

विशेष म्हणजे ते मराठीचे तास घेत. दुसरे अविस्मरणीय शिक्षक म्हणजे

सायमन. साधारणपणे कोट, ऐसपेसपणे उडत असलेले धोतर, किंवा स्वच्छ

आभाळापेक्षा भूमातेलाच जास्त जवळ असणारे काचा मारलेले धोतर व

आखूड कोट एवढे कपडे पुरेसे मानणाऱ्या त्या शाळेत सायमन मात्र अत्यंत

नीटनीटकेपणाने सुटात येत. त्यांचे अनेक रंगांचे टाय होते. टायवर

झगझगीत पिन असे. कोटाच्या वरच्या खिशात हातरूमालाची टोकदार

त्रिकोणी घडी असे. ते जवळून गेले की सौम्य आकर्षक सेंटचे हलके पीस

जवळून गेल्याप्रमाणे वाटे. पण माणूस मात्र कुर्रेबाज. त्याला कुठल्या

अलबत्या-गलबत्याची सलगी खपायची नाही, की काही वावगे खपायचे

नाही. मागच्या बाकांवर बसणारी निबर नापाशी पोरे तर त्यांच्या दृष्टीने

रजिस्टरमधील नुसती नावेच होती. कुणी इंग्रजी निबंध पेन्सिलीने अगर

लाल शाईने लिहिला तर वही गेलीच खिडकीबाहेर. वासू केळकरने

निबंधाच्या एका वहीत वर श्री काढून त्याखाली कुठल्या तरी मोठया

पोटांच्या स्वामीचे चित्र लावले, तर खिडकीतून बाहेर फेकलेली वही

शोधायला त्याला पाच मिनिटे लागली.



त्या वेळी आम्हांला रॉपिड रिडिंग नावाचा एक खुळचट विषय होता. त्यात

आम्हांला दोनशे ओळी इंग्रजी कविता वाचाव्या लागत. रँपिड म्हणजे काय

याचा अर्थ मला अजूनही ठाऊक झालेला नाही. सायमन मास्तरांनी ग्रेची



पान नं. 20

`एलिजी' शिकवायला वीस तास घेतले. त्या वेळी अनुभवलेला थरार

अजूनही कधी तरी जागा होऊन आठवण उजळून जातो.



त्यानंतर टेनिसची Tears, Idle Tears व अर्नोल्डची Forsaken

Merman या कविता घेतल्या. ठरल्या ओळी होऊन गेल्या तरी सायमन

मास्तरांचे रॅपिंड चालूच राहिले. अ तुकडीच्या राव मास्तरांनी सगळाच

मामला सात तासांत खलास केला. नंतर ते डिक्टेशन घालून खुर्चीत स्वस्थ

बसत. काही माणसांना कधी काव्याचा स्पर्श होत नाही, कधीच काहीची

काव्याची धुंदी उतरत नाही, हेच खरे. नंतर सायमन इंदूरला गेले. तेथे

त्यांची बायको डॉक्टर होती, आणि सायमनना तेथील विभागाच्या

मिशनमध्ये काम करावे लागणार होते. जाताना त्यांनी काहीवस्तू

आमच्यापेकी काही जणांना वाटल्या. प्रभाकरला एक नक्षीदार दौत

मिळाली. मला त्यांनी एक अँटलास, चार जुनी व अत्यंत सुदंर ख्रिसमस

कार्डे आणि दोनच थेंब अत्तर उरलेली बाटली दिली. अत्तर संपून गेले.

कार्डे देखील कुठे नाहीशी झाली. पण त्यांनी शिकविलेल्या कविता मात्र

देव्हाऱ्यामधील चांदीच्या टाकाप्रमाणे मनात अगदी स्वच्छ आहेत. नंतर

अनेक वर्षांनी स्वतः कविता शिकविण्याचे दिवस आले तेव्हा सतत वाटायचे.

सायमन मास्तरांच्या शिकविण्यातील एक दशांश तरी माझ्यात यावा. पण

तसे कधी घडल्याचे समाधान मला आठवत नाहीत.



सायमन मास्तरांचा तास संपला की शाळेतील दिवसाची सुगंधी घडी जात

असे. त्यानंतर काचा मारलेले व बटाटयांच्या सालीच्या रंगाच्या धोतरातले

दातार मास्तर येत. मग आम्हांला एकदम ऊबदार, घरगुती व काही वेळा

तर वाह्यात वाटू लागे. शाळेत एकदा पुस्तके टाकली की संध्याकाळपर्यंत

तिकडे ढुंकून न पाहमारा थोडे देखील त्या तासाला हजर राहत असे. तो

काही अभ्यासाकरिता येत नसे. पण त्या वेळी वर्गात जी गंमत चाले ती

त्याला आवडे.



दातार मास्तरांनी अगदी मॅट्रिकपर्यंत आम्हांला हा ना तो विषय शिकवला.

पण शिकवणे म्हणजे कोंडट, कंटाळवाणे वातावरणे मात्र कधी नसं.

कुठल्या तरी मोठया माणसाचे श्राध्द चालले आहे असा भास नसे.



विषय कुठलाही असो, प्रथम ते खडूच्या तुकडयांनी भरलेली जुनी

कापूरपेटी काढत. मग फू फू करून टेबल त्यातल्या त्यात स्वच्छ करून



पान नं. 21

घेत, व तपकिरीची डबी काढून चिमूटभर तपकीर नाकपुडयांत भरत.

सायमन मास्तर जवळून गेले की सेंटची बाटली उघडल्याप्रमाणे वाटे, तर

दातार मास्तर येऊ लागले की जवळपास कुठे तरी तपकिरीचे दुकान

असावे असे वाटू लागे. सेंटमुळे एकदम चपापल्याप्रमाणे वाटे, तर

तपकिरीच्या वासाने अवघडलेले मन सेलावत असे.



त्याचीच खूण आजपर्यंत टिकली आहे. काही पूर्वग्रह जबरदस्त असतात व

जळूप्रमाणे ते आयुष्यात कायम चिकटून राहतात. आपली नात घरातील

पुस्तके कशी टराटरा फाडून बाहेर फेकते, किंवा आरसे-कपबशा फोडून

खिडकीतून बाहेर फेकते, हे कौतुकाने व बऱ्याच विस्तराने सांगत

बसणाऱ्या एखाद्या आजोबाला क्षमा करणे काही वेळा मला कठीण वाटत

नाही. पण तंबाखू चघळत ओठांची कुंची करून बडबडणाऱ्या माणसाची

मात्र ताबडतोब बाहेर रवानगी होईल. आपल्या गेल्या ऑपरेशनविषयी

स्टूल रिपोर्टपासूनसारे काही सांगणारी बाई, कडा कातरल्याप्रमाणे काढून

चपातीचा मधलाच भाग खाणारी माणसे, येताना इतर दोन-तीन जणांना

आगंतुकपणे बरोबर आणणारे पाहुणे, जीन्स घालणाऱ्या मध्यमवयीन

स्त्रियां, यांना माझ्याकडे औपचारिक देखील स्वागत नाही. पण कुणी

तपकीर ओढत असेल तर त्याच्याशी अर्धा तास मनमोकळ्या गप्पा मारणे

मला बरे वाटते. मला स्वतःला तपकीर आवडत नाही, पण तपकीर ओढणारे

दातार मास्तर आवडत, व त्यांच्यामुळे त्यांच्या वर्गातील लोकांविषयी मला

जवळीक वाटते.



दातार मास्तरांच्या तासांपेकी एक तास सातवा असे. त्या वेळी पोरे कंटाळून

गेलेली असत. व मास्तर देखील चुरगळलेले दिसत. अशा वेळी क्रिकेट

आणि गडकरी ही मास्तरांची देवते आमच्या मदतीला येत. पण त्यासाठी

गनिमी कावा लढवावा लागे, व त्याची योजना सकाळपासूनच ठरवावी

लागे. खरे म्हणजे मास्तर स्वतः काचा मारलेल्या धोतरात, उघडया

पावलांनी जिमखान्याच्या कोर्टावर टेनिस खेळत आणि बऱ्यापेकी खेळत.

हातभर उंच असलेल्या नाइक मास्तरांनी एकदा सर्व्हिससाठी चेंडू वर

उडवला, पण तो रॅकेट चुकवून त्यांच्या नाकावर पडला व त्यांचा चष्मा

मोडला. तेव्हापासून मास्तर माणसे टेनिस खेळत आहेत हे समजताच

आम्ही आमचा खेळ तसाच टाकून कोर्टाच्या कडेला जाऊन बसत असू.

आम्हांला टेनिसमधले फारसे काही कळत नव्हते, पण नाइक मास्तरांच्या



पान नं. 22

सारखी गंमत पुन्हा घडली तर त्या वेळी आम्हांला गेरहजर राहायचे नव्हते.



कधी कधी तर दातार मास्तर क्रिकेट देखील खेळत. त्या सगळ्यांची कसली

तरी संडे टीम देखील होती. मोठयांत जॅगरी किंग आणि पोरांत गुळाचा

गणपती म्हणून प्रसिध्द असलेले पाटील हे मूळचे गुळाचे व्यपारी

हॉटेलवाले रेगे त्या टीममध्ये होते. शिवाय डाव्या हाताने बोलिंग करणारे

थत्ते वकील, आणि अडीअडचणीला कोणत्याही विषयावर धार्मिक अथवा

राष्ट्रीय कीर्तन करणारे ग्रामोपाध्ये हे देखील होते. असली टीम जगात कधी

झाली असेल की नाही कुणास ठाऊक. एकीकडे जर एखादा गडी कमी

पडला तर दुसऱ्या बाजूचा एक जण इकडे येत असे, किंवा इकडचा एक

खेळाडू दोनदा खेळत असे. दातार मास्तर जरी अधूनमधून क्रिकेट खेळत

असले तरी देवण्णावर मास्तरांप्रमाणे त्यांना क्रिकेट इतिहास काही घडवता

आला नाही.



देवण्णावर मास्तर चालताना डोलत असत व त्या वेळी वारा भरलेले धोतर

जहाजाच्या शिडाप्रमाणे वाटे. खेळताना पायाला एकच पॅड पुरे होत असे.

एक तर साऱ्या टीममध्येच एकंदरीने दोन पॅड होते, व त्यांतील एक दुसरा

खेळाडू वापरत असे. शिवाय खाली वाकून पट्टे बांधणे हे त्यांना एका पॅडच्या

बाबतीत देखील फार जिकिरीचे वाटे. एका रविवारी त्यांनी दातओठ खात

एक चेंडू हाणला, आणि धाव घेण्यासाठी दौंड सुरू केली. विकेटकीपर

खानोलकर मागे वळून चेंडू शोधू लागला. केवळ सवय म्हणूनच जोशी

बाउंडरीकडे धावू लागला. पण चेंडू कुठेच दिसेना. देवण्णावर मास्तर तर

सारखे धावत होते. तीन-चार-पाच धावा झाल्या तरी ते थांबेनात, व चेंडू

देखील सापडेना. मग थत्ते वकिलांच्या ध्यानात सारा प्रकार आला. त्यांनी

देवण्णावरना पकडले, तेव्हा टीममध्ये असलेला काबाडे नुकतीच पेटवलेली

सिगारेट बाजूला टाकून त्यांच्या मदतीला आला, व क्रिकेट पिचचा आखाडा

झाला. थत्ते वकिलांनी देवण्णायवर मास्तरांच्या सोग्यात अडकलेला चेंडू

काढला, व तो स्टंपांवर हाणून ""औट"" म्हणून गर्जना केली.



""पण बॅट््समनला अशी टांग मारून औट करता येतं का ?"" बॅट उगारत

देवण्णावर थत्तेंकडे धावत आवेशाने म्हणाले.



""मग सोग्यात चेंडू घेऊन धावा काढत बसायच्या की काय त्याने कलियुग

संपेपर्यंत?""



पान नं. 23

""मग त्याबद्दल एम.सी.सी.चे नियम दाखवा."" कायदेशीर मोर्चा बांधत

देवण्णावर म्हणाले.



""तरी बरे, ऑस्ट्रेलियातून ब्रॅडमनला घेऊन या म्हणाला नाहीत !"" थत्ते

कुत्सितपणे म्हणाले.



""लोक हो, धोतराचा सोगा म्हणजे काय हे देखील साहेबाला माहीत असणार

नाही. मग सोग्यात चेंडू अडकला म्हणजे काय करायचे, याचे नियम काय

करणार तो आमचं टाळकं !"" समझोता घडविण्यासाठी दातार मास्तर

म्हणाले व आम्ही पोरांनी टाळ्या वाजवल्या.



अखेर तडजोड झाली. देवण्णावर औट झाले. पण नऊ धावा दिल्याखेरीज

हा निर्णय स्वीकारायचे त्यांनी साफ नाकारले. आम्हांला नाइक मास्तरांच्या

नाकावर पडलेला चेंडू पाहायला मिळाला नाही हे खरे; पण एका बॉलमध्ये

नऊ धावा मिळवणारा खेळाडू इतरांना कुठे पाहायला मिळाला ? आज

हेलमेट, पॅड रिस्टबँड असा श्रृंगार करून क्रिकेट खेळतात. शेळी लेंडया

टाकत राहते. त्याप्रमाणे व त्याच गतीने चार-पाच हजार धावा देखील

काढतात. पण एका बॉलमध्ये नऊ धावा घेणारा देवण्णावर मास्तरांसारखा

खेळाडू मात्र आता भूतली होणे नाही. There were giants in those

days ! आणि धावांचा मुद्दा अतिशय महत्वाचा होता. मॅच संपल्यावर सगळे

जण संध्याकाळी भीमाक्काच्या खानावळीत पालापाचोळा जेवण करत, व

मार खाल्लेल्या टीमने तो खर्च करायचा असे. वास्तविक भीमाक्काची

खानावळ असेच नाव वापरत. भीमाक्कानंतर तिचा मुलगा व त्याची बायको

यांनी खानावळ चालवली ती `क्षुधाशांति भवन 'या जबरदस्त नावाने नंतर

आपला व्यवसाय कोणताही असला तरी नावात `भारती' हाशब्द

वापरण्याची लाट आली, आणि रिकामटेकडे लोक खानावळीला

भूक-भारती असे म्हणू लागले. पण मुलगा व सून एव्हाना अंगाने अतिप्रशस्त

वाढून बसली होती, आणि खानावळीचे नाव आपोआपोच बदलले, आणि

होऊन बसले - लठ्ठ भारती !



क्रिकेट खेळताना दातार मास्तर ग्राउंडवर स्टंपांना नमस्कार

सांगून येत इतकेच. त्यांनी तेथून कधी भेपळा जरी आणला नाही तरी



पान नं. 24

वखार फुटल्याप्रमाणे धावा गोळा करत, सत्तर ऐशींचे बोजे देखील आणलं

नाहीत. माणसाला किती जागेची गरज आहे या प्रश्नाप्रमाणेच माणसाला

किती धावांची गरज आहे या प्रश्नाला त्यांचे उत्तर निश्चित असावे. नंतर

नंतर तर दातार खेळायला आले की खेळ जवळ जवळ संपलाच, असे

समजून वडाखाली हातरूमाल अंथरून थंड वारे घेत बसलेली पोरे उठू

लागत, व आपला घसा ओला करण्यासाठी शाळेच्या विहिरीकडे चालू

लागत. आमचा घसा तापण्याचे कारण कडक ऊन हे नव्हते. कारण

ग्राउंडच्या कडेने पुष्कळ झाडे होती, व त्यांतील एका कोपऱ्यात असलेल्या

अतिशय प्रशस्त अशा वडाखालीच आमचा मुक्काम असे. आमची कोणत्या

एका टीमशी अशी निष्ठा नव्हती. पण कुणीही खोळाडू औट झाला तरी

`पार्शिआलिटी अंपायर' म्हणून आमचे ओरडणे चालू असे, व त्यामुळे घसा

कोरडा होत असे. तीनही दांडया जरी तीन निरनिराळ्या दिशांना उडाल्या

तरी `पार्शिआलिटी अंपायर' हे आमचे मत मात्र कधीही बदलत नसे. इतकेच

नव्हे तर ग्राउंडवर कुणी तरी अंपायर असतो म्हणूनच खेळाडू औट होत

असतात, हे देखील आम्ही मान्य केले असते.



त्यानंतर मास्तरांची दृष्टी बिघडली, व चेंडू कोठून येतो हे देखील त्यांना

दिसेना. अनेकदा तर बोलरच्या हातून चेंडू निसटण्याच्या आधीच त्यांची

बॅट फिरवून झालेली असे, व ते मोठया आशेने बाउंडरी धुंडाळत असत.

मग त्यांनी क्रिकेट सोडूनच दिले, पण ते मुळमुळत नव्हे. तर अगदी

ठणकावून. Not with a whimper, in a burst of glory ! एकदा ते

बॅट फिरवत असता, कसा कुणास ठाऊक, चेंडू कडमडत तिच्या वाटेत

आला व उंच उडाला. चर्चकडील बाउंडरी वीस-पंचवीस फूट तरी कमी

होती. चेंडू वर उडाला व सरळ बाउंडरीपलीकडे जाऊन पडला. मास्तरांचा

त्यावर विश्वासच बसेना. त्यांनी बॅट काखेत मारली व ते बसायला

टाकलेल्या बाकाकडे चालू लागले. ""पार्शिआलिटी अंपायर"" असे आम्ही

ओरडलो नाही, असा तो एकच प्रसंग. सगळ्यांनी मास्तरांभोवती गर्दी केली

व थोडया थट्टेनेच त्यांचे अभिनंदन केले. मास्तर म्हणाले, ""आजपासून

क्रिकेट बंद. आयुष्यात मी ही एकच सिक्सर मारली. रिटायर व्हायला

यापेक्षा चांगला दिवस कधी येईल का ?"" त्या दिवसापासून खरोखरच

त्यांनी हातात बॅट धरली नाही. ते ग्राउंडवर येत. ते काही वेळा अंपायर होत,

व आमची कुचंबणा करत. कधी ते स्कोअरर होत. ते रविवारी हटकून



पान नं. 25

ग्राउंडवर दिसत, पण त्यांचा क्रिकेट रोमान्स संपला होता.



शेवटच्या तासाला जर आमच्या गनिमी काव्यात मास्तर सापडले, तर

आम्ही बेहद्द खूष होत असू. पण आज मात्र वाटते, मास्तर आम्हांलाच

बनवत असावेत. ते काही इतके भोळे नव्हते. त्यांना देखील कंटाळा आलेला

असे, व ते आपखुषीने आमच्या नाटकात सामील होत. आमच्यापेकी कुणी

काय विचारायचे, म्हणायचे हे आधी आधीच ठरवलेले असे. पण ऐन वेळी

जर आपला बेत साधला नाही,तर आणखी काही तरी पदरी असावे म्हणून

एक उपकथानक आम्ही तयार ठेवत असू, साधारणपणे नानू बापट मागच्या

रांगेत कोपऱ्यात बसत असे. या शेवटच्या तासाला आम्ही त्याला डिवचून

खेचून पुढील रांगेत मध्यभागी अगदी टेबलाजवळ बसवत असू. त्याने जर फारच

चिकाटी दाखवली तर निर्मळकर त्याला उचलून त्या जागेवर

बसवत असे. अभ्यासाविषयी निर्मळकराइतके शुध्द वेराग्य असलेला

मुलगा साऱ्या शाळेत मिळाला नसता. दर शनिवारी मुरांच्या बाजाराजवळ

जे लहान मेदान भरे. तेथे तो हटकून एखादी कुस्ती जिंकून रंगवलेल्या

मलमलीचा तुकडा, किंवा तीन नारळ असे बक्षीस मिळवत असे. अलजेब्रा,

जॉमोट्री,अक्षांश-रेखांश, भावे प्रयोग हे शब्द देखील त्याचे नाव ऐकताच

पटापट निपचित पडत असावेत !



नानू बापट मेणबत्तीतील वातीप्रमाणे असून त्याचे डोळे नेहमी ओलसर

असत. मास्तरांनी तपकीर सांडलेला सदरा झटकला की रिंगण सुरू होई.

दोनचार पोरे खोकल्याने बेजार होत व खिडकीपाशी जाऊन उभी राहत.

बापट मात्र काही केल्या रणछोड होत नसे, पण त्याचप्रमाणे त्याला

शिंका-खोकला दाबून ठेवता येत नसे. त्या प्रयत्नात त्याच्यातून जे

निरनिराळे बारीक आवाज बाहेर पडत ते ऐकून शेजारच्यांच्या अंगावर

कोसळल्याखेरीज आम्हांला हसू आवरत नसे. स्कॉटिश बँडमध्ये पिशवी

दाबत बॅगपाइप आवाज निघतात, त्याप्रमाणे नानू बापट हा कशाने तरी

दाबला जात आहे असे आम्हांला वाटे. पण काही झाले तरी हा उपाय

किरकोळ होता. तो फार तर दहापंधरा मिनिटे टिकत असे. नंतर तर हा

मार्ग देखील बंद झाला. नानूला स्वतःचे इतके डोके असेल असे आम्हांला

मधीच वाटले नव्हते. मास्तरांचा शेवटचा तास असला की तो आधीचा तास

चुकवून त्या तासाला दोनचार मिनिटे उशीरा येऊ लागला. त्याने ""May

I come in, Sir ?"" असे विचारले की मास्तर त्याच्याकडे डोळे वटारून



पान नं. 26

पाहत व म्हणत,""या या, नाना फडणीस. बापट, आज आपला चंद्रोदय

उशीरा झालेला दिसतो. या आणि त्या कोपऱ्यातील बाकावर आसनस्थ

व्हा. "" पोरे हसत. वर्गात कोपऱ्यात एक जादा बाक होते. तेथे नानू खाली

मान घालून बसे. व डोळे पुसत मधून मधून आमच्याकडे पाहत आवाज

करत हसे. मग आधी ठरल्याप्रमाणे तिसऱ्या रांगेत कुणी तरी कुणाला तरी

ढकलत मोठयाने ओरडू लागे. त्यावर दातार मास्तर करडया आवाजात

विचारत,""काय रे भोपळ्यांनो, काय गडबड आहे.?""



मग गोपाळ चोपडे उभा राहून साळसूदपणे म्हणे, ""सर, हा प्रभाकर म्हणतो,

नायडूने एका मॅचमध्ये सोळा सिक्सर्स मारले हे सारे झूट आहे. त्याचा

त्यावर विश्वास बसत नाही. ब्रम्हदेवाला देखील इतके सिक्सर्स कधी मारता

येणार नाहीत.""



मग जरी त्यांनी नुकतीच तपकीर भरलेली असली तरी मास्तर पुन्हा डबी

काढत व रागाने पुन्हा एक चिमूट नाकात भरत. अशा वेळी हात थरथरून

बरीच तपकीर सदऱ्यावर पडे. मग ते कोटाची बटणे काढत, प्लॅपॉर्मवरून

खाली उतरत व थेट प्रभाकरसमोर जाऊन उभे राहत. सीतेच्या

चारित्र्याविषयी संशय घेणारा परीटच समोर बसला असल्याप्रमाणे ते

त्याच्याकडे शंभर वॅट डोळ्यांनी पाहत. त्या अवस्थेत ते मिनिटभर थांबत,

व मग स्फोट होई,""म्हणे विश्वास बसत नाही !"" ते उसळून म्हणत, ""तुझा

विश्वास बसणे न बसणे ही गोष्ट इतकी महत्वाची आहे काय रे

भोपळ्या ?""



मास्तरांचा सर्वांत कडक शब्द म्हणजे ""भोपळ्या !"" आणि ते तो शब्द

डबल भोपळा निर्मळकरापासून शून्य भोपळा नानू बापटापर्यंत सर्रास

वापरत."" अरे, तुला क्रिकेट म्हणजे काय हे तरी माहीत आहे ? म्हणे विश्वास

बसत नाही ! आणि नायडूंची सिक्सर म्हणजे काही बाउंडरीपलीकडे फेकलेला

कचऱ्याचा गोळा नव्हता. आम्हांला वाटायचे की बॉल खाली उतरला की

त्याचा स्फोट होणार, आणि मुंबईचा समुद्र हातभर तरी मागे सरकणार !

टाक जा तुझा तो विश्वास भिकाऱ्याच्या झोळीत ! तुला अमरसिंगाचे नाव

तरी माहित आहे का ? अमरसिंग माणूस नव्हता. ती एक महाकाली तोफ

होती तोफ, माहीत आहे ? क्रिकेटच्या दुष्काळात जन्मलेली पाप्याची पितरे

तुम्ही, एकेक काडी गोळा करून रवंथ करणारे प्राणी तुम्ही-तुमचा काय

कपाळ विश्वास बसणार.

---------------------------------------------------------------

पान नं. 38



आता टेबलावरील पुस्तक तर त्यांच्या दृष्टीने मेलेच होते. पण घंटेला तर

अजून अवकाश होता. तातूला आणखी काही तरी म्हणायचे होते, पण

त्याला बोलू न देता मास्तरच म्हणाले,""आणखी एक सांगतो. त्याच्या

नाटकांत खरी पात्रे आहेत ती त्यांची भाषणेच. एका भाषणाला दुसरे सामोरे

जाते, संघर्ष घडतो, व काही वेळा तर लखलखाट होऊन डोळे दिपतात.

सुधाकर,वृंदावन, भूपाल, धुंडिराज ही नावे आपली आहेत सोयीसाठी

नायट्रिक अँसिड,तेजाब ही नावेही आहेत सोयीसाठीच. पण तेजाब म्हणजे

काय, हे त्याला हात लावून बघ म्हणजे समजेल. अरे, अंग पुसायला

राजापुरी पंचे आहेतच की दरिद्रयांनो; पण वरातीत पाहिजे ती पेठणच !

तरी सुध्दा घंटेला अवकाश होता. तातूने हात वर केला व म्हटले, ""सर,

मला बऱ्याच दिवसांपासून एक विचारायचे होते. ""



त्यावर आम्हांला एकदम उत्साह वाटला. अशारीतीने तातूने सुरूवात केली

की तो काही तरी भलतेच वेगळे बोलणार हे आम्हांला माहीत होते. तो

म्हणाला, ""सर. पासोडी म्हणजे काय ?""



मास्तर दचकून त्याच्याकडे पाहतच राहिले. ते म्हणाले,"" पासोडी म्हणजे

चादरीप्रमाणे जाड सुताडी पांघरूण. आता पासोडी का आठवली.?""



""सर, असल्या पासोडीवर कसल्या टाकाने, बोरूने लिहिता येते ? मी एकदा

तसे लिहून पाहण्याचा प्रयत्न केला, तर दोऱ्यात अडकून बोरू दोनदा

मोडला. मी दासोपंताच्या पासोडीविषयी कुठे तरी वाचले की त्यावर त्यांनी

आपल्या कविता लिहिल्या. मला वाटते, पासोडी या शब्दाचा अर्थ वेगळा

आहे.""



""असे तुम्हांला वाटते का ?"" कमरेवर हात ठेवून मास्तर म्हणाले, ""मग

पंडितराज, आपला अर्थ सांगून आम्हा सर्व पामरांना का धन्य करत

नाही ?""



तो शब्द पासोडी नसून पासोदी असा असावा. पासोदी म्हणजे पासोदाची

कविता. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांची भारूडे, भागवत त्याप्रमाणे.""



पान नं. 39

""पण ज्ञानभास्कर, पासोदा म्हणजे तरी काय ?""



""पासोदा हे कवीचे नाव, पण ते त्याने उलट लिहिले आहे. खरे नाव दासोपा,

दासप्पा किंवा दासोपा असे नाव असते, सर""



एकदम दडपण कमी झाल्याप्रमाणे मास्तर मोठ्याने हसू लागले. आमच्या

घरी पूर्वी ते, आजोबा करंदीकर, अप्पा काळे बोलत असता त्यांचे असले

मनमोकळे हसणे आम्हांला आत ऐकू येत असे. त्यांच्यातील ताण,राग सारे

आता ओसरून गेले होते. आम्हांला अगदी जवळचे वाटणारे मास्तर दिसू

लागले. ते म्हणाले, ""तातू, तुझ्या डोक्याला झाकण असते तर बरे झाले

असते बघ. म्हणजे कधी तरी ते काढून आत काय काय चालले आहे हे

पाहता आले असते. कमाल गंमत झाली असती."" तोच घंटा झाली. आम्ही

उठलो, पण जात असता मास्तरांच्या चेहऱ्यावर अजूनही हसणे होते.



मला एकदा तरी वर्गातून हाकलून घातल्याखेरीज कोणतेच वर्ष जाऊ नये

असे लिखितच होते की काय कुणास ठाऊक आणि या खेपेला एका दृष्टीने

कांदेविक्या जबाबदार होता, याचा मला विशेष राग आला. हा कांदेविक्या

अ तुकडीत होता. पण दहा मिनिटांच्या सुट्टीत तो कधी तरी आमच्याकडे

येई व नंतरचा तास आमच्यातच बसे. आडनावाच्या बाबतीत पोरांच्या

जिभा अगदी नाइलाज झाला तरच सरळ राहत. कांदेविक्या हे काही त्याचे

खरे नाव नव्हते. ते होते कानविंदे. आणखी एक नाकाडी म्हणून विद्यार्थी

होता. तो तर पहिल्याच दिवशी `नाकात काडी नाकाडी' होऊन बसला.

दड्डीकराचे धड्ड होणे, गोखल्यांचे खोकल्या, बोरकराचे बोऱ्या हे सारे

रीतसरच होते. प्रभाकरला देखील त्याचा `प्र' अगदी परवापरवाच परत

मिळाला होता. तोपर्यंत त्याला भाकरवरच समाधान मानावे लागत होते.

या मुद्रदानातून सुटायची ती तीनच नावे. कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी.

या तीन नावांची पेदासच अशी भयानक होती, की निव्वळ संख्येच्या

आधारावरच टिकून राहणे फारसे अवघड नव्हते. पण त्यात जर

आद्याक्षरेच धोकेबाज असतील तर कपाळाला हात लावायचा, व गप्प

बसायचे. एक पी.जी.जोशी पाजी जोशी झाला; एक डी आर. कुलकर्णी

ढोर कुलकर्णी झालाच; आणि डी.एम.व टी. आर जोशी ढम्म जोशी आणि

टर्र जोशी झाले. !



कानविंदे इकडे यायचा म्हणजे तो काही आम्हांला प्रेमाने भेटायला यायचा



पान नं. 40

नाही. त्याचा एक वीतभर लेख कुठल्या तरी मुलांच्या मासिकात प्रसिध्द

झाला होता. तेव्हापासून तो कपाळावर दोन विचारी सुरकुत्या टाकून

इकडे-तिकडे भटकत विश्वाची चिंता करत असे. तो आमच्याकडे आला की

आम्ही ओळखत असू की, त्याने नवीन काही तरी लिहिले आहे. आम्ही

मुद्दामच वेगळे विषय काढून त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला उतावीळ

करत होतो. त्याला पाहताच तातूने अफगाणिस्तानातील नद्यांची माहिती

द्यायला सुरूवात केली, तर प्रभाकरने चीनमध्ये माणसे झुरळांचे किती

प्रकार खातात याचे अत्यंत सविस्तर आणि काल्पनिक वर्णन द्यायला

सुरूवात केली. अखेर न राहवून कानविंदेच म्हणाला, ""काल मी एक कविता

केली आहे. तिचे नाव आहे `हा चांदोबा आहे सुदंर."" हे नाव ऐकताच तातू

अंगाला गाठ मारून मागे कोपऱ्यातसरकला. प्रभाकरने आपल्या

कपाळावर तर हात मारून घेतलाच, पण आम्हा दोघा-तिघांच्या कपाळावर

देखील हात मारला.



आभाळाचे निळे पाणी पोहायला

कोवळ्या तारका त्या खायाला

ढगांचा सावरी कापूस झोपायला

पण अमावास्येला असतोस कुठे रे ?

हसतो बिलंदर ! हा चांदोबा आहे सुंदर.



आणि त्याबरोबर हसण्याचा स्फोट झाला. प्रभाकर तर एक पाय वर करून

`हसतो बिलंदर, हसतो बिलंदर' म्हणत नाचू लागला. तोपर्यंत सुट्टी

संपल्याची घंटा झाली, आणि कणकेच्या गोळ्याप्रमाणे चेहरा झालेला

कानविंदे बाहेर पडायच्या आत दातार मास्तर वर्गात आले. तेव्हा तो खाली

मान घालून आमच्याच वर्गात बसला.



""सर, या कानविंदेने एक अप्रतिम कविता लिहिली आहे."" प्रभाकर म्हणाला.

""त्यात एक बिलंदर चंद्र आहे. तो सुंदर आहे म्हणून बिलंदर आहे की बिलंदर

आहे म्हणून सुंदर आहे, हे मात्र आम्हांला समजले नाही.""



""मला आणखी काही तसल्या ओळी माहीत आहेत,"" तातू म्हणाला, ""का न

खाशी गोमय ताजे ? एखाद्याला शेण खायला सांगताना सुध्दा त्यातल्या

त्यात त्याने ताजे शेण खावे हे सांगण्याइतके सौजन्य आजकाल दिसत नाही.""



पान नं. 41

""माती असशी, मातित मिळशी. पण लक्षात ठेवा, हे आत्म्याला लागू नसे.""

प्रभाकर म्हणाला, ""एखाद्या औषधाच्या बाटलीवर लिहितात तसे हे फक्त

बाहेरून लावायचे. पोटात घ्यायचे नाही. आत्म्याला हे लागू नसे."" तातूने

मळकट डायरीसारखी एक वही काढली होती, व तिच्यातून तो मधून मधून

वाचत होता -



उठा उठा रे बांधा कंबर

तुमच्यापुरती ही घी-शक्कर

टाकुनि रूढीशी द्या टक्कर !

खुबी ओळखा, क्या हे अंदर !



""असे होते कधी कधी."" मास्तर म्हणाले. पण आज एकंदरीने ते व्यग्र दिसत

होते, कारण त्यांनी खोटेच रागावून कुणालाच भोपळ्या म्हटले नाही.



""आज येताना मला एक प्रेत दिसले. ते एका मुलाचे होते; पण त्याची आई

मारूतीच्या देवळापुढे उभी राहून त्या मुलाला पूर्ण आयुष्य देऊन सुखी ठेव,

असे हात जोडून म्हणत मध्येच हसत होती. मला एकदम राजहंस कवितेची

आठवण झाली."" ते सांगत होते. वास्तविक आम्ही त्यांचे वेगळे स्वरूप पाहून

गप्प बसायला हवे होते. पण आम्ही आज फसफसून झिंगल्याप्रमाणे झालो

होतो की काय कुणास ठाऊक ! मी म्हटले, ""त्या कवितेत सुद्दा असल्या ओळी आहेतच -



ते ह्दय कसे आईचे

मी उगाच सांगत नाही.""



एवढ्यावर देखील थांबायला हरकत नव्हती. पण माझ्यात कसले तरी पिसे

चढले होते आणि शेजारच्या कांदेविक्याला पाहून तर तो जास्तच वाढले. मी

सूर काढला -



परांजपेच्या हॉटेलातिल पुरी-पातळभाजी-

मी उगाच सांगत नाही !""



मग प्रभाकर देखील चेकाळला. तो म्हणाला,



""तानिबाईची मिरची भजी

मी उगाच सांगत नाही !""



पान नं. 42

मग इतर काही पोरांना देखील त्यातील गंमत समजली, आणि ती ""मी

उगाच सांगत नाही "" ही ओळ एकत्र सामील झाली.



बादशाहिमधला खिमा ब्रेड-

मी उगाच सांगत नाही

ब्रम्हचारी सिनेमा बघा तरी-

मी उगाच सांगत नाही

डिलाइटमधले रवा-डोसे

मी उगाच सांगत नाही...



हा वाह्यातपणा पंधरा मिनिटे चालला, व आम्ही पोटाचे चक्र होईपर्यंत

खिदळलो. पण मध्येच काही तरी तुटल्यासारखे झाले, व सगळे जण

गप्पगार झाले. मास्तर माझ्यापुढे येऊन उभे राहिले होते, व माझ्याकडे

पाहत होते. त्यांचा चेहरा रक्त साकळल्यासारखा झाला होता, व उजवा हात

किंचित थरथरत होता.मग आम्ही पूर्वी कधी न ऐकलेल्या आवाजात ते मला

म्हणाले,""तुम्ही आपली पुस्तके गोळा करा, आणि वर्गातून चालते व्हा आणि

मला विचारल्याखेरीज माझ्या तासाला येऊ नका.""



हा आवाज,`तुम्ही' या शब्दाचा वापर हे सारे मास्तरांचेच, यावर माझा

विश्वास बसेना. पण त्यामुळे मला एकदम मुस्कुटात मारल्याप्रमाणे झाले.

मी खाली मान घालून पुस्तके गोळा केली व बाहेर पडून घरी आलो. घरी

कंरदीकर आजोबा येऊन बसले होते. मला पाहताच ""काय म्हणतो आमचा

किट्टू मास्तर,"" असे विचारणार हे मला माहीत होते. मी तसाच

घरासमोरून पुढे गेलो, व बराच वेळ पिंपळकट्टयावर बसून बऱ्याच उशीरा

घरी परतलो.



त्यानंतर दोन दिवसांनी मास्तरांचा तास होता. आधीचा तास बायबलचा

होता. त्या वेळी मला बऱ्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळत. शिवाय चांदेकर

मास्तर गाणे देखील सुरेख म्हणत असत. आज आई आजारी म्हणून तातू

आला नव्हता. मी घाईघाईने पुस्तके गोळा केली, व त्याच्या घरी जावे म्हणून

निघालो, तर दारातच दातार मास्तर उभे.



""काय रे. कुठे निघालास ?"" त्यांनी विचारले.



""घरी. वर्गात बसू नको असे तुम्ही सांगितलेत.""



पान नं. 43

""जा, फार शहाणा झालास. बाकावर जाऊन बस."" आत येत ते म्हणाले व

थोडे हसले""



पण नंतर साऱ्या तासभर त्यांनी नजर देखील माझ्याकडे वळवली नाही.

पण त्यांचे बरेचसे बोलणे माझ्यासाठीच होते.



ते म्हणाले, ""कित्येकदा फार मोठया कवींच्या केसांत देखील नट्टा-पट्टा

उमटतो. मग निर्जीव ओळी लिहिल्या जातात, आणि त्या वाचताना मन

विरजते. शेक्सपियरच्या नाटकात देखील ओळीच्या ओळी रिकाम्या

गाडग्यारप्रमाणे येतात. पण हिमालयाची थोरवी त्याच्या शिखरावरून

ठरवावी त्यातील खोल दऱ्याभेगांवरून नव्हे. गंगेला देखील पाणउतार

असतो, आणि सरस्वतीला देखील थकून जांभई येते. म्हणून

राजहंससारख्या कवितेतही `मी उगाच सांगत नाही.' असल्या ओळी येतात.



माझा ताण तटकन तुटला, व मी रागाने ओठ आवळले. जाताना देखील

मास्तरांनी माझ्याकडे पाहिले नाही. त्यानंतरचा तास चुकवून मी घरी

आलो. तेव्हा करंदीकर आजोबा नुकतेच पगडी टेबलावर ठेवत होते. मला

पाहताच ते म्हणाले, ""काय बच्चमजी, कसा आहे आमचा किट्टू मास्तर ?""



मी उसळत्या रागात त्यांना हकीकत सांगितली व म्हटले, ""तुमचे किट्टू

मास्तर भयकंर पार्शिआलिटी अंपायर आहेत. मी तसे म्हटले तर त्यांनी

मला वर्गातून हाकलून दिले. पण आज मात्र त्यांनी स्वतःच त्या ओळीवर

टीका केली. म्हणून मी नंतरचा तास चुकवून घरी आलो.""



त्यावर करंदीकर आजोबा इतके हसले की त्यांना खोकला आवरायला पाच

मिनिटे लागली. तोपर्यंत अप्पा काळे देखील आले. त्यांनी पायरीवरूनच

सिगारेट गटारात टाकली, व ते आत आले.



""मोठा खोकला उकरून काढायचे तुमचे वय संपले, भीष्माचार्य,"" ते

म्हणाले. खरे म्हणजे आजोबा अप्पा काळ्यांपेक्षा आठदहा वर्षांनी मोठे

असतील. पण ते अप्पांना नेहमी भीष्माचार्य, द्रोणाचार्य असल्या

महाभारतातील नावांनीच हाक मारत. करंदीकरांनी अप्पांना सारी हकीकत

सांगितली. तेवढ्यात आमचे दादा घरी आले, आणि माझे सगळेच बिंग बाहेर

पडले. मग करंदीकर मला म्हणाले,""हे बघ बच्चमजी, तू काही तरी वागह्यात

बोलणे, आणि किट्टूने काही म्हणणे दोन्ही सारखेच होय रे ? त्याच्यासारखे





पान नं. 44

गडकऱ्यांवर प्रेम कर, आणि मग तसे बोल. तू तुकाराम आहेस का? तुझी

भक्ती असेल तर विठोबाल देखील विठ्या,काळ्या म्हण की ! आणखी

एक गोष्ट सांगून ठेवतो. आमचा किट्टू म्हणजे एक अरभाट माणूस आहे

अरभाट !""



अरभाट हा एक अतिशय गुणी कानडी शब्द आहे. अरभाट म्हणजे

खानदानी, भव्य, मोठया थाटामाटाचा. मठातील जेवण कसे होते ? अरभाट.

मन्सूरांचे गाणे कसे झाले ? तर अरभाट. ऋषिकेशला गंगा कशी आहे, तर

अरभाट. देवळासमोर झालेल्या नाटकातील हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा

होत्या, तर अरभाट. म्हणजे अगदी क्लास ! ""तुला सांगून ठेवतो. तू एक

गोष्ट कर. किट्टूच्या बाबतीत तू नायडू आणि गडकरी यांच्या भानगडीत

पडू नकोस."" माझ्या पाठीवर थाप मारत करंदीकर म्हणाले.



मग अप्पा काळे किंचित पुढे सरकले. आवाज नेहमीचाच ठेवून पण एखादे

गुपित सांगण्याचा आविर्भाव आणत ते डोळे वात्रट करत म्हणाले, ""त्याच्या

जोडीला देविकारणी व गायत्रीदेवी यांच्याविषयी देखील एक शब्द काढू

नको. काय समजले ?"" आणि त्यावर काळे व करंदीकर दोघेही हसले.

देविकाराणी कोण, हे त्या काळी मला काहीच माहीत नव्हते. देविकाराणी

आणि जयपूरच्या गायत्रीदेवी या दोन खानदानी नावांचे जे सुगंधी निळे

चांदणे आयुष्यात पसरले ते फार नंतरच्या काळात. आणि त्या वयात

पसरलेल्या चांदण्याचे गंध कधी ओसरत नाहीत, की त्यांना कधी

कृष्णपक्षाची बाधा होत नाही. मास्तरांचे रागावणे, त्यांनी हाकलून लावणे,

त्यांनी केलेली निबंधाची, हस्ताक्षरांची स्तुती, हे सारे आयुष्याच्या

वेडवाऱ्यात अस्ताव्यस्त उडून गेले. पण त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने एक

कोनाडा गाभाऱ्यासारखा होतो, तो अनुभव वेगळाच होता.



त्यांनी `चिमुकलीच कविता' शिकवायला घेतली ती या वर्षांतील शेवटचीच

कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती.



""यात एक ओळ फार झगझगीत आहे."" तातू हळूच म्हणाला. तो शेजारी

बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता.



कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट

होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे, कच्च्या पोवळ्यांच्या



पान नं. 45

चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे. (नखे लाखिया,दात मोतिया,

आणि स्तनाकार पेले, यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता

मोठी झाल्यानंतरची.) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता

आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो. मग कसलीच चाहूल न दाखवता ती

ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे

तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह.

कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी

अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो.



नंतर बऱ्याच वर्षांचीगोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे हे

आपल्यापुरते सांगताना ए.ई हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ

आठवताच सारे अंग थरथरून येते. जर त्या वेळी मी दाढी करत असेन

तर चेहऱ्यावरील केस एकदम ताठरतात. ही खूण त्याला पुरेशी आहे. Elfs

and fairies shall dance no more ... Brightness falls from

the air, Queens have died young and fair...



एमिली डिकिन्सला जाणवणारे लक्षण निराळे आहे : ""खरी कविता

वाचताना खोल कुठे तरी असा गारठा जाणवतो की विश्वातील सारी उष्णता

जरी त्या क्षणी आपल्यात भरली, तरी तो नाहीसा होणार नाही असे वाटू

लागते.""



तसल्या जातीचा एक लहान अनुभव मला आला, मास्तरांनी ती ओळ

वाचली तेव्हा. गणितातील निर्जीव टिंबाला एका दशवर्षेच्या जीवनात

निर्णायक रूप प्राप्त झाले. मास्तरांनी ती कविता अनेकदा शिकवली असेल,

पण ते या ओळीवर थांबले. पुस्तकात बोट ठेवून ते खिडकीपाशी गेले, व

तेथे किंचित रेंगाळून ते परतले. ""या माणसाची भूकच वेगळी होती. त्याला

एखादा पक्षी पाळायचा असता तर त्याला गरूड देखील निर्जीव वाटला असता.



त्यानंतर मास्तर पुष्कळ बोलत राहिले. पण आता माझेच मन थाऱ्यावर

नव्हते. दररोजच दिसणारा, खिडकीतून आलेले उन्हाचा पट्टा आज

जास्तच का झळझळत आहे हे मला समजेना. पलीकडील ख्चिश्चन



पान नं. 46

स्मशानभूमीतील झाडे स्तब्ध उभी होती खरी, पण त्यांचे सारे लक्ष

माझ्याकडेच होते. कपाळाला एक लहान सुरकुती देऊन, मान किंचित

वाकडी करून ब्रम्हदेव हे दशांश चिन्ह देऊन त्या मुलीचे भवितव्य

ठरवण्याच्या विचारात आहे, आणि त्याच्या आज्ञेची वाट पाहत एक तेजस्वी

टिंब त्याच्यासमोर तरंगत आहे, असे चित्र समोर अस्पष्ट दिसू लागले.



नंतर बऱ्याच काळाने माझ्या ध्यानात आले की, ते टिंब म्हणजे तिच्या

हनुवटीवरील तीळ नव्हता, तर ती एक गोंदण्याची खूण होती. म्हणजे ते टिंब

कुठे द्यायचे, हे जरी ब्रम्हदेवाने ठरवले होते, तरी त्याने अर्जुनाप्रमाणे

एका गोंदणकाराला नाममात्र केले होते !



""आणखी एक ओळ जाता जाता तसेच चेटुक करून जाणारी आहे,"" जागा

झाल्याप्रमाणे तातू म्हणाला, ""कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले

नाही.""



ही किमया होती ती मुख्यत्वेकरून कवीची, पण मला ती दातार

मास्तरांकडून मिळाली म्हणून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता होती.



दातार मास्तर मराठीप्रमाणे गणित देखील शिकवत. खरे म्हणजे शास्त्र

आणि भूगोल सोडून सगळेच विषय त्यांनी केव्हा ना केव्हा तरी शिकवले

होते. निरनिराळ्या रंगांच्या खडूंनी भरलेले पेटी उघडून भूमितीच्या

तासाला ते हात चोळत फळ्यासमोर उभे राहिले की, आता येऊ दे समोर

कोणतेही प्रमेय असा आवेश त्यांच्यात असे ! कधी तरी ते एक अजस्त्र

लाकडी कंपास वर्गात आणत, व त्यात एका टोकात खडू अडकवून तो

बाजूला ठेवून देत. इतक्या वर्षांत त्यांनी तो वापरलेला मात्र आम्ही कधी

पाहिला नाही. उलट हातात खडू धरून हात सेलपणे गोल फिरवून आपण

सुरेख वर्तुळ काढू शकतो, असे ते आम्हांला अभिमानाने सांगत. इतर

सिध्दांत-प्रमेये सांगताना ते अनेकदा पायथागोरासच्या सिध्दांताचा

उल्लेख करत. पण अनेक दिवस पायथागोरासची पाळी येईना. तो सिध्दांत

बराच मोठा असल्यामुळे त्यासाठी दोन तास तरी सलग हवे असत. आमची

उत्सुकता वाढतच गेली. पायथागोरास हा एक ग्रीक तत्वज्ञ होता, व त्याचा

पुनर्जन्मावर विश्वास होता. कदाचित तो भारतात देखील येऊन गेला

असेल. पृथ्वी एका स्थिर बिंदूभोवती फिरते, असा त्याचा विश्वास होता.

त्याची देखील एक शाळा होती. पण एखादा विद्यार्थी मध्येच त्याचे शिकवणे



पान नं. 47

सोडून गेला, तर त्याने दिलेली फी समारंभपूर्वक त्याला परत केली जात

असे. तो गेल्यानंतर मात्र त्याच्या बसण्याच्या जागेवर थडग्यावर ठेवतात

त्याप्रमाणे त्याचे नाव असलेला एक दगड ठेवला जात असे.



अशा पुष्कळशा गोष्टी मास्तरांनी सांगितल्या होत्या. त्याच्या नावावर

असलेला सिद्धांत प्राचीन ईजिप्तमध्ये आधीच माहीत आसावा. पण प्राचीन

इतिहासात काही वेळा कुणाचे तरी श्रेय कुणाला तरीच दिले जाते. ज्याला

आपण अरबी आकडे म्हणतो, ते खरे म्हणजे हिंदू आहेत. प्लेटो नावाच्या

तत्वज्ञाने तर ज्यांना भूमितीची आवड नाही त्यांना आपल्या शाळेत प्रवेश

नाही, असे जाहीरच केले होते. आमच्यापेकी बहुतेकांना प्लेटोने आपल्या

शाळेची पायरी देखील चढू दिली नसती. कारण गणित म्हणजे आकडेमोड

भूमिती म्हणजे रेघामोड, व सगळे मिळून एक असह्य मानमोड एवढीच

आमची कल्पना होती.



अखेर वेळापत्रकात मास्तरांनी थोडा बदल करून घेतला, व दोन तास

सलग मिळवले. त्यांनी लग्नातील नवरदेवाप्रमाणे झगझगीत पिवळ्या

रंगाचा एक काटकोन त्रिकोन बोर्डावर काढला. त्याच्या कर्णावर जांभळ्या

रंगाचा चौरस उभा राहिला. बाजूच्या दोन रेषांवरील चौकोन अद्याप कच्चे

असल्यामुळे हिरवट रंगाचे होते. मग पांढऱ्या खडूने रचना तयार झाली.

संथ आत्मविश्वासाने एकेक पायरी दाखवत मास्तरांनी असे दाखवले की

दोन हिरव्या चौरसांची बेरीज जांभळ्या चौरसाइतकी आहे.



यापूर्वी मास्तरांनी अनेक सिद्दांत शिकविले होते. जे सिध्द करायचे होते, ते

स्वच्छपणे पटवून दिले होते. त्या QED मध्ये एक काम पार पाडल्याचे

व्यवहारी समाधान होते. पावलापुढे पाऊल टाकून रस्ता निभावला होता

इतकेच. पण पावलांना कधी पंख फुटून खालचा रस्ता खालीच राहिला

नव्हता. Where Kingfishers Catch Fire... खंड्या पक्ष्याच्या

पंखावर सूर्यप्रकाश पडून निळी वीज झळळली नव्हती. कधी लोलकांतून

पाहिल्याप्रमाणे कसल्याच रंगरेषा उमटल्या नव्हत्या. मास्तरांनी खडूचे

हात झाडले व खुर्चीत बसून त्यांनी तपकिरीची डबी उघडली.



मी बोर्डाकडे पाहत होतो. त्या क्षणी काय झाले कुणास ठाऊक,

हादरल्यासारखे होऊन सगळा वर्गच वितळल्यासारखा झाला. समोर एक

भव्य काळा पडदा, त्यावर जांभळा व हिरवा असे दोन चौरस हळदी



पान नं. 48

त्रिकोणाभोवती झळाळत उजळले. दोन लहान चौरस भिरभिरत जांभळ्या

चौरसात मिळून गेले. मग मोठा जांभळा चौरस थरथरत चंद्रज्योतीप्रमाणे

फुटला. आणि त्याचे दोन नवे लहान लहान चौरस झाले. ते आता रोखठोक

स्वतःच्या स्वतंत्र सत्याने प्रकट झाले होते. म्हणजे म्हटले तर एक, किंवा

दोन आणि खरे म्हणजे दोन एकच व एकच दोन. हे सारे एकेक पायरी

समजावून घेत, सारे स्वच्छपणे समाजावून घेण्यापेक्षा सर्वस्वी निराळे होते.

हा एक अणुसाक्षात्कार होता.



झेन बुध्दवादातील Satori, साक्षात्कार याअर्थी वापरली जाणारी

Epiphany ही कल्पना, एका देवदत्त क्षणी मी व इतर जग यांतील दुरावा

जळून जाऊन मी आणि माझे जग, I and it जाऊन I and thou, हे

सारे नंतर खूप वर्षांनी वाचनात आले. तसला अनुभव घेण्याचे मला भाग्य

कधीच लाभले नाही. पावले धुळीतच रखडत ठेचाळत राहिली. राजहंस

कधीच खाली उतरले नाहीत. पण त्यांचे एक झरझर प्रतिबिंब मात्र

मानसजलावर क्षणभर सरकून गेले. त्या क्षणी अशा तऱ्हेचा अत्यंत दुर्मिळ

मूल्यवान व अगदी कणरूप अनुभव मला स्पर्श करून गेला हे मात्र खरे.

घंटा झाली व मी भानावर आलो. मास्तर निघाले, पण जाता जाता ते

म्हणाले, ""काय भोपळेबुवा, डुलकी लागली होती वाटतं ? मी दोन प्रश्न

विचारले तुला.""



एरवी मला थोडी शरम वाटली असती, पण त्या क्षणी मात्र मी अगदी

निर्विकार, अलिप्त होतो. पुढचा तास आपटे मास्तरांचा होता. मी पुस्तके

घेऊन ख्चिश्चन स्मशानभूमीत आलो. तेथे कोपऱ्याच जी दोन थडगी होती

त्यांच्यावर सपाट गुळगुळीत अशी मोठी फरशी होती. तेथे स्टीफन माळी

काही तरी करत होता. आता माझी त्याच्याशी चांगलीच ओळख झाली होती.

तो हसला व झाडणीने फरशीवर पडलेली वाळलेली पाने बाजूला करून

तो दुसरीकडे गेला.



मी फरशीवर पसरलो. कसली बोच नाही, हाव नाही. हातमोजा उलटा

केल्याप्रमाणे सगळेच वेगळे, उलटे झाले होते. त्या क्षणी देखील मनातील

ती उत्कट नीरवता मला प्रकट करता आली नसती. इतक्या वर्षानंतर उरली

आहे ती फक्त स्वतःलाच जाणवणारी आठवण.



अशा अनुभवाचा भव्यतेशी किंवा स्वतःच्या मोठेपणाशी काडीचाही संबंध

नसतो.



पान नं. 49

तसला अनुभव पॅसिफिक महासागर प्रथमच पाहिलेल्या कोर्टेझला

(खरे म्हणजे बाल्बोआला) आला. असेल. अणुबबचा पहिला चाचणी स्फोट

पाहिल्यावर दशकोटी सूर्यांची ओपेनहीमरला आठवण झाली व तो हरवून

गेला. तर जेफरीसारख्या साध्या पत्रकाराला असला अनुभव तो एका

टेकडीवरील उतरणीवर गवतात पसरला असता आला होता. नंतर फार

वर्षांनंतरची गोष्ट आहे. एका महान साधकाची कॉलेजला भेट होती.

स्टाफरूमसमोर गाडी थांबली. तेथेच एक रानझुडूप वाढले होते आणि

जगण्याची ईर्षा दुर्दम्य असल्यामुळे त्याला कोवळी, लालसर पाने फुटली

होती. जवळून जाताना साधक एकदम थांबले. त्यांचे हातपाय थरथरू

लागले व त्यांनी उपरणे तोंडावरून ओढून घेतले. ते समाधीत गेले होते.

आम्ही त्यांच्या अशक्त देहाला उचलून देहाला उचलून पुन्हा गाडीत ठेवले, व गाडी थेट

टोकापर्यंत नेली. थोडया वेळाने ते परतले,तेव्हा पुन्हा ते झुडुपाजवळ आले.

पण या वेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले देखील नाही. आता त्याची

काही

गरज उरली नव्हती. एका क्षणी ओळख पटून गेली होती.



त्यानंतर मी पायथागोरासचा सिध्दांत दोन-चार मित्रांना समजावून

सांगितला. माझ्याजवळ योग्य ते शब्दच नसावेत. त्यांनी माना डोलावल्या.

पोस्ट ऑफिस पाच वाजता बंद होते, पूना मेल सहा वीसला येते, असलीच

माहिती मी देत असल्याप्रमाणे ते निर्विकार राहिले. दोघांनी तर तो सिध्दांत

आपल्याला समजला आहे असे सांगितले. पण समजणे निराळे, जाणणे

निराळे. एक लाल पान खुडून कपाळावर चिकटवणे निराळे, आतून काही

तरी उसळून सर्वांगला लाल लाल पाने फुटल्याप्रमाणे वाटणे निराळे.

कदाचित माझ्यातच हा उणेपणा असावा. खुद्द मास्तरांना देखील हाच

अनुभव पुन्हा हुकूमेहुकूम देता येणार नाही, कारण असला क्षण म्हणजे

स्थळ, काळ आणि देवी इशारा यांचा एक अगम्य स्फोट असतो. त्यानंतर

काय ? त्यानंतर काय ? काय ? तर काही नाही, केवळ निःशब्दता,मूकता.

विटगेनन्स्टीनने हे बरोबर ओळखले. त्याबद्दल तो स्तब्ध राहिला. तेथे

शब्दांची मिजास संपते, तत्वचर्चेचा दिमाख बेगडी ठरतो, आणि

वटवटणारी जीभ निरर्थक चुकचुकणाऱ्या पालीप्रमाणे वाटते.



असले काही तरी क्षणिक, किरकोळ प्रथमच मला अनुभवाला आले होते.

योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिले धूसर चित्र आणि हा क्षण यांत

गणिताचाच स्पर्श होता. हनुवटीवरील दशांश चिन्ह भाग्य ठरविणारे होते,



पान नं. 50

तर पायथागोरासच्या चौरसांनी एक नवीनच खिडकी किंचितकाल

उघडली होती.



मग मॅट्रिकची परीक्षा संपली. परीक्षेपुरती गोळा केलेली माधुकरी तिच्याच

झोळीत टाकली. आता देणे-घेणे काहीच उरले नाही. जाताना शाळेने

आम्हांला निरोप दिला नाही. जाताना आम्ही देखील फारसे कुचंबलो नाही.

शेवटी पदरी राहिले काय?



तर सायमनचे कुर्रेबाज काव्यमय इंग्रजी, सेंटचा मंद वास, त्यांनी

शिकवलेली ग्रेची कविता, दातार मास्तरांनी दिलेले दशांश चिन्ह

पायथागोरासचा सिध्दांत, थडग्यावरील फरशीवर पडून अंगावरून जाऊ

दिलेली आत्मरत सुखाची झुळूख; शेवटच्या दिवशी स्टीफन माळ्याने

दिलेली Scented Giranium -ची फांदी व एक पान चुरगळून

नाकाजवळ आणलेला त्याचा सुगंध. बस्स एवढेच.



कॉलेजमध्ये तर सगळाच आनंद होता. कृष्णस्वामींनी ग्रीक शोकन्तिकेचे

दर्शन घडविले तेवढेच काही पदरात पडले. एका प्राध्यापकांनी कॉवरॅड,

हार्डी यांच्यासारखे अवजड लेखक परीक्षेला लावण्याऐवजी पी.जी.

वुडहाऊस, जेरोम के जेरोम असे लेखक लावायला हवे असे सांगितले.

आणखी एकाने कीट््सच्या कवितांचे सारांश देऊन वर्ष रेटले. आणखी एक

बहुधा पिऊन लालबुंद होऊन additional English शिकवायला येत,

आणि Through literature To L ife हे टेक्स्टबुक, damned silly

book म्हणून तास संपवत. जुन्या मित्रांपेकी कुणीच या कॉलेजमध्ये

बरोबर आले नाही. प्रभाकर सायन्ससाठी आपल्या काकांकडे गेला. पाच

वर्षे तातू सामंत माझ्या शेजारी बसत होता. आता बोक्यासारखे दिसणारे

एक धनिक बाळ बसू लागले. हा दर तासानंतर खिशातून कंगवा काढून

केस विंचरत बसे. तो दररोज एका नव्याच मुलीच्या प्रेमात पडे. एखादा नवा

राजकीय पक्ष अस्तित्वात आला की तो त्यात सामील होई व पंधरा दिवस

त्यात राही. एकदा सुभाषचंद्र बोस भाषणाकरिता आले असता त्याने

त्यांच्या स्वाक्षरीसाठी मोठया लाडिकपणे एक छोटी वही पुढे केली, तेव्हा

ती त्यांनी दूर फेकून दिली. हळूहळू कॉलेजात विद्यार्थी-खेळाडूंऐवजी

युवकच येऊ लागले आणि चार वर्षे संपली, त्या वेळी सुटका झाली असेच वाटले



पान नं. 51

त्या वेळी बराच विरंगुळा मिळायचा तो संध्याकाळी करंदीकर आजोबा

आणि अप्पा काळे घरी आले म्हणजे. करंदीकर आजोबा नियमितपणे घरी

येत. दादांना पुष्कळदा घरी यायला वेळ लागे, पण ते आल्याखेरीज नि

त्यांना भेटल्याखेरीज करंदीकर जात नसत. काही वेळा ते अधीरपणे

विचारत, ""काय रे, चित्रगुप्ताला आज इतका उशीर का ?"" दादा

वकिलाकडे काम करत. त्यांनी पाचसहा वकिलांकडे काम केले होते.

त्यांपेकी एकावर करंदीकरांचा फार राग होता व ते त्याला यम म्हणत.

यमाचा कारकून म्हणून दादा चित्रगुप्त. खरे म्हणजे दादा त्या ठिकाणी सहा

महिने टिकले नव्हते व त्यात देखील दोन महिन्यांचा पगार बुडाला होता.

पण करंदीकरांना मात्र ते कायमच चित्रगुप्त राहिले.



दोनचार दिवसांनी अप्पा काळे येत व मग बोलताना दोघांचीही घड्याळे

मरत. आजोबांना घेऊन जाण्यासाठी आलेला पिशव्या विठोबा समोरच्या

कट्ट्यावर बसून कंटाळे, व पेंगू लागे. मग त्याला मागच्यादाराने आत

बोलावून आई त्याच्यापुढे ताट ठेवत असे. मी चौथीत जाईपर्यंत कित्येकदा

दातार मास्तर देखील येत असत. मग तर रात्री आठ काय, नऊ काय,

वाजून जात. स्वयंपाकघरात आई व आजी पाय लांब करून जमिनीवरच

बसून बोलत बसत. पण जेवणाची हाक येईपर्यंत काय करावे, हा प्रश्न

माझ्या एकटयापुढेच असे. दादा फारसे बोलत नसत, पण बाकीच्यांच्या

बोलण्याला खूप हसत व मधून मधून आत जाऊन चहा, सुपारी, लवंगा

आणत. इतक्या आनंदाने दुसऱ्यांना चहा देणारा दुसरा माणूस मी

आजपर्यंत देखील पाहिला नाही.



करंदीकरांच्या पायात बूट असल्याने ते सोप्याचा उंबरा ओलांडून आत येत

नसत. अप्पा काळे तर स्पष्टच सांगत की आपण खुर्चीत बसलो की फक्त

जायच्या वेळीच उठणार, त्या आधी नाही ! मास्तरांना चहा-सुपारी काहीच

नको असे. काळे यांच्या शब्दांत ""त्यांची गन-पावडरची डबी जवळ असली

की त्यांना मोगल साम्राज्य तुच्छ वाटे."" मग मी चौथीत गेलो, व दातार

मास्तरांचे आमच्या घरी येणे बंद झाले. आता मी त्यांचा विद्यार्थी होतो,

आणि एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मनमोकळेपणाने वाटेल ते बोलावे,

हे त्यांच्या वागणुकीत बसत नव्हते. अनेकदा दाद त्याबद्दल हळहळत.





पान नं. 52

बालगंधर्व-केशवराव भोसले यांच्या संयुक्त प्रयोगाप्रमाणे ही तीन माणसे

बोलत राहतात, असे ते म्हणत.



अप्पा काळे चार ते सहा क्लबमध्ये असत, व कुठला तरी एक गावठी रमीचा

डाव खेळत. त्यात दररोज पाच-सात आण्यांचा फार तर व्यवहार होत असे.

ते आपल्याला मिळालेला पेसा कधी घेत नसत, पण गेलेल्या पेशाची उधारी

ठेवत नसत. काही आणे गेलेल्या दिवशी क्लबपासून आमच्या घरापर्यंतचा

रस्ता त्यांच्या आरडाओरड्याने लालभडक होत असावा. त्यांना स्वतःचे

असे घर नव्हतेच. स्वतःच्या दोन खोल्या आणि शेजारच्या छोटया दुकानाचे

भाडे एवढेच त्यांचे ऐहिक वेभव होते. त्यांना एकुलती एक बहीण होती, व

ती सोलापूच्या शाळेत काम करत असे. अप्पा काळे दोनच गोष्टी निष्ठेने

करत. ते पत्ते खेळत व सिगरेट ओढत. सिगरेटमुळे त्यांच्या मधल्या बोटाचे

एक पेर काळसर-तपकिरी झाले होते. मी एकदा जादापणा दाखवून

विचारले, ""तुम्ही सिगरेट फार ओढता का ?""



का कुणास ठाऊक, ते मला नेहमी `अहो-जाहो' म्हणत. ते म्हणाले, ""अहो,

सिगरेट नसती तर मी केव्हाच खलास झालो असतो. बोट असे काळे का

होते, हे नंतर कधी तरी तुम्हांला समजेल. पण सिगरेट ओढण्याची सुरूवात

मात्र कधी करू नका, महाराज.""



त्यांची ही गोष्ट नंतर मी कधी ऐकली नाही. वेतागाच्या, दुःखाच्या

वेळी मी आयुष्यभर सिगारेटचा आश्रय घेतला. सिगरेटइतक्या

सहनशीलतेने आपले कुणी कधीच ऐकून घेत नाही. तिला स्वतःचा असा

आवाज नाही, मत नाही, उपदेश नाही. तिच्यात पत्नीची घरगुती सततची

बडबड नाही, की आपल्याला सतत बोटावर नाचवण्याचा प्रेयसीचा आचरट

प्रयत्न नाही. त्यामुळे सिगरेट सोबत नाही. एकादे अरभाट पुस्तक

किंवा शास्त्रीय संगीताची कुलीन मेफल सोडल्यास !



पण त्यांची एक गंमत होती. आमच्या घरात त्यांनी कधी सिगरेट ओढली

नाही. पायरीवर पाऊल पडले की सिगरेट गटारात पडलीच. दहा मिनिटे

सिगरेटशिवाय न राहणारे काळे तीन-तीन तास तिला स्पर्श न करता गप्पा

मारत बसत.



एकदा करंदीकर आजोबांनी शाहू नगरवासी कंपनीचा उल्लेख केला.



पान नं. 53

गणपतराव जोशांचे नाव घेतले आणि कौतुकाने मान हलवली. अप्पांनी

खुर्ची खस्सदिशी पुढे ओढली. कोणताही महत्वाचा मुद्दा मांडायचा असला

की अप्पा तसे करत. त्यावर घाबरल्यासारखे करून करंदीकर म्हणाले,

""ऐकलेत का भीष्माचार्य, तुम्ही मारे ज्यांचा धोशा लावता ते

गणपतराव जोशी, बालगंधर्व, कोल्हटकर, केशवराव भोसले, नाना फाटक

ही सारीच मंडळी अगदी कुचकामी आहेत. अभिनय म्हणजे काय हे

कुणालाच साऱ्या जन्मात कधी समजले नाही. अहो, त्यांच्यापेक्षा एक गोटा

नारळ जास्त चांगला नट ! सगळा कंजार-कचका, आरडाओरड नुसती.

`माझं नाव घनश्याम' एवढी साधी गोष्ट सांगताना एवढा खणखणीत आवाज

लावण्याची काय गरज आहे ? आम्ही देखील इतके बुद््दू की त्या वेळी

आमच्या अंगावर झरकन काटा उठायचा !""



""पण काळोबा, नाटकात थोडा नाटकीपणा यायचा नाही तर तो यायचा

केव्हा, मंत्रपुष्पाच्या वेळी ?"" टेबलावर मूठ आपटत करंदीकर म्हणाले.



""द्रोणाचार्य, आयुष्यभर तुम्ही पगडी वापरलीत, पण फिरवायची कशी हे

मात्र शिकून घेतले नाही. आजचे नाटक कसे असते माहीत आहे ?एक

मिशाळ नट स्टेजवर बाजूला जातो, आणि प्रेक्षकांकडे पाठ करून बसतो,

आणि उगाच होय की नाही असा एक निःश्वास सोडतो. तो पुन्हा प्रेक्षकांकडे

येतो, त्या वेळी त्याच्या मिशा थोड्या विसकटलेल्या असतात. त्यावरूनच

अत्यंत दारूण अशा संकटामुळे त्याचे जीवन उद््ध्वस्त झाले आहे असे

आम्ही मुकाटयाने समजावयाचे. आणि ती प्रसिध्द नायिका कोण ती मसणी !

ती नाकपुड्या काय सुरेख थरथरवते म्हणता ! त्या थरथरू लागल्या की

तिला आवेग आनावर झाला आहे, असे आपण मानायचे, व आता ती आपले

व्यक्तिमत्व शोधण्यासाठी चौथ्या पुरूषाबोरबर सिंगापूरला जाणार हे

आपण ओळखायचे. तिची सूट-केस नेहमीच तयार असते. आजच्या नाटक

कंपनीत एखादा पडदा कमी असेल, फर्निचर नसेल, पण एक सूट-केस

तयार नाही असे मात्र कधी घडणार नाही.""



पान नं. 54

""काळोबा, हा काय आचरटपणा आहे ?"" करंदीकर म्हणाले, ""स्टेजवर

प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेल्याचा मिशाळ निःश्वास आम्ही कसा

ऐकणार ? आणि ती कोण पूतनामावशी, तिच्या थरथरणाऱ्या नाकपुडया

मागल्या रांगेतील प्रेक्षक काय दुर्बीण लावून पाहणार ? आणि तसे पाहून

घायाळ होणार ? अहो, म्यानात नवी युरोपियन झाडणी ठेवणारे धेर्यधर !

ग्रीक नाटकांत नट मुखवटे वापरत असत. उंची वाढवण्यासाठी पायाखाली

ते लाकडी ठोकळे बांधत. आणि केवळ शब्दांच्या फेकीने, गीत-गायनाने ते

दहा-पंधरा हजार प्रेक्षकांना उघडया थिएटरमध्ये तासन्् तास खिळवून

ठेवत असत, माहीत आहे ? अहो गलपोजी, तुमचे ते नेपथ्या, ती

प्रकाशयोजना सारे घाला खड््डयात ! नाटक जगते ते भाषणावर,

संवादावर ! असा एक धाडसी प्रयोग कधी कुणी केला नाही, पण करून

पाहायला हरकत नाही. समोर एक मोठा पडदा लावायचा आणि त्यामागून

केवळ भाषणे ऐकवायची. पात्रांची थोबाडे समोर नकोत. बघा राजसंन्यास

रंगते की नाही !



""अगदी तुळशी देखील पडद्यामागेच का ?"" अप्पांनी खवचटपणे

विचारले.""



""तुळशी देखील नव्हे, राजश्री,विशेषतः तुळशी. अरे संभाजीसारख्या

उमद्या वीराने सारे आयुष्य जिच्यावरून ओवाळले ती तुळशी तुम्ही प्रत्यक्ष

दाखवणार तरी कशी ? ती जलसुंदरीप्रमाणे वर आली, आणि गडकऱ्यांच्या

कल्पनेत जगली. तशीच ती प्रत्येकाच्या कल्पनेत तेजाळत राहू दे."" काळे

मोठ्याने हसले व त्यांनी टाळी वाजवून खुर्ची आणखी पुढे सरकवताच

करंदीकर मागे सरकले.



""राजसंन्यास म्हणातच एक आठवण झाली,"" अप्पा काळे म्हणाले, ""तीन

वर्षांपूर्वी राजसंन्यास नाटकाच्या जाहिराती लागल्या होत्या, आठवते का

व्यासमुनी ? आणि तुळशीचे काम कोण करणार होते माहीत आहे ?तर

चाळशी घातलेल्या मेंढीप्रमाणे दिसणारी ती प्रसिध्द नटी ! बोला, आला की

नाही प्रळयकाळ ? महाराज, माझ्यावर विश्वास ठेवा. अगदी शपथ घेऊन

सांगतो, मी अंगारा लावला नाही. पण त्या दिवशी मात्र आम्ही धापा टाकत,

धावत चार मेलांवरच्या स्वयंभू माळ मारूतीकडे गेलो, आणि त्याच्या समोर

अंग टाकले.



पान नं. 55

त्याला नवस केला, त्याला साकडे घातले. कधी नाही ती त्याने

आमची याचना ऐकली. ऐन वेळी प्रयोग रद्द झाला. तेव्हा कुठे आम्ही शुध्दीवर

आलो, आणि नारळ फोडून सगळ्यांना खोबरे वाटले.""



""आम्ही ?म्हणजे आणखी कोण होते तुझ्याबरोबर ?"" थोडया आश्चर्याने

करंदीकरांनी विचारले.



त्या प्रश्नाची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे अप्पा हसले व त्यांनी

टेबलावरची पगडी गर्रकन फिरवली. ते म्हणाले,"" आम्ही म्हणजे मी आणि

गडकरी !""



अप्पा काळेंनी आपल्यासाठी काम करावे यासाठी चित्रपटनिर्मात्यांनी काही

त्यांच्यामागे फारशी गर्दी केली नसती. साधारणपणे बोटभर दाढी वाढवलेली,

व अंगात खादीचा लांब सदरा. मुळातच खादी हे कापड पूर्ण स्वच्छ असले

तरी मवाळ मळकट दिसते. एकदा एका माणसाने आपणाला तहान लागली

आहे असे म्हटल्यावर एका सज्जनाने त्याला पेलाभर पाणी दिले तेव्हा तो

उसळून म्हणाला, I said, I am thirsty, not dirty !"" अप्पा काळे

आग पाणी घेत नसत, पण त्यांना पाण्याविषयी दुःस्वास तेवढाच होता.

अप्पा अशा स्वरूपात आले की अनेकदा करंदीकर विचारत, ""काय एखाद्या

ज्वलंत प्रश्नावरील नाटकात काम करणार की काय ? त्यातील

नायकासारखे दिसता !""



""ते जाऊ द्या हो कृपाचार्य. तुमचा चहा वगेरे मी येण्यापूर्वीच संपन्न झालेला

दिसतोय.""



""संपन्न ?हे काय नवीन काढले आहेस ?""



""महर्षी, मराठी भाषा टिकवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे, गोड मानून

घ्यावा.""खुर्चीत जास्तच रूतत काळे म्हणाले,""आजकाल मराठीत समारंभ

साजरे होत नाहीत, तर संपन्न होतात. उद्योगधंद्यात कामगार नसतात, तर

असतात कर्मचारी. पोलिस उपाययोजना करत नाहीत, तर करतात

कारवाई.""



एखाद्याचे ज्ञान कितीही असो असे म्हणायचे नाही, तर त्याचे ज्ञान भले

कितीही असो, असे म्हणायचे. होय का ? असे विचारणे म्हणजे तर



पान नं. 56

बावळवटपणाची कमाल आहे. तर `अच्छा अच्छा' असे राष्ट्रीय एकात्मतेने

म्हणायचे. याच माणसांना एकादा इग्रंजी शब्द आला तर मात्र एका

स्वयंचलितेपुढे आडवे व्हावेसे वाटते ! सरकारी-नव्हे चुकलो-शासकीय

मराठी तर अमरच आहे. तिला आमचे कोटी कोटी वंदन ! अलीकडे मुलगी

पाहण्याचा कार्यक्रम कमी होत चालला आहे. पण असलाच तर मुलीला

शासकीय मराठीतील एका उताऱ्याचा अर्थ सांगता येईल का, असं

विचारावे. ती जर `होय' म्हणाली तर हे वधूइच्छुका, तेथून तत्काळ पलायन

कर. एवढी असामान्य प्रतिभावंत स्त्री तुला बिलकुल पेलायची नाही.



करंदीकर हसत म्हणाले,"" मला अर्थ माहीत नाही, तुम्हीच तो घरगुती

मराठीत सांगा, असे ती म्हणाली तर पंचाईतच व्हायची !""



""पंचाईत कसली ? ती संतोषाचीच गोष्ट होईल. त्याबाबत आपला तर पूर्ण

बोऱ्या उडाला आहे हे स्पष्ट सांगावे. बरे का, समान बौध्दिक पातळीवरचे

हे लग्न सुखाचेच होण्याची शक्यता आहे.पण एक गोष्ट मात्र मान्य केली

पाहिजे. सरकारला शासन म्हणणेच जास्त योग्य आहे, हे मात्र पदोपदी

जाणवते ! हो, आणखी एक नवीन ऐकले का तुम्ही मुनिवर्य ? आता `एकच

प्याला' हे नाटक साध्या कपड्यांत होणार आहे ""



दादांनी आणखी एक चहा आणून ठेवल्यावर काळे खूष झाले. एका लहान

कपावरच करंदीकरांचे चहाचे अवसान संपत असे. करंदीकर म्हणाले,

""म्हणजे सुधाकर फेडेड जीन्स घालणार, सिंधू स्लीव्हलेस घालून गोल

पातळात हुंदके देत `कशि या त्यजू पदाला' असे म्हणणार की काय ? आणि

जुनेरे नेसून दळण दळणाऱ्या सिंधूचे काय मग ?""



खोटया वेतागाने अप्पांनी मान हलवली. ते म्हणाले, ""आजोबा, आता

तुमच्या पगडीसह तुम्हांला जुन्या बाजारात ठेवले पाहिजे. आता नव्या

नाटकात सिंधू एक पाय जात्याभोवती सोडून दळण जळणारच नाही,

समजले ? त्या सीनमध्ये खरोखरच एक मोलकरीण पाच मिनिटे दळत

बसेल व सिंधू स्टेजवर या कडेपासून त्या कडेपर्यंत केवळ येरझाऱ्या घालत

राहील, आणि छोट्या हातरूमालाने कपाळ टिपत राहील. अहो, गाण्याला

जसा प्लेबॅक असतो ना, तसा अभिनयाला देखील असा प्लेबॅक द्यायचा;

समजले ?""
------------------------------------------------------------------
पान नं. 57

""अरे, पण मग ती स्लीव्हलेस गुळव्वा पाहिजे कशाला ?""



""अहो द्वेपायन, आता तुमच्यापुढे करू तरी काय ? जर ती बया नसेल तर

रंगभूमीवर मेरूमांदार गदगदा हलवून सोडणारी क्रांती कोण घडवणार?

मी फार वर्षांपूर्वी `द्रौपदी वस्त्रहरण' नाटक पाहिले होते. द्रौपदीचे काम

करणारा नट म्हणे अत्यंत तलम अशी सात पातळे नेसत असे व मग

दुःशासन त्यातील एकेक ओढत असे. त्या वेळी आम्हांला फार भीती

वाटायची, एखाद्या दिवशी पातळे मोजताना चूक झाली तर काय होईल ?

तसे घडले असतो तर मराठी नाटक बऱ्याच आधी एकदम वयात येऊन

बसले असते ! ही आपत्ती टाळण्यासाठी मी एक प्रतीकात्मक पण

क्रांतिकारक उपाय सुचविला होता. तो त्यांनी स्वीकारला नाही ही गोष्ट

निराळी. त्यामुळे नाटकाचा पहिला क्रांतिकारक म्हणून मला मिळायचे श्रेय

हरपले. द्रौपदीने एकच पातळ नेसायचे., पण एक-दोन आकडे असलेले

वाटेल तितके हातरूमाल कमरेला खोचायचे. दुःशासनाने एक हातरूमाल

ओढून बाजूला टाकला की एक वस्त्र गेले. हा प्रकार दुःशासन अक्षरशः

दमेपर्यंत अथवा कंटाळेपर्यंत चालू ठेवता येतो.""



""असलाया नाटकाला कवडी तिकीच तरी प्रेक्षक ढंकून बघणार नाहीत.

मग एका हातरूमालावर प्रेक्षक असे लिहून तो समोर खुर्चीवर ठेवावा

लागेल."" हात झाडत करंदीकर म्हणाले.



त्यांच्या गप्पा चालूच राहिल्या व कुणाला जेवणाची आठवण होईना. घरी

तर इतरांची संकष्टी होती. आणि चंद्रोदय सव्वादहानंतर असल्याने

स्वयंपाकघरात सारे शांत होते. माझ्या डोळ्यांपुढे मात्र भुकेमुळे चांदण्याच

काय, चंद्र प्रकाशू लागले होते. मला एकदम कांदेविक्याच्या

कवितेची आठवण झाली. त्याने बहुधा आपली कविता संकष्टीच्याच एखाद्या

अनुभवाने लिहिली असावी. कारण उपाशी पोरांच्या तोंडाकडे पाहत

संथपणे उगवत स्वतःशी हसणारा चंद्र बिलंदरच असला पाहिजे. एखादा

झटका आल्याप्रमाणे अप्पा काळे मध्येच खाडकन उभे राहिले व

घड्याळाकडे पाहत म्हणाले, "" बाप रे, नऊ वाजायला आले की !""



""आता जेवून जा, किंवा आज इथेच राहा."" दादा म्हणाले. ""मात्र जेवायला

दहा वाजून जातील""





पान नं. 58

""इतर वेळी राहिलो असतो, चित्रगुप्त! पण संध्याकाळपासून काय झाले

आहे कुणास ठाऊक, पोटात वारूळ उठल्याप्रमाणे झाले आहे. आतड्याला

गाठ बसल्याप्रमाणे होत आहे. ते विसरावे म्हणून येथे येऊन वात्रट बोलत

बसलो झाले. आता मात्र खोलीकडे गेलेच पाहिजे. असा आकांत वाटत

आहे. पण हे बघ, मी कधी तरी मुद्दाम येणार आहे- अगदी

इच्छाभोजनासाठी. तीळ लावलेली बाजरीची गरम भाकरी, भरल्या

मसाल्याची वांग्याची भाजी, खूपसे दही आणि पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर,

बस्स, मग चित्रगुप्त, तुला एक महिना भरपगारी रजा द्यायला सांगेन तुझ्या

मालकाला.""



पण त्या वेळी अप्पांकडे पाहून कुणालाही हसावेसे वाटले नाही. सगळा

जगाने त्यांना बाहेर काढले आहे, व ते त्याच्याकडे रोखून पाहत आहेत.

असे एकटे, बावरलेले दिसत होते.



अप्पा निघालेले पाहून करंदीकर देखील उठले. त्यांनी दारातूनच `विठोबा

म्हणून हाक मारली. विठ्ठलने समोरच्या कट्ट्यावर आरामात पाय पसरले

होते. हाक ऐकून तो धडपडत उठला, व आजोबांबरोबर निघाला. हा विठ्ठल

अगदी अनाथ होता. तसे पाहिले तर त्याला जवळचे कुणीच नव्हते. पण

करंदीकरांनी अतिशय दूरचे असे कुठले तरी नाते काढले होते, व त्याला

एका खासगी अनाथाश्रमातून आणून घरी ठेवले होते. आश्रिताचे त्याचे

आयुष्य, त्याला घरात एखाद्या जुन्या झाडणीपेक्षा जास्त किंमत नव्हती.

पाहावे त्या वेळी तो हातात पिशव्या घेऊन बाजाराकडे तरी जात असे किंवा

तेथून परतत तरी असे. त्यामुळे आम्ही त्याला `पिशव्या विठोबा ,म्हणत

असू. तो नेहमी चिरडलेला, घामट असा दिसे. तो माझ्यापेक्षा एखाद-दुसऱ्या

वर्षांनेच मोठा असेल. तो पूर्ण मोफत असलेल्या एका जुनाट,

नायटयासारख्या दिसणाऱ्या शाळेत जात असे. पण तो कधी आमच्यात

येऊन बसला नाही. थट्टा-मस्करी केली तरी तो कधी चिडला नाही. तो

घरावरून जाताना दिसला की त्याला हाक मारून आई त्याला काही तरी

खायला देत असे. पण त्या वेळी देखील त्याला पिशव्या घरी लौकर

पोहोचवण्याचा घोर लागलेला असे. तो निघाला की घाईघाईने जाऊन

त्याच्या दंडाला चिमटा काढणे ही माझी `गुड नाइट' म्हणण्याची पध्दत

होती, व विठ्ठलने त्याला कधी हरकत घेतली नाही.





पान नं. 59

काळे उठले व पायरीवर आले, पण मध्येच थांबून दादांना म्हणाले,

""ताबडतोब गेले पाहिजे, असे दावे ओढले जात आहे. पण जाऊ नये असेही

वाटते."" मग ते खाली उतरले व पहिले पाऊल रस्त्यावर पडताच त्यांनी

सिगरेट पेटवली. मी लगबगीने विठ्ठलजवळ गेलो, आजोबा जवळ असता

तो ओरडणे शक्य नव्हते. मी चिमटा काढण्यासाठी बोटे पुढे केली, व थोडे

हसत तो बाजूला वळला. तेव्हा माझ्या बोटात चिमूटभर कापड राहून चिमटा

चुकला. सदरा फाटला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू पुसले गेले व तो म्हणाला,

""आता उद्या शाळेला काय रे ?"" तोच आजोबांनी त्याला पुन्हा हाक मारली,

व तो लगबगीने त्यांच्याबरोबर चालू लागला.



नंतर चार-सहा दिवस अप्पा काळे आलेच नाहीत. करंदीकरांचे बोलण्यात

लक्ष लागेना. एक लहान कप चहा घेतल्यावर दोन-चार मिनिटे बोलून ते

निघून जाऊ लागले. आणखी दोन-तीन दिवस गेल्यावर दादा बोलून देखील

अस्वस्थ झाले. ""बाहेर कुठे जायचे असेल तर आम्हांला तसे

सांगितल्याखेरीज जाणार नाही, काळोबा, "" असे ते दोन-चारदा म्हणाले.

क्लबमध्ये देखील अप्पांचा पत्ता नव्हता. त्यांनी खोलीकडे जाऊन पाहिले.

तर खोलीला कुलूप. शेजारच्या दुकानदाराने सांगितले की त्यांची बहीण

फार आजारी आहे, म्हणून तार आली होती. ती त्यांने घेतली व अप्पा

आल्याबरोबर त्यांना दिली. ती वाचल्यानंतर खोलीचे कुलूप देखील न

उघडता अप्पा स्टेशनकडे गेले व रात्रीच्या गाडीने निघून गेले.

दादांनी आपल्या एका मित्राला सोलापूरला पोस्टकार्ड पाठवले व चौकशी

करून कळवायला सांगितले. तिकडून आलेले पत्र हातात पडले, तेव्हा दादा

जेवायला बसणार होते. पण त्यांनी ताट बाजूला सारले व ते बाहेर खुर्चीत

जाऊन गप्प बसले. काही विचारले तर एक नाही की दोन नाही. पण त्यांच्या

डोळ्यांत पाणी दिसत होते. ""अप्पांच्या बहिणीचे काही बरे-वाईट झाले

का ?"" आईने दोन-तीनदा विचारले, तेव्हा दादांनी तिला पत्रच वाचायला

दिले.



बहीण फार आजारी म्हणून अप्पा तिकडे गेले. तिची अवस्था अतिशय

कठीण आहे असे डॉक्टरांनी सांगितले, तेव्हा घरी परतल्यावर अप्पांनी

झोपेच्या गोळ्या घेतल्या व उठलेच नाहीत. ""ती माझी एकुलती बहीण,

आम्ही एकत्र उपास काढले आहेत. आता माझ्या डोळ्यांसमोर तिचे काही

झालेले मला झेपणार नाही."" अशी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.



पान नं. 60

अशाच दोन चिठठया करंदीकर व दादा यांच्या नावाने होत्या. दादांच्या

चिठ्ठीत एक वाक्य जादा होते, ""माझे इच्छाभोजन राहूनच गेले.""

करंदीकरांच्या चिठ्ठीतले जादा वाक्य होते,""आपली मेफल संपली.""



दादांच्या मित्राने चिठ्ठयांतील मजकूर मुद्दाम लिहून पाठवला होता. त्यानंतर

सारे विपरीतच घडले. त्या आजारातून बहीण सावरली. नंतर चार वर्षांनी

जिना उतरत असता पाय घसरून पडली व तिच्या मांडीचे हाड मोडले.

नंतर काय गुंतागुंत झाली कुणास ठाऊक, ती भ्रमिष्टच झाली. ती

कागदाच्या चिठोऱ्यांवर सतत रेघोट्या खरडायची व सांगायची,""एकदा

तरी इकडे येऊन जा म्हणून भावाला पत्र लिहीत आहे.""नंतर तिला त्यातच

कोमा झाला व ती शांतपणे झोपली.



विठ्ठल काही झाले तरी एक आश्रित, एक अर्धपोटी हरकाम्या होता.

करंदीकर आजोबा होते म्हणून निदान घास तरी त्याला मिळत होते.

आजोबा वारल्यानंतर मात्र त्याने तेथून जायचे ठरवले. तो मला भेटायला

आला, त्या वेळी भडाभडा बोलून गेला. तो म्हणाला,""मी जाताना

उंबऱ्यापर्यंत पोहोचवायला देखील कुणी आले नाही बघ. दारात बांधलेले

कुत्रे, ते माझ्या इतक्या ओळखीचे. त्याचे खाणे-पिणे पाहणे हे तर माझे एक

कामच होते. मी त्याला अगदी छातीशी उचलून धरून दोनदा डॉक्टरकडे

नेऊन आणले होते. पण मी जात असता ते वस्सकन्् अंगावर आले आणि

त्याने माझी पँट दातात धरून टरकावली. त्यानेच मला सगळ्यांना निरोप

सांगितला,`आता तुझे इथे काही नाही. तू परका आहेस, तू चालता हो, तू

चालता हो.' पण त्या वेळी तुझ्या दादांचा मला केवढा आधार मिळाला हे

तुला माहीत नसेल.

सध्या तरी दादांचा विषय मला नको होता. अजून आमची जखम ताजी

होती. जाताना त्यांना अतिशय वेदना झाल्या. आईने आपले मन दगडाचे

केले, म्हणूनच ती शेवटपर्यंत त्यांच्याजवळ बसून राहिली. मी हॉस्पिटलकडे

गेलो की ते माझ्याकडे नुसते पाहत राहायचे. पण त्यांच्याकडून एक शब्द

यायचा नाही. आमच्यासाठी त्यांच्याकडे कसल्याच चिठ्ठ्या उरल्या

नव्हत्या.""

""आजोबा गेल्यानंतर दादांनी एक दिवस मला बोलावले आणि एक पाकीट

माझ्या हातात ठेवले. ते म्हणाले, करंदीकर आजोबांनी तुला देण्यासाठी



पान नं. 61

माझ्याजवळ नऊशे रूपये ठेवले होते. कदाचित आता आपण फार दिवस

उरणार नाही, हे त्यांना समजले असावे. एकंदर परिस्थितीत यापेक्षा ते

काही जास्त करूच शकले नाहीत. एक पत्र देखील आहे बघ आत !मला

कसलीच काही कल्पना नव्हती. माझे हात थरथरू लागले. आत आजोबांची

एक चिठ्ठी मात्र होती : `माझी शेवटची भेट नऊशे रूपये.' मी नोटा मोजून

पाहिल्या, तर त्या एक हजाराच्या होत्या. दादा म्हणाले, `होय, शंभर रूपये

माझी एक भेट. कुणास ठाऊक, आपण आता केव्हा भेटू ते. धीराने वाग

आणि आयुष्यात स्वच्छ पावले टाकत जग.' मी त्यांच्या पायांवर डोके ठेवले

व झटकन निघून गेलो, माझ्या तोंडून एक शब्द येईना - शपथ ! मग मात्र

मारूतीच्या देवळात जाऊन अर्धा तास रडलो, मन मोकळे केले. ""
------------------------------------------------------------

Saturday, October 11, 2008

आहे मनोहर तरी

<सुनीता देशंपाडे>

<आहे मनोहर तरी...><प्रकाशक :- श्री. पु. भागवत, मौज प्रकाशन गृह><पुणे>

आवृत्ती :- तिसरी आवृत्ती

पान नं. 1

हे आत्मचरित्र नाही.

आठवणींच्या प्रदेशातली ही स्वेर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या

फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत

केलेली.



आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे

नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्या

संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.



पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि

जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग

माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?



प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध

लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढ

वयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या

पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नाते

जाणवते का ?

अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.

आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधूनमधून वेळ

मिळेल तसे, थोडेथोडे तुकडयातुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता

केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.



एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.



कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश

धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच

रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर

नक्षत्र.



पान नं. 2



पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यांतलं एखादं वेल्हाळ पाखरू

गात माझ्या झाडावर उतरतं.



चोहूकडून नातवंडं येऊन बिलगतात आणि `गोष्ट सांग' म्हणून चिवचिवाट करतात.

...हे सगळं किती लोभसवाणं आहे ! मग माझ्याच पापण्यांत पुन्हा पुन्हा हे असं धुकं कां

जमा होतंय ? `आहे मनोहर तरी गमते उदास ' अशी ही मनाची अवस्था असताना या

पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू ?

एक होता राजा आणि एक होती..

(एक कोण होती ?)

... आणि एक होती परी की एक होती म्हातारी ?

की...(दुसरं कुणी नव्हतंच ?) फक्त

...एक होती परी आणि ती झाली म्हातारी ?

....

....

सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी.

सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.



सध्या असा एक मूड आहे की ज्याला `आताशा मी नसतेंच इथे' मूड म्हणता येईल.

म्हणजे कुणाला भेटू नये, कुणी येऊन डिस्टर्ब करू नये, एकटेच बसावे, स्वतःतच राहावे,

असा. पडून किंवा बसून राहावे.- डोळे उघडे किंवा मिटलेले, कसेही. पण सभोवारचे

काहीच न पाहता, त्यात अगर या इथे न राहता. सारा कल्पनेचा किंवा विचारांचा खेळ

खेळत, त्याच जगाशी एकरूप होत, तिथली सुखदुःखे भोगत.

अशा वेळी डोळ्यांना दुसरचं जग दिसत राहतं. कानांची स्थिती Sir Thomas Browne

च्या शब्दांतल्या नाईल नदीसारखी होते.`and Nilus heareth strange voices' अशी. धूसर

स्वप्नं पडत राहतात, विरत राहतात. `मी झालेंय निळं गाणं- निळ्या नदीत

वाहणारं- निर्मात्याबरोबरच' ती हीच अवस्था का ? पद््माबाईना विचारायला हवं.



आयुष्याच्या सुरूवातीला, जिथून आयुष्य फुलायला लागते अशा वळणावर एक, आणि

शेवटी शेवटी, म्हणजे जिथून आयुष्य उतरणीला लागले अशा वळणावर एक, असे दोन

जबरदस्त मित्र मला लाभले. दोघेही अगदी भिन्न प्रकृतीचे,प्रवृत्तीचे. मीही तीच राहिले

नव्हते. पार बदलून गेले होते. मधल्या काळात तिसऱ्याच एकाच्या सहवासात स्वतःला पूर्ण

विसरून, चक्रावून - अगदी पायाला चाके लावून- त्याचा संसार केला. तोही जबरदस्त

होता म्हणून मी या बंधनात अडकले की... तो अगदीच मूल होता म्हणून त्याचेच खेळणे



पान नं. 3



करून मनसोक्त खेळत राहिले ? की दोन्ही ?



आजा पाहावे तिथे सगळी स्वच्छ निराशाच दिसतेय. आकाशदेखील कुठे निळे नाही.

सगळीकडे एकच राखी रंग, अगदी निर्मळ किंवा विशुध्द कारूण्याची राखी रंगच्छाटा.Gray

of the purest melanchol. झाडेदेखील स्तब्ध, विचारमग्न उभी आहेत. आईच्या डोळ्यांत

गलबल दिसली तर कडेवरचं मूल कसं बावरून तिला नुसतं बिलगून राहतं तशी पानांची

सळसळही पूर्णपणे विराम पावली आहे. माझ्या मनात कसले विचार येताहेत त्याच्याशी या

बाहेरच्या जगाचे इतके जवळचे नाते असेल? कोण जाणे. पण कदाचित साऱ्या

सजीव-निर्जीव सृष्टीशी माझे अज्ञात नातेही शेवटी त्याच मूलतत्त्वांतून-

पंचमहाभूतांतून - सारी सृष्टी निर्माण झाली ना ? मग सारे काही अदृष्ट धाग्यांनी जोडलेले

नसेलच कशावरून ? समोरच्या खिडकीच्या लोखंडी गजांचे माझ्या रक्तातल्या लोहाशी नाते

असेलही. समोर कोण राहतो ? त्याची-माझी ओळख नाही, त्याचे नाव मला माहीत नाही.

अरे वेडया, आम्हा बाहेरच्या लोकांपासून संरक्षण मिळावे म्हणून खिडकीच्या झरोक्यात तू

उभे केलेल हे लोखंडी पहारेकरी आमच्याही नात्यातलेच आहेत हे कसे विसरलास ? हा

विचार आला आणि सगळे काही मूर्खपणाचेच वाटायला लागले. मूर्खपणाचे की भीतिदायक ?

की आशादायक ?



मूड्स तरी किती अस्थिर असतात ! येतात, जातात. पण मुक्कामाला आले की कधीतरी हे

पाहुणे जाणार आहेत हे भानच नाहीसे होते, आणि आपण त्यांच्यात अगदी बुडून जातो.



प्रचंड वेगाने स्वतःभोवती आणि आपल्या जन्मदात्याभोवती फिरणारी ही पृथ्वी अशीच,

या मूड्ससारखीच, पाय रोवायला आधारभूत आणि स्थिर वाटते. या वेगाचे आणि तिच्याही

हतबलतेचे ज्ञान झाले की भीतीने आपले पाय डळमळू लागतात. अज्ञानात खरेच सुख आहे

हे आपला अनुभव हरक्षणी सांगत असतो, तरीही आपण ज्ञानाच्या मागे धावतो आणि

आपल्या मुलाबाळांनाही ज्ञानी करण्यासाठी धडपडतो. हा शहाणपणा म्हणायचा की वेडेपणा ?



माझ्या लहानपणी आमच्या घरात बालदत्तोत्रेयाच्या चित्राची एक फ्रेम होती. रंगीत

पाटावर मांडी घालून बसलेल्या वर्ष-दीड वर्षांच्या बालकासारख्या गोड चेहऱ्याच्या हसतमुख

दत्तात्रेयाचं ते चित्र मला खूप आवडायचं. आईने मग ती फ्रेम मलाच दिली. तिच्या

देवांजवळच भिंतीवर, माझा हात पोचेल इतक्या उंचीवर खिळा मारून घेऊन त्यावर मी ती

टांगली. रोज बागेतून निवडून निवडून फुले आणायची आणि त्यांचा हार करायचा. आंघोळ

झाल्याबरोबर त्या फ्रेमची काच पुसून त्या देवाला पुन्हा गंध लावायचं आणि तो फुलांचा

हार घालायचा. मग हात जोडून डोळे मिटून मी प्रार्थनाकरीत असे. ही प्रार्थना निश्चित



पान नं. 4



कोणती होती, त्यातून मी त्या देवाशी कोणता संवाद साधत होते, यांतले काहीच आता

आठवत नाही. पुढे कधीतरी मी नास्तिक होत गेले आणि पक्की नास्तिक झाल्यावर त्याचा

अभिमानही बाळगू लागले. आजही मी नास्तिकच आहे, अगदी पक्कीच. पण आज वाटते,

नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोषट असली तरी त्यात मनःस्थिती मात्र नसते

आस्तिक्य हे बिनबुडाचे असते खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थ

स्थेर्य,आधार, शांती, असाही असेल. त्यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला

तरी आस्तिकांचा हेवा वाटतो. आणि दुर्देवाची गोष्ट अशी की आस्तिक माणूस हा

विचारान्ती पुढे नास्तिक होऊ शकतो,, पण खरा नास्तिक हा आस्तिक कधीच होऊ शकत

नाही.



पान नं. 5



आप्पांना जाऊन आता सात वर्षे होऊन गेली. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आतच

आईही गेली. जन्माला आलेलं प्रत्येकजण असं जातच असतं. शिवाय त्यांची वयेही

झाली होती. हे सगळे खरे असले तरी अशा व्यवहारी दृष्टिकोनातून मला आप्पा-

आईकडे पाहता येत नाही. मी स्वतः नको तितकी व्यवहारी आहे तरीही. त्यांनी

मला जन्म दिला, माझे पालनपोषण केले. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी

त्यांच्याच छत्राखाली वाढले. त्यानंतर मी स्वंतत्र जीवनक्रम स्वीकारला, तरी शेवटपर्यंत

आमचे संबंध कुठेही दुरावले नव्हते. उलट माझे वय वाढत गेले तशी प्रेमाची किंमत

मला अधिकाधिक जाणवू लागली आणि त्यांच्या मृत्यूमुळे पोरकेपण आले.



पण यात नवल ते काय ? आई-वडील गेले की मुले मोठी असली तरी पोरकी होतातच.

मग हळूहळू दुःख कमी कमी होत जाते आणि पुढे सोईस्कर विसरही पडायला लागतो.

अधूनमधून आठवणी तेवढया शिल्लक राहतात. बऱ्या,वाईट, दोन्हीही

माझ्या बाबतीत ही नेसर्गिक वाटचाल आहेच. पण आणखीही काही घडतेय. ते

निश्चित काय ते निरखण्याचा का हा प्रयत्न आहे ?



आप्पांना मृत्यू मोठा छान आला. वयोमानाप्रमाणे ते थकत चालले होते, शरीर

दुबळे होत होते, स्मृतीही अंधूक होत चाललीय का अशी अधूनमधून शंका येई. पण

समाधानी वृत्ती आणि प्रेमळपणा जराही कमी झाला नव्हता. निवृत्तीतला आनंद

मनसोक्त घेत आणि परावर्तित करीत त्यांचे वय वाढत होते. त्यामुळे त्यांनी

आपल्यातून कधी जाऊच नये असेच त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांना वाटे. त्यांचा

शेवटचा आजारही आला तसाच झटकन त्यांना घेऊन गेला. अवघ्या बारा तासांत

सकाळी एकरा-साडेअकराला त्यांना हार्ट-अँटॅक आला. लगेच उपचार सुरू झाले,

आणि पुण्या-मुंबईला मुलांना फोन गेले. रात्री आठनंतर एकेक गाडी येऊन पोचली

आणि सगळी मुले त्यांना भेटली. आम्ही दोघे सर्वात शेवटी दहा वाजता येऊन

पोचलो. सलाइन,ऑक्सिजन वगेरे लावलेल्या अवस्थेत ते डोळे मिटून पलंगावर पडले

होते. भोवतीला सगळे आप्तस्वकीय. मी त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाले,""आप्पा

मी आलेय. कसं वाटतंय तुम्हाला ?""



त्यांनी मोकळा असलेला हात माझ्या पाठीवरून फिरवत क्षीण आवाजात म्हटलं,

""किती ग माझ्यासाठी माझ्या बाळांना त्रास झाला !""



पान नं. 6



""आप्पा, मला ओळखलंत ?""

""माझे भाई नाही आले ?""

म्हणजे त्यांनी बरोबर ओळखले होते. मग त्यांनी माझ्याकडे थोडे पाणी मागितले.

डॉक्टर सकाळी आप्पांना अँटॅक आला म्हणताक्षणी आले होते ते आता घरी जायला

निघाले. मी दारापर्यंत त्यांच्याबरोबर जात त्यांना म्हटले,""आप्पांचं सर्व काही फार

छान झालंय. त्यांना सुखानं जाऊ दे. आता उगाच त्यांना नाकातोंडात नळ्या घालून

जगवत ठेवू नका.""



डॉक्टर मला म्हणाले,""त्यांना आलेले अँटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही

कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ

राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.

असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळ राहतीलसे""

आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पांनी प्राण सोडला.



बिचाऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला

आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती,वाचा,भान सगळे जात चालले; आणि

नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पेसा,मनुष्यबळ,काही कमी नव्हते.

पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते, आणि तेच नशिबी आले. ती आजारी

पडताच आम्ही मुंबईला आणले. तिथे सगळी मुले,नातवंडे,लेकी,सुना-

सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होतो.

कामे वाटून घेऊन करत होतो. तिऱ्हाइताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान !

कुणी कमी पडू देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुध्दीने,

नाइलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करीत होती, अद्याप करतेय.



समजा, तिच्या ऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी

औषधोपचार,सेवाशुश्रूषा,नवससायास करत राहिली असती.



तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षांच्या

काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वतःचे

औषधपाणी स्वतःच करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती

अंथरूणात आराम करतेय आणि दुसरं कुणी तिची सेवाशुश्रूषा करतंय असं दृश्य

प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न

मानवणारी. आणि दुर्देवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्या

सेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.



आई गेली. मुलेबाळे,नातवंडे लेकीसुना,अगदी भरले घर होते, तरी तिच्या

शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग

आता यानंतर त्याबद्दल लिहून मी दुःख उकरून काढतेय का ? हे दुःख नव्हे; हा



पान नं. 7



वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलटसुलट विचारांचा,भावनांचा गुंता आहे.

तो सोडवता आला तर पाहावा, त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा

यासाठी हा सलारा खटाटोप.



या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत,दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस

असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन. उरलेल्या वेळात

माझ्या स्वतःच्या व्यापातच गुंतले होते, घर-संसार,प्रुफे,नव्या कवितावाचनाच्या

कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोठाय व्यवहाराची कामे आणि

त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगेरे

वगेरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही

सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन

छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन

आमंत्रितांसाठीचे वगेरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमांत काही

अडथळा तर येणार नाही ? ऐनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही

आमची अडचणही होऊन बसली होती, आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक

यातना होत. आपण स्वतः किती स्वार्थी,कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. स्वतःचीच

जेव्हा जाऊन राहत असे तेव्हा ?



हॉस्पिटलमधे मी आईच्या उशाशी बसले होते. माझी थोरली वहिनी आपल्या

छोटया नातींना घेऊन आली होती. तासभर त्या छोटया मुलींनी खूप करमणूक केली.

मोठया गोड पोरी. सगळ्यांना कौतुक. आईच्या शेजारी त्यांना पाहताना एकदम

मन कुठल्या कुठे गेले. वाटले, ही पलीकडे झोपलेली म्हातारी, माझी आई,हीही

एकेकाळी अशीच छोटी,चुणचुणीत,गोड होती असेल. तिचेही तिच्या आईवडिलांनी

असेच कौतुक केले होते असेल...



फार बेचेन झाले. करूणेनं मन भरून आलं, डोळ्यांवाटे वाहू लागलं. जन्मापासून

मृत्यूपर्यंतच्या या फेऱ्यात सुरूवातीच्या टोकाला कुठेतरी त्या छोटया पोरी आहेत,

मध्याच्याही पुष्कळ पुढे कुठेतरी मी आह आणि अगदी शेवटच्या टोकाला आई आहे.

आईची जागा काही काळाने मी घेणार, त्या वेळी ? त्या वेळी माझ्या वाटयाला

आलेल्या फेऱ्याच्या सुरूवातीला कुणी,मधे कुणी,कुठेच कुणी आपले असे दिसेना.

किंबहुना, तो फेराच नाहीसा झाला होता, फक्त शेवटच्या टोकाला मी लोंबकळत होते.

खरे तर आपली ही अवस्था इतर कुणालाही क्लेश देत नाही, असा क्लेश होऊ शकेल

असे लागेबांधे गुंतलेले आपल्याला कुणीही नाही; चला- खऱ्या अर्थाने आपण मुक्त

आहो. आपल्यामुळे इतर कुणालाही दुःख नाही, ही केवढी आनंदाची घटना आहे !

मग मला आनंद न होता हे असं तिसरचं काही कां होतंय ?





रात्र झाली आहे. नुकतेच डॉक्टर तपासून गेले. शरीराबरोबरच आईचं मनही





पान नं. 8



अस्थिर होऊ लागलं आहे. स्मृती फार अंधूक होत चालली आहे आणि असंबध्दता

वाढते आहे. वाचाही अस्पष्ट आणि असमर्थ होऊ लागली आहे. असे आणखी किती

दिवस जाणार ? हे म्हणजे संपूर्ण परावलंबित्व. नेमकी तिला नको असलेली अवस्था.

तिने आयुष्यभर अनेकांसाठी अनेक कष्ट उपसले. पण कुणाहीपुढे मदतीसाठी याचना

केली नाही. आपल्याला मरण कसे नको ? तर नेमके असे, असेच ती म्हणाली असती

निश्चित. मी म्हणे लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन

आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची

स्वतःची,चुलत दिराची,मामेसासूची,बरीच मुलेमाणसे घरात होती. सेपाकपाणी,

आलेगेले,सर्वांचा अभ्यास करून घेणे,सणवार,एवढया मोठया घरसंसारात त्या

काळाच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार,

जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील ! माझ्यापुरते तरी कृतज्ञतेच्या भावनेने

मी तिच्यासाठी काही करायला नको का ? आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार ?आता

तिच्यासाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे या परावलंबित्वातून तिची

सुटका. पण हे कोण कसे करणार ?मर्सी किलिंगबद्दल अद्याप तरी नुसती चर्चाच चालू

आहे. चर्चेत मला रस नाही;तिला तर कधीच नव्हता. याक्षणी मी तिच्यासाठी काही

करणे, अगदी पुढलामागला कसलाही विचार न करता काही करणे म्हणजे...



सगळीकडे सामसूम आहे. प्रत्यक्ष मुलगीच खोलीत तिच्याजवळ असल्यामुळे

हॉस्पिटलच्या नर्सिससुध्दा निर्धास्त आहेत. आम्ही, म्हणजे मी, बेल वाजवल्याशिवाय

कुणीही खोलीत येणार नाही. आई शांत पडली आह. डोळा लागला आहे. हीच वेळ

आहे. मोठया निश्चयाने मी जवळ गेले. म्हातारपणाने आणि आजाराने

आवळचिवळ झालेली तिची एवढीशी मान. माझ्या हातांत पुरेशी शक्ती निश्चित

आहे. आईसाठी काही करण्याची ही अखेरची संधी आहे. बंडखोर,क्रांतिकारी वगेरे

माझी एकेकाळची विशेषणे कालप्रवाहात कधीच वाहून गेली. आताच्या कुणालाही

त्यातले काहीही माहीत नसेल. पण ती बंडखोरी अद्याप मेलेली नाही हे मी स्वतः

जाणते ना ? माझ्या सामर्थ्याचा पुरेपूर अंदाज मला स्वतःला आहे ना ? मग ? मग

अडतेय कुठे ? भीती ? ती तर कधीच नव्हती, नाही. कुठे जीव गुंतलाय का, की

ज्यासाठी जगायला पाहिजे, अविचारी बनून चालणार नाही ? एकेकाळी असे खूप

काही होते. अगदी परवापरवापर्यंतही असे थोडे शिल्लक असल्याचे अधूनमधून जाणवे.

पण आता- या क्षणी तरी असा कुठलाही पाश नाही. माझे हात मुळीच थरथरत

नाहीत. गादीचा कोपरा खूप जोरात दाबून पाहिला, आणि पलंगाचा कठडाही. हातांत

पुरेसा जोर आहे. मग अडतेय कुठे ? मध्यमवर्गीय दुबळेपणा ? मी असे कृत्रिम वर्ग

मानत नाही. मी त्या अर्थाने मध्यमवर्गीय वगेरे मुळीच नाही. भरपूर कष्ट मी

आवडीने करते. कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला

नाही. नाइलाजास्तव कष्ट करणाऱ्या माझ्या परिचयातल्या `कष्टकरी' वर्गातल्या अनेक

व्यक्तींपेक्षा माझ्या वेयक्तिक गरजा फार कमी आहे. ते असो, पण माझ्यात असला



पान नं. 9



कसला दुबळेपणा नक्की नाही. या क्षणी तरी नाही. माझ्या डोळ्यांदेखत अन्याय होत

असेल तर तो समूळ निपटायला मी मागलापुढला विचार करणार नाही. मी पूर्वीचीच

आहे; पिंड तोच आहे.



संतापाच्या भरात कुणालाही मारणं ही गोष्ट मुळीच कठीण नाही. कोणताही प्राणी

हे करू शकतो. शांत डोक्याने, विचारपूर्वक शत्रूला मारणे हे चारचौघांचे काम नसेल,

पण तेही फार कठीण काम आहे असे मला वाटत नाही. आपण ज्यांना क्रांतिकारी

म्हणतो, त्यांतल्या अनेकांनी तेच केलेय. वेळीप्रसंगी मीही ते करू शकले असते. पण

जिथे आपला जीव जडला आहे अशा, निरपराध, विश्वासाने झोपलेल्या व्यक्तीचा

प्रेमापोटी गळा दाबण्याची अलौकिक शक्ती माझ्या हातांत नाही. या क्षणी मला ती

शक्ती हवी होती, पण त्या बाबतीतला माझा दुबळेपणा फक्त जाणवला. आवंढा

गिळता येईनासा झाला. खूप गरम अश्रू वाहू लागले. इतके असहाय दुःख यापूर्वी

कधी झाल्याचं स्मरणात नाही. आईची ती मान आणि माझे ते हात यांच्यात

दुबळेपणाची एकच चढाओढ लागून राहिली आहे. आई गेल्याला आता इतके दिवस

लोटले तरी ही जीवघेणी चढाओढ डोक्यातून मिटतच नाही.



याच आईने आम्हा मुला-नातवंडांची आणि आप्तेष्टांची अनेक आजारपणं

काढली. जाग्रणं केली, काळजी वाहिली, मर मर मरून आम्हांला तऱ्हतऱ्हा करून

खाऊपिऊ घातलं. अभ्यास करून घेतला. मुलं मोठी झाली तशी पांगत गेली. मग आई

आम्हां सगळ्यांना या ना त्या कारणाने कोकणात आपल्याकडे बोलवत राहिली,

आमच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागली. आंबे,नारळ,बोरे,शेवग्याच्या शेंगा,

तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे- जे जे तिच्या मेहनतीतून ती फळाला आणी ते ते आम्हां

सर्वांना ती कुणा ना कुणाबरोबर पाठवत राही. मग नारळ पाठवताना ती पोचवण्यासाठी

त्याला किती त्रास होत असेल याची ती विचार करत नसे. तिची असली कामे

करणाऱ्या मंडळीनाही कधी तक्रार केली नाही. कारण या नाही त्या तऱ्हेने ती त्यांच्या

उपकाराची परतफेड करत असावी. पण असल्या भेटी स्वीकारताना आमची,निदान

माझी तरी, फार पंचाईत होई. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असे. कधी

कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असे. कधी घरात तिसरेच कुणी काही महत्त्वाच्या

कामासाठी आलेले असे. अशा वेळी आईने पाठवलेले आंबे,पोहे,किंवा असलेच

काही घेऊन कुणीतरी येई. आईचे काम केल्याची आणि विशेषतः पु.ल.देशपांडे

यांच्या घरी जाऊन आल्याची धन्यता त्याच्या चेहऱ्यावर दिसे. माझा मात्र चेहरा

ओशाळा होई. आईचा राग येई. या वस्तू इथे मिळत नाहीत का ?मग उगाच

इतक्या दुरून त्या कुणाबरोबर तरी पाठवायच्या कशाला ?आणून पोचवायचा

त्यांनाही त्रास आणि आता त्यांचे आदरातिथ्य करत बसायचा मलाही त्रास. मग

त्यांच्याशी काहीतरी बोलावे लागे. चहापाणी विचारावे लागे. एरवी मी दिवसभर



पान नं. 10



बडबडत असते. रोजचा कित्येकदा आणि कित्येक कप चहा करते. पण हाकपभर

चहा आणि ही इकडली तिकडली चौकशीची चार-सहा वाक्ये मला जड वाटत.



या वस्तू इथे मिळत नाहीत का? आम्ही कामात असतो हे हिला कळत नाही का ?

पुण्या-मुंबईसारख्या शहरात, अगदी एखादा पु.ल.देशपांडे किंवा डॉ. ठाकूर

असला तरी, त्याचं घर शोधून काढून या भेटी पोचवायच्या म्हणजे काय ताप असतो

हे कितीदा सांगूनही हिला कळत कसं नाही ? आणि वर त्या भेटीबरोबर पत्रही असे.

यांतली ही पिशवी या नातवाला पोचव, ती त्या नातजावयाला पोचव-म्हणजे

आम्हांला काय दुसरे धंदेच नाहीत का ? असल्या आईची मग मला लाज वाटे. आणि

ओशाळ्या सुरातच तिचं हे मला न पटणारं वागणं कसं चूक आहे हे न राहवून मी

त्या पाहुण्यांना बोलूनही दाखवीत असे. मला कळू लागल्यापासून जवळजवळतीसएक

वर्ष आईचं हे वागणं माझ्या काटेकोर व्यवहारी दृष्टिकोनात कधी बसलं नाही आणि

त्यामुळे ते मला कधी मनापासून रूचलंही नाही. पण आई आईच राहिली आणि

त्यानंतर मात्र पुढे पुढे आपलेच काहीतरी चुकतेय असे मला वाटू लागले. आता आई

नाही. माझ्यावर तसे ओशाळे होण्याचा प्रसंग तर आता कधीच येणार नाही. ती

पाठवी त्या वस्तू, मला हव्या तेव्हा मी आणू शकेन. ते सगळे काही इथेही मिळते.

मात्र तिने लावलेल्या आणि वाढवलेल्या झाडांचे आंबे, नारळ, शेवग्याच्या शेंगा, बोरे,

रामफळे,फणसाच्या कुयऱ्या- इथल्या बाजारात विकायला येत नाहीत. इथे

मिळणाऱ्या या व्सतू कदाचित अधिक चांगल्या प्रतीच्याही असतील. जिभेला त्या

अधिक चांगल्या लागतील. पण आत कुठेतरी पिंडाला तृप्त करण्याचं सामार्थ्य त्यांना

नक्कीच नाही. कारण त्यांना आईच्या हाताचा स्पर्श नसेल.



हा पिंड म्हणजे काय ? आई-आप्पांनी मला जन्म दिला. माझं अस्तित्व हे

त्यांच्यामुळे. पण जन्म दिला म्हणजे काही उपकार केले असे मी मानत नाही. तो

त्यांच्याही आनंदाचा भाग होता. त्यांनी,विशेषतः आईने, आम्हां मुलांचे पालपोषण

केले. पण हाही तिच्या आनंदाचाच भाग म्हणायचा. स्वतःच्याच मुलांचे केले ना ?

मी तिच्याच पोटची. पण तिच्या पोटची म्हणूनच तिच्यातले अनेक गुणदोषही

अपरिहार्य माझ्यातही आले आहेत. गुणांपेक्षा दोषच अधिक. तिच्याचसारखी मी

फार मोठयाने बोलते. तिच्या मोठयाने बोलण्याचा आम्हांला कधी त्रास झाला नाही,

कारण लहानपणापासूनच आम्हांला त्याची सवयच झाली होती. मला वाटते. शहराबाहेर

राहणारी माणसे जरा मोठयानेच बोलतात का ? कोण जाणे. पण तसे म्हणावे तर

माझी इतर भावंडे माझ्याइतकी मोठयाने बोलत नाहीत. मी मात्र फार मोठयाने

बोलते. याची जाणीवही मला सतत होत असते. कारण भाईला त्याचा फार त्रास होतो

हे मला कळते. पण तरीही, अनेकदा ठरवूनही मी माझी ही सवय बदलू शकले नाही.

हा पिडांचाच धर्म ना ?



पान नं. 11



तिच्यातला माझ्यात उतरलेला दुसरा दोष म्हणजे ती तोंडावर कुणाचे कौतुक करू

शकत नसे. ही बाई एके काळी शिक्षिका होती. लग्न झाल्यावर पहिली तीन मुले

होईपर्यंत तिने हे काम करून जी काही आर्थिक कमाई केली त्याचाही हातभार तिच्या

संसाराच्या पायाला लागला. वक्तृत्वात तिला बक्षिसे मिळाली होती. घोडयावर बसावं

उत्तम घोडेस्वार व्हावं, ही तिची अपुरी राहिलेली इच्छा मी पुरी करावी असे तिला

फार वाटे. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही केले. मला अनेकदा सांगून पाहिले. मला घोडा

हा प्राणी फार म्हणजे फार आवडतो. घोडयावर बसायलाही माझी ना नव्हती. पण

त्याबद्दल आईला होती तितकी ओढ मला नव्हती. तिचे स्वप्न होते, तसे माझे

त्याबद्दल नव्हते. मलाही तशी हौस असती तर तिने रत्नागिरीसारख्या ठिकाणी एखादा घोडा

पाळलाही असता कदाचित, कुणी सांगावे ! पण हीच बाई पुढे वाढत्या संसारात अशी

काही बुडून गेली, की वेळीप्रसंगी एखादी पोथी आणि तिला येणारी पत्रे यापलीकडे

तिचे वाचन राहिले नाही. अधूनमधून आप्तेष्टांना पत्रे लिहिणे आमि संसारातले

हिशेब-ठिशेब यापलीकडे लेखन गेले नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर, परवा

परवा तिच्या कपाटात दोन-चार वह्या सापडल्या. त्यांत तिने डायरीवजा थोडे

लिहिलेले आहे. मी ते वाचल्यावर हसावे का रडावे कळेना. सगळ्या लिहिण्यात सूर

एकच. आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरे सांगायचे तर तिने लिहिलेल्यात काहीही

अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही.

त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा,चांगुलपणा,

दातृत्व,आदरातिथ्य वगेरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते, दुर्गुणांप्रमाणेच

सद््गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची

परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी

वाटत असते. पण सद््गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीने आनंदी मुखवटा वापरावा

लागतो. आणि सदेव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभंयकर शिक्षा

नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायाचं झालं तर दुसऱ्याला त्रास

होईल असं जाणूनबुजून आप्पांनी कधीही काही केलं नाही. अगदी स्वप्नातदेखील

नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या,

आत्मचरित्रे लिहित नव्हत्या हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकारक

ठरले ! आईने ह्या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. पण त्यात तिने आप्पांना दोष मुळीच

दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा

मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने

कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू

शकते. याचं भान ठेवून, तिच्या अडचणी लक्षात घेऊन, मग आप्पांनी त्यावर आपली

गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला ह्या वह्यांचा आधार

घ्यावा लागला नसता. तशी आप्पांची जीवनमूल्ये बावनकशी होती. त्यामुळेच ते संत म्हणा

किंवा फार थोर म्हणा असे होते, निर्भेळ माणूस नव्हते. ह्या माणसांच्या जगात खरी स्वच्छ



पान नं. 12



माणसेच सापडत नाहीत. आणि संत म्हटले किंवा फार थोर लोक म्हटले, की मग

`लोकापवादो बलवान मतो मे' आले आणि पत्नीच्या नशिबी वनवासही आलाच.



आम्हांला आई दिसली ती दिवसरात्र काही ना काही कामातच असलेली. तिने

आम्हांला तरतऱ्हा खाऊपिऊ करून घातले, शिकवले, आमची आजारपणे काढली;

पण कधीही प्रेमाने जवळ घेऊन मुका घेतल्याचे आठवत नाही, की तोंडभर कौतुक

केल्याचेही आठवत नाही. या गोष्टींना तिला वेळ नव्हता म्हणणे सर्वस्वी खरे नव्हे.

मनात असते तर त्यात अशक्य काहीच नव्हते. तिचा तो स्वभावच नव्हता असेच

म्हणावे लागेल. तिला आमचे दोषच दिसायचे आणि ते घालवण्यासाठी जिवाचे रान

करण्यात ती धन्यता मानायची. इतरांनी आम्हांला नावे ठेवू नयेत यासाठीही ही

धडपड असेल. पण कौतुक करून घेण्याची भूक इतकी मोठी असते, की आईच्या

रोजच्या आमच्यासाठी होणाऱ्या काबाडकष्टांपेक्षा वर्ष-सहा महिन्यांनी पाठीवरून

प्रेमाने फिरणारा आप्पांचा हात आम्हांला अधिक मोलाचा वाटे.



समिधाच सख्या या, त्यांत कसा ओलावा,

कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रूक्ष या, एकच त्यां आकांक्षा

तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा !



या कुसुमाग्रजांच्या ओळी कविता म्हणून माझ्याप्रमाणे इतरांनाही आवडतच असणार.

कितीतरी संसारी बायकांना त्यांत ओळखीचा चेहरा दिसल्याचने त्यांचा आधारही वाटत

असणार. कवितेच्या बाबतीत हे सर्व ठीक असते. पण प्रत्यक्षात,`जात्याच रूक्ष' असे

काहीही कुणालाही आवडणार नाही. अगदी त्या समिधांनाही स्वतःतल्या या गुणाचा

तापच होत असेल.



आईमधला हा दोष माझ्यात सहीसही उतरला आहे. तिला स्वतःतल्या त्या दोषाची

जाणीव नव्हती. ते तिला कर्तव्यच वाटे. त्यामुळे त्या बाबतीत ती सुखी होती. मला हा

दोष सतत जाणवत असतो. पण त्यातून सुटका नाही. एखादे पुस्तक वाचले,नाटक

पाहिले, गाणे किंवा व्याख्यान ऐकले, आणि ते खूप आवडले, तरी त्यात एवढेसे काही

न्यून राहिले असेल तर ते नजरेतून सहसा सुटत नाही, विसरता येत नाही; त्या

गोष्टीला चांगले म्हणून गुणगान करताना ती अधिक चांगली व्हावी या हेतूने का

होईना. पण ते न्यूनही सांगितल्यावाचून राहवत नाही. हाही पिंडाचाच भाग.



आईमधला स्पष्टवक्तेपणाही असाच माझ्यात आलेला आहे. हा गुण म्हणायचा की

दोष ? स्पष्टवक्तेपणा हा तसा पाहिला तर गुणांच्या यादीतच सापडतो. पण प्रत्यक्षात

मात्र तो ज्याच्या अंगी असतो तो माणूस फारसा कुणाला आवडत नाही हाच अनुभव

येतो. कुणीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी बाबतीत स्पष्टवक्ता असणे सर्वांना मानवते.

व्यासपीठावरून भाषण करताना तर हा गुण प्रकर्षाने जाणवतो. सर्व श्रोत्यांकडून



पान नं. 13



पसंतीच्या टाळ्या मिळतात. पण प्रत्यक्षात दोन व्यक्तींत एक स्पष्टवक्ती असणे म्हणजे

दुसरीचा दोष न घाबरता सांगणे असाच प्रकार होतो. मग तो फटकळपणा ठरतो.

कुणालाही सहसा न आवडणारा. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. छाप आणि काटा.

स्पष्टवक्तेपणा हा त्या सामान्य व्यक्तीच्या नशिबी काटाच होऊन येतो. सार्वजनिक

पुढाऱ्याच्या नशिबी मात्र तो छाप होतो. आम्ही सामान्य माणसे. तेव्हा पिंडातून

आलेल्या या स्पष्टवक्तेपणाच्या दोषामुळे आम्हांला मात्र मिळणे किंवा कुणाचे प्रेम

मिळणे फार फार कठीण. इतर लोक आम्हांला सदेव टाळतच असतात. फारच खरे

बोलताता ते `तुमची भीती वाटते ' असे स्पष्ट सांगतात, इतकेच.



या स्पष्टवक्तेपणाप्रमाणेच कामसू वृत्तीही गुण आणि दोष यांच्या सरहद्दीवरच

वास्तव्याला असते. सतत काही ना काही काम करत राहण्यातच धन्यता वाटणारी

माणसे चांगली की वाईट ? एके काळी मी `चांगली' असेच उत्तर दिले असते. त्याला

थोर थोर आदर्श व्यक्चींच्या वचनांचा आणि वर्तनाचा आधारही दिला असता. पण

आता मात्र `निश्चितच वाईट' असेच म्हणेन. आता पाय जमिनीला लागले आहेत.

आता थोरामोठयांचा ऐकीव आदर्श जीवनाचा आधार वाटत नाही. स्वतःचे अनुभव

वेगळेच सत्य सांगून जातात.



आमचे आप्पा आणि आई दोघेही सतत काही ना काही काम करत असायचे.

त्यामुळे या बाबतीत त्यांचा एकमेकांना त्रास झाला नाही. त्यांचा हा गुण आम्हां

बहुतेक भावंडात उतरलाय. लहानपणी हे ठीक असते. पण पुढे बायको जर आळशी

मिळाली तर तिला अशा कामसू नवऱ्याचा जाचच होईल. हे झाले माझ्या भावांच्या

बाबतीत. पण मुलींचा फक्त नवऱ्याशीच नव्हे, तर सासरच्या सगळ्याच घराशी संबंध

येतो. अशी वेळी तिथली माणसे जर आळशी किंवा जरूर तरच हातपाय हलवणारी

असतील तर तिच्यावर कामाचा खूपच भार पडतो. म्हणजे या कामसू व्यक्तीला श्रम

अधिक होतात. त्यातून, आपण आहोत म्हणून हे सगळं निभवलं जातंय असा

अंहकारीही स्पर्श करायला लागतो. शिवाय, या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती एकाच

घरात एकत्र नांदायच्या म्हटले की संघर्ष अटळच होऊन बसतो. पांढरपेशा समाजात

असले संघर्ष चारचौघांना कळणे ही लाजिरवाणी गोष्ट वाटते आणि मग मनाचा फार

कोंडमारा होतो. घरात काय आणि समाजात काय, कामसू माणसांचे प्रमाण एकूण

कमीच असते. त्यामुळे जी अशी सतत काम करणारी माणसे असतात त्यांना इतर

लोक आळशी आणि ऐतखाऊ वाटतात आणि वेताग येत असतो. इतरांना तर या

कामसू लोकांचा सदेव तापच होत असतो. शेवटी सारखे काम तरी कशाला करत

राहायचे ? शाळेत असताना वाचलेली `लोटसईटर्स 'ही कविता मला या संदर्भात

नेहमी आठवत राहते. ते तत्त्वज्ञान कुठेतरी आत अंतरात्म्याला आवडलेल असते.

आणि आपण न थकता सतत काम करू शकतो हा आपला मोठेपणा न वाटता,

आळशी नाही ही उणीव वाटत राहते. असो.



पान नं. 14



आईचा हात फार सढळ होता. तिथे हिशेबी वृत्ती नव्हती.मनाचे मूलभूत औदार्य

आणि परंपरागत रीतिरिवाजांच्या बंधनातून पत्करलेली विशिष्ट जीवनपध्दती यांतून

कधीकधी मजेदार प्रसंग निर्माण होत. सहज गंमत म्हणून आठवतो तो एक सांगते.

आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या,हारे वगेरे गोष्टी

लागायच्या. त्या काळी बालद्या हा प्रकार फारसा वापरात नव्हता. मोरीत बसून

धुवायला दगडी डोणी असत आणि धुतलेल्या कपडयांचे पिळे ठेवायला हारे असत.

धान्य पाखडायला सुपं लागत आणि सांदूळ धुवायला रोवळ्या. त्या काळी या वस्तू

विणून विकायला महारणी यायच्या. आणची एक ठरलेली महारीण होती आणि

वर्षांतून दोन-तीनदा ती आमच्याकडे या वस्तू विकायला आणी.माझ्या आठवणीत

तरी वर्षानुवर्षे हीच बाई या वस्तू घेऊन येई. ती आली की तिचा माल ती उलट-सुलट

करून दाखवी. आईला पसंत पडला की तो एका बाजूला ठेवी. मग काय काय घ्यायचे

ते ठरले, की भावात घासाघीस चाले, आणि शेवटी सौदा पटला की मग त्या वस्तूंवर

पाणी टाकून तो माल आई घरात घेई. महारणीला शिवणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् होती.

तिने केलेल्या वस्तूंनादेखील त्यांवर पाणी टाकल्याखेरीज आम्ही हात लावायचा नसे.

तिच्या आणि आमच्या सामाजिक स्थानातला हा फरक आई कसोशीने पाळत असे.

त्यात काही चूक अगर अन्याय आहे असे तिला कधीही वाटले नाही. उलट, हे असेच

असायला हवे यावर तिची इतकी श्रध्दा होती, आणि आम्हांलाही या बाबतीत तिचा

असा काही धाक होता, की वेगळा काही आचार-विचार तिथे त्या काळी संभवतच

नव्हता. केक मेलांवरून पायपीट करून भर उन्हाची आमच्या दारी येणारी ही

महारीण मग तिथे चांगली तास-दोन तास रेंगाळत असे. आई मग तिला जेवण देई.

चहापाणी देई. चहाबरोबर काहीही खायला दिले की ती ते लगेच मुलांसाठी न्यायला

म्हणून मोटलीत बांधू लागे आणि मग आई तिला रागवे.""दिलंय ते निमूटपणे खा.

उन्हातान्हातून आलीस ते पाय काय मुलांचे नाय भाजले. आणि मुलांची आठवण

मलाही आहे. आण्हांलाही देवाच्या दयेनी भरपूर मुलंबाळं आहेत. हे घे मुलांसाठी. पण

तुला दिलंय ते तू खा."" असा संवाद दर वेळी चाले. तिच्या मुलांची आणि घरच्या

सर्वांची नावे आईला माहीत होती. आणि आमची सर्वांची तिला. मग हा कुठे असतो

आणि तो हल्ली काय करतो वगेरे एकमेकींच्या चौकश्या चालत. सुखदुःखाच्या गोष्टी

चालत. जाताना ती तांदूळ,पोहे,लोणचे,कसली कसली औषधे, जुने कपडे, काय

काय घेऊन जाई. या वस्तू देताना आईच्या मनात कोणताही हिशेब नसे. पण तिचा

माल विकत घेताना मात्र घासाघीस ही व्हायचीच.



एकदा अशीच ती महारीण मागल्या दारी येऊन बसली आणि तिने नेहमीप्रमाणे

आईला हाक मारली. मग अगदी नेहमीच्याच पध्दतीने खरेदी वगेरे झाली. पाणी

टाकून माल उचलत असताना आईचे लक्ष तिच्या सुजलेल्या पायाकडे गेले.आईने

चौकशी केली तेव्हा कळले, की रानात कसलातरी मोठठा काटा लागून तिची पोटरी



पान नं. 15



थोडी फाटली होती आणि आता त्यात पू पण झाला होता. पाय सुजला तर होताच,

पण ठणकल्याने दोन-तीन दिवस झोपही आली नव्हती. आईने `पाहू' म्हणून तिचा

पाय पकडला. मग गरम पाणी, पोटॅशियम परमॅगनेट,कापूस,बँडेज म्हणून जुन्या

धोतराच्या पटटया वगेरे वस्तू आणि जखमेवरचा हमखास इलाज असे ते `शेटटीचं

मलम' आणायला आण्हांला सांगून आईने सगळा पू पिळून काढला आणि यथासांग

औषधपाणी करून तिचा पाय बांधून दिला. हे करत असताना ती बाई मोठमोठयाने

ओरडत,रडत होती आणि त्याच्याही वर आवाज काढून,या वयाला आणि

बाईमाणसाला असं ओरडणं शोभत नाही, सहन करता येत नाही तर बायकांच्या

जन्माला आलीस कशाला, वगेरे व्याख्यान आई तिला देत होती,. शेवटी एकदाचे ते

ड्रेसिंग संपले. पुवाने भरलेले कापसाचे बोळे वगेरे एका कागदात गुंडाळून,`रानात

टाकून दे' म्हणून आईने तिच्याकडे दिले. मग आई तिच्या टोपल्यांवर पाणी टाकी तसे.

आम्ही आईच्या डोक्यावर कळशी ओतली आणि आंघोळ करून आई घरात आली.

एका छोटया डबीत आणखी थोडे मलम घालून आईने तिला ते पुन्हा एकदोनदा

लावायला म्हणून दिले. झाल्या प्रकारात काही अंतर्गत विसंगती आहे असे त्या काळी

तिला, आईला अगर आम्हालांही कुणाला वाटले नाही.



पुढे वय थोडे वाढल्यावर आणि शिक्षणाने थोडे ज्ञान आल्यावर आईच्या या

सोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आटवला, की

आईचा कर्मठपणा आणि सह्दयता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून उभी

असल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या, ओळखीच्या, सर्व संबंधित गोरगरिबांबद्दल

तिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ सगळे वेयक्तिक होते.

आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते तर त्या महारणीकडचा

माल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकलं नसतं. पण

त्याचबरोबर बहुधा तिच्या पायाकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले असते कदाचित. फार तर

""एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावा

लागेल"" असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे !



गेल्या पंधरा-वीस वर्षात मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला गेले, तेव्हा तेव्हा सुंदराबाई

म्हणून एक बाई न चुकता भेटायला यायची. मलाच नव्हे, आम्हां मुलांपेकी कुणीही

रत्नागिरीला गेले तरी ती भेटायला येऊन जायचीच. आम्ही दोन-तीन दिवसांसाठी

गेलो तरी तिला कसा सुगावा लागे कळत नसे. एखादी वेडी भिकारीण अशी ती दिसे.

केस पिंजारलेले, काहीशी गलिच्छ. एकटी असली तरी ती सारखी बडबडत असायची.

तिच्यात असं काहीतरी होतं की मला ती कधीच आवडली नाही. आईच्या पोटात

मात्र तिच्याबद्दल अपरंपार दया असे. आमच्याकडून पेसे किंवा एखादी वस्तू हातावर

पडेल या आशेने ती येई. पण येताना कधी रिकाम्या हाताने येत नसे. कुठल्यातरी

दुकानातून विकत घेतलेली गलिच्छ कागदात बांधलेली एखादी खाण्याची वस्तू ती



पान नं. 16



घेऊन येई. चिवडा, लाडू फुटाणे, किंवा असलेच काहीतरी. ते ती आम्हांला

देई आणि खाण्याचा आग्रह करी. आम्हीही तिला भरघोस काही द्यावे अशी आईची

अपेक्षा असे. तिला उचलून काही द्यायला आमची ना नसे, पण तिने फार वेळ

रेंगाळून आम्हांला त्रास देणे, तिने आणलेले आम्हांला खायला लावणे, याला आमचा

विरोध असे. एके काळी आपण कसे खूप श्रीमंत होतो, मग नवरा मेल्यावर

आपल्याला इतरांनी कसे लुटले, मग आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम कसा झाला,

त्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही आपले घरदार धुऊन नेऊन आपल्याला भिकेला

कसे लावले वगेरे आपली कहाणी तिने आईला सांगितली होती; आणि त्यावर आईचा

पूर्ण विश्वास होता. आता ही कहाणी खरी असू शकेल, तशी खोटीही असू शकेल.

आणि काहीही असले तरी त्याचा आम्हांला कां त्रास? पण आईला वाटे प्रसंग,

कुणावर कसा येईल सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या सुंदराबाईशी फार

सहानुभूतीने वागावे.



""ती तर अर्धवट वेडीच आहे. तिला काय कळतं ?पण आम्ही शहाणी आहोत

ना ? मग थोडं सहन केलं तर काय बिघडतं ? इतक्या लांबून पायपीट करत तुम्हांला

डोळे भरून पाहायला येते. एके काळची घरंदाज बाई. आता भिकारी झाली,वेडी

झाली, तरी रीतिरिवाज रक्तात आहेत. कुणाला भेटायला जायचं तर रिकाम्या हाताने

नाही जाणार. तिच्याकडे पेसे कुठले ? पण कसंतरी करून काहीतरी प्रेमाने आणले, तर

तुम्हांला तिच्या समाधानासाठी थोडं तोंडात टाकायला काय होतं ? स्वच्छतेची थोतांड

मला नका सांगू !हॉटेलात खाता-जेवता , तिथे सेपाकघरात काय चालतं ते पाहता का

कधी ? पण तिकडे ठणकावून पेसे घेतात तेव्हा तुम्ही निमूटपणे नोटा काढून द्याला. इथे

ही प्रेमानं काही आणते तर तिची किंमत नाही. आईला आई म्हणता हे तरी माझं

नशीब !"" - इथपर्यंत आईची मजल जायची. त्या सुंदराबाईबद्दल आईला इतका

उमाळा कां ते मला कधीच कळले नाही. मला तर ढोंगी वाटायची. पण आईचा

दृष्टिकोन काही बाबतीत हा असा फार उदार होता. कदाचित नेमित्तिक भेटीला

येणाऱ्या आम्हां मुलांपेक्षा, नित्याच्या या गोतावळ्याचा आईला अधिक आधार तर

वाटू लागला नसेल ? कोण जाणे !



अशीच एकदा आप्पांना बरं नाही म्हणून मी रत्नीगिरीला त्यांना भेटायला गेले

होते. आप्पा, आई दोघेही थकलेले, तेव्हा सेपाकाला एक पोरगी आणि वरकामाला

चोवीस तास घरी राहणारी एक बाई अशी दोन बायका कामाला आहेत हे मला

ठाऊक होते. मी तीन-चार दिवसांसाठी येणार हे कळवले होते. मी संध्याकाळी जाऊन

पोचले आणि दुसरे दिवशी सकाळीच वरकामाला असलेल्या बाईने आपली पाळी सुरू

झाल्याचे सांगितले. म्हणजे आता पुरे तीन दिवस ही नुसती बसून राहणार. आईचे या

बाबतीत कडक सोवळे असे. त्याचा फायदा घेऊन महिन्यातून दोनदादेखील `पाळी'चे

निमित्त सांगून कुणी बसून खाल्ले तरी तिला चाले. अशा वेळी त्या दूर बसतात याचेच

तिला कौतुक. आम्ही कुणीही आपापल्या घरी विटाळ पाळत नाही ही गोष्ट तिला

पान नं. 17



मुळीच आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी राहायला येणेही तिला मनापासून

पसंत नसे. तिच्या या वागण्याचा फायदा कामवाल्या बाया चांगलाच घेत. मी घरी

आल्यावर आप्पा-आईना आवडेल असं काहीतरी करून खाऊपिऊ घालणार, तर

हाताखाली मदतीला कुणी नाहीच, आणि त्यात सेपाकाला येणाऱ्या पोरीनेही ""पोट

दुखते आहे,"" असा निरोप पाठवला. मी वेतागून म्हटले,"" आजच नेमकं हिचं पोट

कसं दुखायला लागलं ?"" तर आई म्हणाली,""तिचे दिवस भरत आले आहेत, ती

लवकर बाळंत होणार असेल."" मला त्या दोघीचा, आईच्या सोवळ्या-ओवळ्याच्या

कल्पनेचा आणि माझ्या नशिबाचाही भयंकर राग आला. मी कधी नव्हे ती माहेरी

आले तरी तिथेही मला क्षणाची विश्रान्ती नाही, याचे आईला वाईट वाटले. पण तिने

त्याबद्दल त्या दोघीनांही दोष न देता, स्वतःचे वय झाल्यने आणि ढोपरे फार दुखत

असल्याने आपल्याच्याने आता होत नाही, नाहीतर आपणच कसे वेगळे केले असते

हेच ऐकवले.



तिसरे दिवशी माझा सगळा सेपाक करून झाल्यावर सेपाकीणी आली. मी

म्हटले.""यायचंच तर लौकर का नाही आलीस? आता सगळा सेपाक झालाय; तू

जा."" तर आईने तिला जेवूनच जायला सांगितले. कारणे दोन. एक तर ती रोज

सेपाक केल्यावर जेवूनच घरी जायची.,मग आज उपाशी पोटी कसे पाठवायचे ? आणि

दुसरे, त्याहून महत्त्वाचे कारण म्हणजे ती गरोदर आहे आणि पहिलटकरीण आहे.

तिला काही खावेप्यावे वाटत असले तरी तिला कोण करून घालणार ? मी इतका

चांगला सेपाक केलाय, तर दोन घास खाऊन तिचा आत्मा तृप्त झाला तर परमेश्वर

मला आशीर्वादच देईल. मला स्वतःला मात्र राब राब राबून मिळणाऱ्या परमेश्वराच्या

त्या आशीर्वादापेक्षा दोन घटका विश्रान्ती आणि आप्पांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष

देता आलं आसतं तर ते अधिक मोलाचं होतं. पण आईचे सगळे तर्कशास्त्रच उलटे

होते. त्यामुळे तिचे मझे कधई पटलेच नाही.



आज आई नाही. आता मागे वळून पाहताना असे अनेक प्रसंग आठवले, की

त्यामागच्या तिच्या मनाचा मोठेपणा दिसतो आणि स्वत:ची लाज वाटते. आईचं

औदार्य माझ्या बहिणीत आलंय. माझ्यात आप्पांची निवृत्ती थोडीबहुत आली असावी,

पण आईचं हे औदार्य मात्र जरासुध्दा आलं नाही.



मला वाटते, औदार्यामागे विचार, सद््सद््विवेकबुध्दी नसते. कुणालाही पटकन

काही देण्यातला निर्भेळ आनंद तेवढा असतो. या आनंदाचा छंद लागला, की औदार्य

हा त्या व्यक्तीचा अविभाज्य घटक बनतो. हा फार मोठा गुणच मानला पाहिजे.

कारण त्यातून स्वतःला सुख लाभतेच, पण दुसऱ्यालाही लाभच होतो, आनंद मिळतो.

शिवाय, त्यात समाजविघातक असे काहीही नाही. औदार्यामुळे स्वभावाचे काही कोपरे

घासून जाऊन जीवनाचा पोत छान तलम बनत असावा.



माझी आई किंवा तिच्यातला हा गुण मोठया प्रमाणावर लाभलेली माझी बहीण या

कुणालाही, काहीही पटकन उचलून देताना मी अनेकदा अनुभवलंय. माझ्या हातून



पान नं. 18



मात्र असं सहसा घडत नाही. एखादी वस्तू किंवा पेसे मागायला दारी आलेल्याला मी

सहज `नाही' म्हणून घालवून देऊ शकते. मग ती मागणी कितीही शुल्लक असो किंवा

मागणारी व्यक्ती कितीही थोर असो. भिकाऱ्याला द्यायलातर पाच-दहा पेशांचे

नाणेदेखील माझ्या हातून कधी सुटत नाही. त्यामुळे मी फार चिक्कू आहे असा

कुणाचाही समज होणे स्वाभाविक आहे. पण अगदी खरं सांगायचं तर मला त्याचे

सोयरसुतक जरासुध्दा नाही. मी तशी रेशमाच्या किडयाच्या जातीची, स्वतःभोवती

छोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांना

स्थान आहे असी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फार

मोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्याहिशेबी काही महत्व नसावे. मला सर्वार्थाने न

ओळखणाऱ्या अनेकांना हे विधान चुकीचे किंवा अतिशयोक्त वाटेल. पण तसे नाही.

मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी ते

विसरूनही जाताना मला मी पाहिले आहे. पण त्या क्षणी तिथे `इदं न मम' ही

निःसंगतेची भावनाच प्रबळ असावी. औदार्याचा लवलेशही नसावा. म्हणून मला

वाटते, या बाबतीत मी कदाचित आप्पाची मुलगी शोभेन.



आमचे आप्पा हे निष्णात फौजदार वकील होते. तर्कशुध्द विचार करत निर्णयाला

येण्याची, उलटसुलट विचार करून शंका काढण्याची त्यांना चांगलीच सवय होती.

बुध्दिबळ आणि ब्रिज हे त्यांचे आवडते खेळ होते. या दोन खेळांचा आणि तर्कशुध्द

विचारसरणीचा परस्परसंबंध असेल का ?



या तिन्ही गोष्टी मलाही खूप आवडायच्या. त्यांतल्या बुध्दिबळ आणि ब्रिज या

खेळांशी पुढे माझा काहीच संबंध राहिला नाही. पण विचारांचा खेळ मला अजूनही

आवडतो. तो कुठेही,केव्हाही, स्वतःशीच खेळता येतो.



आप्पांना वाटे, मी वकील व्हावे, बॅरिस्टर व्हावे. बॅ.सीता आजगावकर ही त्यांची

बहीण.(सख्खी नव्हे,त्यांना सख्खे भावंड वगेरे नव्हतेच. ही दूरची, बहुधा

मावसबहीण असावी. ) ही माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातील पहिली स्त्री बॅरिस्टर. ती

शंकरशेट स्कॉलरही होती. आप्पांना साहजिकच तिचा फार अभिमान होता. मीही असं

काही व्हावं असं त्यांना फार वाटे. पण या बाबतीतही मी त्यांची निराशाच केली.

नाही म्हणायला माझा थोरला भाऊ वकील आमि पुढे जज्ज झाला. पण त्याला

वकिलीत फारसा रस नव्हता. थोरल्या मुलाने वडिलांचा व्यवसाय घ्यावा या त्या

काळच्या धोरणामुळे त्याला वकील करण्याच आले होते इतकेच. पण मी कदाचित

बऱ्यापेकी वकील होऊ शकले असते असे आता वाटते.



आमचे आप्पा गेले त्यापूर्वी दहाच दिवस आधी आम्ही कोल्हापूरला काही

कामानिमित्त गेलो होतो. तिथून जवळच रत्नागिरीला आप्पा-आईना भेटायला म्हणून

एका दिवसासाठी जाऊन आलो. आम्ही घरी जाऊन पोचल्यावर तासाभराने आप्पांनी



पान नं. 19



माझ्या हाती एक पत्र दिले. ते एक प्रकारचे इच्छापत्रच होते. त्यांच्या पेशाअडक्याचे

आणि जमीजुमल्याचे पुढे काय करायचे याबद्दलचे इच्छापत्र त्यांनी रीतसर करून

ठेवलेच होते. या पत्रात त्यापेकी काही नव्हते. स्वतःच्या मृत्यूनंतर आपले डोळे

नेत्रपेढीला आणि शरीर मेडिकल कॉलेजला द्यावे अशी इच्छा त्यात सविस्तर लिहिलेली

होती. इतके मुलगे,सुना,जावई,दुसरी मुलगी वगेरे इतरही असताना, कुटुंबात इतके

डॉक्टर्स असताना, हे पत्र मलाच कां लिहिले, असे मी विचारले तेव्हा ""यावरून या

बाबतीत तुझ्यावर माझा सर्वात अधिक विश्वास आहे असंच नाही का सिध्द होत ?""

असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मग मी त्यांना दोनतीन गोष्टी समजावून सांगितल्या :

एक तर डोळे हे माणसाच्या मृत्यूनंतर तासाभरात काढले तरच त्यांचा उपयोग करता

येतो, असे मला वाटते. आणि रत्नागिरीत नेत्रपेढी नसल्याने ते शक्य होणार नाही.

बाकीच्या शरीराचा उपयोग हा केवळ हा केवळ डिसेक्शनसाठी मेडिकल कॉलेजला तेवढा

होणार. तिथे मग गरीब-श्रीमंत, मूर्ख-विचारवंत, सर्वांच्या शरीराचे अवयव

अभ्यासाच्या दृष्टीने सारखेच. पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांत. जिथे मेडिकल

कॉलेजे आहेत तिथे, रोज अनेक बेवारशी मृत देह फुकट मिळू शकतात. असे

असताना उगाच खर्च करून आपला देह तिथे नेऊन देणे हा वेडेपणाच नाही का ?

तेव्हा हा हटट त्यांनी सोडावा. पण त्यांच्या इच्छेला मान देण्यासाठी मी माझे डोळे

आणि शरीर मृत्यूनंतर असे देऊन टाकण्याची व्यवस्था नक्की करीन. आम्ही शहरात

राहतो. आम्हांला मृत्यूही शहरातच येईल असे धरून चालू, तेव्हा हे सहज शक्य

होईल. मी तुम्हांला असं वचन दिलंय हे सर्वांच्या कानावर घालून ठेवते म्हणजे झालं.



त्यांना माझे म्हणणे तितकेसे रूचलेले दिसले नाही. पण त्यावर ते काही बोलले

नाहीत. हा मृत्यूचा विचार मात्र त्यांना तरीही सोडत नव्हता. कारण त्यानंतर थोडया

वेळाने पुन्हा तोच विषय काढून ते म्हणाले.



""विनोबांनी, सावरकरांनी प्रायोपवेशन केल्याचं वाचलं. मला वाटतं. आपणही

आता तेच करावं. आणखी किती जगायचं आणि कशासाठी ? आता या बाबतीत तर

काही अडचण नाही ना ? पण तुझ्या आईला ते पटत नाही. तुम्ही माझ्यासाठी

इतकं करा. तिची समजूत घाला आणि मला सहकार्य द्या.""



आई तिथेच बसली होती. ती भडकून म्हणाली,""मी असलं काही ऐकून घेणार

नाही. त्यांना आता या वयात दुसरा काही धंदा नाही. उगाच काहीतरी विचार करत

बसतात आणि म्हातारचळ लागल्यासारखे वेडंवाकडं सांगत बसतात. पण तुला तरी

काही अक्कल हवी की नको ? तू ऐकून कसं घेतेस असलं अभद्र ?""



खरे तर हा अप्रिय विषय आम्हांला कुणालाच नको होता. पण आप्पांच्या डोक्यात

तो ठाण मांडून बसला होता, तेव्हा त्यांच्या डोक्यातून तो काढून टाकणे भाग होते.

मग मी त्यांना म्हटले,""आप्पा, मला तुमचं म्हणणं पटत. मीही तुमच्याच विचाराची

आहे. पण प्रायोपवेशन वाटतं तितकं सोपं नाही. त्याला इतरांचा विरोध चालू शकत

नाही. समजा, तुम्ही प्रायोपवेशन सुरू केलं आणि काही काळानं तुमची शुध्द गेली



पान नं. 20



आणि त्यानंतर तुम्हांला जगवण्याचे प्रयत्न इतरांनी केले तर सगळंच फुकट नाही का

जाणार ? आणि आईच खुद्द तसं करील याची मला खात्री वाटते. तुम्ही विचार करू

शकता. तुमची समजूत घालणं सोपं आहे. आईला असलं काही पटवणं कुणाला तरी

शक्य आहे का ? तेव्हा तुम्ही असा विचार करा- गेली साठ-पासष्ट वर्ष आईनं

वाढलेल्या अन्नावरच पोरालेलं हे तुमचं शरीर त्यावर अधिक हक्क कुणाचा ? तुमचा

की तिचा ? मग त्या शरीराची विल्हेवाट होईना का तिच्या मनाजोगी ? आपण या

हाडामांसाला फार महत्व देऊयाच नको. मला तर वाटतं, जिवंतपणीच स्वतःच्या

शरीराकडे निर्मम भावनेनं पाहता आलं तर किती सुखाचं होईल ! तुम्ही मृत्यूचा

विचारच डोक्यातून काढून टाका बरं. त्याला यायचं तेव्हा येऊ द्या. इतकी घाई

कशाला ? तुम्ही आम्हांला सगळ्यांना आणखी खूप हवे आहात. आमच्या एकत्रित

इच्छाशक्तीपुढे तुमचा एकटयाचा काय निभाव लागणार ?""



मी तो विषय एकदाचा संपवून टाकायचा वेडयावाकडया भाषेत प्रयत्न करत होते

लहानपणी अधूनमधून कोर्टात एखादा फार महत्त्वाचा दावा चालू असला, की आप्पा

तो ऐकायला आम्हांला यायला सांगायचे. जिल्हा-न्यायलय आमच्या घरासमोरच

चपराश्यापर्यंत सगळी माणसे आम्हांला ओळखत. आमचे घर, कोर्ट, पोस्ट, ऑफिस,

युरोपियन क्लब (आता तिथे गोगटे कॉलेज झालंय.) या इमारती एकाच परिसरात,

थोडया गावाबाहेर होत्या. नवीन न्यायाधीश आले की प्रथम त्यांचा आमच्या गराशी

परिचय होई. पी.एम.लाड, गुंडील,वॉटरफील्ड, डी. आरा. प्रधान- तिथे

बदलून आलेल्या बहुतेक न्यायाधीशांचे आमच्या घरी खूप जाणेयेणे असे. त्यांचे-

आमचे त्या वेळी जोडले गेलेले कौटुंबिक संबंध पुढेही वर्षानुवर्षे-अद्यापही-तुटलेले

नाहीत. या पार्श्वभूमीवर,लहानपणी त्या कोर्टात आप्पा चालवीत असलेले काही

खटले बाकावर बसून मी ऐकलेले आहेत, तो काळ या क्षणी मला(आणि बहुधा

आप्पांनाही) आठवला. शेवटी आप्पा मला हसून म्हणाले,""तू वकील फार चांगली

झाली असतीस !""



त्यानंतर दहाच दिवसांनी आप्पा गेले, `आपण आता जावं' या प्रबळ इच्छेच्या

पोटीच हे शक्य झालं असेल का ? अगदी शांत,निरामय असा हा मृत्यू. मी बरेच

मृत्यू खूप जवळून पाहिले आहेत. मृत्यूनंतर काही वेळाने अनेक मृतदेहांच्या नाकातून

वगेरे एक प्रकारचा द्रव बाहेर पडतो. आप्पांच्या बाबतीत असले काहीही झाले नाही.

मृत्यूनंतरही दहा-बारा तास ते त्याच अवस्थेत, अगदी स्वच्छ, शांत झोपल्यासारखे

पलंगावरच होते.



मृत्यूचं दुःख हे असतंच. आणि दुःखात मला वाटतं माणसांची मनं थोडी विशाला,

क्षमाशील किंवा अधिक उदार होत असावीत. आपण भेदभाव विसरू पाहतो,

एकमेकांच्या मदतीला धावतो, मृतदेहाला तर पवित्र मानून नमस्कारदेखील करतो. मग

हा मृतदेह स्वच्छ असला काय किंवा दुर्देवाने गलिच्छ झालेला असला काय. हे खरं



पान नं. 21



असलं तरी आप्पांचा मृतदेह शेवटपर्यंत स्वच्छ राहिला या गोष्टीचेही कुठेतरी मला

समाधान होते. आपला मृत्यूही असाच असावा ही इच्छा तर असेलच; पण त्यांचीच

मुलगी असल्यामुळे तो असाच असण्याची शक्यता असल्याचे तर हे समाधान नसेल ?



थोडे बहुत कळायला लागेपर्यंतची माझ्या वयाची पहिली आठदहा वर्षे वजा केली

तर त्यानंतर आईच्या मृत्यूपर्यंत साधारणतः पंचेचाळीस-पन्नास वर्षे आई मला

लाभली. माझ्या सासूबाईशी माझी ओळख झाल्यालाही आता जवळपास तेवढाच काळ

लोटला आहे. साधारणतः एकाच वयाच्या,सारख्याच मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि

सुसंस्कृत घरांत वाढलेल्या,आपापले संसार निष्ठेने केलेल्या या दोन बायका. भाईचे

वडील फार लौकर गेले. त्यामुळे मी त्यांना पाहिलेले नाही. पण भाईकडून त्यांच्याबद्दल

जे काही ऐकले, त्यावरून तेही आमच्या आप्पांसारखेच एक देवमाणूस होते. म्हणजे

या दोघींनी ज्यांच्या बरोबर संसार केले तेही वृत्तीने सारखेच होते म्हणायला हरकत

नाही. पण मुळातच या दोघींचे पिंडधर्म अनेक बाबतींत वेगळे होते. त्यामुळे त्यांच्याशी

संबंधित असलेली माझी सुखदुःखंदेखील अगदी वेगवेगळ्या जातीची आहेत.



माझीही त्या दोघींशी वागण्याची तऱ्हा एकच नसे. आईशी हक्काने फटकून

वागणारी मी, सासूशी संबंध आला की चार वेळा विचार करत असे. देण्याघेण्याच्या

बाबतीत `अं:! आपलीच आहे !' अशी आईला गृहीत धरणारी मी, सासूच्या बाबतीत

शक्य ते उपचार पाळत असे. थोडक्यात, आईच्या बाबतीत आतडयाचा धागा

गुंतल्यामुळे तिला मी माझ्यातच पाहत असे आणि अनेकदा हक्काने दुर्लक्षीत असे, तर

सासूच्या बाबतीत कर्तव्य, सुसंस्कृतता, भाईला बरे वाटावे ही इच्छा, आणि वळण

लावले नाही असा आईला कुणी दोष देऊ नये हा कटाक्ष, वगेरे गोष्टींची फळी पक्की

ठेवून झुकते माप घालण्याकडे माझा कल असे.



माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीला झाला आणि माझ्या आईचा शिवरात्रीला.

हे दोन्ही सणांचे दिवस; त्यामुळे सहज लक्षात राहण्यासारखे. पण माझ्या आईचा

जन्मदिवस शिवरात्रीचा, ही गोष्ट मी लग्न होऊन सासरी आले तरी मला माहीत

नव्हती. आमच्या लहानपणी वाढदिवस वगेरे प्रकार नव्हतेच. आमच्या घरीच नव्हे

तर त्या काळातल्या माझ्या माहितीतल्या इतर घरांतही कधी कुणाचा वाढदिवस

साजरा झाल्याचे आठवत नाही. पण माझ्या सासूबाईंचा जन्म गणेशचतुर्थीच्या दिवशी

झाला हे मला आमच्या लग्नाच्या आधीच कळले. त्यांच्याकडूनच. सहज बोलता

बोलता. मग मी ते लक्षात ठेवले आणि त्यानंतर त्यांचा प्रत्येक वाढदिवस आठवणीने



पान नं. 22



माझ्या परीने मी साजरा करीत आले. सतत पस्तीस-छत्तीस वर्षे, नेमाने. आता हळूहळू

मीच ती प्रथा मोडून टाकली. म्हणजे आठवण येत नाही म्हणून नव्हे. आठवण येते,

मी फोनवर त्यांच्याशी त्याबद्दल मुद्दाम बोलतेही; पण पहिल्यासारखा वाढदिवस साजरा

करणे सोडून दिले. त्यांना बेसनाचे लाडू खूप आवडत. घरी केलेल्या साजूक तुपात

बेसन खमंग भाजून आणि बेदाणा,बदाम वगेरे घालून मी खास त्यांच्यासाठी लाडू

करत असे. त्या दिवशी त्यांना जितकी वर्षे पुरी होत तितके लाडू आणि शिवाय साडी

वगेरे. एकदा कधीतरी आईशी बोलताना मी याचा उल्लेख केला, तेव्हा ती म्हणाली,

""वा, त्यांचा जन्म गणपतीच्या दिवशी का ? माझा शिवरात्रीला."" तेव्हा मला

आईचाही वाढदिवस असू शकतो हे इतक्या वर्षांनी प्रथमच जाणवले., आणि ही गोष्ट

इतक्या उशिरा कळली याचे हसूच आले. पण त्यानंतरही कधी मी आईचा वाढदिवस

खास लक्षात ठेवला नाही आणि सासूबाईंचा वाढदिवस विसरू दिला नाही.

भाईलाही स्वतःच्या वाढदिवसाबद्दल उत्साह असे आणि मीही त्या दिवशी त्याच्या

आवडीचा खास असा सेपाक करत असे.



असे या मायलेकांचे पंचवीस-तीस वाढदिवस झाले, पण माझी जन्मतारीख कोणती

हे विचारण्याचं माझ्या सासूबाईंना कधी सुचलं नाही आणि भाईला ती तारीख मुद्दाम

लक्षात ठेवावी असं कधी वाटलं नाही. मला मात्र इतरांच्या जन्मतारखा लक्षात

ठेवायच्या आणि त्या त्या दिवशी प्रत्यक्ष, फोनवर किंवा पत्राने सदिच्छा द्यायच्या असा

छंदच लागला आणि हळूहळू तो वाढतच गेला. मग त्यांतल्या काहींनी माझी

जन्मतारीख काढण्याचा आणि उलट मलाही सदिच्छा पाठवण्याचा उद्योग सुरू केला

आणि त्यामुळे मग मला भंयकर संकोचल्यासारखं व्हायला लागलं. मनुष्यस्वभाव तरी

कसा मजेदार असतो ! माझा वाढदिवस भाईच्या लक्षात नसतो याचे मला मनापासून

वाईट वाटे. आताशा आताशा तो मुद्दाम ती तारीख लक्षात ठेवतो, आणि आपल्या

लक्षात आहे हे मला त्या दिवशी सकाळी किंवा आधल्या दिवशीही सांगून टाकतो.

मला वाईट वाटू नये म्हणून; स्वतःच्या आनंदासाठी नव्हे. कारण त्या शुभेच्छा देऊन

होताच त्याने `हुश्श' केल्याचे मला जाणवते. मग माझाच मला खूप राग येतो.

आपणच कुठेतरी कधीतरी बोललो असणार, याला माझा वाढदिवस कधीच आठवत

नसल्याचे. या विचाराने मला स्वतःशीच फार लाज वाटते. माझा वाढदिवस कुणाच्या

ध्यानामनी नव्हता ते किती चांगले होते ! त्यात कसला तरी गूढ आनंद मला त्या

दिवशी लाभायचा. माझ्या हाताने आता तो मी गमावून बसले. आणि कमावले काय ?

वर्षांतून एक-दोन कसेसेच दिवस, की ज्या दिवशी फोन वाजला की धडाधडायला

लागतं. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नसतील ? यांच्याशी आता काय आणि

कसं बोलू ? मला औपचारिक बोलणं आवडत नाही हे ठीक आहे. पण करं सांगायचं

तर वेळप्रसंगी तसं बोलावं लागतं हे कळत असूनही मला औपचारिक बोलताच येत

नाही. म्हणजे नक्की काय होतं ? मला रंगभूमीवर अशी एखादी भूमिका वढवायला

मिळाली असती की असं औपचारिक बोलण्याचा जिचा स्वभावच आहे, तर मी काय



पान नं. 23



केलं असतं ? ती भूमिका नाकारली असती ? सांगता येत नाही. ती भूमिका तशी

महत्त्वाची असती तर मी ती स्वीकारलीही असती आणि बहुधा चांगली वठवलीही

असती. मग हा रंगभूमीवरचा अभिनय प्रत्यक्ष जीवनात क्वचित्प्रंसगी आवश्यक

असला तर कां करू नये ? आवश्यक असतानादेखील तो करू नये असे मला मुळीच

वाटत नाही. पण मला मात्र तो तसा करता येत नाही हेच तर दुर्देव आहे. पराभव

आहे. अशा हजारो रंगीबेरंगी पराभवांची मालिका म्हणजेच आपले आयुष्य का ? ""



माझ्या माहेरचे आणि सासरचे वळण अनेक बाबतींत वेगळे होते. आमच्या

आप्पांना चहा फार आवडे. काम करताना त्यांना मधूनमधून थोडाथोडा चहा लागत

असे. अशा वेळी साहजिकच त्यांच्याबरोबर त्या वेळी जी कुणी माणसे असत त्या

सर्वांसाठी आई चहा करीत असे. आप्पांच्या वकील मित्रमंडळीत, त्यांच्याकडे

शिकायला येणाऱ्या तरूण वकील मंडळीत आणि आप्पांच्या पक्षकारांतही बरेच

लोक धर्माने मुसलमान होते. आमच्या पलीकडे बरीच मुसलमान कुटुंबे राहत

होती. अद्याप आहेत. या सर्व मंडळीचे आणि आईचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. पण

चहा देताना मात्र, तोच चहा पण मुसलमानांसाठी आई वेगळ्या कपबश्या वापरत

असे. खरे तर सहज ओळखू याव्यात म्हणून, पण प्रत्यक्षात त्यांनाखास सन्मानित

वाटावे म्हणून, आईने या कपबश्या जरा अधिक किंमतीच्या आणि फुलांची नक्षी

असलेल्या अशा घेतल्या होत्या. चहा देताना मोठया चतुराईने ती त्या त्या माणसापुढे

तो तो कप ठेवी. पण आप्पांचे एकदोन मुसलमान वकील मित्र तिच्याहूनही चतुर होते.

ह्या पाहुणचाराचे वेशिष्टय लौकरच त्यांच्या ध्यनात आले आणि मग आईने टेबलावर

चहा आणून ठेवला की त्यांतला कधी हा तर कधी तो वकील नेमका आप्पांच्या पुढचा

कप आपण घेई आणि आपल्या पुढयातला कप आप्पांच्या पुढे ठेवी. आई मग

घाईघाईने त्यांना सांगे ""त्यांचा (म्हणजे आप्पांचा) चहा नका तुम्ही घेऊ. ते सारखा

चहा पितात. मग पित्ताचा त्रास होतो. म्हणून मी त्यांना अर्धाच कप चहा दिलाय.

त्यांना तोच घेऊ दे. तितकाच पुरे. तुम्ही तुमचा घ्याकपभर."" त्यावर तेही हसून

सांगत की त्यांनाही सारखा सारखा चहा घेऊन त्रास होतो, तेव्हा अर्धा कप चहा

हवा होता. आणि हे सांगत असतानाच आप्पांच्या कपातून ते तो चहा पिऊही लागत.

आप्पाही मग समोर आलेल्या त्या फुलांच्या कपातला अर्धा चहा पीत आणि उरलेला

अर्धा आईकडे देत तिला सांगत,""हा तू घे. फक्कड झालाय. पण मी अर्धा कपच

घेतला. बाकीचा तुला ठेवलाय. घे."" मग आम्ही रिकाम्या कपबश्या धुवायला आत

आणल्या की."" हा पण कप मेल्यांनी बाटवला.!"" म्हणत आई तो आप्पांचा कपही

`मुसलमानांच्याकपा'त ठेवी. लौकरच घरात असे `मुसलमानांचे कप'च फार झाले,

तेव्हा आईने तिचे हे सोवळे मनातल्या मनात गंगेला वाहिले आणि मग सगळे कप

निधर्मी झाले. आमच्या घरातली ही कपबश्यांची, भांडयाकुंडयांची,पंक्तींची वगेरे

वर्णव्यवस्था अशी हळूहळू कोलमडून पडली आणि `ह्या नव्या पिढीला विधिनिषेधच



पान नं. 24



राहिला नाही, तिथे मी तरी एकटी किती पुरी पडणार ?' अशा विषादाने आई खिन्न

झाली. आप्पाही अर्थातच त्या नव्या पिढीतच होते.



माझ्या सासरी सोवळ्या-ओवळ्याचा प्रकार किंवा असला भेदभाव नव्हता. पाळीच्या

वेळी तीन दिवस दूर बसणे हा प्रकारही माहेरच्यासारखा सासरी नव्हता. त्यामुळे खूप

मोकळे वाटे. मात्र गुरूवारी माझ्या सासूबाईंना कांदा-लसूणच वर्ज्य होती असे नव्हे,

तर त्या दिवशी त्यांचेही सोवळे-ओवळे असे. सकाळची पहिली चहा-कॉफीही गुरूवारी

प्रथम आंघोळ करून, मग भरलेल्या पाण्याचीच करावी लागे. पाळी चालू असले तर

त्या सुनेच्या हातचे अन्न त्यांना गुरूवारी चालत नसे. ""गुरूवारमध्येच असं काय खास

असतं ? तुमचा जर असल्या गोष्टींच्यावर विश्वास नाही तर गुरूवारी तरी तुम्ही त्या

कां करता ?"" असे मी सासूबाईंना विचारत असे; पण त्यांच्याकडे त्यावर काहीच उत्तर

नसे. त्या गप्प बसत. किंवा ""एक वार तरी करावंसकेलं तर काय बिघडलं? तुझी

आई पण सोवळं-ओवळ मानतेच."" असले काहीतरी उत्तर देत. माझ्या आईची मात्र

या बाबतीतली विचारसरणी पक्की होती.तिला वाटे, पिढयानपिढया आपले पूर्वज

जीवनाची जी मळलेली वाट तुडवट आले तोच ही भवनदी पार करायचा निश्चित

आणि खात्रीचा मार्ग आहे. त्या वाटेवरून प्रवास करण्यातच आपलं भलं आहे. त्या

पूर्वजांच्या पुण्याईने आणि आशीर्वादानेच आपल्याला शरीरा-मनाची ही शक्ती-बुध्दी

लाभली, त्यांचा अवमान करणे हे पाप आहे. या निष्ठा मूर्खासारख्या, बिनबुडाच्या

होत्या; पण त्यांना चिकटून राहण्यात कष्ट अधिक होते तरीही ते उपसण्याची ताकद

आईमध्ये खूप होती. कुटुंबातल्या आणि भोवतालच्या इतरांचाच विचार आई प्रथम

करीत असे, पण तो पक्कया आखीव अशी तिच्या दृष्टिकोनातून. भाई किंवा त्याच्या

आई यांना इतरांचा विचार कधी सुचतच नाही. हे एकेकाचे प्रकृतिधर्म किवां पिंडधर्म

असतात. त्याला त्या त्या व्यक्तीचा इलाजच नसावा.



सर्वसाधारण घरामध्ये बायकांचे राज्य असते. त्यामुळे स्वतःचे घर असावे,ते

घर, त्यातल्या सोयी, तिथले सामानसुमान,भांडीकुंडी, मांडणी वगेरे वगेरे कशी

असावी, याबद्दलही विशेषतः बायकांना स्वतःची मते, हौशी असतात. दुर्देवाने या

बाबतीत मी बायको म्हणून नालायकच निपजले. असली कोणतीच शहरी हौस मला

नाही. निवडच करायची झाली तर शहराबाहेर,छोटंसं, खूप मोठठाली झाडं

आजूबाजूला असलेलं, एक गाय आणि एक कुत्रा यांची सोबत असलेलं, नदीकाठचं

घर मी निवडलं असंत. पण भाई हा पक्का शहरी माणूस असल्याने तसे घर आपल्या

नशिबात नाही हे मी चटकन मान्य करून मोकळी झाले. मग शहरातच राहायचे तर

बेताचे असे आणि स्वच्छ घर असले की झाले. ते असेल तसे मी भागवून घेत असे.

एक स्वच्छता सोडली तर माझ्या इतर गरजा फारच कमी होत्या. अमकीच भांडीकुंडी

वगेरे मला लागत नसत. त्यामुळे अशा वस्तू निवडून मी कधी जमा केल्या नाहीत.

पण घरातल्या प्रत्येक चीजवस्तूशी माझी वेयक्तिक ओळख आहे. सुरूवातीच्या काळात



पान नं. 25



जुन्या कपडयांवर वगेरे घेतलेली आणि पुढे वेळीप्रसंगी कुणीकुणी दिलेली जी काही

भांडीकुंडी माझ्या घरात जमली आहेत त्यांच्यावर माझा माणसांसारखा जीव जडला

आहे. त्यांतल्या एखाद्या भांडयाला पोचा आला तर चारपाच दिवस माझी झोप उडते

आणि त्यानंतर वर्षाननुवर्षे ते भांडे वापरताना त्या पोच्यावरून माझा हात न चुकता

फिरतो, ते भांडे कुरवाळल्यासारखा.



भाईला मात्र गाडीसारखी घराचीही हौस होती.मग आम्ही सांताक्रूझला मोठठं घर

घेतलं. तिथल्या त्या मोठाल्या हॉलमध्ये अनेकांची गाणी झाली.या कार्यक्रमांना

मित्रमंडळींप्रमाणेच घरचे लोकही साहजिकच असत. माझ्या सासूबाईंनाही गाण्याची

खूपआवड. त्या बाबतीत माझी आई म्हणजे दुसरं टोकं होतं. मुलांना झोपवण्यासाठी

यापेक्षा अधिक गाण्यांची मानवजातीला गरजच नाही, असे तिचे मत होते असावे.

आम्ही गाणं शिकावं असं तिला वाटे. आपला जावई गाणारा आहे याचाही तिला

अभिमान होता; पण याचा अर्थ तिला संगीताच्या क्षेत्रात काही रस होता असा मात्र

मुळीच नव्हे. याउलट, माझ्या सासूबाईना दिवसभर रेडिओ लावून बसा म्हटले तरी

ती शिक्षा वाटत नाही. त्यांना गाण्यातले डावेउजवे काही कळते अशातला भाग नाही,

पण गाणे ऐकायला मनापासून आवडते हे मात्र खरे. तर सांताक्रूझच्या घरी त्या पाच

वर्शांत झालेल्या प्रत्येक गाण्याला त्या हजर असतच. मग मध्यंतरात कॉफी होई. ती

तयार करून कप भरणे वगेरे सर्व मी केलेल असे. पण ट्रे भरभरून पाहुण्यांना कॉफी

नेऊन देणे, रिकामे कप गोळा करून सेपाकघरात आणून ठेवणे वगेरे कामांना

मित्रमंडळीपेकी काही स्वयंसेवक पुढे येत. असल्या कामात भाई स्वतः, त्याचे भाऊ

अगर त्याच्या आई कधीही स्वतःहून भाग घ्यायला येत नसत. पण माझ्या सासूबाईंना

कुणीतरी कॉफी नेऊन दिली, की त्या मलाही चारचारदा ""तूही घे ना ग"" असा

आग्रह करत. आपण घरातली माणसे, पाहुण्यांना आधी द्यावे, मग आपण घ्यावे,

असा विचार भाईप्रणाणेच त्यांनाही चुकूनही सुचत नसे .""आधी तू घे बघू. मग संपेल."" असे

मनापासून सांगत. कारण मीही त्यांची होते, इतर पाहुणे मंडळीसारखी परकी नव्हते.



हे `आपलं' आणि `परकं' ह्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात.

माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या तर अगदी दोन टोकांच्या होत्या. रक्ताचे

नाते हे माझी आई अपरिहार्यपणे मानतच आली. पण अगदी मनाच्या गाभ्यात तिला

लेकीसुना काय आणि शोजारपाजारच्या बायकांपासून कामवाल्यांपर्यंत इतर जणी काय,

एका विशिष्ट पातळीवर सगळ्या सारख्याच होत्या. देवधर्म,सोवळेओवळे,

रीतिरिवाज, नीति-अनीतीच्या कल्पना वगेरे बाबतींतल्या आईच्या निष्ठा पाळणाऱ्या

त्या तिला स्वकीय वाटत आणि धुडकावणाऱ्या त्या परक्या वाटत. अशा अनेक

बाबतीतं माझ्यासारख्या मुलीला तिने जन्माला घातले यात पूर्वजन्मीचे तिचे



पान नं. 26



कोणतेतरी पाप गुंतले असावे अशी तिची भावना असावी. तसे तिने कधी बोलून

दाखवले नाही. पण माझ्या अशा एखाद्या कृतीनंतर तिला जे दुःख आणि वेदना होत

त्यावरून मला हे जाणवे. पण या बाबतीत मीही तिच्याइतकी हट्टी होते. तिला दुःख

होते म्हणून आपण पडते घ्यावे, असे तिच्या हयातील मला कधीही वाटले नाही.





आम्ही परदेशप्रवासाला निघालो तर आमचा प्रवास सुखरूप पार पडो म्हणून ती

सत्यनारायण बोलून गेली. आम्ही परत आल्यावर जोडप्याने बसून तो पुजावा अशी

तिची इच्छा. कारण तो नवस बोलताना म्हणे तिची धारणा तशीच होती. भाईचाही

असल्या गोष्टीवर विश्वास नाही. पण तिची चेष्टा करत का होईना, भाई पूजेला

बसला आणि कथा सांगणाऱ्या भटजींचीही अधूनमधून खिल्ली उडवत त्याने ती पूजा

यथासांग पार पाडली. मी मात्र त्याच्याबरोबर बसले नाही. माझा असल्या गोष्टींवर

विश्वास नाही हे माहीत असताना आईने या नवसात मुळात मला गोवावेच कां ?

आणि विश्वास नसताना केलेली असली खोटी पूजा तिच्या त्या देवाला तरी मानवेल

की ? तरीही आईला सत्यनारायण करायचाच असेल आणि भाई त्याला तयार

असेल तर त्याने माझ्याऐवजी सुपारी लावून पूजेला बसावे असे मी सांगितले; आणि

शेवटी ती पूजा तशीच पार पडली. मग सेपाक करण्यात, इतर कामांत,,वगेरे मी तिला

सर्व मदत केली; पण ही मदत आईला होती. त्या देवाशी या गोष्टींचा काहीही संबंध

नव्हता. खरे तर आईच्या दृष्टीने घरातला तो एक आनंदाचा प्रसंग. मंगल कार्य. पण

त्या दिवशी तिच्या डोळ्याला मधूनमधून पाणी येत होते. माझ्यावर मात्र त्याचा

काडीचाही परिणाम होत नव्हता. ती वाकली होती; मी ताठ होते.



पुढे एकदा बऱ्याच वर्षानंतर त्या प्रसंगाची कशावरून तरी आठवण निघाली आणि

माझ्या त्या हटटी स्वभावाचा निषेध करताना ""कुठे फेडणार आहात ही पापं कोण

जाणे !"" असे ती पटकन बोलून गेली आणि तिच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आले.

त्यावर मी म्हटले.



""मी केवळ पूजेला बसले नाही म्हणून जर मी तुला पापी वाटत होते, तर मग

प्रसादाच्या शिऱ्यापासून कितीतरी सेपाकात वगेरे मी त्या दिवशी तुला मदत केली ती

माझ्या हातची कशी चालली ग ?""



तीही माझीच आई. म्हणाली,""कुठे चालली ?मी तर तुला कशालाही हात लावू दिला

नसता. इतके सत्यनारायण मी करते तेव्हा तू थोडीच असतेच मदतीला ? पण विचार केला,

त्या देवाला डोळे आहेत. नेवेद्याचा सेपाक.तेवढं तरी पुण्य तुझ्या हातून घडू दे.""



मी कपाळावर हात मारून घेतला. त्या दिवशी अशा रितीने माझ्या पदरी पडलेले

पुण्य पुरेसे नव्हते म्हणून तिने मला सद्बुध्दी लाभावी एवढयासाठी म्हणे आणखी एक

सत्यनारायण माहू पूजला होता.



आम्ही- विशेषतः मी- जाणूनबुजून स्वतःचं असं अकल्यमआम करते आणि त्याची

भरपाई करण्यासाठी तिला असे आता या वयात न पेलणारे कष्ट पडतात. माझ्या



पान नं. 27

पोटी तिच्याबद्दल दयामायाच नाही असे पुढेपुढे तिचे ठाम मत बनत गेले होते

असणार. पण हा गेरसमज दूर करायचा उपाय तरी कोमता ? तिच्या समाधानासाठी

मी देवपूजा करणे ? म्हणजे माझा स्वासच मती मागत होती. आई आणि मुलगी हे

आतडयाचे नाते आम्हां दोघींत निश्चितच होते. पण देवाने आम्हां दोघींची स्थाने ही

अशी दोन ध्रुवांवर रोवून ते आतडे तुटेपर्यंत ताणले होते खरे.



माझ्या सासूबाई अश्रध्द मुळीच नव्हत्या. पण त्यांच्या श्रध्दा,देव, धर्म त्यांच्यापुरते

सगळे काही होते. ते त्यांनी कुणावरही कधी असे लादले नाही. खावे,प्यावे,द्यावे,

घ्यावे, चार घटका आयुष्य लाभलेय तर ते आनदात घालवावे, अशा वृत्तीचा हा भाग

होता. अस्तित्ववादी विचारसरणी वगेरेतून निर्माण झालेली ही तात्त्विक भूमिका

नव्हती; तो रक्तदोष( रक्तगुण म्हणू या हवे तर) होता. त्यामुळे लेकी-सुनांशी आणि

मुलांनातवंडांशी त्यांचे खटके उडत ते ऐहिक पातळीवरच्या त्यांच्या अपेक्षाभंगातून

किंवा त्यांच्या मागण्या आणि आमच्याकडून होणारा पुरवठा यांतल्या तफावतीतून

उद्भवत. सुनाकाय, जावई काय, त्यांच्या नातयात आलेली सगळी माणसे ही त्यांनी

त्यांची मानली. मग ती कशीही वागली तरी त्यांना चालत. मी ऋण काढून सण केला

असता तरीही त्यांना विषाद वाटला नसता. फक्त त्या सणात त्यांनाही प्रेमाने

सहभागी करून घ्यावे, इतकेच, आपल्या इतरांपासूनच्या अपेक्षा या अशा छोटया

असोत की मोठया असोत, तपशिलावर बेतलेल्या असोत की त्त्वावर, त्या पुऱ्या

होण्यात नाना तऱ्हेच्या अडचणी असू शकतात आणि हे लक्षात न आल्यानेच आपण

दुःखी होतो. माझ्या सासऱ्यांच्या अकाली निधनामुळे बराच काळ त्यांना आर्थिक

ओढाताण सहन करावी लागली हे खरे. पण परिस्थिती सुधारली तरीही त्यांना

मनाजोगे सुख कधीच लाभले नाही. शत्रूच्याही वाटयाला येऊ नयेत इतके आप्त-

स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या वाटयाला आले. पण निवृत्ती मात्र त्यांच्यापासून सदेव

दूरच राहिली. त्यामुळे बाकी सर्व काही असूनही दुर्देवाने त्या असुखीच राहिल्या. कुणी

कितीही दिले, त्यांना बरे वाटावे, खूष करावे म्हणून कितीही धडपडले, तरी त्यातून

त्यांना मिळणारे समाधान हे फक्त क्षणिक असे. वृत्तीतच कुठेतरी अतृप्तीचा आणि

तक्रारीचा सूर घुमताना ऐकू येत असे. अजूनही येतो.



म्हणजे मग मृत्यू काय करतो ? त्याचा प्रभाव, त्याची टांगती तलवार वगेरेला खरेच

काही अर्थ आहे का ? की त्याच्या बाबतीतही `अतिपरिचयात् अवज्ञा' हेच तत्त्व लागू

पडते ? मला वाटते, अनेकांच्या बाबतींत, त्या क्षणी त्याचा घाव जाणवतो, इतकेच. बाकी

इतकी लौकर बरी होणारी एवढी मोठी जखम दुसरी कोणतीही नसेल. स्वतःच्या

स्वभावातून निर्माण होणारे सव मात्र संवेदनाशील माणसांना जन्मभर टोचचत राहतात.



मी सासूबाईंशीबी अधूनमधून वाद घालत आले. त्यांच्या अधिक्षेप न करता त्यांची

चेष्टा करत आले. पण आमचे भांडण असे कधी झाल्याचे आठवत नाही.



पारल्याच्या आमच्या त्या छोटयाशा बेठका घराला वरती एकच खोली होतीय ती



पान नं. 28



भाईच्या वडिलांनी खास त्याच्यासाठीच बांधली होती. आमच्या लग्नानंतर अर्थातच

तीच आमची खोली झाली. आणचे कुणीही पाहुणे,दोस्तमंडळी आली तरी ती मग

आमच्या खोलीतच आमच्याबरोबर राहत. घरच्या इतरांना परकी अशी नाना

जोग, जे. पी. नाईक, भय्या वगेरे मंडळी मुक्कामाला आली तरी ती त्या वरच्या

खोलीत आमच्याबरोबर असत. अशा एखाद्या वेळी भाई कामानिमित्त बाहेरगावी

गेलेला असला आणि मी एकटीच असले तरी माझ्या सासूबाईंनी या पाहुण्यांच्या

वास्तव्याला कधी हरकत घेतली नाही. माणसाच्या सभ्यतेवर, सुसंस्कृतपणावर त्यांचा

विश्वास होता. त्यांच्या तुलनेने माझी आई या बाबतीत फार कर्मठ, सोवळ्या

विचारांची होती. असे प्रसंगक्वचित एकदोनदाच आले असतील, पण त्या वेळी

माझ्या सासूबाईंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला फार मोलाचा होता. या

बाबतीत आईपेक्षा त्यांचे पारडे जड होते. आणि ही गोष्ट मी त्यांच्या माझ्या

संबंधातल्या कोणत्याही संदर्भात विसरूच शकत नाही. त्यांच्या वागण्यातून आम्हां

सगळ्यांना अनेकदा मनस्ताप होत आला आहे. त्या त्या वेळी त्यांचा फार रागही

येतो. पण मग मला दयाही येतो. स्वतःपलीकडे दुसऱ्या कुणावर तरी जीव तोडून प्रेम

करण्यातला आनंद त्यांच्या ललाटी लिहिलाच गेला नाही, त्यामुळे जमेची बाजू खूप

असूनही त्यांची ओटी फारशी कधी भरली नाही खरी.



गेल्या काही वर्षांपासून माझ्या अंतर्मनात सुरू असलेली एक प्रक्रिया आप्पा-आीच्या

मृत्यूनंतर जरा तीव्र झाली आहे. मनाच्या खेळात मृत्यूच्या विचाराभोवती पिंगा घालणं

जरा जास्तच व्हायला लागलंय. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हाती नाहीत. पण

या दोहोंना जोडणारा प्रवास तरी ? तोही आपल्या हाती नाही ? अनुकूल किंवा

प्रतिकूल परिस्थितीची ताकद आणि आपले आईबाप आणि पूर्वज यांच्या वारशातून

लाभलेल्या पिंडाची ताकद या दोन ताकदींची गुंतागुंत. त्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीतून

निर्माण होणारी सुखदुःखे सगळेच परस्वाधीन. त्यातला अहंकारी `मी' हा तरी मुळात

मनाजोगा असावा ! तो `मी' म्हणजेच पिंड ना ? आई-बाप, पूर्वज या साखळीतले काही

दुवे आणि त्यांत आपल्या निर्मितीमुळे पडलेला आणखी एक वळसा. हे सगळं मोठं

विचित्रच आहे.



मी मृत्यूचा विचार करते,म्हणजे नक्की काय करते ? माझ्या डोळ्यांपुढे दोनतीन

प्रसंग पटकन येऊन जातात. मी खूप लहान होते, धामापूरला आजीकडे होते.

पावसाळ्याचे दिवस. खूप रान वाढलेले. त्या काळी त्या भागात संडास ही गोष्टच

नव्हती.

पान नं. 29 शब्द :-1597



शेतात कुठेतरी जायचं. मी जाऊन बराच वेळ झाला म्हणून आजी शोधायला

आली. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून ती त्या दिशेला आली.

माझ्यासमोर जवळच काही अंतरावर एक नाग वेटोळं घालून, फणा काढून ऐकत (?)

होता, आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होते.- त्याला काहीतरी सांगत होते. मला ही

सवयच होती. कावळा,चिमणी, मुंग्या, तांदळातल्या किडी, हालती पाने-फुले, झाडे

यांच्याशी बोलताना पाहून""अशांनी एक दिवशी वेड लागेल !""असे आईही

म्हणायची. धामापूरच्या त्या वेळच्या आमच्या घरात भिंतीवर एक खूप मोठठे नागोबाचे

चित्र रंगवलेले असे. दरवर्षी नागपंचीमीच्या आधी ती भिंत सारवून नवा नागोबा

रंगवला जाई. आणि नागपंचमीला त्याची यथासांग पूजा होई. ती एक संरक्षक देवताच

मानली जाई. खरा नागदेखील कधीमधी दिसे. पण तरी त्याला मारायचे नसे. आजी

त्याला राखणदार म्हणे. मी ज्याच्याशी बोलत होते तो इतरत्र कुठेही दिसला असता

तरी आजीने हात जोडून त्याला ""राखणदारा,भलं कर बाबा सर्वांच"" असेच म्हटले

असते. पण तो रक्षणकर्ता असला तरी शेवटी विषारी जनावरच ते. त्याच्यापासून

किती दूर राहायचे याची अक्कल माणसाला हवी. त्या वयात मला ती निश्चितच

नव्हती. भिंतीवरचा नाग तर चोवीस तास घरातच असे. त्याला मी हातदेखील लावत

असे. त्याच्या फणेवर गंध-पुष्पे लावली जात. हात जोडून नवस बोलले जात. त्यामुळे

असेल कदाचित, पण या खऱ्या नागाचे मला जरादेखील भय वाटले नव्हते. आणि

म्हणूनच मी त्याच्याशी बोलत बसले होते असेन.त्याला संरक्षक देवता मानणारी

आजी मात्र भलतीच घाबरली आणि मला मागच्या मागे बकोटीला धरून उचलून

धावत घरी आली. मग मला देवाच्या पायावर घालणे, भिंतीवरच्या नागोबापुढे

स्वतःचे आणि माझे नाक,डोके घासणे वगेरे बरेच काही आजीने केले. मला न

समजणारे बरेच समजावूनही सांगितले. त्याचले काहीच आता आठवत नाही. पण

मृत्यूचा विचार आला की हा प्रसंग न चुकता आठवतो.



दुसरा प्रसंग खूप मोठया वयातला आहे. आम्ही दिल्लीला होतो. साठ सालची

गोष्ट असावी. संध्याकाळ झाली होती. भाई ऑफिसमधून घरी येऊन टेबलावर

`अपूर्वाई' या प्रवासवर्णनातला पुढला भाग लिहित होता आणि मी समोरच बसून

पूर्वीच्या भागाची `किर्लोस्कर' ला पाठवण्यासाठी प्रेसकॉपी करत होते. आभाळ भरून

आले होते. खोलीत दिवा, पंखा लावून आमचे काम चालले होते. अचानक गडगडाट

सुरू झाला. ती मेघगर्जना तर होतीच, पण पृथ्वीच्या पोटातूनही काही विचित्र आवाज

येताहेत असा भास झाला आणि सगळं थरथरायला लागलं. आम्ही दोघंही

एकमेकांकडे पाहून ""धरणीकंप! असे म्हणत जागचे उठलो. आम्ही वरच्या

मजल्यावर राहत होतो. पंडारा रोडला, मधे मोठे मोकळे मेदान आणि भोवताली ही

सरकारी घरे होती. धरणीकंप झाला की इमारती कोसळतात, तेव्हा घर सोडून शक्य

तितक्या लौकर उघडया जागी जाणे आवश्यक असते, हे आम्हां दोघांनाही माहीत

होते. भाई धावत खाली उतरून मेदानात गेला. जाता जाता त्याने आमच्याकडे



पान नं. 30



कामाला असलेला पोरगा भेदरून रडायला लागला होता त्यालाही खाली नेले.

भोवतालच्या सर्व घरांतली बहुतेक सगळी माणसे धावत मेदानात गोळा झाली होती.

मी मात्र प्रथम दिवा आणि पंखा बंद केला. टेबलावरचे कागद उडू नयेत म्हणून

त्यावर पेपरवेट ठेवले. भाईने पेन उघडेच टाकले होते ते नीट बंद करून खणात

टाकले. खाली उतरताना घराला कुलूप घातले. मी खाली जाऊन पोचेपर्यंत धरणीकंप

कधीच थांबला होता. त्यानंतर पुढले काही दिवस माझी ही वर्तणूक हा आमच्या

मित्रमंडळीत चेष्टेचा विषय होता. या गोष्टीलाही आता कितीतरी वर्षे झाली. पण मृत्यूचा

विचार म्हटला की हाही प्रसंग न चुकता डोळ्यांपुढे जसाच्या तसा लख्ख उभा राहतो.



तिसरा प्रसंग मात्र अगदी याच्या उलट आहे. मला वाटते, शेहेचाळीस सालच्या

ऑक्टोबरातलीच गोष्ट असावी. दिल्लीजवळ ओखल्याला डॉ. झाकीर हुसेन यांची

जामिया मिल्लिया इस्लामिया ही संस्था. भय्या (मीर असगर अली )हा तिथला विद्यार्थी.

त्या संस्थेचा रौप्यमहोत्सव होता. त्या निमित्ताने प्रथम ओखल्याला, मग मीरतला

कॉग्रेसचे सेशन होणार होते तिथे, आणि परतताना उत्तर हिंदुस्थानातली प्रसिध्द स्थळे

पाहायला, असा दौरा आखून भय्याबरोबर भाई आणि मी जायचे नक्की केले होते.

आयत्या वेळी भाईचा बेत रजा न मिळाल्याने रद्द झाला आणि भय्या आणि मी

दोघेच दिल्लीला आणि तिथून ओखल्याला गेलो. माझी उतरायची व्यवस्था प्रो. आगा

अश्रफ यांच्या घरी होती. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असा सुंदर सभारंभ पहिल्या

दिवशी पार पडला. गांधी,नेहरू,आझाद,जिना वल्लभभाई, राजाजी, सरोजिनी

नायडू-- नाव घेण्यासारखा त्या काळचा देशातला प्रत्येक राजकीय पुढारी त्या प्रचंड

स्टेजवर बसला होता. अनेकांची भाषणे झाली. सभारंभानंतर जवळपासचे म्हणजे

दिल्लीहून वगेरे आलेले पाहुणे परत गेले. जेवणे, गप्पा होऊन आम्ही झोपलो.

मध्यरात्री प्रचंड आरडाओरडा ऐकू आला आणि मी जागी झाले. घरातले इतरही

लोक उठले होते. फाळणीपूर्वीचा तो काळ. ठिकठिकाणी मधूनमधून जातीय दंगे

उसळत होते. त्या रात्री ओखल्याच्या शेजारच्या गावातून हिंदुंचा प्रचंड जमाव हातांत

पलिते घेऊन मुसलमानांचे हे विद्यापीठ जाळायला हल्ला करून येत होता.`हर हर

महादेव' च्या घोषणा ऐकू येत होत्या. प्रो. अश्रफ माझ्याजवळ आले आणि म्हणाले,

""घाबरू नको. काही होणार नाही. ते लोक खूप दूर आहेत. पोलिसांची गस्त चालू आहे.""



हे जरी खरं होतं तरी मी भेदरून थरथरत होते. हा प्रसंग आठवला म्हणजे न

चुकता मला माझी भयंकर लाज वाटते. मी मृत्यूला घाबरले म्हणून नव्हे. ती प्रतिक्रिया

नेसर्गिकच होती. त्यात कमीपणा मानायचे काय कारण ! पण मला शरम वाटते ती

त्या क्षणी माझ्या डोक्यात क्षणभर का होईना, पण येऊन गेलेल्या एका विचाराची.

मला वाचले, मुसलमानांना मारायला आलेले हे हिंदू. मी त्यांच्यातलीच आहे, हिंदू

आहे हे त्यांना कळणार नाही आणि मला निष्कारण मरावे लागणार.



`मी त्यांच्यातलीच आहे' म्हणजे काय ? मी धर्म मानत होते का ? त्या काळी

भय्याइतका जवळचा मला दुसरा कुणीही मित्र नव्हता. घरदार, नातीगोती, कोणतीही



पान नं. 31



बंधने न मानणारी मी, सुंदर जीवनमूल्यांना जिवापाड जपणारी मी, क्षणभर का

होईना पण त्या अविचारी जमावाला `आपला मानते ? प्रसंग आलाच असता तर

प्रो. आगा अश्रफ आणि त्यांच्या घरातल्या इतरांनीही त्यांच्या घरच्या माझ्यासारख्या

पाहुणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा केली असती, हे त्या क्षणीही मला

कळत होते. त्यांचा तो धर्मच होता. त्या क्षणी त्या मुसलमानांतला माणूस जागा झाला

होता आणि माझ्यातला हिंदू डोकं वर काढू पाहत होता. हल्ला करून येणाऱ्यांचा लोंढा

परतून सगळे स्थिरस्थावर होण्यात अर्धाएक तास तरी गेला असेल. तो महाभयंकर

विचाराचा क्षण कधीच मागे गेला होता. प्रत्यक्ष प्रसंग आलाच असता तर स्वतःवर सूड

काढण्यासाठी मी कदाचित सर्वांत अधिक धेर्य आणि माणुसकी दाखवली असती. इतर

कुणाला काहीही कळले नाही; पण मला मात्र माझं एक वेगळंच दर्शन झालं होतं.



या वृत्ती एरवी कुठे असतात ? प्रसंगी केवढी उसळी मारून ज्वालामुखीतून

विध्वसंक लाव्हा अचानक उफाळून यावा तशा येतात ! या एवढयाशा जीवात असं

काय काय एकवटलेलं असतं आणि संस्कार करून न घेता स्वतंत्र अस्तित्व बाळगत

असतं ? आपल्यालाच आपण अद्याप ओळखलेले नाही.



भीती ही शारीरिक असते की मानसिक ? माझ्या असे लक्षात आलेय, की इतरांच्या

दृष्टीने अत्यंत क्षुल्लक वाटणाऱ्या काही प्रसंगी मी शारीरिक आणि मानसिक दोन्ही

दृष्टींनी अगदी अळुमाळू होऊन भेदरून लागते आणि जिथे सर्वसामान्यांचे

धेर्य खचते तिथे मी अगदी सहजतेने वावरू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर

अगदी जवळच्या व्यक्तीचादेखील आजार, अगर मृत्यू, अपघात, ऑपरेशन, वेडा,

राजकीय लढयातील दंडुकेशाही किंवा गोळीबार, आग, युध्द, असल्या गोष्टींचे अगर

नेसर्गिक आपत्तींचे मला कधीच भय वाटलेले नाही. पण दारू पिऊन झिंगलेला माणूस,

चोरी, मारामारी, दंगे, अगदी चित्रपटातले बॉक्सिंग किंवा कुस्तीचे दृश्य, असल्या गोष्टी

मी पाहू शकत नाही. मला कसेतरीच व्हायला लागते. मळमळायला लागले, थरथरायला

लागते, आपल्याला भोवळ येईलसे वाटू लागते. मी क्राइम-स्टोरीज वाचू शकते, म्हणजे

वाचताना ती दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतातच ना ? पण त्या वेळी असे काही होत नाही.

प्रत्यक्षात मात्र अशा वेळी माझी मी राहतच नाही. म्हणजे निश्चित काय ?

मला वाटते, माझ्यातले जिवाला अतिशय घाबरणारे, दुबळे, नेसर्गिक अस्तित्व

अशा वेळी जागृत होऊन माझ्या संस्कारित अस्तित्वावर मात करते. म्हणजेच मला

वाटते माणसाला दोन पिंड असावेत. एक आई-बाप आणि पूर्वज यांच्यापासून

लाभलेला आणि पुढे आपल्या वंशजांचे आपण पूर्वजच होणार या अर्थाने आपल्या

स्वतःच्या आयुष्यातल्या नव्या अनुभवाने थोडा बदलेला असा संस्कारित पिंड; आणि

दुसरा आदिमायेकडून (इथे मूळ शब्द `आदिमाया' नसून `आदिमाय' असा असायला

हवा ) लाभलेला, कोणतीही संस्कार करून घ्यायला राजी नसलेला मुळ पिंड. वाटले तर

असे म्हणून या, की भूगोलावर आधारलेले जिवंत शरीर म्हणजे हा मूळ पिंड आणि



पान नं. 32



इतिहासावर आधारलेले मन हा संकरित पिंड. म्हणजे मग हे द्वेत झाले. आजचे

वेद्यकशास्त्र हे शरीर आणि मन यांचे अद्वेत मानण्याकडे झुकत असताना हा

द्वेतविचार योग्य आहे का ? अचूक आहे का ? मलाही शंका आहे, पण त्याबरोबरच

हा विचारही आहेच.



आता वय उताराला लागलंय. स्वतःच्या प्रकृतीची मी कधीच काळजी केलेली

नाही. तेव्हा मला काय वाटतं याची काळजी न करता आता प्रकृतीने मला इंगा

दाखवायचं ठरवलं तर मला तक्रार करण्याचा अधिकार नाही. आपल्याला शेवटचा

आजार कधी येईल आणि कोणत्या स्वरूपाचा येईल हे जरी अनिश्चित असलं आणि

आपल्या हाती नसलं तरी त्या वेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचं आपल्याशी जे

वर्तन राहील ते बरंचसं आपलं आयुष्यभर त्यांच्याशी जे वर्तन राहिलं त्यावरच

अवलंबून असणार.त्यामुळे या बाबतीत कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवण्याचा

मला अधिकार नाही. मी मला वाटले तसेच वागत आले, इतरांना काय वाटेल याचा

विचार कधीच केला नाही. म्हणजे मी माझ्यासाठीच जगले, इतरांसाठी नाही. मग मी

मरताना इतरांनी स्वतःच्या आयुष्यातला काही वेळ आणि काही शक्ती माझ्यासाठी कां

खर्च करावी ?



म्हणजे मग हा प्रश्न सोडवायचा एकमेव उपाय म्हणजे आत्महत्या का ?



स्वतःच्या विचारानेच जगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तींनी खरं तर एकटं राहावं,

एकटं जगावं, एकटं मरावं. हा विचार आला की मला न चुकता फक्त माझ्या आजीची

आठवण येते. तिचा- माझा सहवास माझ्या लहानपणी घडला तेवढाच. पण आम्हां दोघींचा

एकमेकींवर इतका जीव होती, की आयुष्यातला अत्यंत सुखाचा काळ कुठला या प्रश्नाला,

लहानपणी धामापूरला होते तो, किंवा धामापूरच्या आजीच्या सहवासात गेला तो, इतकेच

उत्तर मी देऊ शकेन. या आजीचे मला दिसलेले रूप फार सुखद आहे आणि तिच्या

पूर्वायुष्याची वाडवडिलांकडून कानावर आलेली कहाणी विलक्षण आहे.



तसे आम्हां दोघींचे रक्ताचे नात नव्हते. ती माझी सावत्र आजी. आम्ही ठाकूर

धामापूरचे. माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते. त्यांच्या

घोडयाच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसे

ते रूबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार.

त्या मोठया कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे

मालवणपासून बारा मेलांवर आहे. मालवणहून नेहरूपाराला नदीपाशी येणारा रस्ता

धामापूरला जातो.